कॉकटेल लाउंज : बुलफ्रॉग (Bullfrog)

२०१३ च्या सरत्या संध्याकाळी २०१४ ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे बुलफ्रॉग (Bullfrog)

पार्श्वभूमी:

३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी एक पोटंट आणि तितकेच दिलखेचक व आकर्षक असलेले हे बुलफ्रॉग नावावरून ‘बैलाचा आव आणलेली बेडकी’ असे वाटणे सहाजिक आहे; पण दिसते तसे नसते ह्या उक्तीला सार्थ करणारे हे कॉकटेल आहे, साहित्यावरून ते किती जहाल असावे ह्याची कल्पना येईल.

ह्या वर्षाची आजची शेवटची रात्र एकदम मादक होऊन येणारे इंग्रजी नववर्ष आपणा सर्वांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना.

प्रकार रेड-बुल बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
वोडका १ औस (३० मिली)
जीन १ औस (३० मिली)
टकीला १ औस (३० मिली)
ब्लु कुरास्सो १ औस (३० मिली)
रेड बुल टॉप-अप करण्यासाठी
मोसंबी रस (ऑप्शनल) १० मिली
बर्फ
ग्लास टम्बलर किंवा मॉकटेल ग्लास

कृती:

ग्लासमध्ये 2/3 बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, वोडका, जीन आणि टकीला ओतून घ्या.

आता बारस्पूनने सर्व घटक एकजीव होतील असे स्टर्र करुन घ्या. आता त्यात ब्लु कुरास्सो हळूवारपणे ओतून घ्या.

आता रेड-बुल ओतून ग्लास टॉप-अप करून घ्या.

आता सजावटीसाठी ग्लासवर लिंबाचा काप लावून घ्या.

नववर्षाच्या स्वागतासाठी जहाल आणि मादक ‘बुलफ्रॉग’ तयार आहे 🙂

सर्वाँना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

पार्श्वभूमी:
Crabby ह्या शब्दाचा Crabbie अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल.

मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे ‘एक मखमली’ टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच ‘उंची’ देऊन जाते.

प्रकार व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
मालिबू २ औस (६० मिली)
संत्र्याचा रस १ औस (३० मिली)
अननसाचा रस १ औस (३० मिली)
बर्फ
ग्लास मॉकटेल ग्लास

कृती:

कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.

झक्कास आणि क्रॅबी चवीचे ‘क्रॅबी कॉकटेल’ तयार आहे 🙂

चावडीवरच्या गप्पा – मोदी विरुद्ध राहुल गांधी (दिवाळी धमाका)

(मिसळपाव.कॉम दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित)

chawadee

“काय हो, कर्तृत्व काय ह्या शिंच्याचे? त्या नेहरू घराण्याची सून असलेल्या इटालियन बाईच्या पोटी जन्म घेतला, एवढेच ना?” घारुअण्णा चकलीचा तुकडा काडकन तोडत, दिवाळीच्या फराळासाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“कोणाबद्दल बोलताय घारुअण्णा, आज कोणाची कंबख्ती?” नारुतात्या चिवड्याचे ताट ओढत आणि चेहऱ्यावर हसू आणत.

“तुमच्या त्या ‘राउल’ ऊर्फ पप्पूबद्दल बोलतोय मी, का उगाच वेड पांघरताय ह्या दिवाळीच्या मंगलमय सकाळी?” घारुअण्णा चकली ताटात टाकत, भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, त्यात त्याचे कसले आलेय कर्तृत्व? ते कर्तृत्व राजीवचे! खी खी खी…”, नारुतात्या चिवड्याचा बकाणा भरत आणि पांचट विनोद करत.

“नारुतात्या, कसले शिंचे पुचाट विनोद करतांय सकाळी सकाळी? मी सीरियसली बोलतोय!” घारुअण्णा करारी चेहरा करून.

बारामतीकर“अहो घारुअण्णा! नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?” बारामतीकर.

“बारामतीकर, ह्याची लायकी काय हो? आपल्या ह्या ‘आर्य सनातनी आसेतुहिमाचल भारतवर्षा’चे नेतृत्व करण्यासाठी आणि करोडो जनतेची धुरा वाहण्यासाठी आयात केलेले शिलेदार, सेनापती का लागावेत तुम्हाला?”, घारुअण्णा कसल्याश्या आवेशात.

“ह्म्म्म… तुम्हालाsss”, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“नाहीतर काय? आमचे मोदी बघा, असे ह्या अस्सल हिंदुस्तानच्या मातीतून तळपत पुढे आलेले अस्सल स्वदेशी आणि करारी नेतृत्व!”, चिंतोपंत घारुअण्णांच्या खांद्याला खांदा देत.

“घारुअण्णा, तुमची देशाबद्दलची व्याख्या अतिशय जातीयवादी आणि जनमानसाचे ध्रुवीकरण करणारी आहे, असे नाही वाटत तुम्हाला?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा तुकडा मोडत.

“वाटलेच मला, अजून कसे ह्यांनी ह्यांचे सेक्युलर तोंड उघडले नाहीं ते!” घारुअण्णा तिरीमिरीत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, देशाची व्याख्या राहू द्या तात्पुरती बाजूला. पण मला सांगा, ह्या काँग्रेसकडे, नेहरू घराण्याच्या ह्या लाडावलेल्या नातवाशिवाय दुसरे कोणते कणखर नेतृत्व नाही?” चिंतोपंत.

“नाहीतर काय, शिंचा युवराज म्हणे!” घारुअण्णा रागाने धुसफुसत.

“काय हो, काय प्रॉब्लेम काय तुमचा? उमदे आणि सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व आहे की राहुल!” इति बारामतीकर.

भुजबळकाका“हो, आणि नेमके तेच कारण सांगत संघश्रेष्ठींनी अडवाणींच्या गुडघ्याचे बाशिंग काढून घेतले ना?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा दुसरा तुकडा मोडत.

“अहो, देशात अतिरेकी कारवाया होत असताना हे तुमचे सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व परदेशात काय गुण उधळत होते, ते माहीत आहे आम्हाला!” घारुअण्णा रागाने चकलीचा चुरा करत.

“अहो, त्याने CII Industrial Meet मध्ये तोडलेले अकलेचे तारे आम्ही ऐकले आणि पाहिलेसुद्धा. काय म्हणे भारत मधमाशीचे पोळे आहे, भारतीय ट्रेन्समध्ये लोक नाही तर आयडियाज प्रवास करतात. पायलट ट्रेनिंगमध्ये म्हणे आउटडेटेड सिलॅबस शिकवला जातो. नॉन्सेन्स!” चिंतोपंत करंजी मोडत.

“अहो चिंतोपंत, फक्त पायलट ट्रेनिंग नव्हे, पूर्ण शिक्षणपद्धतीचा बोर्‍या वाजलाय म्हणे. हा सुकळीचा म्हणे अमेरिकेत आणि केंब्रिजमध्ये शिकून सुशिक्षित झालाय! अरे, शिरा पडो तुझ्या तोंडात, शिंच्या, आमच्या भारतीय शिक्षण परंपरेला नावे ठेवतोय काय रे नापास गाडग्या!” घारुअण्णा रागाने अजून एका चकलीचा चुरा करत.

“अहो घारुअण्णा, कुठे भरकटत चालला आहात. मुद्द्याला धरून राहा. जनमताचे ध्रुवीकरण करणार्‍या जातीयवादी आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या नेतृत्वापेक्षा हे सर्वसमावेशक सेक्युलर नेतृत्वच भारताचे भले करेल!” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडूचा घास घेत.

चिंतोपंत“बहुजनसम्राट, शब्द मागे घ्या! फॅसिस्ट काय, जातीयवादी काय? काहीही बोलाल काय? अहो, गुजराथचा झालेला कायापालट बघितला आहात काय? मोदी फॅसिस्ट आणि जातीयवादी असते तर गुजराथच्या जनतेने त्यांना निवडून दिले असते काय? गुजराथच्या जनतेचा सार्थ विश्वास आहे मोदींच्या कणखर नेतृत्वावर. गुजरातच्या विकासाचे व्यवस्थित पॅकेजिंग आणि मार्केटिंग करून गुंतवणुकीचा ओघ त्यांनी गुजराथेत वळवला आहे. आता हाच ‘गुजराथ पॅटर्न’ भारतभर राबविण्याची गरज आहे. विकास आराखड्याची गरज आहे आज भारताला. पण त्यासाठी सार्थ पुरोगामी वैचारिक बैठक असलेल्या नेतृत्वाची आज निकड आहे आणि नरेंद्र मोदी हाच सार्थ पर्याय आहे आणि ती काळाची गरजही आहे!” चिंतोपंत ठामपणे रव्याचा लाडू तोडत.

“अहो, गुजराथबाहेर ह्या मोदींना कोणी ओळखते का? राहुलचा दिल्लीपासून पार केरळपर्यंत जनमानसावर पगडा आहे. अखंड भारत त्याला आज ओळखतो आणि त्याला पंतप्रधानाच्या रूपात पाहतो आहे. तुमच्या भाजपात तरी एकवाक्यता आहे का? तिथेही तंगडीखेच चालू आहेच. नुसता विकास आराखडा नको आहे, तो सर्वसमावेशक हवा आणि तळागाळातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हवा.” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडू संपवत.

घारुअण्णा“अरे, पण ह्या नेहरू कुटुंबाच्या घराणेशाहीने राष्ट्राची वाट लागते आहे ना! मागच्या साठ-पासष्ट वर्षात देशाचा नुसता रौरवनरक करून टाकला आहे ह्यांनी. अराजक माजले आहे नुसते अराजक, त्यात आता हे युवराज, पप्पू कुठचा. काही नाही, हे थांबले पाहिजे आणि त्यासाठी मोदींना पर्याय नाही.” घारुअण्णा उद्विग्नतेने आता बेसनलाडूचा चुरा करत.

“काय हो, ७७मध्ये ही घराणेशाही मोडून काढली होती ना? काय झाले त्याचे? जनसंघाचे किती तुकडे झाले?” नारुतात्या आता चकलीवर ताव मारत.

“अहो, त्या वेळी नाही जमले, पण अटलबिहारींच्या राज्यात सर्व काही आलबेल केले होते की नाही? ‘फील गुड फॅक्टर’ कसा होता तेव्हा? होती का ही असली जीवघेणी महागाई?” चिंतोपंत शांतपणे फराळ संपवून हात झटकत.

“होsss? मग का नाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं? का तशी सुज्ञ जनता फक्त गुजराथेतच आहे?”, बारामतीकर मिश्कीलपणे शंकरपाळी चघळत.

“अहो चावडीकर, जरा माझे ऐकता शांतपणे सर्व जण? का उगा एवढे वातावरण तापवत आहात? आणि काय ह्या शाब्दिक आणि वैचारिक फटाक्यांच्या माळा? दिवाळीची एक सकाळ जरा शांत घालवा, फराळ संपवा!” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्हीच बघा बुवा काय ते आता.” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना“अहो, हा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा पोकळ बुडबुडा ह्या दोन्ही पक्षाच्या थिंक टॅन्कने, मीडियाला हाताशी धरून, हवा देऊन फुगवला आहे. अहो, गाजराची पुंगी आहे ही दोन्ही पक्षांसाठी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, काय? त्यात तुमच्यासारखे अनुयायी आहेतच त्या बुडबुड्याला अजून हवा द्यायला. निवडणुकीआधी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा किंवा तसे संकेत द्यावेत, असे पक्षावर कोणतेही बंधन नसते. ही फक्त संभाव्य मतदारांना दाखवलेली लालूच असते. अहो, निवडणुकीत जिंकेल जो जिंकायचाय तो. तुम्ही का आपापसात लढताय फुकाचे? तुमच्या मतदारसंघात कोणी लायक उमेदवार उभा केला आहे का, ते बघा. नसला तर आता सरकार तसे कळवायची सोय करतेय म्हणे, त्याचा वापर करा. त्याचा प्रभावी वापर केलात तर मोदी आणि राहुल दोघेही सोडा – कोणीच पंतप्रधान होऊ शकणार नाही. काय, पटतंय का?” सोकाजीनाना मंद हसत.

“चला, आज चहा नको. दिवाळीच्या मुहूर्तावर बायकोने बासुंदी करून दिली आहे सर्वांसाठी, ती घ्या आणि तोंड गोड करा!” सोकाजीनाना मिश्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या बासुंदीच्या वाट्या भरू लागले.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’आपली मते

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग…बरं… बरं… काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी! विशेष म्हणजे तुमच्या त्या केजरीवालांचेही पितळ उघडे केले आहे?”, बारामतीकर अभिमानाने.

“ह्म्म्म, आमचे केजरीवाल!”, (आमचे वर जोर देत) नारुतात्या.

“दिल्लीकरांनी अजून पाच सहा जागा देऊन आम आदमी  पक्षाला सरकार बनविण्याची संधी द्यायला हवी होती म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असते असे साहेब म्हणाले, परखडपणे”, बारामतीकर.

“अहो, पवार बोलणारच! त्यांच्या ‘कांद्याचे भाव’  ह्या वर्मावर केजरीवालांनी ‘कांद्यांचे भाव निम्मे करून दाखवू’ असे म्हणत बोट ठेवले होते ना!”, इति चिंतोपंत.

“अहो शेती आणि शेतीची जाण हाच तर साहेबांचा हुकुमाचा एक्का आहे! त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की  या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात  हेच वास्तव आहे.”, बारामतीकर एकदम भावुक होत.

“कसला शिंचा हुकुमाचा एक्का आणि कसली शिंची ती जाण! अहो ह्या कृषिप्रधान देशाच्या शेतीचा पार चुथडा केला आहे ह्या कृषिमंत्र्याने.”, घारुअण्णा लालबुंद होत.

“घारुअण्णा उगाच काहीही बरळू नका, तुम्हाला काय कळते हो शेतीतले?”, शामराव बारामतीकर घुश्शात.

“नसेल मला शेतीतले काही कळत, पण तुमचे सो कॉल्ड साहेब काय करताहेत ते मात्र कळते आहे बरं! भारी शेतकर्‍यांतचा पुळका त्यांना! अहो आपल्या पुण्यातलीच किती एकर लागवडीखालची जागा ‘डेव्हलपमेंट’च्या नावाखाली बरबाद केली? आणि त्यातून कोणाची ‘डेव्हलपमेंट’ झाली हे ही कळते हो! असे केल्यावर कसे वाढणार उत्पन्न आणि कशा होणार किमती कमी?”, घारुअण्णा रागाने.

“अरे पवार काय म्हणाले आणि तुम्ही कुठे चाललात! पवारांनी एकंदरीत आढावा घेतला आहे निवडणूक निकालांचा. सर्वांनाच कानपिचक्या दिल्या आहेत त्यांनी!”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“धन्यवाद बहुजनहृदयसम्राट, नेमके हेच म्हणायचे होते मला.”, बारामतीकर हसत.

“पण साहेबांनी केजरीवालांवर केलेला हल्ला जरा अतीच होता. दिल्ली निकालानंतर तर काय सगळेच केजरीवालांचे भविष्य आपल्यालाच कळल्याच्या थाटात मते सांडत सुटले आहेत? ”, इति भुजबळकाका.

“म्हणजे? स्पष्ट बोला असे मोघम नको.”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, लोकसत्तेच्या अग्रलेखात माननीय संपादकांनी काय तारे तोडलेत ते वाचले नाहीत का?”, भुजबळकाका.

“नाही ब्वॉ, काय म्हणतोय लोकसत्तेचा अग्रलेख?”, इति घारूअण्णा.

“ज्या क्षणी ‘आम आदमी पक्ष’ आपली राजकीय भूमिका स्पष्ट करेल तो क्षण आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात असेल असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“आम आदमी पक्ष वा त्या पक्षाचे रोमॅंटिक समर्थक यांनी हुरळून न जाणे बरे असा फुकटचा न मागितलेला सल्ला ही दिला आहे बरं का!”, चिंतोपंत.

“च्यामारी, त्या बिचार्‍या केरजीवालाचे यश कोणालाच बघवेनासे झालेले दिसतेय!”, नारुतात्या जोरात हसत.

“हो ना, अण्णांनी पण मौन सोडलेले दिसतेय. अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाचा प्रचार दिल्लीतल्या घरा-घरात झाला असे आता अण्णा म्हणताहेत.”, चिंतोपंत.

“पण हेच अण्णा केजरीवालांची खिल्ली उडवत होते ना पक्ष स्थापनेनंतर?”, नारुतात्या.

“अहो, केजरीवालांचे यश बघून त्यांचे संतपण ही गळून पडलेले दिसतेय, परत उपोषणाची घोषणा केली आहे त्यांनी! किती ती शिंची अॅलर्जी म्हणावी, खीsssखीsssखीsss”, घारुअण्णा खो खो हसत.

“त्या किरण बेदीही निवडणूक प्रचाराच्या वेळी कुठेही नव्हत्या, पण निकालानंतर मात्र एकदम आप आणि भाजपा यांच्यात समेट करायला रिंगणात!”, चिंतोपंत.

“अहो भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच! दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुका होतात की नाही बघा! साहेबांचेही खाजगीतले हेच मत आहे.”, बारामतीकर.

“त्याचा फायदा भाजपालाच होईल, केजरीवालांना काही फायदा होईलसे वाटत नाही.”, चिंतोपंत.

“काहीही असो, पण केजरीवालांनी मिळवलेल्या यशाने बहुतेकांना अनपेक्षिततेचा धक्का जरा जास्तच बसलेला दिसतोय!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो केजरीवालांना कोणी खिजगणतीतच धरले नव्हते! काँग्रेस राहुल गांधी आणि भाजपा नरेंद्र मोदी यांच्याच नादात होते. केजरीवाल एकदम 28 जागांवर कब्जा मिळवतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. त्यामुळे हा धक्काच आहे सर्वांसाठी!”, सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, खरे आहे तुमचे?”, नारुतात्या.

“सद्य राजकीय अनागोंदीच्या आणि भ्रष्ट सरकारी पार्श्वभूमीवर हा निकाल पॉझिटिव्ह आणि प्रॉमिसिंग ठरावा. अण्णांच्या आंदोलनाने जन-जागृती झाली होती पण त्या जन-आंदोलनात भरीव काहीही नव्हते. त्यावेळी झालेल्या जन-आंदोलनाने समजा जर क्रांती होऊन सत्ताधार्‍यांना सत्तेवरून हाकलून लावले असते, ट्युनेशिया क्रांतीसारखे, तर पर्यायी सरकारची व्यवस्था काय होती अण्णांकडे? नुसते जनलोकपाल बील पास करून घेण्यासाठीच झालेल्या जन-जागृतीचा आणि जन-आंदोलनाचा भर ताबडतोब विरून गेला कारण ठोस अजेंडाच काही नव्हता. व्यवस्थेला बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग असणे गरजेचे असते, केजरीवालांनी नेमके हेच जाणून घेतले आणि आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यावेळी अण्णांची त्यातून माघार घेतली खरी पण आता त्यांचीही गोची झालेली दिसतेय कारण केलरीवालांचे हे यश कोणालाच अपेक्षित नव्हते.

सद्य स्थितीत, कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष सत्तेवर येण्यापेक्षा एका नवीन, फ्रेश पर्यायाची भारताला गरज आहे. ‘आप’च्या रूपात केजरीवालांनी तो पर्याय दाखवला आहे आणि दिल्लीतील त्यांच्या विजयाने जनतेने त्या पर्यायाला स्वीकारलेले दिसते आहे. आता केजरीवाल आणि त्यांचे आमदार कसे आहेत ते लवकर कळेलच. त्यामुळे दिल्ली हा ‘आप’ची धोरणे समजून घेण्यासाठी उपलब्ध झालेला एक प्लॅटफॉर्म ठरावा. एवढ्यातच कुठल्याही निष्कर्षावर पोहोचणे हे जरा आततायी होईल. सो, वेट अॅन्ड वॉच!”, सोकाजीनाना मंद हसत.

“काय पटते आहे का? जाऊद्या चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.