चावडीवरच्या गप्पा – रिटेल बाजार आणि FDI

“हद्द झाली ह्या शिंच्या काँग्रेसची, आता तर काय भारत विकायलाच काढला आहें.”, घारुअण्णा तणतण करीत कट्ट्यावर हजेरी लावत.

“तरी म्हटलेच! अजून असे काय कोणी सरकारी निर्णयावर न घसरता पक्षावर तोंडसुख घेतले नाही”, शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर, तो तुमच्या पक्षाचा चष्मा काढा आणि उघड्या डोळ्यांनी बघा जरा”, घारुअण्णा जरा चिडून.

“अहो घारुअण्णा तुम्ही नेमक्या कोणत्या काँग्रेसबद्दल बोलताय? त्याचं काय आहे, आपल्या शामरावांच्या काँग्रेसची ‘आय’ वेगळी आहे हो, खी खी खी”, इति भुजबळकाका.

“डोंबल तुमचं, अहो वेळ काय, विषय काय आणि तुम्ही पांचटपणा असला करताय”, घारुअण्णा घुश्शातच पुढे म्हणाले, “अहो, रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊन ह्या मनमोहन सिंगाने देश आंदणच दिला की हो परकीय कंपन्यांना, ईस्ट इंडिया कंपनीही अशीच भारतात आली होती”.

“घ्या, कळसुत्री बाहुला! कळसुत्री बाहुला! म्हणून त्यांचे हसे उडवायला तुम्हीच पुढे होतात ना घारुअण्णा? आता चक्क त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी काही ठाम निर्णय घेतला तर त्यावरही तोंडसुख घ्यायला, विरोध करायला तुम्हीच पुढे. हे डबलस्टॅंडर्ड झाले.”, शामराव बारामतीकर.

“ढोल बाजेsss, ढोल बाजेsss, ढोल बाजे ढोल, ढमढम बाजे ढोsssल”, भुजबळकाका जोरात गुणगुणत.

“भुजबळकाका शांत व्हा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात देशाच्या नाड्या देणेच झाले हे म्हणजे”, चिंतोपंतांनी चर्चेत तोंड घातले.

“चिंपोपंत, तुमचे सरकार होते तेव्हा का नाही हो हाकलवल्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या? तेव्हा तुमच्या सरकारचाही रिटेल बाजारात ह्या गुंतवणुकीचा अजेंडा होताच ना!”, शामराव बारामतीकर.

“ढोल बाजेsss, ढोल बाजेsss, ढोल बाजे ढोल, ढमढम बाजे ढोsssल”, भुजबळकाका पुन्हा गुणगुणणे सुरू करत.

“तेव्हाही आमचं म्हणणे, Computer Chips, YES! Potato Chips, NO!! असेच होते. रिटेल मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या घुसल्या तर शेतीमालावर त्यांचे वर्चस्व होईल आणि मग सर्व नाड्या त्यांच्या हातात जातील. शेतकरी अधिक पिचला जाईल आणि भांडवलशाहीला बळी पडेल तो”, चिंतोपंत.

“बरं, बरं! तुमची खरी काळजी ही त्या शेतकर्‍यांची की त्या शेतीमालाच्या नाड्या सध्या हातात असलेल्या शेठजींची हो?”, शामराव बारामतीकर.

“चिंतोपंत , तुम्ही कधीपासून भांडवलशाहीविरोधी झालात. तुमच्या पक्षाने आताही हा जो काही विरोध दर्शवला आहे तो भांडवलशाहीला नाहीच आहे मुळी. जे काही वर्चस्व आणि नाड्या ह्या व्यापारी शेठजींच्या हातात आहेत त्याला उद्भवणार्‍या धोक्याची जाणीव होऊनच हा कळवळा आला आहे.”, भुजबळकाका गुणगुणणे थांबवून.

“अहो भुजबळकाका, कशाचा संदर्भ कुठे लावताय?”, घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, जरा थांबा तुम्ही. इथे बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे येणारी निकोप स्पर्धाच नको आहे. स्पर्धा वाढली की वर्चस्व संपले, दलाली संपली. हीच खरी गोम आहे.”, शामराव बारामतीकर.

“खरं आहे! कृषिक्षेत्राच्या दृष्टीने हा निर्णय चांगलाच असणार आहे. सध्या शेतीमालाच्या उत्पादनानंतर तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत 65-100% जास्त झालेली असते, हे सर्व होते त्यानंतरच्या दलालीमुळे. त्याचे पर्यवसान होते महागाई वाढण्यात.”, भुजबळकका.

“त्यामुळे, शेतकर्‍यांचे नुकसान होणार, एतद्देशीय व्यापारी बुडणार, देश विकला जाणार असे गळे काढत ह्या निर्णयाला विरोध करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.”, शामराव बारामतीकर.

“अहो सोकाजीनाना कसला विचार करताय, लक्ष कुठे आहे तुमचे?”, चिंतोपंत.

“ह्म्म्म.., काही नाही ऐकतो आहे तुमचे सगळ्यांचे, पण एक वेगळाच विचार घोळतो आहे मनात”, सोकाजीनाना.

“आता कसला विचार घोळवताय मनात”, इतका वेळ निमूट बसलेले नारुतात्या.

“हा जो काही सावळा गोंधळ चालला आहे सध्या त्याला राजकारणाचा कुबट वास येतोय. सध्या आर्थिक विकासाला बसलेली खीळ पाहता, GDP ला आलेली मरगळ पाहता, त्या दृष्टीने आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी घेतलेला एक आर्थिक निर्णय म्हणून ह्याकडे का नाही बघू शकत आपण. तो निर्णय एका पंतप्रधानाने घेतलेला आहे, जो एक नुसताच राजकारणी नसून एक निष्णात अर्थकारणीही आहे.”, सोकाजीनाना.

“कॉम्प्युटरयुगाची सुरुवात भारतात होतानाही असाच गोंधळ झाला होता. आर्थिक उदारीकरणाचा, खुल्या आर्थिक धोरणांचा निर्णय घेताना केला गेलेला गोंधळही असाच अभूतपूर्व होता. काय झाले? आज त्याची चांगलीच फळे दिसताहेत ना?”

“अरे, आपण भारतीय स्वतःला प्रयोगशील म्हणवतो ना? मग हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त काय होईल? हा निर्णय योग्य ठरला नाही तर आर्थिक नुकसानच होईल ना? परकीय आपला पैसा लुटून नेतील एवढेच ना? सध्याचे, आपल्याच स्वदेशी बांधवांनी केलेल्या घोटाळ्यांचे आणि लुटीचे उजेडात येणारे आकडे लक्षात आहेत की विसरलात एवढ्यात? तेवढ्या आकड्यांचे नुकसान व्हायच्या आत तो निर्णय परत फिरवता येऊही शकेल ना! एनरॉन प्रकल्प तिथल्या मशीनरीला गंज चढून बंद पडलाच ना?”

“काही करायच्या आधीच नुसते वाईटच होणार हा असला निराशावाद का धरावा? कृती करूयात आणि त्यानंतर होणार्‍या परिणामांची जबाबदारी स्वीकारूयात. चांगले झाले तर मस्तच. पण वाईट होईल असेही गृहीत धरून त्याच्यासाठी ‘बॅक अप’ प्लान करूयात ना म्हणजे प्लान बी. तो प्लान बी सद्य सरकारने नसेल केला तर तो तसा करावा म्हणून सरकारवर दबाव आणूयात. पण कृती करायचीच नाही म्हणून कसले बंद पाळायचे.”

“बघा बुवा! ‘क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे’ असलं काही बाही मनात येत होतं. हे पटतंय का तुम्हाला? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच मान हालवत चहाची ऑर्डर देण्यास अनुमती दर्शवली.

रंगबिरंगी भूछत्रं

मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्‍यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. चेन्नैच्या भयंकर उकाड्यावर हा उतारा एकदम कातिल होता.

पहिल्या दिवशी सकाळी सकाळी ‘कोकर्स वॉक’ नावाच्या साधारण एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एक रपेट मारून ‘साईटसिइंग’ला सुरुवात झाली. त्यानंतर एक जंगलातला ट्रेल होता. सुरुच्या बनातून असलेला एक मस्त ट्रेल. अचानक एका चढावर एक लहान फुलाच्या गुच्छासारखे काहीतरी दिसले म्हणून फोटो काढायला पुढे सरसावलो आणि काय आश्चर्य, ती फुले नसून रंगबिरंगी भूछत्र, कुत्र्याच्या छत्र्या किंवा जंगली अळंबी असल्याचे निदर्शनास आले. एकदम चकितच झालो ती विविध रंगातली भूछत्री बघुन. आजूबाजूला बघितल्यावर जाणवले की खूपच सुंदर, ह्यापूर्वी कधीही न बघितलेले भूछत्र्यांचे रंगबिरंगी आणि मनमोहक विश्व.

लहान मुली पावसात छत्र्या घेऊन फिरायला निघाल्या आहेत असे वाटायला लावणारी ही सुंदर आणि लालचुटुक भुछत्रे.

चॉकलेटच्या किंवा कॉफीच्या लॉलीपॉपची आठवण करून देणारी ही कॉफी कलरची सुंदर भुछत्रे.

लहानपणी गंगा नदीची जी काही चित्रमय झलक पाहिली होती त्यानुसार गंगा नदी म्हटले की तिच्या घाटावर असलेल्या पंडित लोकांच्या गोलाकार छत्र्या ह्यांचीच आठवण मला प्रथम होते. ही भुछत्री बघितल्यावर एकदम त्यांची आठवण झाली. चमक (शायनिंग) असलेली भुछत्रं पहिल्यांदाच बघितली, मी तरी.

ही भुछत्रे भरघोस फुलांचे गुच्छ असल्याची जाणिव करून देत आहेत.

चिमुकली आणि अगदी नाजूक असणारी ही भुछत्रे बघताच एकदम नाजूक चणीच्या लहान गोंडस बालिकांची आठवण होते.

एकदम एलियनांच्या UFO प्रमाणे दिसणारी ही एकदम वेगळ्याच रंगछटा असलेली भुछत्रे.

फुलांच्या गुच्छाप्रमाणेच असणारी ही भुछत्रे, पण ह्यावेळी वेगळ्या नजरेने आणि ऍंगलने बघितल्यावर कॉर्नेट ह्या म्युसिकल इंस्ट्रुमेंटला असलेल्या दट्ट्यांची आठवण होत होती.

चावडीवरच्या गप्पा – प्रमोशन आणि आरक्षण

“चिंतोपंत खरे नशिबवान आहात तुम्ही”, नारुतात्या चावडीवर हजेरी लावत.

“काय झाले?”, चिंतोपंत बुचकाळ्यात पडत.

“अहो काय झाले काय? रिटायर झालात तुम्ही! आमची अजुन आठ वर्षे जायची आहेत. आता काही नशिबात सिनीयर डिव्हीजनल ऑफीसरची पोस्ट नाही. प्रमोशन घेऊन रिटायर होणे हे आता स्वप्नच रहाणार असे दिसतेय”, नारुतात्या हताश स्वरात.

“कशाला जीव जाळताय एवढा, व्ही.आर.एस. घेऊन टाका”, शामराव बारामतीकर

“त्याने काय होणार आहे शामराव, नोकरीरुपी म्हातारी मरेल पण काळ सोकावतोय त्याचे काय?”, नारुतात्या.

“अरे पण झाले काय ते सांगाल का?”, घारुअण्णा काहीच न कळल्यामुळे बुचकळ्यात पडून.

“घ्या! म्हणजे तुम्हाला अजुन समजलेलं दिसत नाहीये. अहो, आता म्हणे सरकारी नोकरीतल्या बढतीमध्ये आरक्षण आणतय सरकार”, शामराव बारामतीकर.

“शिरा पडली त्या सरकारच्या…. अरे हे काय चालवलेय काय? हे म्हणजे आता ह्या सरकारी ब्राह्मणांना सरकारी यज्ञोपवित घालण्यासारखेच आहे. हे विश्वेश्वरा बघतो आहेस का रे? काय चाललेय हे”, घारुअण्णा रागाने तांबडे होत.

“घारुअण्णा, जरा जपून, चिडला आहात, ठीक आहे, पण हे असे तोल जाऊन बरळणे चांगले नाही”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनहृदयसम्राट, ज्याचे जळते ना त्यालाच कळते”, घारूअण्णा आवेगात.

“देवळात लांबच्या लांब रांग लावून कधी उभे राहिले आहात का, दहा-दहा तास्स? त्यावेळी एखादा सरकारी व्हिआयपी येऊन मध्येच आरामात दर्शन घेऊन जातो किंवा एखादा पुजार्‍याला अभिषेकासाठी पैसे देऊन विनासायास दर्शन मिळवतो त्यावेळी तुमची चिडचीड कधी झाली नाहीयेय का? त्यावेळी तुमची जी चरफड होते, तस्सेच आहे हे अगदी”, चिंतोपंत.

“फरक आहे!” भुजबळकाका प्रत्येक शब्दावर जोर देऊन.

“चिंतोपंत, तुम्ही महत्वाचा मुद्दा विसरताय ह्या दोन्ही केसमध्ये! खरा फायदा हा त्या पुजार्‍याचा झालेला असतो. आणि विषेश म्हणजे त्या फायद्यासाठी त्यांनीच ते आरक्षण घडवून आणलेले असते. त्यामुळे त्यावेळी जी चरफड होते ना ती ह्या जाणीवेमुळे होते. आता मला सांगा, ह्या मुद्याने तुमची चिडचीड कधी झालीयेय का? माझी खात्री आहे झालेली नसणारच”, अंगठा आणि तर्जनी उडवून पैशाची खूण करत, पुजारी आणि आरक्षण शब्दांवर जोर देत भुजबळकाका.

“भुजबळकाका तुमचा मुद्दा मान्य, पण ह्या असल्या प्रकाराने गुणवत्तेचे काय? ती डावलली नाही का जाणार?”, नारुतात्या.

“म्हणजे बहुजनांमध्ये गुणवत्ता नसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?”, भुजबळकाकाही जरा आवेगात.

“एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचेय, आहे ना गुणवत्ता! मग कशाला हव्यात ह्या असल्या कुबड्या?”, नारुतात्या.

“अरे, अजुनही ही उच नीचता एवढी आहे की नोकरीमध्ये योग्यता असूनही बढतीच्या संधी मिळत नाहीत जातीच्या राजकारणामुळे. चक्क एका आय.ए.एस. अधिकार्‍याला मिळणार्‍या उच्चवर्णिय कनिष्ठ श्रेणी कामगाराकडून मिळणार्‍या वागणुकीचा किस्सा सत्यमेव जयतेमुळे कळला नं तुम्हाला. हे आहे हे असे आहे! दोन्हीकडच्या बाजूंचा विचार व्हायला हवा.”, भुजबळकाका.

“म्हणजें नेमका कसां?”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, मगाशी मी जे म्हणालो त्याचे उत्तर द्या ना आधि म्हणजे मग नेमका कसां ते सांगतो. देवळातले आरक्षण चालते का तुम्हाला?”, भुजबळकाका ठामपणे.

“हे म्हंजे कै च्या कै झाले हा तुमचे बहुनजसम्राट!”, घारुअण्णा घुश्शात.

“बरं! आम्ही देवळाच्या प्रश्नात घुसलो की लगेच तुम्हाला आलेला राग तो खरा, पण तुम्ही काहीही वक्तव्य केले आणि आम्हाला राग आला तर ते कै च्या कै. हा खासा न्याय आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“अहो पण मुद्दा गुणवत्तेचा आहे भुजबळकाका”, शामराव बारामतीकर.

“मीही तेच म्हणतोय, मुद्दा गुणवत्तेचाही आहेच! पण गुणवत्ता ही एका वर्गाची मक्तेदारी कशी काय?”, भुजबळकाका.

“अहो सोकाजीनाना, नुसतेच हसताहात काय? बोला ना काहीतरी?”, चिंतोपंत, मिष्कील हसत असलेल्या सोकाजीनानांना.

“आज आपण काय ठरवायला भेटणार होतो”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आपल्या वर्षाविहाराचा प्रोग्राम ठरवायला, त्याचे इथे काय?”, बुचकाळ्यात पडत चिंतोपंत.

“अहो, तीच तर गंमत आहे ना. आपापल्या घरी जायची वेळ झाली आणि आपण आपला प्रोग्राम ठरविण्याच्या मुद्याला स्पर्शही केलेला नाही”, सोकाजीनाना.

“पण त्याचे काय?”, नारुतात्या, आता बुचकळ्यात पडायची पाळी त्यांची होती.

“सरकारही नेमके हेच करते आहे. मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांपासून जनतेला दूर करायचे असले की असले काहीतरी पिल्लू द्यायचे सोडून. मग बसते जनता असली अफूची गोळी चघळत आणि त्याच तारेत. ह्यात मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांमुळे अडचणीत येण्याच्या शक्यतेवर धुरळा बसतो. झाले! सरकारला नेमके हेच हवे असते. गेली साठ – पासष्ठ वर्षे हेच चालले आहे आणि अजुनही आपण त्यातुन शहाणे व्ह्यायला तयार नाही. कोळसा प्रकरण अंगाशी येतेय असे दिसताच हे आरक्षणाचे पिल्लू दिले सोडून. बसा आता चघळत हा विषय. तर भुजबळकाका, आहे हे अस्से आहे अगदी”, मिष्कील हसत सोकाजीनाना.

“काय पटतय का? पटलं असेल तर चहा मागवा आणि वर्षाविहाराचा प्रोग्राम ठरवायला घ्या आणि त्या प्रवासातल्या बसमधे भुजबळकाकांची सीट आधि आरक्षित करा”, मोठ्ठ्याने हसत सोकाजीनाना.

नारुतात्यांनी हसणे आवरत चहाची ऑर्डर दिली.