भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS

मागे GPS वर लिहिलेल्या लेखात संपूर्ण भारतीय बनावटीच्या ग्लोबल पोजीशानिंग सिस्टिमचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलेल्या आयआरएनएसएस (IRNSS) प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीने आज एक मैलाचा दगड पार केला. ह्या प्रणालीत अंतर्भूत असलेल्या सात उपग्रहांमधला सातवा, शेवटचा, उपग्रह भारताने आज श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात प्रक्षेपित केला. ह्या शिरपेचातल्या तुऱ्याने भारत आज अमेरिका, रशिया, युरोप आणि चीन ह्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

कारगिल युद्धाच्या वेळी स्वतंत्र आणि भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची गरज अधोरेखित झाली होती. त्यावेळी अमेरिकेच्या GPS ह्या प्रणालीचा उपयोग भारताला करावा लागला होता. इस्रोने त्यानुसार आयआरएनएसएस (IRNSS) प्रणालीचे काम हाती घेतले होते आणि आज सर्व उपग्रह प्रक्षेपित करून भारताचा उपग्रह आणि अवकाश तंत्रज्ञानातली घेतलेली झेप किती यथार्थ आहे हे सिद्ध केले.

(चित्र: आंतरजालावरून साभार)

ह्या प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये:

  • भारतीय उपखंडातील भारताच्या आजूबाजूच्या सुमारे १५००  किमी प्रदेशात ह्या प्रणालीची सेवा अचूक, रिअल-टाइम स्थिती आणि वेळ दाखवू शकणार आहे.
  • ही प्रणाली दोन प्रकारच्या सेवा प्रदान करेल:
    १. Standard Positioning Service (SPS) – हे सेवा खुली असून नागरी उपयोगाकरिता वापरण्यात येईल.
    २. Restricted Service (RS) – ही सेवा फक्त अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल आणि सुरक्षेसाठी ही सेवा एनक्रिप्टेड असेल.
  • ह्या प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित केलेले IRNSS-1A, 1B, 1C, ID,1E, 1F and IG असे हे सात उपग्रह.
  • सर्व उपग्रहांची कार्यक्षमतेचा कालावधी १२ वर्षांचा आहे आणि आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी २ राखीव उपग्रह तैनात केलेले आहेत.
  • येत्या ३-४ महिन्यांमध्ये ह्या सातही उपग्रहांमध्ये समन्वय साधला जाऊन त्यांचे प्रणालीबरहुकूम काम चालू होईल.

२४ उपग्रहांची GPS आणि GLONASS, ३४ उपग्रहांची युरोपियन गॅलिलियो, ३५ उपग्रहांची चिनी बैदु ह्या पार्श्वभूमीवर ७ उपग्रहांची सुटसुटीत IRNSS हे भारताच्या तंत्रज्ञानाताल्या अफाट प्रगतीचे द्योतक आहे!