चावडीवरच्या गप्पा – स्मारक

“काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.

“ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्‍यावर आणत.

“हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला. सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना असेच म्हणावे लागेल.”, घारुअण्णा एकदम सुतकी चेहेर्‍याने.

“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठीसुद्धा!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“चला, ह्या निमित्ताने तरी घारुअण्णा आणि बहुजनह्रदयसम्राटांचे एकमत झाले! मला वाटले आता ‘सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना’ वरून जुंपते की काय… खीs खीss खीsss”, नारुतात्या पांचट विनोद करत.

“नारुतात्या, तुम्हाला कसला पोचच नाही, कुठे काय बरळावे ह्याचा काही अंदाज?”, इति चिंतोपंत.

“असो, आम्ही गेलो होतो फिरायला पण तो दिवस हॉटेलातच बसून काढला, अंत्यदर्शनासाठी जमलेली गर्दी बघून आपली तर छातीच दडपून गेली ब्वॉ.”, घारुअण्णा एकदम भावुक होत.

“हो! २० लाख लोक जमले होते म्हणे शिवाजी पार्कात. साहेबांचा हिंदूहृदयसम्राट असण्याचा ह्याहून भरभक्कम पुरावा तो काय असेल दुसरा”, इति चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत, तो २० लाख म्हणे उगाच फुगवलेला आकडा आहे. एवढी माणसे जमायला तिथे जागाच नाहीयेय म्हणे”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“बरंsssबरंsss, तुमच्या सकाळ समूहानेच लावला असेल हा असला जावईशोध, नाही का?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, तुम्हाला असे बोलवतेच हो कसे? त्या २० लाखाच्या आकड्यांवर बर्‍याच जणांचा आक्षेप आहे इतकेच मला म्हणायचे होते.”, इति बारामतीकर.

“अहो, आकडा कसा काय महत्त्वाचा असेल? तो अंत्यविधीसाठी आपणहून जमलेला जमाव होता, कोणाचे शक्तिप्रदर्शन नव्हते आकड्यात मोजायला.”, घारुअण्णा रागाने लाल होत.

“जाऊ द्या हो घारुअण्णा, ह्याचा इश्यू करून काही फायदा नाहीयेय. सोडून द्या, २० लाख काय किंवा २ लाख काय, संपूर्ण अंत्ययात्रा आणि अंत्यविधी शांततेत पार पडला हे महत्त्वाचे!”, इति भुजबळकाका.

“अहो, मला कुठे इश्यू करायचाय ह्याचा, ह्या सेक्युलरवाद्यांचेच हे नेहमीचे अवलक्षण असते.”, घारुअण्णा रागात घुमसत.

“तो २० लाखांचा आकडा जाऊद्या, पण बाळासाहेबांचे स्मारक तर शिवाजी पार्कात व्हायलाच हवे! त्यावरही काही सेक्युलरवाद्यांचा आक्षेप आहे, आता बोला ”, चिंतोपंत.

“भले शाबास! हिंदूंसाठी ह्या भारतात काहीही करायचे झाले तर प्रत्येक वेळी ह्यांची परवानगी मागायची, हे म्हणजे हिंदू अस्मितेवर हल्ला आहे! हे होणे नाही! हम स्मारक वहीं बनायेंगे!”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“अहो घारुअण्णा का उगाच ‘हिंदूंवर अन्याय’ हा प्रपोगंडा करताय, शिवाजी पार्क खेळाचे मैदान आहे. तिथे कसले स्मारक उभारताय?”, भुजबळकाका शांतपणे.

“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, ज्या शिवतीर्थावर या महानेत्यानं साडेचार दशकं अधिराज्य गाजवलं, ज्या ठिकाणी चिरनिद्रा घेतली, त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभे राहणे उचित आहे.”, चिंतोपंत जरा तडकून.

“मान्य, बाळासाहेब हे देशातील एक महान नेते होते त्यामुळे त्यांचं स्मारक उभारायलाच हवं. या भावनेशी मी असहमत नाही. फक्त, शिवाजी पार्क मैदानात हे स्मारक बांधणं योग्य होणार नाही.”, भुजबळकाका ठामपणे .

“बरं मग, इंदू मिलच्या जागेवर हे स्मारक बांधण्यावर आपले काय मत आहे बहुजनह्रदयसम्राट?”, घारुअण्णा घुश्शात.

“त्यापेक्षा, कोहिनूर मिलच्या जागेवर हे स्मारक बांधले तर?”, नारुतात्या काडी सारत.

“इथे तर मराठी माणसालाच काही पडले नाहीयेय तर बाकीच्यांना दोष देऊन काय उपयोग?”, घारुअण्णा हताश होत.

“अहो डोंबलाचे मराठी माणसाचे मत! भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच!”, भुजबळकाका ठामपणे.

“अहो भुजबळकाका, मनोहरपंत जोशीसरांनीसुद्धा स्मारक शिवाजी पार्कात व्हायला हवे असेच म्हटले आहे.”, चिंतोपंत.

“नाही चिंतोपंत, त्यांना तसे बोलायला काय जातेय? तसेही जोशीसरांचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पीळ काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.

“हो, अहो आचरटपणा आहे हा सगळा. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार करण्याची मागणी आधीच झाली आहे आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुन्हा इंदू मिलचे नाव सुचवणे हा शुद्ध आचरटपणा आहे. त्यानंतर कोहिनूर मिलच्या जागेचे नाव निघताच जोशीसर कासावीस झाले आहेत आणि त्यामुळेच शिवाजी पार्काचा त्यांनी हट्ट धरला आहे. वेळ आल्यास शिवसैनिकांनी कायदा हातात घ्यावा असेही त्यांनी सुचवले आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्‍याने.

“सोकाजीनाना, ह्यातही राजकारण?”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.

“तर काय! हे सगळे गलिच्छ राजकारण आहे. जोशीसरांकडून ह्यावेळी तरी ही अपेक्षा नव्हती.”, सोकाजीनाना काहीसे हळवे होत.

“अहो, ‘शिवसेनाप्रमुख हे सच्चे क्रीडाप्रेमी होते. त्यामुळे मैदानांवर खेळणारी पावले थांबवून, खेळाचा श्वास कोंडून तिथे आपले स्मारक उभारणे, हे बाळासाहेबांनाही पटले नसते’ असे मत मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी व्यक्त केले आहे. स्मारक बांधण्याबद्दल काही हरकत नाही हो कोणाची. पण त्यातही राजकारण केले जावे ह्यात खुद्द बाळासाहेबांचा अवमान आहे हेही लक्षात घेत नाहीयेय कोणी.”, सोकाजीनाना शांतपणे, “शिवसेना भवन किंवा बाळासाहेबांचे घर, निवासस्थान, ह्या दोन्ही वास्तू बाळासाहेबांचे स्मारक म्हणून उचित स्थानं असू शकतात. ह्या दोन्ही जागांचे पावित्र्य आणि स्थानमाहात्म्य तेवढे थोर नक्कीच आहे. बाळासाहेबांच्या हस्तस्पर्शाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या वास्तू खरेतर त्यांची अस्तित्वात असलेली स्मारकेच आहेत. ही दोन्ही ठिकाणे शिवसैनिकांना आणि मराठी तरुणांना नेहमीच स्फूर्ती देत राहतील ह्यात कोणाला शंका असण्याचे काही कारणच नाही. त्यामुळे नवीनं जागा शोधून त्यावर स्मारक बांधण्याचे राजकारण करत बसण्यापेक्षा ते स्मारक नेमके कसे असावे त्याचे स्वरूप कसे असावे ह्याबद्दल चर्चा केली जाणे महत्त्वाचे आहे.”

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

कॉकटेल लाउंज : गोवन समर

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर

पार्श्वभूमी:

मागच्या आठवड्यात 3-4 दिवसांचा गोव्याचा दौरा करून आलो. ह्यावेळी येताना काजू फेणीच्या दोन बाटल्या आणल्या. पहिल्यांदाच काजू फेणी ट्राय केली म्हणजे चव घेतली. ह्या आधि काजू फेणीबद्दलचे माझे मत बरेचसे पूर्वग्रहदूषीत होते (त्याचे कारण दुसर्‍या लेखात). आता ते सर्व ह्या काजू फेणीच्या उत्कृष्ट चवीमुळे बदलून गेले आहे. काजूच्या गराची एक मस्त चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी अफलातून (सेक्सी) चव आहे काजू फेणीला. मागे एकदा माझा मित्र नचिकेत गद्रे ह्याच्याशी काजू फेणीच्या कॉकटेलबद्दल ओझरती चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी काजू फेणी चाखली नसल्याने त्या चर्चेला म्हणावा तसा रंग भरला नव्हता.

आता फेणी चाखली असल्यामुळे, तिच्या चवीप्रमाणे काय कॉकटेल करता येइल ह्याचा अंदाज आला. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट, माझी रेसिपी.

प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी (Cazcar Brand) 2 औस (60 मिली)
कॉइंत्रो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
लिम्का
बर्फ
मीठ
लिंबाचा काप (सजावटीसाठी)
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लावून घ्या.

आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.

आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.

लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.

अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे 🙂

यक्कु उर्फ येश्या उर्फ यशवंत कुलकर्णी…

मागच्या 4 दिवसांच्या धमाल सहलीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अगदी वांझोटा गेला. काहीतरी रितेपण मेंदू कुरतडून टाकत होते. अगदी हताश नाही पण एक भकासपण व्यापून राहिले होते सभोवताली. कधी कधी असे होते की काही गोष्टीँची संगतीच लागत नाही आणि आपण एका पोकळीत असल्यासारखे असतो, भांगेच्या नशेत असावे तसे.

माझ्या बाबतीत असे व्ह्यायला कारण होता यक्कु. यशवंत कुलकर्णी, औरंगाबादेतला एक तरुण अवलिया. काल रात्री 1 वाजता फेसबुकवर बर्‍याच दिवसांनी लॉगिन केले तोच, ‘यकु तु असा कसा काय निघून गेलास’ असल्या पोस्ट दिसल्या. च्यायला, ह्याने परत काही घोळ घातला का काय इंदोरवरून परत येउन असा विचार करेपर्यंत RIP यकु असली पोस्ट दिसली आणि हबकलोच. त्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये असे हिंदोळे मन घेऊ लागले. मग मिसळपाव.कॉम वर लॉगिन केले आणि त्याच्यावर असलेली एक स्वतंत्र पोस्ट दिसली आणि मग खात्री पटली. फेसबुकबर एक मित्र ऑनलाइन होता. त्याच्याशी बोलणे झाल्यावर त्याच्या आत्महत्येची बातमी कळली. एकदम सुन्न झालो आणि त्याच तंद्रीत झोप लागली (10-11 तास ड्रायव्हिंगचा शिणवटाही त्याला कारणीभूत होता). पण सकाळी उठल्यापासून एक अनामिक पोकळी……

ह्या यकुची आणि माझी ओळख मिसळपाव.कॉम वर झाली. कशी आणि कधी नेमकी झाली तेही आता आठवत नाही. पण झालेली ओळख एकदम पक्की होती, अगदी जन्मज्न्मांतरीची असल्यासारखी. (हे असे बहुदा त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वाँच्याच बाबतीत खरे असावे). अतिशय तरल आणि भावनाप्रधान असलेला यक्कु, जे मनात असेल ते तोंडावर आणणारा. कोणाचीही कसलीही भीड न बाळगता, कसलाही मुलाहिजा न बाळगता त्याची ठाम मते व्यक्त करणारा. तो मला त्याच्या त्या स्वभावामुळेच कदाचित भावला असावा.

त्याची ओळख झाली तीच मुळी आभासी, आंतरजालावरची. त्याचे बरेचसे लिखाण न कळणारे, अतिशय उच्च किंवा सर्वसामान्य माणसांच्या आकलना पलिकडचे असावे तसेच असायचे. सुरुवातीला तो यु. जी. कृष्णमूर्तींवर विलक्षण लिहायचा. पण त्यानंतर हळूहळू त्याचे लिखाण हे एका अज्ञाताची अनामिक ओढ असलेल्या अनुभवांनी भरगच्च होऊ लागले. त्याचे लिखाण बर्‍याच वेळा अगदी भितीदायकही असायचे. भितीदायक अशासाठी की त्यात वापरलेल्या भाषेनी आणि अनुभवांनी घाबरून जायला व्हायचे. अघोरी आणि हठयोगी साधू, नाथपंथी, शाक्तपंथी, महाकाली असले काय काय तो अनुभवायचा आणि त्यावर लिहायचा. त्याला कोsssहम हा प्रशन फार लवकरच पडला असावा. आणि त्यामागे तो आयुष्यभर (?) धावत राहिला, उणीपुरी 26 वर्षे.

त्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या स्नेह्यांना आणि मित्रांना अलिकडे त्याची बरीच काळजी लागून राहिली होती. त्याचे लिखाण आणि त्याचे विचार पार विस्कळीत झाले होते. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे कानावर येत होते. तो इंदोरला नोकरीसाठी असे पर्यंत माझा त्याच्याशी संपर्क होता. मला तो बर्‍याच वेळा निरोप टाकून इंदोरला एक सर्व मित्रांचा कट्टा करू असे सुचवायचा. त्यावेळी फोनवर होणारे त्याचे बोलणे कधीही आक्षेपार्ह वाटले नाही. कदाचित अध्यात्म हा माझ्याही आवडीचा विषय असल्याने मला त्याच्या विचारांचे वावगे वाटायचे नाही. पण त्याने जो अघोरी किंवा नाथपंथीय मार्ग स्विकारला होता तो मला काही पटायचा नाही. त्याविषयावर आमचे बोलणे कधी झाले नाही. त्याला तो विषय काढून उपदेशपर बोलणे केले की आवडायचे नाही, तो ते कळण्यापलीकडे पोहोचला होता. त्यामुळे मीही कधी त्या विषयावर ताणून घरले नाही. एकदा प्रत्यक्ष भेट झाली, पुण्यात, एकदम अनपेक्षित. इंदोरवरून आला होता तो काही कामासाठी पुण्यात. त्या वेळी माझ्या दारुविषयक लिखाणावर चर्चा झाली पुढच्या भेटीत ‘बैठक’ जमवायची, तीही इंदोरला, असा प्लानही झाला. पण आता ते राहिले ते राहिलेच. अलिकडेच तो इंदोरची नोकरी सोडून औरंगाबादला परत आला होता. त्यानंतर त्याचा नविन संपर्कक्रमांक काही मला मिळाला नाही आणि त्याने दिलाही नाही. पण फेसबुकवरून संपर्क होताच पण तो अगदी किरकोळ झाला होता.

रुढ अर्थाने त्याने आत्महत्या केली, पोलिस फाइलीत ‘मानसिक स्थिती बरोबर नसल्याने आत्महत्या’ अशीच नोंद झाली असेल. पण आज दिवसभर जी पोकळी जाणवत होती ती त्याच्या आत्महत्येमुळे नव्हतीच. त्याने केलेली ही आत्महत्या असावी का? की कुठल्यातरी तंद्रीत (कदाचित भांगेच्या तारेत) उत्कट अनुभूतीसाठी त्याच्या हातून घडलेला हा प्रयोग? हे न कळल्यामुळे!

लौकिक अर्थाने त्याने केलेले हे कृत्य आत्महत्या म्हणायला अजूनही मन कचरते आहे कदाचित त्याचे विचार काही अंशी का होइना कळले असल्याने. हे खरंच, बरच स्फोटक विधान आहे, बर्‍याच कॉमन मित्रांचा ह्या विधानावर आक्षेप असेल, कदाचित माझे डोके ठिकाणावर आहे का असाही प्रश्न उभा राहिल. पण आज दिवसभर असलेल्या विमनस्क मन:स्थितीचे कारण हेच असावे बहुदा!

यक्कु! यक्कु!! काय करून गेलास रे बाबा…..

दिवाळी eअंक – 2012

सर्वप्रथम सर्वाँना

!!! शुभ दीपावली आणि दिवाळीच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा !!!

दरवर्षी दिवाळीला फराळाबरोबर दिवाळी अंक वाचण्याची खुमारी काही औरच असते. सकाळी कुरकुरीत चकली बरोबर आणि खमंग चिवड्यावरोबर खुसखुशित काही वाचायला असले तरच दिवाळी खर्‍या अर्थाने साजरी झाल्याचा फील येतो. दरवर्षी छापील माध्यमातले ठरलेले दिवाळी अंक न चुकता वाचले जातात. पण सध्याच्या ऑनलाइन जमान्यात मागील काही वर्षाँपासून दिवाळीत बरेच ऑनलाइन अंक प्रकाशित होत आहेत आहेत. हे माध्यम नुसते वाचनीय न रहाता आता दृक – श्राव्य असेही असल्यामुळे बरेच ऑनलाइन दिवाळी अंक हे  दृक – श्राव्य दिवाळी अंक आहेत.

त्यांचा मागोवा घेण्यासाठी ही पोस्ट. सध्या मी ज्या काही दिवाळी अंकांना भेट दिली आहे आणि वाचले आहेत त्यांच्या लिंक्स ह्या पोस्ट मध्ये देतो आहे. जसे जसे आणखी नविन दिवाळी अंकांच्या लिंक्स मिळतील आणि वाचीन तसे तसे ह्या पोस्टला अपडेट करण्याचा मनसुबा असून तसे प्रयत्न करीन.

1. मिसळपाव

ह्या संस्थळाचा ह्या वर्षी पहिला-वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. हा अंक PDF आणि HTML ह्या दोन्ही प्रकारात सादर केला आहे.
ह्या दिवाळी अंकात अस्मादिकांचे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. (इथे मी सोत्रि ह्या टोपण नावाने लिहीतो)

2. ऐसीअक्षरे

ह्याही संस्थळाचा ह्या वर्षी पहिला-वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. हा अंक HTML ह्या प्रकारात आहे.  ‘बदलती माध्यमं’ ही ह्या वर्षीची मध्यवर्ती थीम आहे ह्या अंकाची. त्या विषयावरची कुमार केतकरांची मुलाखत  हे ह्या दिवाळी अंकाचे खास आकर्षण ठरावे.
ह्या दिवाळी अंकात अस्मादिकांचा एक लेख प्रकाशित झाला आहे (इथे मी सोकाजीरावत्रिलोकेकर ह्या टोपण नावाने लिहीतो)

3. मायबोली

मायबोलीचा दिवाळी अंक ‘हितगुज दिवाळी अंकाचे’  याची प्रमुख आकर्षण म्हणजे ‘संवाद’. कलागुणांमुळे, विचारांमुळे, कार्यामुळे असामान्य उंचीवर जाऊन पोहोचलेल्या व्यक्तींशी त्यांच्या प्रवासाबद्दल केलेली मनमोकळी बातचीत म्हणजेच ‘संवाद’! या वर्षी दिलीप प्रभावळकरांशी केलेला संवाद ह्या अंकात वाचायला मिळेल. त्याचबरोबर, सचिन कुंडलकरसारखा प्रतिभावान दिग्दर्शक, लेखक समजून घ्यायची संधी मिळणार आहे. या अंकात, मनोरंजनाच्या, ज्ञानाच्या जोडीला सामाजिक आस्था आणि बांधिलकीची जाणीव ठेवून विकीश प्रकारचे लेखन वाचकांना देण्याचा या अंकात प्रयत्न केला आहे..

4. मनोगत

सुदर आणि आकर्षक रंगसंगती असलेल्या ह्या दिवाळी अंकात ह्या वर्षी प्रथमच श्राव्यसाहित्याचा स्वतंत्र विभाग समाविष्ट  केला आहे. रुचकर पाककृती, विविध पद्यप्रकार, कथा, अनुभव, अनुवाद, मुलाखत, पुस्तक-परीक्षण ह्यांनी अंक सजला आहे. मनोगताचे वैशिष्ट्य असणारी शब्दकोडी ह्या वर्षीच्या अंकातही आहेत.

5. रेषेवरची अक्षरे

वेगवेगळ्या ब्लॉग्सवर लिहीले जाणारे लेखन, केवळ ललित साहित्य ह्या प्रकारचे,  निवडकपणे वेचून उत्कृष्ट लेखांचा एक गुच्छ म्हणजे रेषेवरची अक्षरेचा दिवाळी अंक. दोन-तीनशे ब्लॉग पालथे घालून ह्या रेषेवरची अक्षरेच्या टीमने मागील चार वर्षाँची परंपरा ह्या वर्षीही कायम ठेवली आहे.

चला तर मग, सध्या एवढेच. ह्यावर समाधान मानून हे सर्व दिवाळी अंक वाचून काढा, तोपर्यंत मी आणखी अंक शोधतो आणि त्यांच्या लिंक्स इथे अपडेट करतो.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

“ते घोर कलियुग का काय म्हणतात  ना, त्याची  प्रचीती दिली  हो तुमच्या  साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत.

“ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या.

“अहो,  ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी  महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे,  म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या.

“मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग  यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत .

“काय? आज चक्क मटा ? अहो, संध्यानंद बंद होईल की हो अशाने? खी. खी.. खी…   ”, इति नारुतात्या.

“डोम्बल तुमचं नारुतात्या, अहो  एवढा सिरीयस विषय आणि तुम्ही दात काय काढताय?”, घारुअण्णा तणतणत.

“बरं…बरं! त्यांना म्हणावे जळजळ पोहोचली  बरं का, घारुअण्णा”, इति शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर, तुमच्या साहेबांचा ह्यात हात आहे. एवढा मोठा सामाजिक प्रश्न आणि तरीही तुम्ही साहेबांचीच बाजू कशी काय घेऊ शकता हो, ऑ? ”, घारुअण्णा अजून घुश्श्यात,  “एवढा शेतीचा जाणकार माणूस पण त्यानेच सर्व कॄषीक्षेत्राची वाताहत करावी यासारखे दुर्दैव नाही ह्या देशाचे. आता नसती अवदसा सुचली आणि दारूचे परवाने देत सुटले आहेत तुमचे साहेब.”

“अहो, ह्यात नेमका मुद्दा काय ते कळेल का? म्हणजे जर हे सत्तास्थान नागपुरात असते आणि एका ड्रायव्हरला एका कंपनीचा डिरेक्टर बनवून त्याला परवाने दिले तर आपला महाराष्ट्र, मद्यराष्ट्र बनता इथे रामराज्य अवतरले असते असे  म्हणायचे   आहे का तुम्हाला?”, बारामतीकर बरेचसे  उपरोधाने आणि किंचित रागाने.

“अहो  पण साहेबांचा ह्यात ‘हात’ कसा काय असेल? त्यांनी तर  हातातला ‘हात’ हळूच काढून त्यावर घड्याळ चढवले ना? खी. खी.. खी…”, नारुतात्या तेवढ्यातही आपली विनोदबुद्धी पाजळत.

“गपा हो नारुतात्या! अहो बारामतीकर, दारूने समाजाचे नुकसान होते, समाजविघातक आहे ही दारू आणि तिचा असा उदोउदो केला जावे जे काही पटत नाही!”, चिंतोपंत नागपूर विनाकारण चर्चेत आल्याने कळवळून जात.

“हा! असे म्हणा की मग काहीतरी मुद्दा घेउन, उगाच राजकीय चिखलफेक करण्यात काय  आहे?”, इति बारामतीकर.

“बरं बुवा! दारूने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच, त्यामुळे दारू समाजविघातक आहे ह्यावर काय म्हणणे आहे तुमचे? ”, नारुतात्या सिरीयस होत.

“अहो नारुतात्या, कुठल्याही गोष्टीला तारतम्य असावे लागते की नाही,  दारूचेही तसेच आहे, तारतम्य न  पाळता दारू ढोसल्यास विनाश हा होणारच.  पण  त्यामुळे दारूवर सरसकट बंदी घालणे जरा आततायीपणाचे आणि मूर्खपणाचे लक्षण आहे, ह्यावर काय काय म्हणणे आहे तुमचे?”, बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका चर्चेत सामील होत.

“भले शाबास!  बहुजनह्रदयसम्राट, देशात जनतेला खायला अन्न नाहीयेय! त्यामुळे त्यांच्या  दोन वेळेच्या अन्नाची सोय  बघायची की दारुचा महापूर आणायचा? गरज कशाची आहे?”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

“अहो तसे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत देशात, नव्हे एकंदरीतच जगात, म्हणून काय बाकीचे सगळे सोडून द्यायचे का?”, भुजबळकाका शांतपणे.

“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, वाईनर्‍या बांधुन कितपत समाजकल्याण साधले जाणार आहे ?”, चिंतोपंत जरा तडकून.

“गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव, समाजकल्याण हे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण त्यांचा दारु  बनविणे आणि न बनविणे किंवा त्यासाठी परवाने देणे ह्याच्याशी  थेट संबंध जोडणे म्हणजे जरा भावनिक किंवा सेन्टीमेन्टल होते आहे, व्यावहारिक नाही. व्यावहारिक पाताळीवरुनही विचार करून बघा जरा!”, भुजबळकाका ठामपणे .

“वा  रे व्यावहारिक, अहो संस्कृति नावाचा काही प्रकार आहे की नाही? आपल्या हिंदू संस्कृतीत हे बसते का?”, घारुअण्णा चिडून.

“कोणत्या संस्कृतीच्या गप्पा सांगता आहात तुम्ही घारुअण्णा? रामायण आणि महाभारतातही दारू प्राशन केल्याचे दाखले आहेत, तेही एक प्रथा म्हणून प्राशन केल्याचे.”, भुजबळकाका हिरीरेने, “आणि बहुजनांच्या  संस्कृतीचा तर तो आजही भाग आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचे स्थान मानाचे आहे.”

“अरें देवा! विश्वेश्वरा बघ रे बाबा तुच आता. धर्मच बुडवायाचा प्रयत्न आहे हा, म्हणून तर  घोर कलियुग आले आहे असे म्हणत होतो मी, ते काही खोटे नाही!”, घारुअण्णा हताश होत .

“डोंबलाचे कलीयुग! अहो लोकांनी, दारु कशी पिउ नये व कशी प्यावी, हे समजावून घेतले की झाले, त्याचीच गरज फक्त, बास्स!”, भुजबळकाका.

“अहो भुजबळकाका, हे  तर दारूचे उदात्तीकरण झाले असे नाही का  वाटत?”, चिंतोपंत.

“नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.

“हो,  हे वाटणे  खूप सापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणजे तुम्ही नेमके कसे आणि काय बघता ह्यावर ते अवलंबून आहे.”, सोकाजीनाना मंद हसत, “म्हणजे असे बघा,  नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. अगदी प्रत्येक मानवनिर्मीत आणि नैसर्गिक गोष्टीला सुद्धा. आपण त्या गोष्टीकडे कुठल्या बाजूने बघतो, म्हणजे आपली सापेक्षता काय आहे ह्यावर, काय दिसणार हे अवलंबून आहे. आता बघा, सूर्यही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यालाही एक बोचरी आणि मानवासाठी हानिकारक बाजू आहे!”

“काय बोलताय काय सोकाजीनाना, हे काही पटत नाही ब्वा!”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.

“सूर्याच्या उष्णतेमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीराला दुर्गंध येतो तसेच काताडीचा रंग काळा पडतो ही सूर्याची एक दुसरी बाजू आहे की नाही.  पण त्यामुळे आपण सूर्याला झाकून टाकण्याचा वेडेपणा करतो? तर नाही. त्यावर उपाय शोधतो. तसेच आहे, जे भुजबळकाका म्हणत आहेत ते. अहो  ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही आम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे? ज्याचे त्याला ठरवू देत की काय करायचे ते. राहीला मुद्दा ह्यातल्या राजकारणातला, तर तुमच्यात धमक आहे ते परवाना राजकारण थांबविण्याचे? मग उगा बोंबाबोंब कशाला?”

“अहो, त्या दारुताही काहीतरी मजा असेलच की, उगाच नाही तो गालिब म्हणून गेला ‘ला पिला दे साकियां, पैमाना पैमाने के बाद’. फार कशाला आपले केशवसुतही म्हणून गेलेत ‘काठोकांठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या ! ‘ ” सोकाजीनाना मिश्कील हसत.

“अहो घारूअण्णा असे डोळे फाडून काय बघता आहात, मी काही ‘एकच प्याला’ मागवणार नाहीयेय आता, चहाच हवा ब्वा  आपल्याला!  चला तर आपला चहा मागवा कसें!”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

घारुअण्णांनी हसणे  आवरात  चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – बस डे

“काय घारुअण्णा, आज काय मग बसने, मंडईत वाहिनीना घेउन?”, चिंतोपंत एकदम थट्टेखोर हसत.

“अरे हो आज बस डे होता नाही का! आज काही बाहेर जायला झालेच नाही. त्यामुळे काय झाले ह्या बस डेचे काही कळलेच नाही”, नारुतात्या.

“अहो कसला डोंबलाचा बस डे अन काय, आमच्या हिला पण भारीच हौस.”, घारुअण्णा भयंकर त्राग्याने.

“काय झाले?”, इति नारुतात्या.

“अरे, चांगले म्हणत होतो की आपली स्कूटर घेउन जाऊ, पण नाही! नवरोबाचे ऐकेल ती बायको कसली.”, घारुअण्णा घुश्श्यात.

“अहो, काय झाले ते नेमके सांगाल का, का उगाच त्रागा करताय एवढा.”, इति नारुतात्या.

“शिंचा बस डे म्हणे! आपण सच्चे पुणेकर आहोत तर बस डे पाळलाच पाहिजे, असे म्हणून चक्क पीएमटीच्या बसने घेउन गेली मला मंडईत.”, घारुअण्णा तणतणत.

“अहो त्यात रागावण्यासारखे काय काय एवढे? बरोबरच म्हणाल्या की वाहिनी, त्यात त्यांचे काय चुकले ?”, इति भुजबळकाका.

“तरी म्हटलेच अजून बहुजानह्रदयसम्राट कसे नाही बोलले. अहो त्या मोडक्या पीएमटी बसने कधी प्रवास केला आहे का तुम्ही ?”, घारुअण्णा अजून घुश्श्यात,  “सगळी बस कराकरा वाजत होती, होर्न सोडून सगळ वाजत होते! त्यात पुन्हा शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटलेले, त्याने कुठे लागू नये, विजार फाटू नये त्यासाठी कसरत करावी लागली ती वेगळीच.”

“च्यामारी, परवा तर, छॅsss, आपल्या पुण्याची सगळी रया गेली, कसला हा ट्राफिक जॅम होतो आजकाल असे तुम्हीच कोकलत होतात ना!”, भुजबळकाका उपरोधाने.

“अहो बहुजानह्रदयसम्राट, प्रत्येक वेळी वाकड्यांतच शिरायला हवें का?”, घारुअण्णा लालेलाल होऊन.

“खरे आहे हो भुजबळकाका, घारुअण्णा म्हणताहेत ते, बसेसची अवस्था तशीच आहे पुण्यात, मुंबईच्या बेस्ट सारखी काही सेवा नाही पुण्यात.”, इति चिंतोपंत.

“त्या मुंबईकरांना नाही काही असले बस डे वैगरे पाळावे लागत. तिथे बस कशा चकाचक असतात.”, घारुअण्णा रागाने.

“अहो घारुअण्णा, तिकडे मुंबईत सगळे, प्रवास बस नाहीतर लोकलनेच करतात!”, नारुतात्या.

“नाहीतर काय, तुम्हाला तर बुडाखाली गाडी घेतल्याशिवाय बाहेर निघायला नको असते, मग त्या बसेसची सेवा चांगली असावी म्हणून प्रशासनावर दडपण आणणार कोण ?”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात उतरत.

“व्वा! ह्याला म्हणतात निष्ठा, ह्यांच्या सकाळ समुहाने आयोजित केला ना हा बस डे, मग तर हे त्याचे गुण गाणारच”, घारुअण्णा उपरोधाने.

“घारुअण्णा, तुम्ही उगाच माझ्या निष्ठेवर घसरू नका. तो विषय काढायचं काम नाही.”, शामराव बारामतीकर जरा तडकून.

“हो ना! घारुअण्णा, तुमचा नेमका राग कशावर आहे? वाहिनी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध बसने घेउन गेल्या म्हणून की सकाळ समुहाने बस डे आयोजित केला म्हणून खी…खी…खी..”, भुजबळकाकाही आता जरा थट्टेने .

“तुम्हाला नाही कळणार हो बहुजानह्रदयसम्राट. तुम्हाला समजूनच घ्यायचे नाहीयेय तर बोलून काय उपयोग?”, घारुअण्णा हताशपणे.

“पण सांगा की नीट समजावून मग, तुम्हाला काय म्हणायचे ते.”, भुजबळकाका जरा सिरीयस होत.

“अहो, मला सांगा, हे असले बस डे वैगरे साजरे करून काय साध्य होणार आहे? उद्यापासून येरे माझ्या मागल्याच ना! हे असले पालथे धंदे सांगितलेत कोणी.”, घारुअण्णा.

“ही तुमची टोकाची भूमिका आहे असे नाही तुम्हाला वाटत?”, भुजबळकाका.

“अरें देवा! ह्या भुजबळकाकांना माझे म्हणणे कधी पटणार हे तो विश्वेश्वरच जाणे.”, घारुअण्णा उद्वेगाने.

“घारुअण्णा, अगदी विश्वेश्वरापर्यंत जायची काही गरज नाहीयेय! मलाही तुमचे म्हणणे जरा टोकाचेच वाटत आहे.”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, सोकाजीनाना?”, घारुअण्णा जरा शांत होत.

“अहो आपल्या देशात इतके डे साजरे होतातच ना? त्यात अजून एक. बाकीचे ते सगळे डे जवळजवळ परदेशीच असतात. आपला हा बस डे तर खास स्वदेशी आहे की नाही?  तोही चक्क मराठमोळ्या पुण्यातला. त्याचा आपल्याला अभिनान असला पाहिजे आणि असे काहीतरी अभिनव करण्याची प्रथा पुणेकर कायम ठेवत आहे त्याचाही”, सोकाजीनाना मंद हसत.

“गमतीचा भाग सोडा. पण आज पुण्यात किती वाहने झाली आहेत बघा आणि त्यात पुन्हा हे वाहन  म्हणजे स्टेटस सिम्बॉल. अहो सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यात कसला आलाय कमीपणा. तिकडे जपानमध्ये एका कम्पनीचा सीइओ सुद्धा सब-वेने प्रवास करतो. रस्त्यावरची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिला पर्यायी विकल्प शोधायला नको का? त्यासाठी जनमानस तयार व्हायला हवे ना. हा सकाळ समुहाचा एक प्रयत्न, त्या दृष्टीने टाकलेले एक पहिले पाउल, म्हणून ह्याकडे सकारात्मक दृष्टीने बघूयात ना. हे जनमानस तयार झाले तर त्या जनमानसाच्या रेट्याने बससेवा सुधारित, चांगली आणि प्रवास करण्यायोग्य करण्यासाठी प्रशासनावर दबावही आणता येईलच की. करायच्या आधीच नुसते, हं, असल्याने काय होणार आहे, पालथे धंदे सगळे, असला निराशावाद आणि नकारात्मक भूमिका का घ्या?”

“काय झाले आहे की आजच्या जमान्यात कशाकडेही शंकास्पद नजरेने आणि नकारात्मक बघायची सवयच,  लागलीय आपल्याला. जरा मोकळ्या मनाने विचार करा. एका दिवसात किती इंधन वाचले आज, किती प्रदूषणही कमी झाले असेल? कितीतरी जणांना, किती कमी पैशात ऑफिसला जाता येते ते आज पहिल्यांदाच कळले असेल. कितीतरी जणांच्या शरीराला आज कधी नव्हे तो व्यायाम मिळाला असेल असेल, बसप्रवासात त्रास होउन. त्यातून समजा एखाद्याने जरी नेहमी सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास करायचे असे ठरवले तरीही हा बस डे साजरा करण्याच्या प्रयत्नाला यश आले असे म्हणता येईल ना!”

“मी तर म्हणतो की फळाची अपेक्षा कराच का? फक्त कर्म करूयात की. नुसताच अजून एक ‘डे’ साजरा झाला असे समजूयात. काय? तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

घारुअण्णांनी मान हालवत चहाची आणि हसत ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.