लाल सिंग चढ्ढा

बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, “नका बघू मग आमचे सिनेमे” ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.

काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.

सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.

सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.

जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे…वगैरे…) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.

सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

आशा भोसले – जीवेत शरद: शतम् 

आशा भोसले
(Image used from Internet – Wikipedia)

मिसरूड फुटण्याच्या काळात, सतरा अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असताना बाजीगर सिनेमा बघण्याचा योग आला. नाही… नाही… शाहरुख खान बद्दल काही म्हणायचं नाहीयेय. त्या सिनेमामध्ये एक गाणं होतं, ‘किताबे बहुत सी पढी होगी तुमने, कही कोई चेहरा भी तुमने पढा है ‘. ते गाणं तेव्हा ऐकलं त्यावेळी त्या गायिकेचा धारदार आवाज काळीज चिरत खोलवर गेला. त्या आवाजाची इतकी भुरळ पडली होती की ते गाणे अक्षरशः लूपवर लावून ऐकत होतो. पण तो आवाज कोणाचा आहे हे त्यावेळी माहिती नव्हत कारण त्या वयात तोपर्यंत किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि के. एल. सैगल सोडून यांच्या पलीकडे संगीत जास्त ऐकलं नव्हत. (गाण / संगीत ऐकण्याची साधन तेव्हा परवडणारी नव्हती.) तेव्हा त्या गाण्याच्या गायिकेचा आवाज कोणाचा आहे हे माहिती नसल्याने साहजिकच कोणाचा आवाज आहे याचा शोध घेतला. तेव्हा तो आवाज आशा भोसले यांचा आहे असं कळलं! ते कळलं आणि चाटच पडलो कारण त्या वर्षी आशाबाईंचं वय साठ (६०) वर्ष होतं. सतरा – अठरा वर्षांच्या अल्लड तरुणीला तो साठ वर्षाच्या गायिकेचा आवाज चपखल बसला होता!

आशाबाईंचा आवाज आहे कळल्यावर झपाटून गेलो आणि त्यांच्या गाण्यांची शोधमोहीम हाती घेतली. आणि, त्या शोधमोहिमेत जे काही हाती लागलं त्याने आयुष्यच बदलून गेल. आशाबाईंच्या गाण्यांचा मग जो काही खजिना हाती लागला आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी अशी काही मनावर पडली त्यातून आजही बाहेर येता येत नाहीयेय. त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडून, त्यांचा फॅन होऊन, ‘लता ग्रेट की आशा’ ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, एक वेगळीच धुंदी होती त्यात त्या अल्लड वयामध्ये. आणि, त्या गाण्याच्या आवाजाच्या मोहिनी मुळे हे असले वाद कसे निरर्थक आणि पोकळ आहेत याची जाणीवही नसायची पण ते भारावलेपणच तितकं तीव्र होतं.आशाबाई – आर डी बर्मन, आशाबाई – ओ पी नय्यर, आशाबाई – कॅब्रे सॉंग्स, आशाबाई – मादक गाणी अशी अनेक समीकरण झाली होती. पण ह्या सगळ्या समीकरणांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आवाजावरची भक्ती उत्तरोत्तर वाढतच गेली.

मध्यंतरी कुठल्यातरी एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये त्या आणि सुनिधी चौहान दोघीही एकत्र होत्या. (सुनिधी चौहान ही माझी आताच्या काळातली आवडती गायिका) त्यावेळी आशाबाईंनी गायकाला (स्पर्धकाला) काहीतरी सल्ला दिला आणि खाण्यापिण्याची काळजी गेट आवाजाची निगा कशी राखायची या बद्दल काहीतरी सांगत होत्या. त्या वेळेस सुनिधीने, “मी तर चॉकलेट, आइसक्रीम मनमुराद खाते,जीवन मुक्त जगलं पाहिजे” असल्या टायपाची काहीतरी अल्लड विधान करून आशाताईंना प्रतिवाद करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खरंच हसूआलं, ज्या वयामध्ये आशाबाई तिच्या समोर बसून त्यांच्या आवाजाच्या ताकदीने स्टेजला आग लावता होत्या त्या पुढे अशी काहीतरी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचा कळस होता. असो! अशा या हरहुन्नरी गायिका, आशाबाई आज वयाच्या 88 व्या वर्षी वर्षात पदार्पण करत आहेत.

त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

चावडीवरच्या गप्पा – AI / ML चा बागुलबुवा

chawadee

हा लेख मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या  श्रीगणेश लेखमाला २०१९ मधील ह्या लेखात पूर्वप्रकाशित!

चिंतामणी“सोशल मिडीयवर एक व्हिडीयो व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो लाखो नोकर्‍यांवर गदा येणार अस म्हटलय!” चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, ते ही एकदम सोशल मीडिया-बिडीया. हम्म, जोरात आहे गाडी!”, नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.

“नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो! “, घारुअण्णा तिरमिरीत.

“अहो चिंतोपंत, कसला व्हिडियो आणि काय आहे काय त्या व्हिडियोत एवढं व्हायरल होण्यासारखं?”, बारामतीकर.

“व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?”, नारुतात्या वेड पांघरत.

“नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे.”, चिंतोपंत.

“म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?”, बारामतीकर मोठा आ करत.

भुजबळकाका“बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी काम रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते! “, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“तितकं सोपं नाहीयेय ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत, खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही.”, चिंतोपंत.

“विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचे. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?”, घारुअण्णा घारुअण्णागरगरा डोळे फिरवत.

“घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं.”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनह्रदयसम्राट, असं कसं, चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडियोत काही तथ्य असेलच ना.”, घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.

चिंतोपंत“होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गुगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हे सुद्धा सांगतंय, आता बोला!”, चिंतोपंत.

“हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?”, घारुअण्णा चिंताग्रस्त होत.

“काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!”, इति बारामतीकर.

“अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसेच टेस्ट करण्यासाठी केला जातोय.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!”, घारुअण्णा बावचळून जात.

भुजबळकाका“अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्या पादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाईक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वातक्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसऍप्स म्हणजे फोटो प्रोसेस करणारी ऍप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत.”, भुजबळकाका समजावून सांगत…

“आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खुपसारा विदा (डेटा), अक्षरशः: टेराबाईट्समध्ये, पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार. “, इति भुजबळकाका.

“अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!”, नारुतात्या ‘आजी म्या ब्रह्म पाहिले’ असा चेहरा करत.

“हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

चिंतोपंत“अहो, पण अमेरिकेततर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. ऍमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्टकरून, मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून, आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवण पण करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!”, चिंतामणी चिंताग्रस्त होत.

“साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्‍यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला.”, भुजबळकाका.

“म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल तो तरून बारामतीकर
जाईला हा अवघड काळ, काय बरोबर ना?”, बारामतीकर विचार करत.

“बारामतीकर, ते खरंच हो पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असच राहूनराहून वाटतंय!”, साशंक चिंतोपंत.

“म्हणजे त्या इंग्रजी सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रीक्ससिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका? “, घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत.

“अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!”, भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत.

“आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही अस नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?”, नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना

“आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंग हे, काळाच्या ओघात होणार्‍या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावले आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला अजून बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचे आणि नोकर्‍यांचे नेमके काय आणि होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणे उचित ठरणार नाही. त्याची कास घरून पुढे जावेच लागेल. औद्योगिक क्रांती, इलेक्ट्रॉनिक्स आणि आलिकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगिकारावंच लागेल.

पण, ह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलीजंस मुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंग मुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या ‘जाणिवेत’ न राहता, आधिभौतिक तंत्रज्ञानच्या प्रगतीने येणार्‍या नेणीवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेच अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही ह्याची काळजी घेतली की झालं!”, सोकाजीनाना मंद हसत.

“पटतंय का? चला तर मग, आज चहा नको, बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी ते घ्या आणि तोंड गोड करा!”, सोकाजीनाना मिष्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचे ताट फिरवू लागले.

पुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य

Plagiarism किंवा वाड्‍ःमयचौर्य हा प्रकार ब्लॉगर जगतात ब्लॉगर्ससाठी काही नवीन नाही. त्यापासून सुरक्षा म्हणून कॉपीराईट सुविधा पुरविणाऱ्या बऱ्याच साईट्स पुढे आल्या. बहुतेककरून सर्व ब्लॉगर्स ह्या सुविधांचा वापर ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित करतात. मीही ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित केले आहेत.

पण नुकताच एक धक्का बसला. ‘पुढारी’सारख्या ख्यातनाम वर्तमानपत्राकडून माझ्या सैराटवरच्या लेखाचे वाड्‍ःमयचौर्य झाले. ‘बॅकसाईड स्टोरी’ ह्या सदरात माझा लेख जसाचा तसा प्रकाशित केला होता.  त्या लेखावर  एक प्रतिक्रिया टाकून  मी  निषेध नोंदवून ह्याबद्दल खुलासा मागवला. त्याचबरोबर संकेत पारधी ह्या मित्राने फेसाबुकवर पोस्ट टाकून हे वाड्‍ःमयचौर्य पब्लिकमध्ये उघड केले.

त्यावर पुढारी कडून त्या लिंकवर माझा नामनिर्देश करणारा खालील चित्रात दिसणारा बदल करण्यात आला. (त्यात वापरलेली मराठी भाषा अतिशय हास्यास्पद आहे)

IMG_4101[1]

तसेच पुढारीच्या वेबअडमीन कडून मेलद्वारेही खुलासा करण्यात आला.

Web Pudhari – webpudhari@pudhari.co.in via rediffmailpro.com
May 20

Dear Sir,
Got your mail regarding the article. This article was published in one of our print edition and so got carried on the website. We have informed this matter to the concern editor who is looking into the issue. Please give us some time to find out who submitted your article to us..
Pls send us your mobile number so that we can get in your touch…

असा अतिशय अश्लाध्य प्रकार पुढारीसारख्या दैनिकाकडून व्हावा हे खरोखर खेदजनक आहे. तसेच संपादकांनी कोणीही दिलेला मजकूर कसलीही शाहनिशा न करता प्रकाशित करावा  हेही निंद्य आहे!

पुढारीने माझा नामनिर्देश करून चूक कबूल केली आहे पण  त्याचा आनंद नाही कारण आता वर्तमानपत्रांचा  वाड्‍ःमयचौर्यरूपी काळ’ सोकावातोय…

भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS

मागे GPS वर लिहिलेल्या लेखात संपूर्ण भारतीय बनावटीच्या ग्लोबल पोजीशानिंग सिस्टिमचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलेल्या आयआरएनएसएस (IRNSS) प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीने आज एक मैलाचा दगड पार केला. ह्या प्रणालीत अंतर्भूत असलेल्या सात उपग्रहांमधला सातवा, शेवटचा, उपग्रह भारताने आज श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात प्रक्षेपित केला. ह्या शिरपेचातल्या तुऱ्याने भारत आज अमेरिका, रशिया, युरोप आणि चीन ह्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

कारगिल युद्धाच्या वेळी स्वतंत्र आणि भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची गरज अधोरेखित झाली होती. त्यावेळी अमेरिकेच्या GPS ह्या प्रणालीचा उपयोग भारताला करावा लागला होता. इस्रोने त्यानुसार आयआरएनएसएस (IRNSS) प्रणालीचे काम हाती घेतले होते आणि आज सर्व उपग्रह प्रक्षेपित करून भारताचा उपग्रह आणि अवकाश तंत्रज्ञानातली घेतलेली झेप किती यथार्थ आहे हे सिद्ध केले.

(चित्र: आंतरजालावरून साभार)

ह्या प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये:

  • भारतीय उपखंडातील भारताच्या आजूबाजूच्या सुमारे १५००  किमी प्रदेशात ह्या प्रणालीची सेवा अचूक, रिअल-टाइम स्थिती आणि वेळ दाखवू शकणार आहे.
  • ही प्रणाली दोन प्रकारच्या सेवा प्रदान करेल:
    १. Standard Positioning Service (SPS) – हे सेवा खुली असून नागरी उपयोगाकरिता वापरण्यात येईल.
    २. Restricted Service (RS) – ही सेवा फक्त अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल आणि सुरक्षेसाठी ही सेवा एनक्रिप्टेड असेल.
  • ह्या प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित केलेले IRNSS-1A, 1B, 1C, ID,1E, 1F and IG असे हे सात उपग्रह.
  • सर्व उपग्रहांची कार्यक्षमतेचा कालावधी १२ वर्षांचा आहे आणि आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी २ राखीव उपग्रह तैनात केलेले आहेत.
  • येत्या ३-४ महिन्यांमध्ये ह्या सातही उपग्रहांमध्ये समन्वय साधला जाऊन त्यांचे प्रणालीबरहुकूम काम चालू होईल.

२४ उपग्रहांची GPS आणि GLONASS, ३४ उपग्रहांची युरोपियन गॅलिलियो, ३५ उपग्रहांची चिनी बैदु ह्या पार्श्वभूमीवर ७ उपग्रहांची सुटसुटीत IRNSS हे भारताच्या तंत्रज्ञानाताल्या अफाट प्रगतीचे द्योतक आहे!

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार

chawadee

“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.

“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.

“तो शिंचा केजरी त्या अम्रीकेच्या CIA च्या ताटाखालचं मांजर आहे म्हणे!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“हो त्याच्या NGO ला मिळणारे फंडींग, त्याच्या परदेशवार्‍या तसे असण्याला दुजोराच देताहेत.”, इति चिंतोपंत.

“अहो हो ना, म्हणे भाजपावर वचक आणि कंट्रोल ठेवायला अम्रीकेने उभे केलेले बुजगावणे आहे ते, जसे त्या पाकड्यांच्या मलाला उभे केले होते तसे.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो घारुअण्णा, उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करू नका, शांतपणे बोला जरा.”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“हो ना, विषय काय नं हे बोल्तात काय? भाजपाचा सुपडा साफ झालाय त्याचे काय ते बोला ना.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! अहो पण भाजपाचा मतदार दूर गेलेला नाही. तो भाजपाच्या पाठीशीच आहे.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… मियाँ गीरे तो गीरे तंगडी उनकी उप्परच!”, नारूतात्या पुन्हा एकदा पांचट विनोद मारत.

“हो ना! अहो, दिल्लीत जेमतेम 3 जागांची बेगमी झालीय आणि कसला मतदार पाठीशी हो घारुअण्णा?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, भाजपाचा टक्का कमी झालाच नाहीयेय, काँग्रेसची सगळी मते आपला मिळाली आहेत आणि काँग्रेसचाच सुपडा साफ झाला आहे खरंतर.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, काँग्रेस संपतेय ते कसे काय बघवेल त्यांना.”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! इथे विषय दिल्ली निवडणूकीच्या निकालांचा चाललाय. काँग्रेस तशीही रिंगणात कधी नव्हतीच. दुहेरी लढतच होती ही.”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, आणि अरविंदला शह द्यायला त्याच्या एकेकाळच्या साथी, किरण बेदींना, रिंगणात आणायची चाल खेळून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपाने. पण ती गाजराची पुंगी होती ते आता कळतंय, आता पराभवाचे खापर त्यांच्या बोडक्यावर मारता येईल म्हणजे मोदींच्या जोधपुरीवर शिंतोडा नाही.”, बारामतीकर शांतपणे.

“मोठे मोठे नेते, खुद्द पंतप्रधान, दिल्लीत येऊन शक्तिप्रदर्शन करून दिल्ली काबीज करण्याच्या गर्जना करत होते.”, इति भुजबळकाका.

“पंतप्रधान? प्रधानसेवक म्हणायचंय का तुम्हाला?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“अहो ते तर दिल्ली पादाक्रांत केल्याच्या थाटात, दिल्लीतूनच नितीशकुमारांना आव्हान देत होते!”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, एक अराजक माजवणारा माणूस आणि त्याचा पक्ष, काश्मीरला स्वायत्तता द्या असे म्हणणारे त्याचे साथीदार हे दिल्लीचा, देशाच्या राजधानीचा, कारभार हाकणार हे पटतच नाहीयेय.”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“फुक्कट वीज, फुक्कट पाणी सगळा फुकट्या कारभार असणार आहे. काय आहे विश्वेश्वराच्या मनात ते त्या विश्वेश्वरासच ठाऊक! ”, घारुअण्णा तणतणत.

“कळकळ दिल्लीत अराजक माजणार त्याच्यामुळे आहे.”, चिंतोपंत.

“होय होय, भाजपा हरल्याचं दुःख नाही पण हा केजरीवाल सोकावतोय ना…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. हे असले कुडमुडे ‘आप’वादी राजकारणी कसं काय राज्य चालवणार?”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“आप किंवा केजरीवाल अ‍ॅन्ड कंपनी दिल्लीत निवडून आली, ती कशी? भरघोस मतदान होऊन! आता मतदान कोणी केले? दिल्लीकरांनी! जे तिथे राहताहेत त्यांनी त्यांच्या भल्यासाठी दिलेला कौल आहे तो. त्याच दिल्लीकरांनी लोकसभेसाठी भाजपाला कौल दिला होता, तो देश चालविण्यासाठी होता. आता स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकांना निवडून आणले आहे. परिपक्व लोकशाहीची जाण असल्याचा वस्तुपाठ आहे तो! आणि अराजक माजवलेच आपने तर जशी भाजपाची आणि काँग्रेसची गत आज केलीय तशी दिल्लीकर आपची करतीलच की! दिल्लीकरांनी विश्वास दाखवलाच आहे तर आपण ही 100 दिवस बघू की वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते. त्यावरून 5 वर्षांत काय होईल याचा अंदाज येईल. आणि तसंही जादूची कांडी असल्यासारखे सगळे लगेच आलबेल होत नाही, लागायचा तो वेळ लागतो, हे मोदींनी केंद्रात दाखवून दिले आहेच!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“तर, जे काय व्हायचे असेल ते होईलच! पण आता जरा ‘आप’चे कौतुक आणि अभिनंदन करा की 67/70 ही कामगिरी कौतुकास्पद आहेच. काय पटते आहे का? जाऊ द्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – अफझलखानाचे सै(दै)न्य

chawadee

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.

“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.

“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला? ”, घारुअण्णा बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे ओले करीत.

“अहो, म्हणून काय ह्या थराला जायचे? असे बोलायचे, तेही एकेकाळच्या मित्राला? ते ही चक्क उपरा असल्याच्या थाटात?”, इति चिंतोपंत.

“मित्रं??? असा पाठीत खंजीर खुपसणारा मित्रं?? शिरा पडो असल्या मित्राच्या तोंडात!”, घारुअण्णा गरगरा डोळे फिरवत.

“अहो घारुअण्णा, भावुक होऊ नका उगीच. शांतपणे विचार करा जरा. खरोखरीच ते वक्तव्य चुकीचे नव्हते का? अशी उपमा योग्य आहे का? कितीही मतभेद असले तरीही अफझल खानाचे सैन्य असे म्हणणे हे जरा अतीच होते बरं का!”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! युती तोडायचे पातक केलेन ते केलेन वरून मिज्जासी दाखवताय कोणाला? ते सहन करून घेतलेच जाणार नाही बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात! महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असा संदेश द्यायलाच हवा. शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनीही हेच केले असते.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… बाळासाहेब असते तर युती तुटलीच नसती! कुठे ते हिंदूहृदयसम्राट आणि कुठे हे स्वहृदयसम्राट!”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“हो ना! अहो दिल्लीत सरकार आले ते ह्यांच्याच युतीमुळे असे समजून बेडकी फुगावी तसे फुगले हे उदबत्ती ठाकरे! उदबत्ती फटाका पेटवायच्या कामी येते पण तिच्यात स्वतःमध्ये कसलाही दम नसतो हे कळले असते तर असली बाष्कळ वक्तव्य करायची वेळ आली नसती त्याच्यावर.”, बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना, आणि ते ही डायरेक्ट मोदींवर हल्ला? स्वकर्तृत्वावर आणि हिकमतीवर बहुमत मिळवून मिळालेल्या एका पंतप्रधानावर? ”, बारामतीकर हसत.

“स्वकर्तृत्वावर? संघानं डोक्यावर घेतला आणि भाजपाने पैसा ओतला म्हणून हा शिंचा पंतप्रधान! त्यात पुन्हा ब्राह्मणही नाही, कसले स्वकर्तृत्व त्या शिंच्याचे?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! पुरोगामी महाराष्ट्रात आहात, असल्या जातीयवादी पिंका टाकवतात तरी कशा तुम्हाला!”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“अच्छा, म्हणजे मोदी ब्राम्हण नाही हे कारण आहे होय घारुअण्णांच्या मोदीद्वेषाचे? बरं बरं…”, नारुतात्या संधी अजिबात न सोडत खाष्टपणे.

“अहो विषय काय, चाललात कुठे? आमच्या साहेबांकडून धोरणीपणा शिकावा जरा उद्धवाने आणि तुम्हीही घारुअण्णा! कितीही कट्टर विरोधक समोर असला तरीही जिभेवर साखरच असणार साहेबांच्या!”, इति बारामतीकर.

“साखर तर असणारच, साखर कारखान्यांच्या सहकारातून ती तर फुकटच असेल नै?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“मला तर हा पवारांचाच काहीतरी कावा वाटतोय. तिकडे मोदींची दाढी कुरवाळताहेत आणि इकडे दोन्ही ठाकरे बंधूंना पण गूळ लावताहेत. कुछ तो गडबड है!”, चिंतोपंत.

“बारामतीकर, है कोई जवाब?”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, असे अफझलखानाची उपमा देणे शोभते का? अरे, अफझल खानाने केलेला हल्ला हा लूट करून शिवरायांसकट महाराष्ट्राला बुडवण्यासाठीचा होता. त्याचीशी तुलना करायचा विचार येऊच कसा शकतो? इतिहास माहिती असला अन पक्षाचे नाव शिवरायांच्या नावावरून असले म्हणजे असे काहीही निंद्य बोलायचा परवाना मिळतो का? इतकी वर्षे सोबत मिळून सत्ता उपभोगली आणि आता तोच हिंदुत्ववादी मित्र अचानक अफझलखानाच्या पातळीवरचा होतो? अजब आहे? अकलेची दिवाळखोरी नाहीतर काय हे?”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“ऐतिहासिक दाखले देऊन जनतेला इतिहासातच रमवत ठेवण्याची ही जुनीच चाल आहे शिवसेनेची आणि एकंदरीतच राजकारण्यांची!”, बारामातीकर.

“हा मुद्दा पटण्यासारखा आहे!”, भुजबळकाका.

“मुद्दा तुम्हाला पटेलच हो! हा घारुअण्णा काहीही म्हणाला तरी त्याची फिकीर इथे आहे कुणाला? आज बाळासाहेब असते तर हे दिवस दिसले नसते! ”, घारुअण्णा उद्वेगाने.

“होय! घारुअण्णा तुम्ही म्हणताय ते खरेच आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, चिंतोपंत एकदम चमकून.

“हो, आज केलेले घूमजाव बघितले का? म्हणे मी टोपी फेकली पण त्यात तुम्ही डोके का घातले? ते ही त्या विधानावर भाजपाकडून कडाडून प्रत्युत्तर आल्यावर लगेच! अरे जनतेला टोप्या घालायचे आतातरी बंद करा!”, सोकाजीनाना कठोर बोलत, “अहो, शिवसेनाप्रमुख जेव्हा काही विधानं करीत तेव्हा ते आपल्या मतांवर ठाम असायचे मग ते मत चूक असो की बरोबर. शिवसैनिक कधीच संभ्रमात असायचा नाही. भूमिका ठाम, पक्की आणि रोखठोक असायची. त्यांना अशी सारवासारव करायची बहुदा गरजच पडत नसे! धाकली पाती उगाच आव आणून बाळासाहेबांचा तोरा आणण्याचा प्रयत्न करते आहे पण ते जमत नाहीयेय.

‘शिवसेनाप्रमुखपद’ हे शिवधनुष्य आहे आणि ते पेलविण्याची ताकद उद्धवाकडे नाही हेच युती तुटल्यावर सिद्ध झाले. मारे बाळासाहेबांचा आव आणाल, पण मुत्सद्दीपणा कुठून आणाल? बरं, ते विधान केले ते केले पण अफझल खान दिल्लीचा सरदार नव्हता, तो दक्षिणेकडून महाराजांवर आणि महाराष्ट्रावर चाल करून आला होता हा साधा इतिहास माहिती असू नये? त्याचे तारतम्य न बाळगता बेजबाबदार विधाने करणे हा भलताच मूर्खपणा आहे!

तर ते एक असो, निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात.”

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’आपली मते

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग…बरं… बरं… काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी! विशेष म्हणजे तुमच्या त्या केजरीवालांचेही पितळ उघडे केले आहे?”, बारामतीकर अभिमानाने.

“ह्म्म्म, आमचे केजरीवाल!”, (आमचे वर जोर देत) नारुतात्या.

“दिल्लीकरांनी अजून पाच सहा जागा देऊन आम आदमी  पक्षाला सरकार बनविण्याची संधी द्यायला हवी होती म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असते असे साहेब म्हणाले, परखडपणे”, बारामतीकर.

“अहो, पवार बोलणारच! त्यांच्या ‘कांद्याचे भाव’  ह्या वर्मावर केजरीवालांनी ‘कांद्यांचे भाव निम्मे करून दाखवू’ असे म्हणत बोट ठेवले होते ना!”, इति चिंतोपंत.

“अहो शेती आणि शेतीची जाण हाच तर साहेबांचा हुकुमाचा एक्का आहे! त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की  या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात  हेच वास्तव आहे.”, बारामतीकर एकदम भावुक होत.

“कसला शिंचा हुकुमाचा एक्का आणि कसली शिंची ती जाण! अहो ह्या कृषिप्रधान देशाच्या शेतीचा पार चुथडा केला आहे ह्या कृषिमंत्र्याने.”, घारुअण्णा लालबुंद होत.

“घारुअण्णा उगाच काहीही बरळू नका, तुम्हाला काय कळते हो शेतीतले?”, शामराव बारामतीकर घुश्शात.

“नसेल मला शेतीतले काही कळत, पण तुमचे सो कॉल्ड साहेब काय करताहेत ते मात्र कळते आहे बरं! भारी शेतकर्‍यांतचा पुळका त्यांना! अहो आपल्या पुण्यातलीच किती एकर लागवडीखालची जागा ‘डेव्हलपमेंट’च्या नावाखाली बरबाद केली? आणि त्यातून कोणाची ‘डेव्हलपमेंट’ झाली हे ही कळते हो! असे केल्यावर कसे वाढणार उत्पन्न आणि कशा होणार किमती कमी?”, घारुअण्णा रागाने.

“अरे पवार काय म्हणाले आणि तुम्ही कुठे चाललात! पवारांनी एकंदरीत आढावा घेतला आहे निवडणूक निकालांचा. सर्वांनाच कानपिचक्या दिल्या आहेत त्यांनी!”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“धन्यवाद बहुजनहृदयसम्राट, नेमके हेच म्हणायचे होते मला.”, बारामतीकर हसत.

“पण साहेबांनी केजरीवालांवर केलेला हल्ला जरा अतीच होता. दिल्ली निकालानंतर तर काय सगळेच केजरीवालांचे भविष्य आपल्यालाच कळल्याच्या थाटात मते सांडत सुटले आहेत? ”, इति भुजबळकाका.

“म्हणजे? स्पष्ट बोला असे मोघम नको.”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, लोकसत्तेच्या अग्रलेखात माननीय संपादकांनी काय तारे तोडलेत ते वाचले नाहीत का?”, भुजबळकाका.

“नाही ब्वॉ, काय म्हणतोय लोकसत्तेचा अग्रलेख?”, इति घारूअण्णा.

“ज्या क्षणी ‘आम आदमी पक्ष’ आपली राजकीय भूमिका स्पष्ट करेल तो क्षण आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात असेल असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“आम आदमी पक्ष वा त्या पक्षाचे रोमॅंटिक समर्थक यांनी हुरळून न जाणे बरे असा फुकटचा न मागितलेला सल्ला ही दिला आहे बरं का!”, चिंतोपंत.

“च्यामारी, त्या बिचार्‍या केरजीवालाचे यश कोणालाच बघवेनासे झालेले दिसतेय!”, नारुतात्या जोरात हसत.

“हो ना, अण्णांनी पण मौन सोडलेले दिसतेय. अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाचा प्रचार दिल्लीतल्या घरा-घरात झाला असे आता अण्णा म्हणताहेत.”, चिंतोपंत.

“पण हेच अण्णा केजरीवालांची खिल्ली उडवत होते ना पक्ष स्थापनेनंतर?”, नारुतात्या.

“अहो, केजरीवालांचे यश बघून त्यांचे संतपण ही गळून पडलेले दिसतेय, परत उपोषणाची घोषणा केली आहे त्यांनी! किती ती शिंची अॅलर्जी म्हणावी, खीsssखीsssखीsss”, घारुअण्णा खो खो हसत.

“त्या किरण बेदीही निवडणूक प्रचाराच्या वेळी कुठेही नव्हत्या, पण निकालानंतर मात्र एकदम आप आणि भाजपा यांच्यात समेट करायला रिंगणात!”, चिंतोपंत.

“अहो भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच! दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुका होतात की नाही बघा! साहेबांचेही खाजगीतले हेच मत आहे.”, बारामतीकर.

“त्याचा फायदा भाजपालाच होईल, केजरीवालांना काही फायदा होईलसे वाटत नाही.”, चिंतोपंत.

“काहीही असो, पण केजरीवालांनी मिळवलेल्या यशाने बहुतेकांना अनपेक्षिततेचा धक्का जरा जास्तच बसलेला दिसतोय!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो केजरीवालांना कोणी खिजगणतीतच धरले नव्हते! काँग्रेस राहुल गांधी आणि भाजपा नरेंद्र मोदी यांच्याच नादात होते. केजरीवाल एकदम 28 जागांवर कब्जा मिळवतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. त्यामुळे हा धक्काच आहे सर्वांसाठी!”, सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, खरे आहे तुमचे?”, नारुतात्या.

“सद्य राजकीय अनागोंदीच्या आणि भ्रष्ट सरकारी पार्श्वभूमीवर हा निकाल पॉझिटिव्ह आणि प्रॉमिसिंग ठरावा. अण्णांच्या आंदोलनाने जन-जागृती झाली होती पण त्या जन-आंदोलनात भरीव काहीही नव्हते. त्यावेळी झालेल्या जन-आंदोलनाने समजा जर क्रांती होऊन सत्ताधार्‍यांना सत्तेवरून हाकलून लावले असते, ट्युनेशिया क्रांतीसारखे, तर पर्यायी सरकारची व्यवस्था काय होती अण्णांकडे? नुसते जनलोकपाल बील पास करून घेण्यासाठीच झालेल्या जन-जागृतीचा आणि जन-आंदोलनाचा भर ताबडतोब विरून गेला कारण ठोस अजेंडाच काही नव्हता. व्यवस्थेला बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग असणे गरजेचे असते, केजरीवालांनी नेमके हेच जाणून घेतले आणि आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यावेळी अण्णांची त्यातून माघार घेतली खरी पण आता त्यांचीही गोची झालेली दिसतेय कारण केलरीवालांचे हे यश कोणालाच अपेक्षित नव्हते.

सद्य स्थितीत, कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष सत्तेवर येण्यापेक्षा एका नवीन, फ्रेश पर्यायाची भारताला गरज आहे. ‘आप’च्या रूपात केजरीवालांनी तो पर्याय दाखवला आहे आणि दिल्लीतील त्यांच्या विजयाने जनतेने त्या पर्यायाला स्वीकारलेले दिसते आहे. आता केजरीवाल आणि त्यांचे आमदार कसे आहेत ते लवकर कळेलच. त्यामुळे दिल्ली हा ‘आप’ची धोरणे समजून घेण्यासाठी उपलब्ध झालेला एक प्लॅटफॉर्म ठरावा. एवढ्यातच कुठल्याही निष्कर्षावर पोहोचणे हे जरा आततायी होईल. सो, वेट अॅन्ड वॉच!”, सोकाजीनाना मंद हसत.

“काय पटते आहे का? जाऊद्या चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – पंतांची ‘बेबंदशाही’

chawadee
“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.

“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.

“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.

“कसली दुरुस्ती? काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा चेहरा वाकडा करत.

“जे काम बाळासाहेबांनी फार पूर्वीच करायला हवे होते ते ह्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी केलं, झालं!”, इति भुजबळकाका.

“अच्छा म्हणजे सरांविषयी बोलता आहात तर आपण”, चिंतोपंत चर्चेत येत.

“हो! ‘मनोहर जोशी परत जा’, ‘मनोहर जोशी चले जाव’, शिवसैनिकांच्या अशा घोषणांमुळे सरांना व्यासपीठच नव्हे तर मेळावा सोडून जावे लागले.”, भुजबळकाका शांतपणे.

“अहो, हे तर धक्कादायक आहे!”, आता शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना! हे जरा अतीच झाले आणि काय हो बहुजनहृदयसम्राट ह्यात तुम्हाला का एवढा आनंद झाला आहे?”, चिंतोपंत जराशा त्राग्याने.

“आनंद नाही झालाय पण जे काही झाले ते खूप उशीरा झाले असे म्हणायचे आहे. अहो, खाजवून खरूज काढायचे आणि ते चिघळले की बोंबा मारायच्या असे झाले हे सरांचे चिंतोपंत”, भुजबळकाका.

“म्हणजे काय? कसली खरूज?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, दादरला एका नवरात्र मंडळाच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांनी दिली काडी लावून. ‘शिवसेनेचे नेतृत्व आता बाळासाहेबांसारखे आक्रमक राहिले नाही’ ‘असे स्फोटक विधान केले. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही वर त्यांनी व्यक्त केली. आहे की नाही मज्जा!”, भुजबळकाका उपहासाने.

“बाळासाहेबांच्या स्मारकाचा खांदा करून, त्यावर बंदूक ठेवून त्यांनी उद्धवावर गोळ्या डागण्याचा प्रयत्न केला खरा पण तो अंगाशी आला.” इति बारामतीकर.

“अगदी बरोबर बोललात बारामतीकर! अहो सरांचा हा बामणी कावा आजचा नाहीयेय. अगदी शिवसेनेत बाळासाहेबांच्या जवळ पोहोचल्या पासूनचा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“ओ बहुजनसम्राट असलात म्हणून उगाच काहीही बरळू नका! कसला बामणी कावा? वाट्टेल ते बोलाल काय?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत, इतिहास गवाह है! बहुजन समाजात, तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम ज्या छगनरावांनी केले त्यांच्यावरच शिवसेना सोडण्याची वेळ यावी यामागे कोणाचा आणि कोणता कावा होता हे सर्वांना माहिती आहेच.”, इति भुजबळकाका.

“बरं! ज्या शिवसेनेमुळे आणि बाळासाहेबांमुळे त्यांचे स्वतःचे अब्जावधी रुपयांचे साम्राज्य त्यांनी उभे केले त्यांच्याच स्मारकावरून राजकारण करावे ही मात्र हद्द झाली.”, बारामतीकर तावातावाने.

“ ‘बाळासाहेबांची भाषा आपण वापरत नाही, म्हणून त्यांचे स्मारक होण्यास विलंब होत आहे. त्यांची भाषा वापरली असती तर आतापर्यंत त्यांचे स्मारक उभे राहिले असते आणि आता स्मारकासाठी आंदोलन उभे राहिले तर त्यासाठी उभा राहणारा पहिला सैनिक मी असेन’, असली काहीतरी कावेबाज स्टेटमेंट पत्रकारांना देण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही”,भुजबळकाका

“अहो खरंआहे , एवढा जर पुळका होता स्मारकाचा तर द्यायचा एक कोपरा कोहिनूर मिलचा स्मारकासाठी पण नाही.”, इति बारामतीकर.

“अहो, मुळात स्मारक स्मारक हवेच कशाला! त्याने काय असे भले होणार आहे?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“अहो, इथे स्मारक हवेय कोणाला, त्याच्या आडून राजकारण करायला मिळते ना!”, बारामतीकर.

“अहो शिवसेनेत आल्यापासून फक्त राजकारणच आणि तेही घाणेरडे राजकारण करणारे सर काय म्हणताहेत बघा ‘राजकारण आणि धोरणीपण एकत्र असतात. बाळासाहेब २0 टक्के राजकारणी आणि ८0 टक्के समाजकारणी होते. त्यांनी राजकारणाला नाही तर समाजकारणाला महत्त्व दिले. बाळासाहेब निवडणुका जिंकणारे राजकारणी नव्हते, म्हणूनच ते आदर्श राजकारणी होते.’, आहे की नाही मज्जा आणि चिंतोपंत, तुमच्यासाठी ‘बामणी’ हा शब्द वगळतो, पण ह्यात तुम्हाला कावा दिसत नाही?”, भुजबळकाका हसत.

“अहो, साहेबांच्या जवळ असल्याने ह्यांनी स्वतःच्या फायद्याचे राजकारण करून, स्वतःचे भले करून घेतले खरे पण त्याचबरोबर शिवसेनेचे भले करण्याऐवजी नुकसानच केले त्यांनी. बाळासाहेबांनी मुख्यमंत्रिपदी बसवले त्याचीही चाड ठेवली नाही.”, बारामतीकर.

“चालायचेच, तुमच्या साहेबांच्याच जास्त जवळ आहेत म्हणे ते बाळासाहेबांपेक्षा, वाण आणि गुण लागायचाच मग!”, नारुतात्या गालातल्या गालात हसत.

“नारुतात्या, उगाच आमच्या साहेबांना मध्ये आणायचे काम नाही!”, बारामतीकर जरा चिडून.

“का हो का? शिवसेना आणि बाळासाहेब ह्या चर्चेत पवारसाहेबांचा विषय येणे अपरिहार्यच आहे हो!”, नारुतात्या गालातल्या गालातले हसणे चालू ठेवत.

“नारुतात्या, पोरकटपणा करून उगाच विषयांतर करू नका!”, भुजबळकाका वैतागत.

“अहो, बहुजनहृदयसम्राट, नारुतात्यांच्या बोलण्यात तथ्य आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“ऑ?”, घारुअण्णा एकदम चमकून.

“अहो, दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी दादरला नवरात्र मंडळात केलेला मेलोड्रामा ह्यात एक छुपे कनेक्शन नक्कीच आहे.”, सोकाजीनाना मिश्किल हसणे कायम ठेवत.

“सोकाजीनाना, स्पष्ट बोला ब्वॉ! ह्या खोपडीत काही शिरले नाही.”, नारुतात्या हार मानत.

“सोपे आहे हो सगळे. मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही? पण पंतांचा लोभ काही सुटत नाही. थोडा हे थोडे की जरुरत है असेच त्यांचे अजूनही चालले आहे. लोकसभेच्या उमेदवारीचा लोभ आणि ती धोक्यात येताना दिसणारी उमेदवारीच ह्या सगळ्या मर्कटलीला करण्यास त्यांना भाग पाडत आहे.”, सोकाजीनाना

“अहो पण सोकाजीनाना, त्याने उद्धवावर तोफा डागून काय होणार आहे?”,चिंतोपंत प्रश्नांकित चेहेर्‍याने.

“अहो तीच तर सरांची खासियत आहे! आधी टीका करायची मग ‘राजकारणाची आवड असेल तर उत्तम लोकप्रतिनिधी होता येते. निवडणुकीचे राजकारण करून मार्गदर्शनही करता येते. मी जुन्या काळातला नेता असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्याबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे’ असली वक्तव्ये करून दबावाचे राजकारण करायचे हा सरांचा फार आवडीचा आणि जुना उद्योग आहे आणि सर त्या उद्योगात एकदम पारंगत आहेत. पण आता ‘होते’ असे म्हणावे लागेल. कारण दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांना उद्धवने कॉर्नर केले ते पाहता सरांची शिवसेनेतली सद्दी संपली याचे सूतोवाच करते.”, सोकाजीनाना पुढे बोलत, “सर व्यासपीठावर येताच शिवसैनिकांकडून त्यांना परत जाण्यास सांगणार्‍या घोषणा सुरू झाल्या. त्यात युवा शिवसैनिकांचा भरणा होता. शिवसैनिकांच्या गोंधळाला शिवसेना नेत्यांची मूकसंमती असल्याचे वाटावे अशी परिस्थिती होती. मनोहर जोशी यांनी व्यासपीठ सोडून जावे ही शिवसैनिकांची भावना असल्याचे चित्र उद्धव यांनी निर्माण केले. सर जेव्हा व्यासपीठावरून जाण्यास निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी कोणीही गेले नाही. वरून उद्धवने पुढे भाषणात ‘कोणाचीही बेबंदशाही चालवून घेतली जाणार नाही’ असा शालजोडीतलापण दिला!”

“थोडक्यात काय, सुंभ जळला तरीही पीळ जात नाही अशी, ‘राजकारणी आणि कावेबाज’ मनोहरपंत सरांची, आजची अवस्था आहे! काय पटते आहे का? चला, चहा मागवा!”, मंद हसतसोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.

थॅन्क्यू गूगल फॉर द डूडल…

आज अस्मादिकांचा वाढदिवस. चेन्नैहून पुण्याला, सुट्टी घेऊन, वाढदिवस कुटुंबासमावेत साजरा करण्याचा प्लान केला होता. चेन्नैहून पुण्याचे विमान भल्या पहाटेचे असल्याने विमानतळावर येण्यासाठी बुक केलेली टॅक्सी त्याहुनही भल्या पहाटे येणार असल्याने झोपेशी गट्टी फू करणे भाग होते. कारण एकदा मी झोपलो की भल्या पहाटे उठणे हे अशक्य काम असते. तर रात्री उशीर पर्यंत बायकोशी चॅट करून, तिच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन, फेसबुकावर मित्रांचे शुभेच्छा संदेश वाचून त्यांना कमेंट्स देईपर्यंत टॅक्सी यायची वेळ झाली. प्रवासात फ्रेश रहावे म्हणून वाढदिवसाच्या मुहुर्तावर भल्या पहाटे चक्क आंघोळ केली. ( हे वर्ष बहुदा धुतल्या तांदळासारखे स्वच्छ जाणार असे वाटते आहे) 🙂

विमानतळावर पोहोचून चेक-इनचे सोपस्कार पार पाडून लाउंज मध्ये आलो. विमानच्या उड्डाणवेळेला भरपूर अवकाश होता म्हणून नेहमीच्या सवयीप्रमाणे लॅपटॉप चालू करून एखादा सिनेमा पहावा असा विचार करून व्हीएलसी प्लेयर चालू करून एक सिनेमा (प्रेस्टीज, सिनेमाचे नाव) चालू केला; तर व्हीएलसी प्लेयर ने फॉन्ट लायब्ररी रीलोड करतो आहे असला काहीतरी मेसेज दिला. त्याला वेळ लागणार होता. आजकालच्या फास्टफूड जमान्यात असे वाट बघणे काही जमत नाही. लगेच टाटा फोटॉन ऑन करून नेटला कनेक्ट झालो. (हे असे नेटला कनेक्ट होताना मला नेहमी मी मॅट्रीक्स सिनेमातला निओ आहे आणि मी डोक्यात प्लग घालून मॅट्रीक्स मध्ये शिरतो आहे असा फील येतो) कनेक्ट झाल्या झाल्या गूगल क्रोम चालू केले. होम पेज अर्थातच गूगल.कॉमच आहे. ते लोड झाले आणि ‘गूगल Doodle’ हे चक्क वाढदिवसाच्या केकचे होते. च्यामारी, माझ्या प्रगटदिनी आणि कोणत्या महान आत्म्याने जन्म घेतला आहे ह्याचे कुतुहल वाटून त्या गूगल Doodle वर माउस कर्सर फिरवला आणि काय चमत्कार सांगावा महाराजा चक्क माझेच नाव!

सकाळी सकाळी इतके छान वाटले म्हणून सांगू की बास. एकदम आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एखाद्या मित्राने आठवणीने शुभेच्छा द्याव्यात असे वाटले.

आता बर्‍याच जणांना हा गूगलचा व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला वाटेल, वैयक्तिक माहिती साठावून त्यातुन माझ्या व्यक्तिगत आयुष्यात केलेला चोँबडेपणा वाटेल किंवा अजून काही. असे वाटणारे माझ्या ओळखीतले, खास मित्र आहेत आणि त्यांच्याशी ह्या विषयावर बरेच वैचारिक वादही झालेत. पण ज्याला जे वाटायचे आहे ते वाटो बापडे! मला जो काही सकाळी…सॉरी…सॉरी भल्या पहाटे गूगलने जो आनंद मिळवून दिला त्याची तोड फक्त रात्री 12 वाजता बायकोने शुभेच्छा दिल्यावर झालेल्या आनंदाशीच होऊ शकेल कदाचित.

तर गूगल, ह्या पर्सनलाईज्ड डूडल बद्दल मनापासून धन्यावाद बरं का!