चेन्नै नीलम चक्रीवादळच्या विळख्यात

आज चेन्नै निलम चक्रीवादळाच्या ‘विळख्यात’ सापडले आहे. संध्याकाळी साधारण 5:30 च्या सुमारास चेन्नैच्या किनार्‍यावर ते जवळजवळ 100 किलोमीटर प्रती तास ह्या वेगाने थडकणार आहे. ह्या नीलमचा प्रवास चेन्नैच्या कड्डलूर ह्या किनार्‍यावरून आंध्र प्रदेशातल्या नेल्लूर च्या दिशेने होणार आहे.

उपग्रहाने टिपलेले हे ह्या नीलमच्या सद्य परिस्थीचे छायाचित्र

चेन्नैतल्या सर्व शाळा कॉलेजेसना तसेच सरकारी कचेर्‍यांना सुट्टी जाहिर केली आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ‘अमेरिकेतील सँडी ह्या वादळाला भारताने नीलमच्या रुपाने उत्तर देऊन, भारत अमेरिकेच्या कणभरही मागे नाही’ अशी चर्चा विनोदी अंगाने चालू होती. पण खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मात्र हे चक्रीवादळ गंभीरतेने घेऊन, त्यांचे कर्मचारी सुखरूप घरी पोहोचावेत ह्याची काळजी घेतली आहे. (ते ‘आपापल्याच’ घरी पोहोचतील ह्याची हमी देण्याची जबाबदारी मात्र ह्या कंपन्यांनी घ्यायला नकार दिला आहे असे वृत्त आहे 😉 )

ह्या चक्रीवादळाबरोबरच मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली गेली आहे, पण त्या आधिच पावसाने दुपारभर जोरदार वार्‍याच्या साथीने थैमान घातले होते. आता जरी पाउस शांत असला तरीही तुफानी वार्‍याचा जोर कायम आहे. हे चक्रीवादळ किनार्‍यावर थडकायच्या आधिच काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत तर विजेचा लपंडाव अपेक्षेप्रमाणे चालू आहे.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी कितपत आहे, हे चक्रीवादळ झेलण्याची, हे उद्या सकाळीच कळेल.

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या.

“अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत.

“अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका.

“नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय?  खी खी खी…”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली.

“हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी! आमच्या सचिनचा असा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.”, घारुअण्णा तणतणत.

“च्यामारी, परवा तर, छॅsss, ह्या सचिनने आता रिटायर होण्यातच शहाणपणा आहे असे तुम्हीच म्हणत होतात ना!”, भुजबळकाका उपरोधाने.

“अहो बहुजनसम्राट, प्रत्येक वेळी वाकड्यांतच शिरायला हवें का?”, लालेलाल होऊन.

“ह्या क्रिकेटचा बट्ट्याबोळ झाला आहे! असे तुम्हीच म्हणता ना हो घारुअण्णा, म्हणून भुजबळकाका तसं म्हणत असतील!”, नारुतात्यांनी चर्चेत तोंड घातले.

“तुम्ही काय त्यांचे वकीलपात्र घेतलेंय का?”, घारुअण्णा घुश्शात.

“नाही पण खरे आहे घारुअण्णा म्हणतात ते. मॅथ्यु हेडनच्या पोटात का दुखतंय ते खरंच कळलं नाही”, चिंतोपंत.

“त्या हरभजनने बरीं खोड मोडली होती त्याची”, घारुअण्णा.

“अहो, पण तो तसं बोलला तर प्रॉब्लेम काय तुम्हाला?”, भुजबळकाकाही आता सीरियस होत.

“तुम्हाला नाही कळणार हो हा उद्वेग, विनोद कांबळी बद्दल जर असे काही झाले असते, तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटले असते, हो ना?”,  आता घारुअण्णा उपरोधाने.

“हे बघा, घारुअण्णा,  आता तुम्ही वाकड्यात शिरताय”,  भुजबळकाका काहीसे दुखावले जात.

“अहो, एका देशाने एका खेळाडूच्या कारकीर्दीची उत्स्फूर्तपणे घेतलेली दखल आहे ही, त्याच्या कारकीर्दीला दिलेला मानाचा मुजरा आहे हा आणि त्याचा आपल्याला अभिमान असायलाच हवा! म्हणून हेडनच्या ह्या वक्तव्याचा राग मलाही आला आहे, जसा घारुअण्णांना आला आहे.”, चिंतोपंत.

“कारकीर्द? मानाचा मुजरा? बरं बरं! मग जेव्हा दिलीप कुमारला ‘निशानं-ए-पाकिस्तान’ हा खिताब पाकिस्तानने दिला होता आणि त्याने तो स्वीकारला होता तेव्हा त्याला पाकिस्तानात हाकलून द्या असे तुम्हीच तावातावाने म्हणत होता ना हो घारुअण्णा”, भुजबळकाका.

“अरें देवा! ह्या भारतात, ह्या मुस्लिमांचे लांगूलचालन कधी बंद होणार आहे हे तो आकाशातला विश्वेश्वरच जाणे रे बाबा.”, घारुअण्णा उद्वेगाने.

“घारुअण्णा, तुमच्या अंगाशी आले की नेहमी त्या विश्वेश्वराला साकडें घालायची तुमची आयडिया भारीच आहे हा, खी… खी… खी… ”, नारुतात्या.

“अरे काय तुम्ही, कुठून कुठे ताणत आहात ह्या विषयाला”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“अहो सोकाजीनाना तुम्हीच सांगा, आता ह्यात घारुअण्णांचे काय चुकले?”, चिंतोपंत.

“त्याचं काय आहे चिंतोपंत, घारुअण्णांचे काय चुकले ते सोडा. हेडनचे काय चुकले ते सांगा. अहो, तो एक ऑस्ट्रेलियन आहे. त्यालाही ऑस्ट्रेलियन अस्मिता वगैरे असणारच, की नाही? त्यातही आपल्या सचिनने त्यांना त्राही भगवान कडून सोडले होतेच, त्याचीही ठसठस कुठेतरी असेलच ना. पण त्यामुळे तो जे काही बोलला ते चुकीचे कसे असेल? त्याच्या देशाचा एक सर्वोच्च बहुमान एका परकीयाला देण्यास त्याचा विरोध असेल तर त्यात त्याचे काय चुकले? काय घारुअण्णा आणि चिंतोपंत, मी नेमकं काय म्हणतोय ते ध्यानात येतंय का?”,

“त्याच्याही देशात लोकशाही आहेच की. त्या लोकशाही अंतर्गत त्या लोकशाहीने त्यालाही व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केलेले आहेच. त्यामुळे त्याने जे वक्तव्य केले ते करण्याचा त्याला हक्क आहेच. आणि तो जे म्हणाला ती त्याचा वैयक्तिक मताची पिंक होती. त्याला ना ऑस्ट्रेलियन सरकारने भीक घातली ना आपल्या सचिनने.”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्या हेडनला एवढा सारासार विचार करण्याची शक्ती असती असती तर एक चेंडू धोपटत बसण्याचा खेळ खेळण्यापेक्षा, आपल्या चावडीवरचा, तुमच्यासारखा विचारवंत नसता का झाला? काय पटतंय का? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

चिंतोपंतांनी मान हालवत चहाची ऑर्डर दिली.

ब्लॉग माझा 2012 स्पर्धा आणि माझा ब्लॉग

आज ‘कर्णोपकर्णी’ ह्या शब्दाचा अर्थ मला लागला.  🙂

सप्टेंबर मध्ये ब्लॉग माझा 2012 स्पर्धेची बातमी वाचली आणि त्यात सहभागी होण्याचे ठरवून त्यात भाग घेतला. तो  सहभाग घेताना ‘कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस’ हा कृष्णाच्या भगवतगीतेचा सार अगदी लक्षात ठेवला होता (आता माझे नावच ब्रिजेश [ब्रज  + इश] त्यामुळे हे लक्षात ठेवावेच लागत नाही 🙂  ). त्यामुळे ते विसरूनच गेलो होतो. स्पर्धेच्या फॉर्ममध्ये, ‘फक्त विजेत्यांनाच’ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात  मेलद्वारे स्पर्धेचा निकाल कळविण्यात येईल असा एक मुद्दा दिलेला होता. पहिल्या आठवड्यात काही मेल आले नाही त्यामुळे मग फळाची अपेक्षा सोडूनच दिली होती.

पण आज माझा एक ब्लॉगर मित्र, ज्याला आम्ही प्रेमाने ‘डॉन्राव’ म्हणतो (‘ब्लॉग माझा’ चा पहिल्या वर्षीचा पारितोषिक विजेता), त्याने मला एक मेसेज पाठवून “एबीपी ब्लॉग माझा 2012 च्या स्पर्धेत तुला बक्षिस मिळाले आहे त्याबद्दल अभिनंदन” असा मेसेज पाठवला. तो पर्यंत काही मी पर्सनल मेल्स चेक केलीच नव्हती (ऑफिसमध्ये सर्व पर्सनल मेल्स बॅन्ड आहेत). त्यानंतर बर्‍याच जणांचे एसएमेस आणि फेसबुकवर मेसेज आले.

लगेच मोबाइल वरून मेल चेक केले आणि प्रसन्न जोशी यांचा हा खालील मेल आला होता.

प्रिय ब्लॉग माझा २०१२ स्पर्धक,

 सोबत यंदाच्या स्पर्धेच्या निकालाची प्रत पाठवित आहे.
 हाच निकाल एबीपी माझाच्या www.abpmajha.in या वेबसाईटवर आज संध्याकाळी उशीरा किंवा उद्या सकाळपर्यंत दिसू शकेल.
 फक्त विजेत्यांना पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कळविले जाईल.
 
आपला,
 प्रसन्न जोशी,
असो. सिनिअर प्रोड्युसर-अँकर, एबीपी माझा.

हा मेल वाचल्यावर आनंदाला पारावर राहिला नाही कारण ह्या स्पेर्धेत निवडलेल्या दहा उत्तेजनार्थ ब्लॉगमध्ये माझ्या ब्लॉगचा समावेश आहे!
हे नक्कीच अभिनंदनिय तर आहेच पण त्याचबरोबर अजुन चांगले लिहीत रहाण्याची जबाबदारी वाढली आहे ह्याने जरा दडपणही आले आहे.
पण असो, हा आनंद माझ्या लाडक्या ‘लॅफ्रॉंय़’  ह्या सिंगल मॉल्ट व्हिस्कीच्या साथीने साजरा करण्यात आलेला आहे 🙂

सर्वप्रथम, ही संधी सर्व मराठी ब्लॉगर्सना उपलब्ध  करून दिल्याबद्दल एबीपी माझाचे मनापासून आभार . ह्या स्पर्धेच्या सर्व परिक्षकांचे, वेळात वेळ काढून सर्व ब्लॉग्स (जवळ जवळ दिडशे) वाचून, त्यांतून विजेते निवडण्याबद्दल आभार.

ह्या माझ्या ब्लॉगवरील सर्व वाचकांचे ह्या निमित्ताने मी आभार मानतो.  तुमच्या प्रतिसादांमुळे  आणि वाचनामुळेच लिहीण्याचा हुरुप कायम राहिला आणि काहीबाही नविन लिहीत राहिलो.  मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाचे आणि तेथिल वाचकांचेही आभार, माझी लेखनकला ही तेथेच बहरली आणि तिथल्याच मित्रांच्या प्रोत्साहनाने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कोणाचेही नाव इथे घेणे हा बाकीच्यांवर अन्याय होईल इतके हितचिंतक ह्या एका वर्षाच्या लेखनप्रवासात लाभले आहेत.  त्यामुळे सर्वांचेच आभार.

पण ह्यावेळी माझ्या बायकोचे आभार न मानले तर हा तिच्यावर अन्याय असेल. तिने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळेच हे यश बघू शकतो आहे. त्यामुळे ह्या यशात तिचाही फार मोठा हात आहे. माझ्या लेखांचे प्रुफ रिडींग नेहमी तिच करते. (आता ह्यापुढे माझ्या लेखात काही चुका आढळल्यास दोष कुणाला द्यायचा हे तुम्हाला कळले असेलच 😉 आपला दोष दुसर्‍यांवर कसा ढकलावा हा गुण कॉरपोरेट जगात नक्कीच शिकलोय!) .

तर बायको, तुझे आभार आणि अशीच साथ तु वर्षानुवर्षे देत रहा हीच एकमेव मागणी. (फक्त ह्याच जन्मी बर कां, नाही काय आहे, मलाही तुझी काळजी आहे म्हटलं  😀 )

– आपलाच, ब्रिजेश मराठे

चावडीवरच्या गप्पा – लग्नाचे वय

“कळस आहे हा मूर्खपणाचा! हसावं का रडावं ह्यापुढे आता?”, नारुतात्या कपाळाला हात लावतच चावडीवर आले.

“कोणांचा आणि कसलां मूर्खपणां नारुतात्या?”, घारुअण्णा.

“अहो, ही खाप पंचायत हो! म्हणे मुला- मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करा, का? तर त्याने म्हणे बलात्काराचे वाढते प्रमाण कमी होईल, आहे की नाही मूर्खपणा”, नारुतात्या.

“ह्या शिंच्या पंचायतीला भारीच ब्वॉ पंचायती?”, घारुअण्णा.

“सोळाव्या वर्षीच मुलामुलींचे लग्न झाली तर ती भरकटणार नाहीत आणि त्यातून बलात्काराच्या घटना घटतील असे त्यांचे म्हणणे आहे हो.”, शामराव बारामतीकर.

“आयला खरंच आचरटपणा आहे हा. लहान वयात लग्न आणि बलात्काराचा काय संबंध?” भुजबळकाका.

“नाहीतर काय! बलात्कार काय ठराविक वयात करावीशी वाटणारी गोष्ट आहे काय? काय हो चिंतोपंत”, शामराव बारामतीकर.

“अं…अं…मला काय माहिती? मला का विचारताय हो बारामतीकर?”, चिंतोपंत एकदम गांगरून.

“खॅ.. खॅ.. खॅ.. तसे नाही हो चिंतोपंत, बारामतीकरांना म्हणायचेय की बलात्कार करण्याची पशुतुल्य भावना मनात उत्पन्न होण्यास वयाची अट नसते.”, नारुतात्या

“हो तर काय, मानसिक विकृतीच आहे ती आणि ती वयातित असते.”, शामराव बारामतीकर.

“ते बरीक खरेंच हो तुमचे बारामतीकर, पण मी काय म्हणतो आपल्याकडेही पूर्वी बालविवाह होत होतेच की, त्याचे कारण हेच असावे काय हो? नाही आपली एक शंका”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, तुमचं आपलं काहीतरीच असतं नेहमी. त्या बालविवाहांचा इथे काय संबंध ? ”, शामराव बारामतीकर जरासे उखडून.

“नाही? मग त्यामागे काय कारण असावे?”, घारुअण्णा.

“त्या काळीही बरेच मतप्रवाह होते म्हणतात लग्नाच्या वयावरून. तेही ह्या खाप पंचायतीला लाजवतील असे. आपले पूर्वजही काही कमी नव्हते बरं का.”, भुजबळकाका.

“सांगा तरी बघू कसें होते ते आमचे पूर्वज?”, घारुअण्णा उपरोधाने.

“आमचे? बरं! आठव्या वर्षी मुलीचा विवाह प्रशस्त होय, असे तुमच्या मनूने म्हटले आहे. रजोदर्शनापूर्वी आपल्या मुलीचे लग्न जो पिता, माता व ज्येष्ठ भ्राता करीत नाही तो नरकात जातो असेही सांगितले होते बरं का!”, भुजबळकाका.

“भुजबळकाका उगा जातीयवादात जावू नका. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत पूर्वीच्या काळी मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी ही पित्याची होती. वंश, जात-पोटजात, गोत्र इत्यादींसंबंधीचे नियमही त्या काळी फारच कडक होते. त्यामुळे वयात आलेल्या मुलीने स्वतःच वरसंशोधन करून, ह्या नियमांचे उल्लंघन होऊन समाजाचा रोष ओढवून घेणे हे त्या काळी परवडण्यासारखे नसल्याने, मुलगी वयात येण्यापूर्वीच तिचे लग्न उरकून टाकावे, अशी वृत्ती बळावली असावी. तसेच स्त्रीच्या चारित्र्यालाही अतिशय महत्त्व होतेच, मुलीचे कौमार्य ह्याचा तर बाऊ आजही आहे, त्यामुळे मुलीने मोहात पडून बदनाम होऊ नये यासाठी बालविवाहाची प्रथा रूढ झाली असावी.”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“पण हे काही पटत नाही हो सोकाजीनाना, मूर्खपणाच नाही का हा?”, शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर! तुम्ही आजच्या काळात राहून हा विचार करता आहात म्हणून ‘हा मूर्खपणा’ असे वाटते आहे तुम्हाला. टाइम्स हॅव चेंज्ड”, चिंतोपंत.

“चिंतोपंत एकदम बरोबर म्हणत आहेत.”, सोकाजीनाना.

“बरं! मी आजच्या ह्या काळात आहे मान्य, पण म्हणून मी म्हणतो ते चुकीचे असे कसे?”, शामराव बारामतीकर इरेला पेटून.

“तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे तेच तर कळतं नाहीयेय ना! खी… खी… खी…”, नारुतात्या.

“अहो नारुतात्या, माझे म्हणणे एवढेच आहे ही लग्नाचा आणि बलात्काराचा जसा संबंध नाही तसा लग्नाचा आणि वयाचाही काही संबंध नाही? शरीरसंबंधासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेला कोणीही केव्हाही लग्न करू शकतो.”, शामराव बारामतीकर.

“घ्याsss लग्न काय फक्त शरीर संबंधासाठीच करायचे असते.”, नारुतात्या.

“नारुतात्या, मनुष्यप्राणी लग्न का करतो? तो पशूंपेक्षा वेगळा आहे. त्याला सामाजिक जाण आहे. त्या जाणिवेमुळेच, पशूंप्रमाणे स्वैराचार बोकाळला तर, जोडीदारासाठी हाणामार्‍या होऊन मनुष्यजात नष्ट होऊ नये ह्यासाठी लग्न संस्था त्याने उभी केली असावी. त्यामुळे लग्नाचे एक मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे शामराव बरोबर बोलत आहेत आणि त्यांचे पटतंयही.”, सोकाजीनाना .

“पण शामराव म्हणत आहेत तसा वयाचा अगदीच संबंध नाही असे नाही. वयाला तर बरेच महत्त्व असायला हवे. पण तुमची जी चर्चा चालली होती त्या अनुषंगाने नव्हे एका वेगळ्याच अर्थाने.”, सोकाजीनाना.

“म्हणजे नेमके कसे?”, चिंतोपंत.

“म्हणजे असं बघा, आपण भारतीय जनरली लग्नाचा विचार कधी करतो? सेटल झाल्यावर. म्हणजे स्थिर नोकरी मिळाली की. आता तर काय स्वतःचे घर असल्याशिवाय लग्नाचा विचारही करता येत नाही. त्यात पुन्हा आताच्या रॅट रेसमुळे करियर घडविणे महत्त्वाचे, मग लग्न. त्या नादात तिशी कधी ओलांडते हे कळतही नाही. मग लग्न. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लग्नाचे एक मुख्य कारण हे शरीरसंबंधच असते. पण आपल्या तथाकथित संस्कृतीच्या पगड्यामुळे हे लग्न होईपर्यंत आपल्याला शरीर म्हणजे काय आणि त्याची मागणी काय हेच माहिती नसते. तसे काही शिकवलेलेही नसते. जोडीदाराचे शरीर आणि त्यातले बारकावे, खाचाखोचा, सौंदर्य, मादकता ह्या सर्व गोष्टींची खर्‍या अर्थाने ओळख होईपर्यंत आणि कळेपर्यंत तारुण्याचा भर ओसरून गेलेला असतो. पुरुषाच्या पोटावर आणि स्त्रीच्या कमरेवर चरबीचे टायर चढलेले असतात. त्यात तिशीच्या आसपास लग्न केल्यामुळे प्लॅनिंग करून मुलं होणे लांबवणे शक्य होत नाही. मग मुले झाले की मग जोडीदाराला वेळ देता येत नाही. ह्या सर्वांवर काहीबाही उपाय करत थोडे दिवस गेले की लगेच मिड लाईफ क्रायसेस डोके वर काढतो. झालं ह्या साठीच केला होता का हा अट्टहास असे म्हणायचे वेळ येते.”, सोकाजीनाना, थांबून सगळ्यांकडे बघत.

“प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक वेळ असते, ती त्या त्या वेळी व्ह्यायला हवी. भूपाळी रात्री झोपताना म्हटली तर चालेल का? नाही ना! लग्नाचे आणि वयाचेही तसेच आहे. मला हे असे म्हणायचे होते. काय पटतंय का? पटत असेल तर चहा मागवा.”, सोकाजीनाना.

सर्वजण सोकाजीनाना नेमके काय म्हणाले ह्याचा अर्थ लावण्यात गर्क असल्याने मग सोकाजीनानांनीच हसत हसतं चहाची ऑर्डर देऊन टाकली.

अमिताभ, जीवेत शरद: शतम!

हिंदी चित्रपट सृष्टीचा चेहरा मोहरा बदलवून टाकणार्‍या, सहस्त्रकातील सर्वोत्तम अभिनेत्याला, आणि माझ्या लाडक्या अमिताभला त्याच्या सत्तराव्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा.

त्याच्या परिवारासोबत राहून आजच्या दिवसाचा आनंद त्याने लुटावाच पण पुढची आणखिन 70 वर्षे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी अशाच शुभेच्छा पोस्ट टाकत रहावे ही इश्वराच्या चरणी प्रार्थना!

माझ्या ह्या लाडक्या अभिनेत्याच्या काही भावमुद्रा!

अमिताभ, जीवेत शरद: शतम!

चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय झाले आता?”, कोणीतरी.

“अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा.

“काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर.

“बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर.

“मग काय! आता भगवा आणि निळा युती आहे म्हटलें!”, घारुअण्णा उपरोधाने.

“हे बघा, ही सरळ गोष्ट आहे, उगाच कीस पाडू नका! मी आधीही म्हटलेच होते मंत्रालयाला आग लागली तेव्हा की ती काही साधीसुधी आग नव्हती.”, भुजबळकाका काहीसे आक्रमक होत.

“फरक आहे ना, तुम्ही चावडीवर बरळला होतात, पण आता आमचा उद्धव तेच जाहीरपणे बोलतोय, खी खी खी”, घारुअण्णा टिपीकल चिपळुणी अंदाजात, “पण जे काही बोलतोय ते खरेंच आहे हों! हे अजित’दादा’ आता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ‘राजीनामा आपण फेकला, आता होऊन जाऊ द्या चौकशी’ असा आव आणत मिशीला तूप लावून फिरत आहेंत.”

“तेच तर, मंत्रालयाच्या आगीत घोटाळ्यांची कागदपत्रे जाळून राख केली, त्यामुळेच तर त्यांच्यात हे एवढे धाडस, हिंमत आलीय, त्याचा मंत्रालयातील आगीशी संबंध खचितच असणार”, भुजबळकाका.

“ते ठीकच आहे हो! पण पुढे दादा आणि ताईंना राज्य आणि केंद्र आंदण दिले आहे का? असला फालतू सवाल करण्याची काय गरज होती?”, शामराव बारामतीकर.

“तो फालतू सवाल कसा काय हों?”, घारुअण्णा.

“का हो! मग आम्हीही विचारू शकतो, मागे जेव्हा तुम्हाला सत्ता बहाल केली होती तेव्हा का मग सगळे राज्य आंदण मिळाल्यासारखे वागत होतात? झुणका भाकर केंद्रांच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या त्याचे पुढे काय झाले?”, शामराव बारामतीकर अजिबात विचलित न होता.

“अहो बारामतीकर, विषय सिंचन घोटाळ्याचा चालला आहे!”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, तुमच्या वर्मावर बोट ठेवले की कसे लागते ना लगेच तुम्हाला. तरी मी अजून बाकीच्या गोष्टी बोललोच नाहीयेय अजून.”, शामराव बारामतीकर.

“बारामतीकर हा राजीनामा त्यांनी दिलेला नाहीयेय. काकांनी त्यांना द्यायला लावलाय. त्यांना सुप्रियाताईंसाठी ‘गादी’ तयार करायची आहे ना! लोकशाही अंतर्गत असलेली घराणेशाहीच आहे ही कॉग्रेसची. खी…खी…खी….”, भुजबळकका.

“घराणेशाही ही काय फक्त काँग्रेसमध्येच आहे? काय हो घारुअण्णा बोलू का?”, शामराव बारामतीकर.

“हे बघा उगाच राळ उडवायचा प्रयत्न करू नका, तमाम शिवसैनिकांचीच ती इच्छा होती.”, चिंतोपंत.

“बरोबर आहे, फक्त तमाम शिवसैनिकांचीच होती ती इच्छा, एका सेनापतीची सोडून. पण काय हो ह्या असल्या इच्छा काय फक्त सैनिकांनाच असतात काय हो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय इच्छा नसतात काय हो?”, शामराव बारामतीकर.

“अरे तुम्ही सगळे कुठून कुठे वाहवत चालला आहात?”, इतका वेळ निमूट बसलेले नारुतात्या.

“बोला, बोला सोकाजीनाना तुम्हीच सांगा आता ह्यां सगळ्यांना!”, नारुतात्या.

“उद्धवचे कार्य साध्य झाले. त्याला जे साधायचे ते त्याने मेळाव्यात जाहीर प्रकटन करून साध्य केलेच. त्याला मतदार राजाला नेमके असेच जागे करायचे होते. ते झाले!”, मंद हसत सोकाजीनाना, “अरे, हे सगळे जवळ येत चाललेल्या निवडणुकांचे पडघम आहेत. विरोधकांकिषयी रान उठवण्याची रंगीत तालीम आहे ही. मतदार राजा जागा हो!”

“अहो पण मतदार राजाने जागे होऊन करायचे काय? सगळेच साले चोर लेकाचे. मतदान करायचे तरी कोणाला. त्यातल्या त्यात कमी चोराला निवडून दिले की पाच वर्षांत तो एक मोठा दरवडेखोरच बनून जातो”, चिंतोपंत त्यांची खंत व्यक्त करत.

“त्याचे काय आहे चिंतोपंत, गंगाजल सिनेमात अजय देवगण म्हणतो, ‘समाज को सरकार और पुलीस वैसीही मिलती है जैसा समाज खुद होता है’ ते अगदी खरे आहे. तुम्ही ही जी आहे ती परिस्थिती बदलवू शकता का? आमूलाग्र बदल कोणीतरी घडवून आणण्यापेक्षा तो स्वतः घडवण्याची पात्रता किंवा धाडस आहे का तुमच्यात? नुसत्या चर्चा झोडून उसासे सोडण्यापेक्षा ह्या सिस्टिमला पर्यायी सिस्टिम शोधण्याची आणि बनविण्याची तयारी आहे का तुमची? नसेल तर मग जे आहे त्यातले चांगले ते वेचून वाईट सोडून द्यायची तयारी ठेवा आणि जर असेल तर एक आंदोलन करायची तयारी करा!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“सोडा हो ह्या बातां आणि चहा मागवा”, सोकाजीनाना.

चिंतोपंतांनी मान हालवत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

धुक्यात हरवली वाट…

मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. त्यावेळी मागच्या पोस्टमधल्या भुछत्रांचे फोटो काढून परत येताना ही धुक्याची दुलई अतिशय दाट झाली आणि धुक्यात हरवली वाट…

जरी फोटोंमधले हे सर्व वातावरण अगदी रम्य आणि उन्मादक असले तरीही एक उदासी होती तेव्हा तिथे माझ्या मनात. हे सर्व फोटो इथे टाकताना काही फार छान फिलींग मात्र नाहीयेय. कारण विचारताय? बरं सांगतो… कारण इतक्या छान रोमॅन्टीक ठिकाणी ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर हातात हात गुंफून फिरायला बायको बरोबर नव्हती 😦 सगळे मद्रासी अण्णा बरोबर होते, काहीतरी पांचट जोक्स करत, तेही तमिळ मध्ये 😦

असो, पण त्याने ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवरची उन्मादकता कमी होत नाही नक्कीच!