चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य


chawadee

“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.

“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्‍यावर आणत.

“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो! पण एवढ्यातच 2014 च्या निवडणुका जिंकल्याचा आनंद झाल्यासारखे आनंदित होऊ देऊ!”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, भाजपासाठी आणि ‘भाजपेयीं’साठी!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“चला, ह्या निमित्ताने तरी भाजपा – पार्टी विथ डिफरन्स ह्याचा अर्थ काय ते कळले!”, नारुतात्या पुन्हा पांचट विनोद करत.

“हो ना! इतर पक्षांपेक्षा तसूभरही कमी नसून, इतर पक्षांत आणि भाजपा मध्ये काही नाही डिफरन्स हे नक्कीच आता कळले तमाम भारतीय जनतेला.”, बारामतीकर.

“बारामतीकर, नारुतात्यांना कसला पोचच नाही हे ठाक आहे, पण तुम्ही सुद्धा?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, राहू द्या! अडवाणीजींनी यापुढे आपण पक्षाचे केवळ प्राथमिक सदस्य असणार आहोत असे म्हणत सगळ्या पदांचा राजीनामा देणे, हे ह्या लाखों हजार रुपयांचे घोटाळे करणार्‍यांच्या पक्षाच्या समर्थकांना कधी कळणार नाही. कसलाही हव्यास नसलेले निष्काम कर्मयोगी यांना काय समजणार?”, घारुअण्णा एकदम भावुक होत.

“निष्काम कर्मयोगी! ह्म्म्म”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“अहो डोंबलाचे निष्काम कर्मयोगी. एकेकाळी देश पेटवला होता ना ह्याच तुमच्या निष्काम कर्मयोग्याने, विसरलात का? राममंदिराच्या नावाखाली देशभर आयोजीत केलेली रथयात्रा हा सत्तेसाठी केलेला निष्काम कर्मयोग होता काय हो घारुअण्णा? आणि चिंतोपंत प्रत्येक वेळी ह्या नारुतात्याचा पोच काढण्याची काही गरज नाही!”, नारुतात्या .

“बरंsssबरंsss, तुम्ही जुन्याच मुळी उगाळत बसा! अहो वेळ काय घटना काय? तुम्ही बरळताय काय?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, तेच म्हणतो मी, अहो वेळ काय घटना काय? व्यक्ती कोण आणि निष्काम कर्मयोगी काय?”, इति बारामतीकर.

“बरें, निष्काम कर्मयोगी राहूदे पण देशासाठी आणि देशातील जनतेच्या भल्यासाठी लढणारा एक सच्चा देशभक्त तर आहेत ते!”, घारुअण्णा रागाने लाल होत.

“अहो पण त्यांचे मूळ गाव आणि जन्म पाकिस्तानात आहे ना, जन्माने पाकिस्तानीच आहेत ते?”, इति नारुतात्या.

“नारुतात्या तुम्ही गप्प बसा!”, घारुअण्णा रागात घुमसत.

“नारुतात्या, तुम्ही शांत बसा बरे जरा. पण घारुअण्णा, असा राजीनामा देण्याने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत नाही का? ”, चिंतोपंत.

“शिंचा, कसला अंतर्गत कलह आता?”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“अहो घारुअण्णा, हा राजीनामा म्हणजे, नरेंद्र मोदींची भाजपच्या निवडणूक प्रचारसमिती प्रमुखपदी झालेली निवड लालकृष्ण अडवाणी यांना फार रुचली नसल्याचे द्योतक आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“मग त्यात काय चूक आहे? एवढ्या अनुभवी आणि ज्येष्ठं नेत्याला काही किंमत आहे की नाही?”, घारूअण्णा जरा तडकून.

“हे बघा, त्यांची किंमत त्यांचीच घालवली असे माझे मत आहे?”, बारामतीकर ठामपणे .

“नक्कीच, माझ्यालेखी त्यांची किंमत तेव्हाच शून्य झाली होती जेव्हा त्यांनी बाबरी पाडल्याचा जाहीर राष्ट्रीय निषेध व्यक्त केला होता.”, नारुतात्या घुश्शात.

“घ्याsss ह्यांची गाडी अजूनही तिथेच अडकली आहे?”, घारुअण्णा उद्विग्नतेने.

“अहो पण मोदींचा उदोउदो तुम्ही लोकांनीच चालवला होता ना? मग आता निवडणूकीची धूरा त्यांच्या सक्षम हातात दिली तर त्यात एवढे राजीनामा देण्यासारखे काय आहे?”, भुजबळकाका शांतपणे.

“देशातील लोकांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान झालेले बघायचे आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनीही आता मोदींना आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांनी व्यक्त केली आहे. हा अनाठायी उपदेशही बहुदा त्यांना झोंबला असावा. संघाकडून नथीतून मारला गेलेला हा तीर असावा असा त्यांचा समज झाला असावा.”, बारामतीकर ठामपणे.

“नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हायला काहीच हरकत नसावी. 2014 निवडणूका आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मोदी हाच पर्याय उचित आहे. अडवाणीजींनी निदान आता तरी असे कृत्य करायला नको होते.”,चिंतोपंत खिन्नपणे.

“नाही चिंतोपंत, तोच तर कळीचा मुद्दा आहे ना! अडवाणींचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पंतप्रधान पदाचा असलेला सोस काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो, आचरटपणा आहे हा सगळा. त्यांनी पाठवलेले राजीनाम्याचे पत्र वाचलेत का? पक्षाची सद्य स्थिती आणि पक्षाची दिशा यांची बऱ्याच दिवसांपासून ते सांगड घालण्याचा प्रयत्न करत होते म्हणे! तशी सांगड घालताना त्यांना साक्षात्कार झाली की भाजपा हा मुखर्जी आणि दीनदयाळ यांनी स्थापन केलेला आदर्श पक्ष राहिला नसून मतलबी लोकांची बजबजपुरी झाला आहे. बरें ही परिणती आताच व्हायचे कारण असावे? तर, मोदींची हवा बर्‍याच दिवसांपासून तयार होत होती. त्यामुळेच तर अडवाणींनी प्रकृती अस्वस्थाचे कारण देऊन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही दांडी मारली होती. पण आता नरेंद्र मोदींचे भाजपच्या निवडणूक प्रचारसमितीच्या प्रमुखपदी झालेले शिक्कामोर्तब ह्यात त्यांना त्यांच्या पंतप्रधानपदी बसण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होताना दिसला असणार. त्याच एकमेव आशेवर तर त्यांनी इतके दिवस तग धरला होता. आदर्श पक्ष वैगरे सगळ्या बाजारगप्पाआहेत, खरा पोटशूळ आणि कळीचा मुद्दा ‘पंतप्रधानपद’ आहे आणि ते आता हातातून जाताना दिसते आहे.”

“मोदी हा उत्तम पर्याय आहे! त्यामुळे विसरा हे राजीनामा नाट्य. काय पटते आहे का? तर चहा मागवा चटकन!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

One thought on “चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s