किंकर सेन्सेई

आयुष्यात अनेक लोकांशी आपल्या ओळखी होतात, भेटीगाठी होतात. त्यापैकी काही खास व्यक्तींशी झालेली भेट ही आपल्या मागल्या जन्माच्या पुण्यसंचितामुळेच झाल्याची जाणीव होते. तर काही जणांशी आपली भेट होणे किंबहुना ‘गाठ’ पडणे हा दैवी संकेत वा ईश्वरी संकेत असतो. त्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यावर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. अंधारात चाचपडताना अचानक त्यांच्या रूपाने एक प्रकाशाची तिरीप येते आणि अंधार विरून आयुष्य एका वेगळ्याच प्रकारे दृष्टिगोचर होते. माझ्या आयुष्यात किंकर सेन्सेईंची (सेन्सेई म्हणजे शिक्षक) भेट होणे हा एक नक्कीच दैवी संकेत होता.

मी जपानच्या पहिल्या व्यावसायिक दौर्‍यानंतर परत आलो ते जपानी शिकण्याची खूणगाठ मनाशी बांधूनच. पुणे विद्यापीठात जपानी भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेणे हे त्यावर्षीची प्रवेशप्रक्रियेची तारीख उलटून गेल्यामुळे जमले नाही. त्यादरम्यान सिंबायोसिसमध्ये जपानी भाषेच्या एका कोर्सची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे असे कळले आणि प्रवेश घेतला. ऑफिसमध्ये मित्रांना त्याची माहिती देत होतो तोच एक अनोळखी मुलगा ते ऐकुन पुढे आला (मनोहर जोशी, जो पुढे माझा चांगला मित्र झाला) आणि माझ्याशी जपानीत बोलू लागला, मला ओशाळल्यासारखे झाले. मी त्याला म्हणालो, ‘अरे आजच प्रवेश घेतलाय. मला काही कळत नाहीयेय तू काय म्हणतो आहेस ते’. त्यानंतर त्याने मला तो जपानी व्याकरणाचे मराठी पुस्तक वाचून अभ्यास करतो आहे असे सांगितले. मी खुर्चीतून पडलोच ते ऐकून, जपानी व्याकरणाचे मराठी पुस्तक? दुसर्‍या दिवशी तो ते पुस्तक घेऊन आला. माझ्यासाठी ती अलीबाबाची गुहाच होती. पुस्तक दाखवून मला त्याने तो त्या लेखकाकडे जपानी भाषेच्या शिकवणीकरिता जातो असे जेव्हा मला सांगितले तेव्हा मला काय बोलावे तेच कळेना. अक्षरशः आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे मला झाले. मग त्याने त्या पुस्तकाचे लेखक किंकर सेन्सेई आहेत आणि ते पुणे विद्यापीठात शिकवतात हे सांगितले. त्याच्याकडून मी किंकर सेन्सेईंचा नंबर घेतला आणि त्यांना फोन करायचे ठरवले. त्या दरम्यान माझा सिंबायोसिसमधला कोर्स पूर्ण होत आला होता. तो कोर्स अगदीच मूलभूत होता आणि मला माझ्या जपानी भाषा शिकण्याच्या ‘बकासुरी भुकेपुढे’ अगदीच किरकोळ वाटत होता.

किंकर सेन्सेईंना फोन करून मी त्यांना शनिवारी किंवा रविवारी भेटू शकतो का असे विचारले त्यावर फोनवरून ते म्हणाले, ‘शनिवारी भेटू, विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये येऊन मला भेट.’ बरं म्हणून फोन ठेवला खरा पण एक भला थोरला प्रश्न डोक्यात फेर धरून नाचू लागला, बॉटनी डिपार्टमेंटचा आणि जपानी भाषेचा काय संबंध? त्यांनी मला बॉटनी डिपार्टमेंटमध्ये भेटायला का बोलावले असेल? त्या प्रश्नांबरोबरच एक दडपणही होते, एका जपानी व्याकरणाच्या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याचे. शनिवारी विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये त्यांना दिलेल्या वेळेच्या आधीच जाऊन थडकलो. तिथल्या कचेरीत चौकशी केल्यावर मला बाहेरच्या दालनात वाट बघायला सांगितले. मी तिथे लावलेली बॉटनीच्या संशोधकांची चित्रे बघण्यात मशगुल झालो होतो तोच कानावर एक एकदम मृदू आवाज पडला, ‘ब्रिजेश?’ मागे वळून पाहिले तर पन्नाशीची प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची एक व्यक्ती माझ्याकडे हसर्‍या चेहेर्‍याने बघत होती. हीच माझी आणि किंकर सेन्सेईंची पहिली भेट!

ते मला बाहेर असलेल्या बागेत घेऊन गेले. बाहेर आल्यावर त्यांनी शांतपणे एक सिगारेट काढून शिलगावली आणि दोन बोटांच्या बेचक्यांत धरून मस्त झुरके घेत माझ्याबरोबर गप्पा मारू लागले. बोलण्याची पद्धत एकदम एका मित्राशी बोलल्यासारखी, एक आपुलकी आणि ओलावा असलेली. माझे सारे दडपण गळून पडले. मीही मग जरा धीट होऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारू लागलो. त्यांनी गप्पांच्या ओघात माझ्याकडून माझी जपानी भाषेची आतापर्यंत शिकलेली माहिती काढून घेतली व म्हणाले, ‘ब्रिजेश, हे बघ माझ्या क्लासमध्ये रानडेचे विद्यार्थी सांक्यु (जपानी परीक्षेची एक पायरी) साठी येतील, त्यांचा पुणे विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स पूर्णं झालेला असेल. त्यांना कमीत कमी १०० एक कांजी येत असतील, तुला तर एकही कांजी येत नाही. ते सर्व विद्यार्थी कॉलेजातली मुले असतील, तू एक नोकरीपेशा माणूस, तुला त्यांच्याबरोबर बसून कमीपणा वाटेल. कसे करायचे?’ मी काकुळतीला येऊन त्यांना म्हणालो, ‘तुम्हीच मार्ग सांगा’. ते म्हणाले ‘माझ्या पुस्तकातले १३ धडे क्लासला येण्याच्याआधी पूर्ण करावे लागतील, ते करून आलास तर तुझा निभाव लागेल. बघ ठरव तू काय करायचे ते.’ असे म्हणून माझा निरोप घेऊन ते निघून गेले. मी घरी येऊन ते धडे संपवण्याचा धडाका लावला. साधारण २-३ आठवड्यांनंतर मी त्यांच्या कमला नेहरू पार्कजवळच्या क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला गेलो. ते भेटल्यावर मी त्यांच्याशी मोडक्यातोडक्या जपानीत सुरु झालो आणि त्यांना, ‘तुम्हाला बॉटनी डिपार्टमेंटमध्ये भेटलो होतो, प्रवेश घेण्यासाठी आलो आहे’ असे सांगितले. त्यांच्या चेहेर्‍यावर आश्चर्यमिश्रित भाव होता. त्यांनी मला क्लासचे टाईमटेबल सांगून पुढच्या सोमवारी क्लास सुरू होतो आहे असे सांगितले.

सोमवारपासून क्लास चालू झाला आणि किंकर सेन्सेई ही काय चीज आहे ते कळू लागले. हा माणूस हाडाचा शिक्षक. चेहेर्‍यावर कायम हास्य. त्यांच्याशी जेवढा काळ प्रत्यक्ष संपर्क होता त्या काळात त्यांच्या चेहेर्‍यावर कधीही एक आठी बघितली नाही की रागावलेले बघितले नाही. जपानी भाषेबद्दल अतिप्रचंड प्रेम, आदर आणि आपुलकी. त्या भाषेवरच्या प्रेमामुळेच त्यांना इतके सहज सुंदर शिकवता येत असावे. कांजी शिकवताना त्या कांजीतले सौंदर्य शोधायला त्यांनी शिकवले. कांजीमधले मूलभूत आकार ज्यांना ‘बुशु’ म्हणतात ते समजून घेऊन कांजी कशी अभ्यासावी ते त्यांनी शिकवले. एकदा एका रविवारी ते सर्वांसाठी त्यांच्याकडचे ब्रश घेऊन क्लासमध्ये आले आणि वर्तमानपत्र, ब्रश आणि पाणी वापरून कांजी काढायचा सराव कसा करायचा हे प्रात्यक्षिकासहित शिकवले. मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षर असलेले सेन्सेई जपानी कांजी खडूच्या साहाय्याने ज्या नजाकतीने फळ्यावर काढीत ते बघताना असे वाटे की जणू काही एक चित्रकार कुंचल्याच्या साहाय्याने एका कॅनव्हासवर एखादे चित्र चितारतोय.

जपानी उच्चारांबाबत ते भयंकर कडक आहेत. कोणी चुकीचा उच्चार केला की, ‘श्शी, काय घाणेरडा उच्चार!’ अशी त्या बोलणार्‍याची बोळवण करायचे. त्यांचे त्यावरचे एक उदाहरण ठरलेले असायचे. मी धनकवडीला राहतो हे वाक्य ‘मी धनक वडीलारा हतो’ असे तुटकपणे बोलल्यावर कसे वाटते ते एकदम साभिनय करून दाखवायचे. त्या साभिनय समजावून सांगण्यात इतका प्रामाणिकपणा असायचा की प्रत्येकजण आपल्याकडून पुन्हा अशी उच्चारांच्या चुका होऊ नये असे मनाशी ठरवून टाकायचा. त्यांच्या उच्चारांच्या बाबतीतल्या उच्चपणाच्या एका घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे. एकदा क्लासमध्ये एक जपानी व्यक्ती आली होती. ती व्यक्ती ‘सॉफ्टब्रीज सोल्युशन्स’ ह्या कंपनीत इंग्रजी शिवण्याच्या कामावर होती. पुण्यातून त्या कंपनीत गेलेल्या मुलांचे जपानी उच्चार एवढे स्वच्छ आणि सुस्पष्ट कसे असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यांनी त्यावर जरा सखोल चौकशी केल्यावर त्यांना असे कळले की किंकर सेन्सेईंकडे शिकलेल्या मुलांचे उच्चार असे स्वच्छ आणि सुस्पष्ट आहेत. त्यामुळे कोण हा मनुष्य भारतात राहून इतके मनापासून अस्खलित जपानी शिकवतो आहे हे बघण्यासाठी ते आमच्या क्लासमध्ये आले होते. हे सर्व त्यांनीच आम्हाला सांगितले. त्यावेळी त्यांचे आणि किंकर सेन्सेईंचे जपानी भाषेतून जे काही संभाषण झाले ते ऐकताना आम्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून गेली होती. ते बोलणे आम्ही कानांनी आणि डोळ्यांनी अक्षरशः प्राशणं करत होतो. जपान – पुणे विद्यापीठ ह्यांच्या काही प्रोग्राम अंतर्गत भारतात येण्यार्‍या तरुण पिढीतील जपानी विद्यार्थ्यांना त्यांचे उच्चार कसे सदोष आहेत ते दाखवून देण्याइतके जपानी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि पात्रता असलेला माझ्या माहितीतला एकमेव हाडाचा शिक्षक म्हणजे किंकर सेन्सेई.

त्यांच्या क्लासमध्ये असल्यावर आपण शिकण्यासाठी इथे आलोय आणि एक प्रचंड प्रज्ञा असलेला भाषापंडीत आपल्याला एक भाषा शिकवतोय असे कधी वाटायचेच नाही. क्लासमध्ये एकदम खेळीमेळीचे वातावरण असायचे. उत्तरे देताना कोणी काही शेंडी लावायचा प्रयत्न करतोय ते चटकन त्यांच्या लक्षात यायचे. त्यावर ते त्यांच्या टिपीकल शैलीत म्हणायचे, ‘संध्याकाळची थंडगार हवा आणि किंकरांच्या डोक्यावर बेल, फुल वाहा’. कोणी काही मोठ्या आवाजात वादविवाद करायचा प्रयत्न करून वातावरण तापले की अजिबात न रागावता हसर्‍या चेहेर्‍याने त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडायचे, ‘प्रेम… प्रेम… प्रेमाने बोला’. एखादा विद्यार्थी जरा जास्तच आगाऊ असला की त्याला त्यांच्याकडून ‘अतिरेकी’ ही पदवी मिळायची. मी बर्‍याच वेळा ‘अतिरेकी’ झालेलो आहे. पण सेंसेईंचे आमच्या बॅचमध्ये माझ्यावर जरा जास्तच प्रेम होते. त्यामुळे माझे अतिरेकीपद लयाला जाऊन मला महामहोपाध्याय ही पदवी त्यांनी बहाल केली होती. व्याकरणातल्या एखाद्या पॅटर्नवर कोणाच्यातरी शंकेचे निरसन करताना चर्चा सुरु झाली की, ‘हं, महामहोपाध्यायांचे काय मत?’ असे मिश्कीलीने विचारायचे. क्लासमध्ये बर्‍याच वेळा चर्चा करून समजावून देताना विषयांतर व्हायचे त्यावेळी कोणत्याही विषयावर ते परखडपणे कितीही वेळ बोलू शकत. मूळ मुद्द्यापासून लांब गेलो हे त्यांच्या लक्षात आले की ‘असोsss’ असे म्हणून मूळ चर्चेकडे, गाडीने सटकन रूळ बदलावे तसे वळायचे. कोणी टोप्या लावायचा प्रयत्न केला की ‘नारहोदोsss, नारहोदो नेsss’ असे म्हणत हसरा चेहेरा करून असे काही डोके हालवायचे की समोरचा ओशाळून त्याला आपली चूक लगेच समजून यायची. त्यांना जपान बद्दल आणि जपानी भाषेबद्दल अपार प्रेम. मी अलीकडच्या काळात जपानला जाऊन असल्यामुळे त्यांना काही न पटणार्‍या गोष्टी सांगितल्या की ‘अशक्यsss’ असे जोरात म्हणून त्यांचे एक नेहमीचे आणि आवडते उदाहरण सांगायचे, ‘तुम्ही रेल्वे फलाटावर उभे आहात, गाडीची वेळ ९:३० आहे, बरोबर ९:३० ला डोळे बंद करून पाय उचलून पुढे टाका तो गाडीच्या उघड्या दारातून आत पडलाच पाहिजे, असा आहे जपान!’ त्यांच्या तोंडून जपानबद्दलचे आणि तिथल्या अनुभवांचे किस्से ऐकणे म्हणजे खुद्द व्यासांच्या तोंडून महाभारताचे किंवा वाल्मीकीच्या तोंडून रामायणाचे कथाकथन ऐकण्यासारखेच असते.

माझ्यावर त्यांचा जरा जास्तच जीव असल्यामुळे त्यांच्याबरोबर एकदा ‘बैठक’ करायची माझी खूप इच्छा होती. त्यांना एकदा धीर गोळा करून तसे विचारलेही. त्यावेळी माझ्या खांद्यावर हात टाकून ते म्हणाले, ‘जरी तू माझा विद्यार्थी असलास तरी एक नोकरपेशा व्यक्ती आहेस त्यांमुळे काहीच हरकत नाही.’ हे ऐकल्यावर मला जो काही आनंद झाला होता तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. त्यांच्याबरोबरच्या ‘बैठकी’च्या वेळी असंख्य विषयांवर गप्पा व्ह्यायच्या. त्यावेळी स्वतःच बोलत न राहून समोरच्याचे बोलणे मन लावून ऐकून समोरच्याला जिंकून घ्यायची एक विलक्षण पद्धत आहे त्यांची. दुसर्‍यांदा जपानवरून आल्यावर त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी परत एकदा त्यांच्याबरोबर ‘बैठक’ जमवण्याचा योग जुळून आला त्यावेळी ते जे म्हणाले ते आजही हृदयात कोरून ठेवले आहे, ‘ब्रिजेश, आपले नाते आता गुरु-शिष्य ह्या नात्याला पार करून एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे, गुरुला आपल्या शिष्याची प्रगती बघण्यात एक वेगळाच आनंद असतो, तु आणि तुझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी तो मला मिळवून दिला ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे.’ साधेपणाने जगणारा हा मनस्वी माणूस सगळे आयुष्य जपानी भाषेवर प्रेम करत ती शिकवण्यासाठी खर्च करत आलेला आहे. मी जपानवरून त्यांच्यासाठी साकेची एक दुर्मिळ बाटली घेऊन आलो होतो, ती बाटली घरी न नेता तिथेच लगेच क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी वाटून टाकली ह्यातच त्यांच्या साधेपणाचे सार आहे.

त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय बॉटनी होता (त्यामुळे मला त्यांनी मला सुरुवातीला बॉटनी डिपार्टमेंटमध्ये भेटायला बोलवले होते). समुद्र शैवालावर पोस्ट डॉक्टरल रिसर्च करायचे असे जेव्हा त्यांनी ठरवले तेव्हा जपानमध्ये त्यावर खूप संशोधन झाले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी जपानला जायचे निश्चित केल्यावर ती भाषा यायला पाहिजे म्हणून ती भाषा शिकण्याची तयारी त्यांनी केली.

त्या अभ्यासापासून सुरू झालेला जपानी भाषेचा त्यांचा प्रवास, जपानमध्ये राहून जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, जपानच्या नागोया विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल रिसर्च करताना प्रतिष्ठेची ‘मोम्बुशो स्कॉलरशिप’ मिळवणे (१९८२-८३), पुणे विद्यापीठात जपानी भाषेच्या अभ्यासाची पाळेमुळे खोल रुजवणे, डॉ. दामल्यांबरोबर पुण्यात जपानी शिक्षकांची एक संघटना (Japanese Language Teachers’ Association, JALTAP) उभी करून तिचे ‘प्रेसिडेंट’ पद भूषवणे, असंख्य मराठी विद्यार्थ्यांना जपानी शिकणे सोपे जावे म्हणून ‘सुलभ जपानी व्याकरण (भाग १-२)’ हे पुस्तक लिहिणे आणि अतिशय आत्मीयतेने जपानी शिकवणे असा आजतागायत सुरू आहे.

आज मला जे काही थोडे फार जपानी समजते (असे मला वाटते) ते या हाडाचे शिक्षक असलेल्या किंकर सेन्सेईंमुळेच! म्हणूनच माझ्या आयुष्यात त्यांची भेट होणे, त्यांच्याशी ऋणानुबंध जुळणे, त्यांच्याशी असलेले नाते गुरु-शिष्याच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक पातळीवर येणे हे सर्व एका दैवी संकेतानुसार झाले असे मी मानतो.

चावडीवरच्या गप्पा

‘हा चक्क अन्याय आहे’, सकाळी सकाळी तणतणत नारुतात्यांनी चावडीवर हजेरी लावली. नेहमीचे सिनियर सिटीझन्स आधीच हजर होते.

‘काय झाले?’, कोणीतरी विचारले.

‘अरे त्या बिचार्‍या संगमांना राजीनामा द्यावा लागला, त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षातुन, हे काही ठीक नाही! हे तर त्या स्टीव्ह जॉबसारखे झाले’, नारूतात्या.
(हा नारुतात्यांच्या नातवाने आणलेले स्टीव्ह जॉबचे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच वाचल्याचा परिणाम होता.)

‘कोssण हा शिंचा संगमाsss’, घारुअण्णा अस्लखित चिपळुणी अंदाजात विचारते झाले.

‘हाच तर प्रॉब्लेम आहे, इथे उपेक्षितांवर अन्यात होत असताना, उपेक्षित कोण हेच माहिती नसणे हा बहुजनांवरचा अन्याय पुरातन आहे’, इति कट्ट्याचे बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

‘साहेबांशी घेतलास पंगा, भोग म्हणावे आता आपल्या कर्माची फळे’, शामराव बारामतीकरांनी साहेबांच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा व्यक्त केली.

‘अरे काय तुमचे साहेब, ज्याच्या मांडीला मांडी लावून नव्या पक्षाची स्थापना केली साधी त्याच्या मनातली ईच्छा समजू नये त्यांना?’ नारुतात्यांनी त्यांचा मूळ मुद्दा पुन्हा हिरिरीने मांडला.

‘महत्वाकांक्षा सर्वांनाच असते हो, पण ती साहेबांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणे म्हणजे साक्षात आत्महत्याच हो, दालमिया आठवतोय का?’, शामराव बारामतीकर.

‘अहो कोण हा संगमा, कर्तुत्व काय ह्याचे?’, घारुअण्णांचे पालुपद.

‘अहो प्रखर राष्ट्रवाद दाखवून सोनियाला विरोध करून तिला पंतप्रधान होऊ दिले नाही हे कर्तुत्व काय कमी आहे का?’, भुजबळकाका.

‘त्यात त्याचे कसले आलेय कर्तुत्व? तिचा काय जीव वर आला होता! तसेही काही न करता पैसा ओरपायला मिळणार, सत्ता तशीही ताब्यात, कशाला व्हायचे पंतप्रधान!’, घारुअण्णांचे तर्कशास्त्र.

‘झाले ह्यांचे सुरु, अहो मुद्दा काय, तुम्ही बरळताय काय? विषय आहे सगमांचा’, नारुतात्या.

‘अरे! पण त्या शिंच्याला राष्ट्रपती व्ह्यायची खाजच का म्हणतो मी?’, घारुअण्णा.

‘सोनियाच्या विरूद्ध लढायला सगळेच उतरले पण त्यांना फक्त कपडे सांभाळावे लागले. अहो साहेबांना त्यांनी पक्ष काढायला मदत केली पण मलई सगळी साहेबांनी खाल्ली.
हेच खरे दु:ख दुसरे काय! त्यात आता प्रतिभाताईंच्या जगप्रवासाच्या खर्चाचे आकडे प्रसिद्ध झाले आणि फिरले डोळे त्याचे. हाय काय आन नाय काय.

चोर सगळे लेकाचे. सर्वसामान्य जनता होरपळतेय त्याचे कोणाला काही आहे? जो तो आपली तुंबडी भरण्याच्या मागे. त्या ममताला प्रणब मुखर्जी नको, कारण एक बंगाली, दुसर्‍या पक्षाचा, सर्वोच्च स्थानावर येऊन त्याने डो़यावर मिर्‍या वाटायला नको. देशाचे कोणाला काही पडले आहे?’, इतकावेळ शांत बसलेले सोकाजीनाना.

‘अहो पण राष्ट्रपती होऊन परदेशी व्यक्तींना देशात कोणतेही पद भुषबता येऊ नये असा वटहुकुम जारी करायचा छुपा हेतु असेल त्यांचा’, घारु अण्णांचा स्वन्पाळु आशावाद.

‘घंटा वटहुकुम काढता येतोय! आपल्या देशात राष्ट्रपती पद हे रबर स्टँप टायपाचे पद आहे. खुप काही जबाबदार्‍या पण पावर काही नाही!

उगाच नाही अब्दुल कलामांनी नकार दिला पुन्हा राष्ट्रपती होण्याला, एवढा मोठा, सर्वोच्च मान कोणी असा सुखासुखी सोडेल काय?
तेव्हा ह्या फुकाच्या बातां सोडा आणि चहा ऑर्डर करा! चला!!’, इति सोकाजीनाना!

ह्याला सर्वांनी दुजोरा दिला आणि चहाची ऑर्डर दिली.

काही ‘जपानी’ अनुभव

जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक.

अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता. तेवढ्यामुळेच जपानला जाण्याची एक ओढही होती. कधी जायचा योग येइल असे वाटले नव्हते पण नशिबाने जायचा योग आला, दोनदा. त्या देशाच्या एका कंपनीसाठी काही काम करून त्यांच्या ॠणातुन (सुभाषबाबूंना केलेली मदत) काही अंशी उतराई होण्याची संधी मिळाली हे माझे अहोभाग्य.

माझ्या पहिल्या दौर्‍यातल्या वास्तव्यात त्यांनी तांत्रिक विश्वात केलेल्या प्रगतीचे तोंडाचा आsss करून बघण्यातच बराच काळ गेला. जमिनीखाली सहा थरांमध्ये चालणारी (अचूक वेळेनुसार) मेट्रो रेल्वे, जमिनीखाली एक शहराप्रमाणे असलेले तोक्यो रेल्वे स्टेशन, भुकंपालाही हरविणार्‍या गगनचुंबी इमारती. हे सगळे अनुभवता अनुभवता हळूहळू त्या शहरात असणारी प्रचंड स्वच्छता जाणावू लागली. कुठेही बघावे तर टापटीप. मग त्याचे कारण शोधता शोधता जपानी लोकांचे निरीक्षण करण्याचे व्यसन लागले (हो… हो! आले लक्षात तुम्हाला काय वाटतेय ते, त्यात जपानी ललनाही आल्याच). पहिल्या दौर्‍यातले ह्या स्वच्छतेबद्दल असलेल्या जागरुकीचे आलेले काही अनुभव…

एके दिवशी सकाळी ९:०० वाजता ऑफिस गाठताना लागणार्‍या एका फुटपाथवर टाइल्स बदलायचे काम चालू होते. व्यवस्थित पिवळ्या रंगाच्या पट्ट्या लावून चौकोनी ब्लॉक तयार करून त्यात सर्व सामग्री आणि कामाची आयुधे ठेवून दोघेजण त्यांचे काम मन लावून करत होते. ‘काम चालू रस्ता बंद’ अशी पाटी न लागता ‘तुम्हाला होणार्‍या असुविधेबद्दल क्षमस्व’ असा दिलगीरी व्यक्त करणारी पाटी होती. हे सर्व बघून पुढे निघून गेलो. दुपारी जेवायला बाहेर आलो तर ती पाटी आणि पिवळ्या पट्ट्या गायब आणि तिथे सकाळी काही काम चालू असण्याचे नामोनिशाणही नव्हते. आश्चर्य वाटून गडबडीत निघून गेलो. दुसर्‍या दिवशी त्याच फुटपाथवर पुढच्या ब्लॉकमध्ये टाइल्स बदलायचे काम चालू होते. परत दुपारी एकदम चकाचक. मग ऑफिसमधल्या एका जपानी मित्राला त्याबद्दल विचारले तर तो चकित होऊन माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेर्‍याने बघायला लागला व म्हणाला, ‘अरे त्या दोन कर्मचार्‍यांना त्यांच्या ठरविक वेळेत संपेल इतकेच दिले जाते व ते त्याचे नियोजन करून तेवढीच जागा व्यापुन काम पुर्ण करतात. उगाच जास्त काम हाती घेतले तर रस्ता बंद होउन सर्वांचा खोळंबा नाही का होणार?’

बर्‍याच सबवे मेट्रो स्टेशनच्या भिंतींवर टाइल्स लावलेल्या आहेत, छोटे-छोटे चौकोन असलेल्या टाइल्स. एकदा एका रविवारी मेट्रो स्टेशनवर गेलो असताना दिसले की पाणी मारून त्या भिंती धुतल्या जात होत्या. भिंती धुतलेले पाणी जाण्यासाठी जिन्याच्याकडेने जागा सोडून त्यातुन पाणी पाटाच्या पाण्याप्रमाणे निचरा होऊन जाईल ह्याची सोय केलेली होती. त्यानंतर काही वयस्कर माणसे हातात कडक दातांचे ब्रश घेऊन त्या टाइल्समधील छोट्या-छोट्या चौकोनांमधील फटींमध्ये अडकलेली घाण साफ करत होते.

ह्यानंतर माझा ह्या जपान्यांविषयीचा आदर दुणावला आणि मग मी त्यांच्या सामाजिक वागणुकीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यात जाणवले ते म्हणजे त्यांना असलेला त्यांच्या देशाविषयीचा प्रचंड अभिमान. प्रचंड काम करून आपल्या देशाला उच्च स्थानावर नेऊन ठेवण्याची महत्वाकांक्षा. देशाच्या अभिमानाला धक्का लागेल असे काही झाले जर हाराकीरीच करतील अशी ही माणसे. त्याची प्रचिती आलेले हे अनुभव…

एकदा मी आणि माझा मित्र सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी जायला म्हणून एका सबवे स्टेशनवर तिकीट काढून गाडीची वाट बघत होतो. वाट बघत असतानाच एका सहकार्‍याचा ऑफिसातून फोन आला की ऑफिसात यायची गरज नाही. मग तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी एका तिकीटयंत्राकडे (तिकीटयंत्रात तशी सोय असते) जाऊन आम्ही दोघे खटाटोप करत होतो. त्यावेळच्या जपान दौर्‍यात मला जपानी येत नव्हते. त्यामुळे नेमके काय करायचे हे कळत नव्हते. त्या यंत्राच्या बाजुलाच एक जपानी माणुस उभा होता व आमच्याकडे बघत होता. ही जपानी माणसे तशी फार लाजाळू आणि अबोल असतात (पण त्यांचे रूप हे नामाबीरु किंवा साके प्यायल्यानंतर एकदम विरूद्ध होऊन जाते). तो बराच वेळ आमच्याकडे बघत होता मग जरा धीर करून आमच्याकडे येऊन म्हणाला, ‘सॉरी मला इंग्लीश जास्त येत नाही, पण तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का, काही मदत करू का?’ आमची अवस्था आंधळा मागतो एक डोळा… अशी झाली. त्याला आमची समस्या सांगितल्यावर त्यानेही बरीच झगडाझगडी केली त्या मशिनशी पण त्यालाही काही जमले नाही. ‘एक मिनीट’, म्हणून तो गायब झाला. माझ्या बिहारी मित्राने लगेच त्याच्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. पाच सात मिनीटांनी तो आला तो एका रेल्वे कर्मचार्‍याला घेऊनच. मग त्या दोघांनी जपानीमध्ये बरीच काही बडबड केली आणि त्या यंत्रावरही बरेच काही केले. शेवटी यंत्र बिघडले आहे असे सांगुन तो रेल्वे कर्मचारी निघुन गेला. आमच्या दोघांच्या चेहेर्‍यावरील भाव बघून त्या माणसाने आमचे तिकीट कुठपर्यंतचे आहे ते विचारले. मग त्याने ते तिकीट आमच्याकडे मागितले आणि त्या तिकीटाएवढे पैसे काढून आम्हाला दिले व म्हणाला, ‘तुम्हाला ह्या तिकीटाचे पैसे परत घ्यायला स्टेशनमास्तरशी बोलायला प्रोब्लेम येईल मी बघतो काय करायचे ते’. एवढे बोलून वर परत आम्हालाच त्रास झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत सॉरी म्हणाला. हा किस्सा २००२ सालचा आहे त्यामुळे नक्की काय प्रोब्लेम होता ते अंधुक आठवते आहे पण त्यानेच, मदत करून वर आम्हाला थॅन्क्यु म्हणायची संधी न देता, सॉरी म्हणणे हे लख्ख आठवते आहे. माझा बिहारी मित्र रडला होता त्यावेळी. त्या माणसाने आम्हाला मदत करण्यामागची भावना अशी की ह्या परदेशी लोकांचे माझ्या देशाविषयी गैरसमजानेसुद्धा मत खराब होऊ नये!

एकदा मी धाडस करून एकटाच तोक्यो स्टेशन फिरायला गेलो. ते जमिनीखालचे स्टेशन एवढे प्रचंड आहे की जणू एक शहरच वसले आहे. त्यावेळी भाषा येत नसल्यामुळे आम्ही ग्रुपमध्येच फिरायचो. पण त्यावेळी मी आता सर्व स्टेशन्स समजली ह्या आत्मविश्वासाने (फाजील) एकटाच गेलो. आणि त्या तोक्यो स्टेशनवर हरवलो. काही केल्या कुठे जायचे कळेना. एकही पाटी इंग्रजीत नाही (का म्हणून लावावी?) कोणाशी इंग्रजीत बोलायची सोय नाही. जवळ मोबाइल नाही, भयंकर घाबरून गेलेलो. इकडे तिकडे फिरता फिरता एके ठिकाणी एका दुकानात एक डेंटिस्ट चक्क त्याचा दवाखाना थाटून बसला होता. आता तो जरी डेंटिस्ट असला तरीही डॉ़क्टरच. त्यामूळे त्याला इंग्रजी येत असणार म्हणून मी भयंकर खुष झालो. त्याच्याकडे जाऊन मी, मी हरवलो आहे, मला जपानी येत नाही, मला मोन्झेन नाकाचो ह्या स्टेशनला जायचे आहे, कसे आणि कुठुन जायचे, मदत कराल तर खुप उपकार होतील अशी सरबत्ती चालू केली. त्याने सर्व शांतपणे ऐकून घेतले. मग मला हाताने थांबायची खूण करून कुठेतरी निघून गेला. आता तो एका पेशंटच्या दातातले किडे तसेच वळवळत ठेऊन गेला असल्याने परत येईल ह्याची खात्री होती. गेला असेल नकाशा आणायला असा विचार करून मी शांतपणे बसून होतो. तो डेंटिस्ट १५-२० मिनिटांनी परत आला. त्याच्याबरोबर एक माणूस होता. माझ्याजवळ आल्यावर त्या माणसाशी काहीतरी बोलून मला त्याच्या हवाली करून त्याच्या पेशंटकडे निघून गेला (मला खात्री आहे त्याने त्याच्या पेशंटबरोबरच त्याच्या दातातल्या किड्यांचीदेखिल माफी मागितली असेल दिलेल्या तसदीबद्दल). त्या नविन माणसाने माझ्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली व म्हणाला, ‘त्या डेंटिस्टला इंग्रजी थोडे थोडे कळते पण बोलता येत नाही म्हणून तो मला घेऊन आला आहे, बोला मी आपली काय मदत करू?’

ह्या अनुभवांनंतर, ह्या देशात परत यायचे आणि यायचे ते ह्यांची भाषा शिकुनच, त्यांच्याशी संवाद साधायला, ही खुणगाठ बांधूनच परत आलो. आल्यावर पुणे विद्यापिठात जपानी शिकायला सुरूवात कली आणि नशिबाने परत जपानला जायचा योग आला.

ह्या दुसर्‍या फेरीतील अनुभव पुन्हा केव्हातरी. 🙂

प्रोमीथीयस (Prometheus)

प्रोमीथीयस नावाचे एक भव्य अंतरा़ळ यान पृथ्वीपासून करोडो मैलांवर असलेल्या एका आकाशगंगेतल्या सुर्यमालिकेतील एका ग्रहावर एका मिशनसाठी चालले आहे. त्यात सर्व अंतराळवीर दीर्घकाळीन (दोन वर्षांहून अधिक) झोप घेऊन तो ग्रह जवळ आल्यामुळे उठुन त्या ग्रहावर उतरण्यासाठी तयार होत आहेत. सर्वजण उठून तयार झाल्यावर वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड, त्या मिशनचा स्पॉन्सर, एका व्हिडीओद्वारे त्या सर्वांशी संवाद साधून त्यांना सांगतो, “हा व्हिडीओ बघितला जात असेल तेव्हा मी जिवंत नसेन पण आत्मा म्हणजे काय?, आपण कोण आहोत?, आपण कुठुन आलोत?, आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?, मृत्युनंतर आपले काय होते? ह्या प्रश्नांची उकल ह्या मिशनमुळे होणार आहे आणि ती मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि खळबळजनक असणार आहे.” त्यासाठी त्याने पुरातन सांकेतिक चित्रांचा अभ्यास करणार्या? एलिझाबेथचा ह्या मिशनमध्ये समावेश केला आहे. तीची एक थियरी ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करणार असते. काय असते ही थियरी…

पुरातन चित्रांचा अभ्यास करतना वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या संस्कृतीतील काही निवडक चित्रांमध्ये कमालीचे साम्य, साधर्म्य आणि एक संदेश आहे, ह्याचे सुसुत्रीकरण एलिझाबेथ हिने केलेल असते.

ह्या चित्रांमध्ये दाखवलेली एक ग्रहमालिका ही सजीवांची उगमभूमी आहे आणि तिथल्या ‘इंजीनियर्सनी’ मानवाला तयार केले अशी ही थियरी असते. आता हे इंजिनियर्स कोण? ते म्हणजेच ‘देव’ का हे शोधण्यासाठीच हे मिशन असते. त्या अंतरा़ळ यानावर डेविड नावाचा एक मनुष्यांप्रमाणे दिसणारा रोबोट असतो. तो ह्या सर्वांची मदत करण्यासाठी शिपवर पीटर वेलॅन्डने तैनात केलेला असतो.

एकदाचे ते अंतरा़ळ यान त्या ग्रहावर उतरते आणि त्यातले अंतराळवीर त्या ‘इंजीनियर्सचा’ शोध घेण्यास यानाच्या बाहेर पडतात. तिथे असलेल्या गुहेत शिरून कॅमेर्‍याद्वारे तिथली सर्व स्थिती यानावर प्रक्षेपित केली जात असते त्याचे 3D मॉडेल यानातील अंतराळवीर अभ्यासत असतात. अचानक त्या गुहेत त्यांचा काही चमकणार्‍या आकृत्या पळताना दिसतात आणि इथुन एक थरार सुरु होतो ह्या सिनेमात. त्या आ़कृत्या आभासी असतात आणि त्या बघून त्यांच्यापैकी दोघेजण घाबरून परत यानात जाण्यासाठी तिथुन पळ काढतात. त्या आ़कृत्या जिथुन एका भिंतीत अदृश्य झालेल्या असतात तिथे गेल्यावर त्यांना काही सांगाडे दिसतात आणि मानवाच्या उगमाचे कोडे उलगडणार असे वाटू लागले जाऊन उत्कंठा एकदम शिगेला पोहोचते. ती भिंत एका सांकेतिक खुणेने उघडण्यास रोबोट, डेवीड, यशस्वी होतो. त्याला अफाट माहिती फीड केलेली असल्यामुळे तिचे जलदरीत्या पृथःकरण करून त्याला हे शक्य होते. त्या भिंतीपलीकडे असते एक भव्य मानवी चेहेर्‍याच्या आकाराची मुर्ती!

त्यानंतर अचानक एक भयानक वादळ सुरु होते आणि त्या सर्वांना यानात परत यावे लागते. येताना मात्र त्या मानवी सांगाड्याच्या डोक्याच्या भागाला त्यांच्याबरोबर घेवुन यानात येण्यात ते यशस्वी ठरतात. त्याचवेळी तो रोबोट, डेविड, तिथली एक काचेची वस्तू कोणाच्याही नकळत, गुपचुप त्याच्या बॅगमध्ये टाकतो. पण यानात पोहोचल्यावर काय होते…

यानात पोहोचल्यावर त्या मानवी सांगाड्याच्या डोकेसदृश्य भागाचे विष्लेशण केले जाते तेव्हा त्यांना कळते की तो सांगाडा म्हणजे एक हेल्मेट आहे. ते तोडल्यावर त्याच्या आत एक मानवी मुंडके असते. त्यात असणार्यात मेंदुत विचार प्रक्रिया करण्याची शक्ती असल्याचे त्यांच्या निदर्शनास येते. लगेच एक इंजेक्शन देऊन त्या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो यशस्वी होतोही पण त्या चेहृयातुन रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात आणि सर्वजण त्या चेहेर्‍याला एका काचेच्या बॉक्समध्ये बंद करतात. त्या बॉक्समध्ये त्या चेहेर्या चा स्फोट होतो. त्या रक्तातले DNA घेऊन त्याची पडताळणी मानवी रक्ताच्या एका सॅंपलबरोबर केली जाते आणि तो DNA मानवी DNA शी तंतोतंत जुळणारा असतो. आपल्याला तयार करणारे ‘इंजीनियर्स’ एकदाचे मिळाले ह्याचा आनंद सर्वांना होतो. आता परत त्या गुहेत जाउन त्या ‘इंजीनियर्स’पैकी कोणि तिथे सांगाड्यांऐवजी जिवंत असल्यास त्याचा शोध घ्यायचा असे ठरते. त्याचवेळी यानात रोबोट, डेविड, गुढपणे कोणाशीतरी बोलत असतो आणि सिनेमातले गुढ एकदम अचानक वाढते कारण आकृत्यांना घाबरून यानात परत येण्यास निघालेले यानात परत आलेलेच नसतात, ते त्या गुहेतच विरूद्ध दिशेला जाउन शोधकार्य करीत असतात. डेविड त्याने आणलेल्या काचेच्या वस्तूमधील रक्तसदृश्य द्रवपदार्थ एलिझाबेथच्या पार्टनरला देतो जो तिचा बॉयफ्रेंडही असतो. थरार वाढतो आणि उत्कंठा लागून रहाते पुढे काय होणार ह्याची…

दुसर्याश दिवशी सगळे परत सगळे परत त्या गुहेत जातात आणि इथुन पुढे सगळ्या चित्रपटाचा बट्ट्याबोळ व्ह्यायला सुरुवात होते. अचानक एवढा चांगला विषय आणि आशय ह्यांच्यावर बेतलेला सिनेमा अचानक ‘एलियनपट’ बनतो. पुन्ह्या त्याच चित्रविचित्र किळसवाण्या एलियनचे अवतार दिसणे, त्यांनी विरूद्ध दिशेला जाउन शोधकार्य करीत असणार्यास अंतराळवीरांच्या तोंडात त्यांचा सोंडसदृश्य शरीराचा भाग सोडून त्यांना मारणे, एलिझाबेथ प्रेग्नंट राहून (रोबोट, डेविड जेव्हा तिच्या पार्टनरला रक्तसदृश्य द्रवपदार्थ देतो त्यारात्री त्यांना प्रेमाचा साक्षात्कार झालेला असतो) एकाच रात्रीतला गर्भ ३ महिन्यांच्या गर्भाप्रमाणे मोठा असणे, तो गर्भ म्हणजे एक एलियन असणे, तिने स्वतःचे स्वतः ऑटेमॅटिक ऑपरेशन मशिन वापरून गर्भपात करताना, तेही भूल न घेता लेसर किरणांनी पोट फाडून घेऊन, त्यातुन तो एलियन बाहेर पडणे असल्या मार्गानी सिमेना जायला लागून रसातळाला जातो.

पुढे कळते की वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड हा मेलेला नसून तो त्या यानातच असतो. त्याला अमर व्ह्यायचे असते म्हणजे मृत्युला हरवायचे असते त्यासाठी त्याने हा सगळा खटाटोप केलेला असतो, हाय रे कर्मा! हेही नसे थोडके म्हणून पुढे, ती गुहा ही गुहा नसून अजून एक अंतराळ यान असते जे मानवसदृश्य ‘इंजीनियर्स’चे असते. ते ‘इंजीनियर्स’ सर्वजण नष्ट झालेले असतात आणी त्यांच्यातला फक्त एकजण जिवंत असतो आणि ते म्हणे त्या वेलॅन्ड कॉर्प. ह्या कंपनीचा मालक, पीटर वेलॅन्ड आणि रोबोट डेविडला माहिती असते. तो शेवटचा मानवसदृश्य ‘इंजीनियर्स’ त्याचे अंतराळयान घेऊन पृथ्वीवर जाउन पृथ्वी उजाड करणार आहे कारण त्याला त्यांची जमात पुन्हा पृथ्वीवर वसवायची आहे. मग प्रोमीथीयस अंतरा़ळ यानाचा कॅप्टन पृथ्वीला वाचवण्यासाठी त्या ‘इंजिनीयरच्या’ अंतराळयानाला धडक देतो आणि पृथ्वीला एका भयानक संकटातून, आपत्तीपासून (?) वाचवतो. पण त्यावेळी एलिझाबेथ त्या ग्रहावर असते, ती वाचते. मग रोबोट, डेविड तिला सांगतो ही त्या ग्रहावर अजूनही अंतराळ याने आहेत. तो ती याने चालवू शकतो. मग एलिझाबेथ त्यातील एक यान वापरून पृथ्वीवर न परतता ‘पुनश्च हरीओम’ म्हणत खरोखरीच्या ‘इंजीनियर्स’चा शोध घेण्यास अंतराळात निघून जाते. त्याचवेळी तिकडे त्या ग्रहावर तिच्या गर्भातून निघालेल्या एलियन मधून अजुन एक विचित्र एलियन सदृश्य आकृती पडद्यावर येउन, पडदा व्यापून खच्चून ओरडते, उगाचच….

इथे सिनेमा संपतो आणि पैसे वाया गेल्याची जाणिव होते. हॉलीवुडला पडलेली परग्रहवासीयांची भुरळ काही केल्या उतरायची नाव घेत नाहीयेय. खरंतर वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या आकारातले परग्रहवासीयांचे काल्पनिक चित्रीकरण सुरुवातीच्या काही सिनेमांमध्ये आकर्षक वाटले होते पण आता त्यात तोच तोचपणा येऊन (ऑक्टोपससदृश्य प्राण्यांचे किळसवाणे दृश्यीकरण) परग्रहवासीयांवर आधारित सिनेमांचा कंटाळा आला आहे. त्यामुळे जेव्हा प्रोमीथीयस (Prometheus) सिमेनाच्या प्लॉटबद्दल वाचले होते तेव्हा, आत्मा म्हणजे काय?, आपण कोण आहोत?, आपण कुठुन आलोत?, आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय?, मृत्युनंतर आपले काय होते? ह्या प्रश्नांचा उहापोह ह्या सिनेमात केला आहे हे कळले होते. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मनुष्य फार पुरातन काळापासूनच करतो आहे. ह्या असल्या भारी भक्कम कंसेप्ट वर सिनेमा आणि तोही रिडले स्कॉट ह्या ‘एलियनपटांचा’ बादशहा असलेल्या दिग्दर्शकाकडून येणार म्हटल्यावर उत्सुकता खुपच होती. रिडले स्कॉट एलियन्सच्या पुढे जाउन आता ‘देव’ ह्या संकल्पनेशी त्यांचा (एलियन्सचा) काही संदर्भ जोडेल अशी आशा होती पण पदरी पूर्णपणे निराशा येते.

दिग्दर्शन आणि चित्रपटाचा कॅन्व्हास अप्रतिम आहे. ग्राफिक्स वापरून सिनेमाला दिलेला अंतराळ यानातला ‘ग्लॉसी’ लूक एकदम मस्त आहे. स्काय फाय सिनेमासाठी जे काही आवश्यक आहे तो सर्व मसाला ठासून भरलेला आहे पण सिनेमाचा आत्मा, पटकथा, त्या पटकथेचा अर्ध्यातून चुथडा झालेला आहे. खरेतर ह्या विषयाला साजेसा वेळ (२ तासांपेक्षाही जास्त) घेतला आहे रिडले स्कॉटने पण तो चुकीच्या पद्धतीने वापरला गेला आहे. शेवटी एका एलियनला ओरडायला लावून ह्या चित्रपटाच्या सिक्वेलची जाहिरातही करून टाकली आहे.

चार्लीझ थेऱोन ह्या सुंदर आणि कमनिय हिरॉइनला चित्रपटात काहीही ‘काम’ नाहीयेय, तिला तिचा रोल फार महत्वाचा आहे असे सांगून चित्रपटात घेतले होते असे वाचले कुठेतरी आणि हसूच आले. बाकीच्या कलाकारांनी कामे त्यांच्या भुमिकेनुसार चांगली केली आहेत. Michael Fassbender ने साकारलेला रोबोट, डेविड, एकदम मस्त आणि पुर्णतः यंत्रमानव वाटतो. पण एकंदरीत हा सिनेमा एक परिपूर्ण अनुभव देण्यात पूर्णतः अयशस्वी ठरला आहे.

हॉलीवुडमधले चित्रपटही बॉलीवुड चित्रपटांना टक्कर देऊ शकतात, भरकटण्याच्या बाबतीत, ह्याचे उदाहरण असलेला प्रोमीथीयस सिनेमागृहात जाऊन बघण्याची घाई करण्याएवढा काही खास नाही. सावकाश डाउनलोड करून बघितल्यास एकदा बघायला हरकत नाही.

कॉकटेल लाउंज : जामुनटीनी

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “जामुनटीनी

पार्श्वभूमी:
मागच्या आठवड्यात सुट्टी घेऊन पुण्याला आलो होतो. आल्याआल्या बायकोने मंडईत जायचा फतवा काढला. सगळा असंतोष मनातल्या मनात दाबून टाकून हसर्‍या चेहर्‍याने पिशव्या हातात घेऊन गुणी नवरा असल्याचा साक्षात्कार बायकोला करून दिला. (अ‍ॅक्चुली ह्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात पण असो…)

जाऊदे, ‘जे होते ते भल्यासाठीच’ (हाही १२ वर्षाच्या लग्नाच्या अनुभवाने आलेला एक शहाणपणा). मंडईत गेल्यावर टप्पोरी जांभळे दिसली. जांभूळ म्हणजे माझे एक आवडते फळ, तोंडाला निळेशार करणारे! बर्‍याच वर्षांनंतर जांभूळ बघितले आणि बरे वाटले.

मग लगेच एक कॉकटेल आठवले, ‘जामुनटीनी’. जेम्स बॉन्डच्या मार्टीनी ह्या कॉकटेलला दिलेला एक जबरदस्त देशी ट्वीस्ट.

प्रकार जीन बेस्ड (मार्टीनी)
साहित्य
जीन (लंडन ड्राय) २ औस (६० मिली)
मोसंबी रस ०.५ औस (१५ मिली)
सुगर सिरप १० मिली
टपोरी जांभळे ४-५
बर्फ
मडलर
Hawthorne Strainer
ग्लास कॉकटेल

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमध्ये बर्फ आणि पाणी घालून फ्रीझ मध्ये ग्लास फ्रॉस्ट करण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर कॉकटेल शेकर मध्ये जांभळाचे तुकडे कापून घ्या.

आता मडलर वापरून जांभळाचे तुकडे चेचून जांभळाचा रस काढून घ्या

एका परसट बशीत मीठ आणि लाल मिरची पूड ह्यांचे मिश्रण करून पसरून घ्या. फ्रॉस्ट झालेल्या कॉकटेल ग्लासच्या कडेवर मोसंबी फिरवून कडा ओलसर करा आणि बशीतल्या मिश्रणामध्ये ग्लासची कडा बुडवून घ्या.

आता शेकर मध्ये बर्फ घालून त्यावर जीन, मोसंबीचा रस आणि शुगर सिरप घालून व्यवस्थित शेक करा.

शेक केलेले मिश्रण शेकरच्या अंगच्याच स्ट्रेनरने एका स्टीलच्या ग्लासमध्ये गाळून घ्या.

आता Hawthorne Strainer वापरून कॉकटेल ग्लासमध्ये मिश्रण दुसर्‍यांदा गाळून घ्या. (ह्याला डबल स्ट्रेनिंग म्हणतात.)

चला तर, चवदार जामुनटीनी तयार आहे 🙂

(सदर कॉकटेल ‘टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल्स’ मधून साभार)