चावडीवरच्या गप्पा – बळीराजा आणि रामगिरी

chawadee

चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत.

“आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण्णा नाराजीने.

“अहो घारुअण्णा, पण त्यांनी तसे का केले हे तर समजून घ्यायचा प्रयत्न करा ना!”, बारामतीकर जरा सावध होत.

घारुअण्णा“कसले काय हों! काहीतरी फुकटात पदरात पाडून घ्यायचे असेल दुसरे काय?”, घारुअण्णा थोड्याश्या तिरस्काराने.

“नाहीतर काय, कर्जमाफी हवी असेल दुसरे काय?”, नारुतात्या घारुअण्णांची री ओढत.

“नारुतात्या, घारुअण्णा एक आपले फक्त संध्यानंद वाचतात, आता तुम्हीही सध्या संध्यानंद लावलात की काय?”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“का ब्वॉ?”, नारुतात्या.

“अहो! फक्त कर्जमाफीसाठी काहीही झालेले नाही, पेपर वाचला नाहीत का?”, इति बारामतीकर.

भुजबळकाका“आपल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात व्यवस्थित आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून त्यांनी ह्यांना वेळ द्यावा एवढेच त्यांचे म्हणणे होते.”, भुजबळकाका.

“बरंsss मग पोलिसांशी बाचाबाची करण्याचे काय कारण मग?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, अहो मुख्यमंत्र्यांना म्हणे वेळच नव्हता!”, इति बारामतीकर.

“कुठल्या ‘आदर्श’ कामात गुंतले होते म्हणे आपले माननीय मुख्यमंत्री?”, नारुतात्या.

“पुढे कुठल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे कुठले पितळ आता उघडे करायचे याची चर्चा करत असतील पक्षश्रेष्ठींबरोबर अजून काय!”, बारामतीकर नाराजीने.

“छॅsss ह्या आपल्या बारामतीकरांची दौड आपली इथपर्यंतच…”, घारुअण्णा उपरोधाने.

बारामतीकर
“घारुअण्णा शेतीच्या प्रश्नातले तुम्हाला काय कळते हो?”, बारामतीकर घाव सहन न होऊन.

“व्वा रे व्वा! कोंकणात वाडीत नारळी आणि पोफळीची झाडें आहेंत म्हटले आमची. झालंच तर चार फणस आहेंत.”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

नारुतात्या“अहो घारुअण्णा, त्याला झाडी म्हणतात शेती नव्हे! खी…खी..खी… ”, नारुतात्या पाचकळपणा करत.

“नारुतात्या अहो कसला बाष्कळपणा चालवलाय तुम्ही हा, आहो विषय काय तुमचे चाललेय काय?”, चिंतोपंत जरा तडकून.

“नाहीतर काय, अहो शेतकर्‍यांनी न्याय मार्गाने आपले म्हणणे आणि मागण्या मांडायचा प्रयत्न केला होता.”, भुजबळकाका शांतपणे.

“काय मागण्या होत्या त्यांच्या एवढ्या?”, चिंतोपंत.

“केंद्र सरकारने कापसाच्या आधारभूत किमतीत 20 टक्के दरवाढ किंवा राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या न्यायाकरिता 20 टक्के कापसावर बोनस द्यावा, धान्य उत्पादकांना 3 हजार प्रतिक्विंटल दर द्यावा, शेतकर्‍यांना 24 तास वीज द्यावी, शेतकर्‍यांचे वीज बिल आणि कर्जमाफी देण्यासह विविध रास्त मागण्या होत्या शेतकर्‍यांच्या.”, बारामतीकर.

“त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चेला वेळ न दिल्यामुळे त्यांनी चिडून त्यांच्या निवासस्थानावर कूच करायचे ठरवले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना अडवायचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांनी त्या बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली.”, भुजबळकाका.

“पण पोलिसांनी परिस्थिती धीराने हाताळल्यामुळे लाठीचार्ज टळला आणि भलतेच काही झाले नाही.”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“चला म्हणजे कोणीतरी शहाणपणा दाखवला म्हणायचा!”, नारुतात्या.

“अहो सोकाजीनाना ऐकताय ना, शेतकरी आणि पोलिसांची धक्काबुक्की झालीयेय”, चिंतोपंत.

“हो, ऐकले सगळे! कृषिप्रधान असलेल्या भारत देशात, त्या कृषिप्रधानतेचा पाया असलेल्या बळीराजावर ही वेळ यावी याचेच वैषम्य वाटते आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्‍याने.

“हे बरीक खरें हों!”, घारुअण्णा.

सोकाजीनाना“अहो, ज्या जनतेचे नेतृत्व करत आहेत त्या जनतेला देण्यासाठी, जनतेचा सेवक असलेले, मुख्यमंत्री यांना वेळ नसावा, ह्या सारखे दुर्दैव दुसरे कोणते असावे? अडत्यांच्या जाळ्यात अडकलेल्या, अठरा ते वीस-वीस तास लोड शेडिंगच्या तडाख्यात अडकलेल्या, कितीही उत्पादन घेतले तरीही कर्जाच्या विळख्यातच अडकून पिचत असलेल्या आणि ह्या सर्वामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍याने जायचे कोणाकडे? त्याच्या मुख्यमंत्र्याकडेच ना? पण त्यांना त्यासाठीही वेळ असू नये? एकीकडे अतिप्रचंड फायद्यासाठी बिल्डरांच्या गळ्यात गळे घालून लागवडीखालची प्रचंड जमीन लाटायची, त्यासाठी बिल्डरधार्जिणे नियम बनवायचे, ह्यासाठी वेळच वेळच असणार्‍यांना, उरलेल्या जमीनत सचोटीने लागवड करून महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या अन्नधान्याची सोय लावणार्‍यासाठी मात्र वेळ नसावा ह्याची खरंच शरम वाटायला हवी.”, सोकाजीनाना गंभीर चेहेर्‍याने.

“असो, झाली घटना काही चांगली झाली नाही! तरीही शेवटी त्यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर 30 मिनिटे का होईना पण चर्चेसाठी दिली, जनाची नाहीतरी मनाची लाज वाटून, हेही नसे थोडके! जाऊद्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरील गप्पा – सचित्र झलक

नमस्कार मंडळी! चावडीवरच्या गप्पांची मैफल आवडते ना? चावडीवरील सर्व वल्ली आहेतच एकदम नग, एकापेक्षा एक. आजपर्यंत त्यांच्या गप्पा जशा तुम्ही ऐकल्यात तशा त्या, माझी मिसळपाव.कॉम वरील मैत्रिण पूजा पवार हिनेही ऐकल्या आणि ती सोकाजीनानांची फॅन झाली. त्यांच्या चहाची चाहत तिला एकदम भावली. तिने मिसळपाव च्या दिवाळी अंकात ह्या सर्व मंडळींची एक फर्मास चर्चा ‘हौन जाउ दे’ असा आदेश दिला. (हो, ती आदेशच देते!) त्याला मिसळपाव वरील अजुन एक कलाकार मित्र, अभिजीत देशपांडे ह्याने दुजोरा देत ही फर्मास चर्चा सचित्र करुयात असा प्रस्ताव मांडला आणि ह्या वल्लींना दृश्य रुप द्यायचा विडा उचलला.

त्या दोघांच्या प्रयत्नांमुळे ह्या दिवाळीला चावडीवरील सर्वांना चित्रमय अस्तित्व मिळून तुमच्या पुढे येण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पूजा पवार आणि अभिजित देशपांडे या दोघांचे शतशः आभार.

चला तर मग आता तुम्हाला मी सर्वांची ओळख करून देतो.

घारूअण्णा
हे आमचे घारूअण्णा, ह्यांचे बालपण गेले रत्नागिरीच्या मधल्या आळीत, तरुणपण गेले चिपळूणमध्ये आणि आता सध्या उतारवयात पुण्यात स्थायिक झाले आहेत.

रत्नागिरीच्या मधल्या आळीत ह्यांची सगळी हयात न गेल्यामुळे आणि पुण्यातही सदाशिव पेठेत न राहिल्यामुळे, त्यांचे बोलणे जरी तिरकस असले तरीही त्या तिरकस बोलण्याला धार नसते.

ह्यापलीकडे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असल्याने चावडीवर हजेरी लावून उरलेल्या वेळेत वहिनींना मंडईत घेऊन जाणे, संध्यानंद वाचणे, देवळात जाणे यात त्यांचा सारा वेळ जातो. या घारूअण्णांचा देवावर भयंकर विश्वास! अत्यंत धार्मिक आणि सनातनी.

बरेचसे अंधश्रद्धाळूही, भुजबळकाका आणि यांचे खटके उडण्याचे हे ही एक कारण.

भुजबळकाका
हे आमचे भुजबळकाका, यांना त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे चावडीवर बहुजनहृदयसम्राट हे नाव मीच दिले आहे. तसेही यांची पुण्या-मुंबईकडच्या अभिजनांच्या मताशी नेहमीच असहमती असते, पण त्यांचे विचार सर्वसमावेशक असतात.

भुजबळकाका सध्या लष्करातून निवृत्त होऊन आता एका खाजगी कंपनीत चीफ सुरक्षा अधिकारी (CSO) म्हणून काम करत आहेत.

सारी हयात लष्करात गेल्याने शिस्तीचे प्रचंड भोक्ते. कुठलाही उथळपणा यांना चालत नाही अगदी विचारांमधलाही. बालपण अती दुर्गम भागातल्या खेड्यात गेल्यामुळे, परिस्थितीचे बरेच टक्के टोणपे खाल्ल्यामुळे आणि चटके सोसल्यामुळे, विचारांमध्ये एका प्रकारची सर्वसमावेशकता आणि ठामपणा असतो यांच्या.

शामराव बारामतीकर
हे आमचे शामराव बारामतीकर, मूळचे बारामतीचे पण नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य. दर महिन्याला बारामतीला जाऊन शेतीचे कमीजास्त बघणे आणि गावाकडच्या नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारणे हा नेम कधी चुकत नाही.

आता बारामतीचेच असल्याने त्यांची ‘साहेबांच्या’ प्रती असलेली निष्ठा पदोपदी जाणवते. वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या कुटुंबावर ‘साहेबांचे’ बरेच उपकार आहेत असे त्यांनी मला खाजगीत बर्‍याचदा सांगितले आहे.

त्यामुळे राजकारणात साहेबांची बाजू लावून धरणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त असते. पण त्यांचा ‘टग्या’दादांवर अतिशय राग आहे, त्या ‘टग्या’दादांमुळे  ‘साहेबांची’ प्रतिष्ठा कमी होते असे त्यांचे मत आहे. पण सुप्रियाताईंबद्दल त्यांना का कोण जाणे त्यांना खूप जिव्हाळा आहे. 

नारुतात्या
हे आमचे नारुतात्या, कोणाच्याही न अध्यात न मध्यात. यांना सर्वांचेच म्हणणे पटते. थोडक्यात काय तर यांचा नेहमी ‘बेंबट्या’ होत असतो.

साधे सरळ व्यक्तिमत्त्व. यांची सोकाजीनानांवर अपार श्रद्धा. सोकाजीनाना जे म्हणतील ते करण्यास नेहमी तत्पर.

सरकारी नोकरीची शिल्लक राहिलेली काही वर्षे, प्रमोशनचे स्वप्न बघत घालवत आहेत कशीबशी. पण स्वभावाने अगदीच भिडस्त असल्याने साहेबांचे आणि त्यांचे मतभेद होत नाहीत. 

चिंतोपंत
हे आमचे चिंतोपंत, संघाच्या, ब्राह्मणी हिंदुत्वाच्या, मुशीत सारे बालपण आणि तारुण्य नागपुरात पोसले गेलेले आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन स्थायिक झालेले.

ह्यांचे बरेचसे नातेवाईक आणि मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. पण ह्यांना परदेशात राहणे आवडत नसल्याने सध्या निवृत्त होऊन एका पेन्शनराचे आयुष्य मायदेशातच व्यतीत करत आहेत. 

ह्यांचे मूळ कोंकणातले असल्याने यांचे आणि घारूअण्णांचे सूत व्यवस्थित जमते.

सोकाजीनाना
तर मंडळी, हे सोकाजीनाना, कमावत्या वयात, कमावलेला पैसा व्यवस्थित डोके लावून गुंतवला असल्याने आता व्ही. आर. एस. घेऊन स्वच्छंद आयुष्य जगत आहेत. कामानिमित्ताने संपूर्ण जग पालथे घातले असल्याने जाणीवा प्रगल्भ होऊन अनुभवाचे विश्व व्यापक झालेले चावडीवरचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. ह्यांचा शब्द अंतिम आणि प्रमाण मानला जातो चावडीवर.

अनुभवसिद्ध असल्याने कुठल्याही विषयावर बोलण्याची हातोटी आहे यांची. एखाद्या विषयाबद्दल माहिती नसेल तर त्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्याचा ह्यांचा ध्यास विलक्षण आहे. त्यामुळे माहिती नसली तर गप्पा राहून चिंतन करणे आणि अभ्यास करून माहिती मिळाल्यावर, आपल्या विचाराची बैठक भक्कम करूनच मग हे त्यांची मते चावडीवर मांडतात. त्यामुळे त्यांना चावडीवर फार मान आहे.

“मंडळी आता ओळख तर झाली आहेच, तीही चक्क सचित्र. मग आता येत रहा चावडीवर नेहमी आठवणीने. काय आहे गप्पा मारायला आम्हाला आवडतेच पण आपल्या गप्पा कोणीतरी ऐकते, ऐकून त्यावर चर्चा होते हे खूपच सुखावह असते हो! चला आता मी आपली रजा घेतो. काय आहे, चहाची वेळ झाली आमच्या आणि आज ऑर्डर द्यायला कोणीही नाही त्यामुळे चहा प्यायला घरीच जावे लागेल. एक छानसा गजरा घेतो सौ.साठी, तेवढाच जरा मसाला चहा मिळेल हो, काय?”,” सोकाजीनाना मंद हसत.

चावडी
अस्मादिक
सर्वात शेवटी अस्मादिक 🙂

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र

“ते घोर कलियुग का काय म्हणतात  ना, त्याची  प्रचीती दिली  हो तुमच्या  साहेबांनी, बारामतीकर!”, घारुअण्णा तिरमिरीत चावडीवर प्रवेश करत.

“ काय? आज कसला बार उडवताय घारुअण्णा?”, नारुतात्या.

“अहो,  ह्या बारामतीकरांच्या साहेबांनी  महाराष्ट्रात दारूचा महापूर आणून महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा घाट घातला आहे,  म्हणून म्हणालो घोर कलियुग”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

“कोण म्हणतंय असं ?”, इति नारुतात्या.

“मटातली बातमी वाचली नाही का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग  यांनी हे म्हटले आहे आणि ह्याचे सत्तापीठ बारामतीत आहे ह्याची चिंता व्यक्त केलीय.”, घारुअण्णा त्याच उद्विग्नतेत .

“काय? आज चक्क मटा ? अहो, संध्यानंद बंद होईल की हो अशाने? खी. खी.. खी…   ”, इति नारुतात्या.

“डोम्बल तुमचं नारुतात्या, अहो  एवढा सिरीयस विषय आणि तुम्ही दात काय काढताय?”, घारुअण्णा तणतणत.

“बरं…बरं! त्यांना म्हणावे जळजळ पोहोचली  बरं का, घारुअण्णा”, इति शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर, तुमच्या साहेबांचा ह्यात हात आहे. एवढा मोठा सामाजिक प्रश्न आणि तरीही तुम्ही साहेबांचीच बाजू कशी काय घेऊ शकता हो, ऑ? ”, घारुअण्णा अजून घुश्श्यात,  “एवढा शेतीचा जाणकार माणूस पण त्यानेच सर्व कॄषीक्षेत्राची वाताहत करावी यासारखे दुर्दैव नाही ह्या देशाचे. आता नसती अवदसा सुचली आणि दारूचे परवाने देत सुटले आहेत तुमचे साहेब.”

“अहो, ह्यात नेमका मुद्दा काय ते कळेल का? म्हणजे जर हे सत्तास्थान नागपुरात असते आणि एका ड्रायव्हरला एका कंपनीचा डिरेक्टर बनवून त्याला परवाने दिले तर आपला महाराष्ट्र, मद्यराष्ट्र बनता इथे रामराज्य अवतरले असते असे  म्हणायचे   आहे का तुम्हाला?”, बारामतीकर बरेचसे  उपरोधाने आणि किंचित रागाने.

“अहो  पण साहेबांचा ह्यात ‘हात’ कसा काय असेल? त्यांनी तर  हातातला ‘हात’ हळूच काढून त्यावर घड्याळ चढवले ना? खी. खी.. खी…”, नारुतात्या तेवढ्यातही आपली विनोदबुद्धी पाजळत.

“गपा हो नारुतात्या! अहो बारामतीकर, दारूने समाजाचे नुकसान होते, समाजविघातक आहे ही दारू आणि तिचा असा उदोउदो केला जावे जे काही पटत नाही!”, चिंतोपंत नागपूर विनाकारण चर्चेत आल्याने कळवळून जात.

“हा! असे म्हणा की मग काहीतरी मुद्दा घेउन, उगाच राजकीय चिखलफेक करण्यात काय  आहे?”, इति बारामतीकर.

“बरं बुवा! दारूने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलच, त्यामुळे दारू समाजविघातक आहे ह्यावर काय म्हणणे आहे तुमचे? ”, नारुतात्या सिरीयस होत.

“अहो नारुतात्या, कुठल्याही गोष्टीला तारतम्य असावे लागते की नाही,  दारूचेही तसेच आहे, तारतम्य न  पाळता दारू ढोसल्यास विनाश हा होणारच.  पण  त्यामुळे दारूवर सरसकट बंदी घालणे जरा आततायीपणाचे आणि मूर्खपणाचे लक्षण आहे, ह्यावर काय काय म्हणणे आहे तुमचे?”, बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका चर्चेत सामील होत.

“भले शाबास!  बहुजनह्रदयसम्राट, देशात जनतेला खायला अन्न नाहीयेय! त्यामुळे त्यांच्या  दोन वेळेच्या अन्नाची सोय  बघायची की दारुचा महापूर आणायचा? गरज कशाची आहे?”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

“अहो तसे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत देशात, नव्हे एकंदरीतच जगात, म्हणून काय बाकीचे सगळे सोडून द्यायचे का?”, भुजबळकाका शांतपणे.

“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, वाईनर्‍या बांधुन कितपत समाजकल्याण साधले जाणार आहे ?”, चिंतोपंत जरा तडकून.

“गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव, समाजकल्याण हे सर्व मुद्दे बरोबर आहेत पण त्यांचा दारु  बनविणे आणि न बनविणे किंवा त्यासाठी परवाने देणे ह्याच्याशी  थेट संबंध जोडणे म्हणजे जरा भावनिक किंवा सेन्टीमेन्टल होते आहे, व्यावहारिक नाही. व्यावहारिक पाताळीवरुनही विचार करून बघा जरा!”, भुजबळकाका ठामपणे .

“वा  रे व्यावहारिक, अहो संस्कृति नावाचा काही प्रकार आहे की नाही? आपल्या हिंदू संस्कृतीत हे बसते का?”, घारुअण्णा चिडून.

“कोणत्या संस्कृतीच्या गप्पा सांगता आहात तुम्ही घारुअण्णा? रामायण आणि महाभारतातही दारू प्राशन केल्याचे दाखले आहेत, तेही एक प्रथा म्हणून प्राशन केल्याचे.”, भुजबळकाका हिरीरेने, “आणि बहुजनांच्या  संस्कृतीचा तर तो आजही भाग आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये दारूचे स्थान मानाचे आहे.”

“अरें देवा! विश्वेश्वरा बघ रे बाबा तुच आता. धर्मच बुडवायाचा प्रयत्न आहे हा, म्हणून तर  घोर कलियुग आले आहे असे म्हणत होतो मी, ते काही खोटे नाही!”, घारुअण्णा हताश होत .

“डोंबलाचे कलीयुग! अहो लोकांनी, दारु कशी पिउ नये व कशी प्यावी, हे समजावून घेतले की झाले, त्याचीच गरज फक्त, बास्स!”, भुजबळकाका.

“अहो भुजबळकाका, हे  तर दारूचे उदात्तीकरण झाले असे नाही का  वाटत?”, चिंतोपंत.

“नाही चिंतोपंत, उदात्तीकरण नाही वाटत मला तरी!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.

“हो,  हे वाटणे  खूप सापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणजे तुम्ही नेमके कसे आणि काय बघता ह्यावर ते अवलंबून आहे.”, सोकाजीनाना मंद हसत, “म्हणजे असे बघा,  नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. अगदी प्रत्येक मानवनिर्मीत आणि नैसर्गिक गोष्टीला सुद्धा. आपण त्या गोष्टीकडे कुठल्या बाजूने बघतो, म्हणजे आपली सापेक्षता काय आहे ह्यावर, काय दिसणार हे अवलंबून आहे. आता बघा, सूर्यही नैसर्गिक गोष्ट आहे पण त्यालाही एक बोचरी आणि मानवासाठी हानिकारक बाजू आहे!”

“काय बोलताय काय सोकाजीनाना, हे काही पटत नाही ब्वा!”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.

“सूर्याच्या उष्णतेमुळे घाम येतो आणि घामामुळे शरीराला दुर्गंध येतो तसेच काताडीचा रंग काळा पडतो ही सूर्याची एक दुसरी बाजू आहे की नाही.  पण त्यामुळे आपण सूर्याला झाकून टाकण्याचा वेडेपणा करतो? तर नाही. त्यावर उपाय शोधतो. तसेच आहे, जे भुजबळकाका म्हणत आहेत ते. अहो  ज्यांना ती भावते ते पितात, ज्याला जी परवडते ती तो पितो. जे तारतम्य ठेवून पितात ते त्यातला आनंद लुटतात, ज्यांना त्यातली मर्यादा कळत नाही आणि पाळता येत नाही ते बहकले जातात आणि त्याचे दुष्परिणाम तेच भोगतात. त्यावर तुम्ही आम्ही कोण संस्कृतीरक्षक बनून पोलिसिंग करणारे? ज्याचे त्याला ठरवू देत की काय करायचे ते. राहीला मुद्दा ह्यातल्या राजकारणातला, तर तुमच्यात धमक आहे ते परवाना राजकारण थांबविण्याचे? मग उगा बोंबाबोंब कशाला?”

“अहो, त्या दारुताही काहीतरी मजा असेलच की, उगाच नाही तो गालिब म्हणून गेला ‘ला पिला दे साकियां, पैमाना पैमाने के बाद’. फार कशाला आपले केशवसुतही म्हणून गेलेत ‘काठोकांठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळूं द्या ! ‘ ” सोकाजीनाना मिश्कील हसत.

“अहो घारूअण्णा असे डोळे फाडून काय बघता आहात, मी काही ‘एकच प्याला’ मागवणार नाहीयेय आता, चहाच हवा ब्वा  आपल्याला!  चला तर आपला चहा मागवा कसें!”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

घारुअण्णांनी हसणे  आवरात  चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – बस डे

“काय घारुअण्णा, आज काय मग बसने, मंडईत वाहिनीना घेउन?”, चिंतोपंत एकदम थट्टेखोर हसत.

“अरे हो आज बस डे होता नाही का! आज काही बाहेर जायला झालेच नाही. त्यामुळे काय झाले ह्या बस डेचे काही कळलेच नाही”, नारुतात्या.

“अहो कसला डोंबलाचा बस डे अन काय, आमच्या हिला पण भारीच हौस.”, घारुअण्णा भयंकर त्राग्याने.

“काय झाले?”, इति नारुतात्या.

“अरे, चांगले म्हणत होतो की आपली स्कूटर घेउन जाऊ, पण नाही! नवरोबाचे ऐकेल ती बायको कसली.”, घारुअण्णा घुश्श्यात.

“अहो, काय झाले ते नेमके सांगाल का, का उगाच त्रागा करताय एवढा.”, इति नारुतात्या.

“शिंचा बस डे म्हणे! आपण सच्चे पुणेकर आहोत तर बस डे पाळलाच पाहिजे, असे म्हणून चक्क पीएमटीच्या बसने घेउन गेली मला मंडईत.”, घारुअण्णा तणतणत.

“अहो त्यात रागावण्यासारखे काय काय एवढे? बरोबरच म्हणाल्या की वाहिनी, त्यात त्यांचे काय चुकले ?”, इति भुजबळकाका.

“तरी म्हटलेच अजून बहुजानह्रदयसम्राट कसे नाही बोलले. अहो त्या मोडक्या पीएमटी बसने कधी प्रवास केला आहे का तुम्ही ?”, घारुअण्णा अजून घुश्श्यात,  “सगळी बस कराकरा वाजत होती, होर्न सोडून सगळ वाजत होते! त्यात पुन्हा शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटलेले, त्याने कुठे लागू नये, विजार फाटू नये त्यासाठी कसरत करावी लागली ती वेगळीच.”

“च्यामारी, परवा तर, छॅsss, आपल्या पुण्याची सगळी रया गेली, कसला हा ट्राफिक जॅम होतो आजकाल असे तुम्हीच कोकलत होतात ना!”, भुजबळकाका उपरोधाने.

“अहो बहुजानह्रदयसम्राट, प्रत्येक वेळी वाकड्यांतच शिरायला हवें का?”, घारुअण्णा लालेलाल होऊन.

“खरे आहे हो भुजबळकाका, घारुअण्णा म्हणताहेत ते, बसेसची अवस्था तशीच आहे पुण्यात, मुंबईच्या बेस्ट सारखी काही सेवा नाही पुण्यात.”, इति चिंतोपंत.

“त्या मुंबईकरांना नाही काही असले बस डे वैगरे पाळावे लागत. तिथे बस कशा चकाचक असतात.”, घारुअण्णा रागाने.

“अहो घारुअण्णा, तिकडे मुंबईत सगळे, प्रवास बस नाहीतर लोकलनेच करतात!”, नारुतात्या.

“नाहीतर काय, तुम्हाला तर बुडाखाली गाडी घेतल्याशिवाय बाहेर निघायला नको असते, मग त्या बसेसची सेवा चांगली असावी म्हणून प्रशासनावर दडपण आणणार कोण ?”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात उतरत.

“व्वा! ह्याला म्हणतात निष्ठा, ह्यांच्या सकाळ समुहाने आयोजित केला ना हा बस डे, मग तर हे त्याचे गुण गाणारच”, घारुअण्णा उपरोधाने.

“घारुअण्णा, तुम्ही उगाच माझ्या निष्ठेवर घसरू नका. तो विषय काढायचं काम नाही.”, शामराव बारामतीकर जरा तडकून.

“हो ना! घारुअण्णा, तुमचा नेमका राग कशावर आहे? वाहिनी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध बसने घेउन गेल्या म्हणून की सकाळ समुहाने बस डे आयोजित केला म्हणून खी…खी…खी..”, भुजबळकाकाही आता जरा थट्टेने .

“तुम्हाला नाही कळणार हो बहुजानह्रदयसम्राट. तुम्हाला समजूनच घ्यायचे नाहीयेय तर बोलून काय उपयोग?”, घारुअण्णा हताशपणे.

“पण सांगा की नीट समजावून मग, तुम्हाला काय म्हणायचे ते.”, भुजबळकाका जरा सिरीयस होत.

“अहो, मला सांगा, हे असले बस डे वैगरे साजरे करून काय साध्य होणार आहे? उद्यापासून येरे माझ्या मागल्याच ना! हे असले पालथे धंदे सांगितलेत कोणी.”, घारुअण्णा.

“ही तुमची टोकाची भूमिका आहे असे नाही तुम्हाला वाटत?”, भुजबळकाका.

“अरें देवा! ह्या भुजबळकाकांना माझे म्हणणे कधी पटणार हे तो विश्वेश्वरच जाणे.”, घारुअण्णा उद्वेगाने.

“घारुअण्णा, अगदी विश्वेश्वरापर्यंत जायची काही गरज नाहीयेय! मलाही तुमचे म्हणणे जरा टोकाचेच वाटत आहे.”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, सोकाजीनाना?”, घारुअण्णा जरा शांत होत.

“अहो आपल्या देशात इतके डे साजरे होतातच ना? त्यात अजून एक. बाकीचे ते सगळे डे जवळजवळ परदेशीच असतात. आपला हा बस डे तर खास स्वदेशी आहे की नाही?  तोही चक्क मराठमोळ्या पुण्यातला. त्याचा आपल्याला अभिनान असला पाहिजे आणि असे काहीतरी अभिनव करण्याची प्रथा पुणेकर कायम ठेवत आहे त्याचाही”, सोकाजीनाना मंद हसत.

“गमतीचा भाग सोडा. पण आज पुण्यात किती वाहने झाली आहेत बघा आणि त्यात पुन्हा हे वाहन  म्हणजे स्टेटस सिम्बॉल. अहो सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यात कसला आलाय कमीपणा. तिकडे जपानमध्ये एका कम्पनीचा सीइओ सुद्धा सब-वेने प्रवास करतो. रस्त्यावरची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिला पर्यायी विकल्प शोधायला नको का? त्यासाठी जनमानस तयार व्हायला हवे ना. हा सकाळ समुहाचा एक प्रयत्न, त्या दृष्टीने टाकलेले एक पहिले पाउल, म्हणून ह्याकडे सकारात्मक दृष्टीने बघूयात ना. हे जनमानस तयार झाले तर त्या जनमानसाच्या रेट्याने बससेवा सुधारित, चांगली आणि प्रवास करण्यायोग्य करण्यासाठी प्रशासनावर दबावही आणता येईलच की. करायच्या आधीच नुसते, हं, असल्याने काय होणार आहे, पालथे धंदे सगळे, असला निराशावाद आणि नकारात्मक भूमिका का घ्या?”

“काय झाले आहे की आजच्या जमान्यात कशाकडेही शंकास्पद नजरेने आणि नकारात्मक बघायची सवयच,  लागलीय आपल्याला. जरा मोकळ्या मनाने विचार करा. एका दिवसात किती इंधन वाचले आज, किती प्रदूषणही कमी झाले असेल? कितीतरी जणांना, किती कमी पैशात ऑफिसला जाता येते ते आज पहिल्यांदाच कळले असेल. कितीतरी जणांच्या शरीराला आज कधी नव्हे तो व्यायाम मिळाला असेल असेल, बसप्रवासात त्रास होउन. त्यातून समजा एखाद्याने जरी नेहमी सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास करायचे असे ठरवले तरीही हा बस डे साजरा करण्याच्या प्रयत्नाला यश आले असे म्हणता येईल ना!”

“मी तर म्हणतो की फळाची अपेक्षा कराच का? फक्त कर्म करूयात की. नुसताच अजून एक ‘डे’ साजरा झाला असे समजूयात. काय? तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

घारुअण्णांनी मान हालवत चहाची आणि हसत ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या.

“अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत.

“अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका.

“नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय?  खी खी खी…”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली.

“हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी! आमच्या सचिनचा असा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.”, घारुअण्णा तणतणत.

“च्यामारी, परवा तर, छॅsss, ह्या सचिनने आता रिटायर होण्यातच शहाणपणा आहे असे तुम्हीच म्हणत होतात ना!”, भुजबळकाका उपरोधाने.

“अहो बहुजनसम्राट, प्रत्येक वेळी वाकड्यांतच शिरायला हवें का?”, लालेलाल होऊन.

“ह्या क्रिकेटचा बट्ट्याबोळ झाला आहे! असे तुम्हीच म्हणता ना हो घारुअण्णा, म्हणून भुजबळकाका तसं म्हणत असतील!”, नारुतात्यांनी चर्चेत तोंड घातले.

“तुम्ही काय त्यांचे वकीलपात्र घेतलेंय का?”, घारुअण्णा घुश्शात.

“नाही पण खरे आहे घारुअण्णा म्हणतात ते. मॅथ्यु हेडनच्या पोटात का दुखतंय ते खरंच कळलं नाही”, चिंतोपंत.

“त्या हरभजनने बरीं खोड मोडली होती त्याची”, घारुअण्णा.

“अहो, पण तो तसं बोलला तर प्रॉब्लेम काय तुम्हाला?”, भुजबळकाकाही आता सीरियस होत.

“तुम्हाला नाही कळणार हो हा उद्वेग, विनोद कांबळी बद्दल जर असे काही झाले असते, तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटले असते, हो ना?”,  आता घारुअण्णा उपरोधाने.

“हे बघा, घारुअण्णा,  आता तुम्ही वाकड्यात शिरताय”,  भुजबळकाका काहीसे दुखावले जात.

“अहो, एका देशाने एका खेळाडूच्या कारकीर्दीची उत्स्फूर्तपणे घेतलेली दखल आहे ही, त्याच्या कारकीर्दीला दिलेला मानाचा मुजरा आहे हा आणि त्याचा आपल्याला अभिमान असायलाच हवा! म्हणून हेडनच्या ह्या वक्तव्याचा राग मलाही आला आहे, जसा घारुअण्णांना आला आहे.”, चिंतोपंत.

“कारकीर्द? मानाचा मुजरा? बरं बरं! मग जेव्हा दिलीप कुमारला ‘निशानं-ए-पाकिस्तान’ हा खिताब पाकिस्तानने दिला होता आणि त्याने तो स्वीकारला होता तेव्हा त्याला पाकिस्तानात हाकलून द्या असे तुम्हीच तावातावाने म्हणत होता ना हो घारुअण्णा”, भुजबळकाका.

“अरें देवा! ह्या भारतात, ह्या मुस्लिमांचे लांगूलचालन कधी बंद होणार आहे हे तो आकाशातला विश्वेश्वरच जाणे रे बाबा.”, घारुअण्णा उद्वेगाने.

“घारुअण्णा, तुमच्या अंगाशी आले की नेहमी त्या विश्वेश्वराला साकडें घालायची तुमची आयडिया भारीच आहे हा, खी… खी… खी… ”, नारुतात्या.

“अरे काय तुम्ही, कुठून कुठे ताणत आहात ह्या विषयाला”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“अहो सोकाजीनाना तुम्हीच सांगा, आता ह्यात घारुअण्णांचे काय चुकले?”, चिंतोपंत.

“त्याचं काय आहे चिंतोपंत, घारुअण्णांचे काय चुकले ते सोडा. हेडनचे काय चुकले ते सांगा. अहो, तो एक ऑस्ट्रेलियन आहे. त्यालाही ऑस्ट्रेलियन अस्मिता वगैरे असणारच, की नाही? त्यातही आपल्या सचिनने त्यांना त्राही भगवान कडून सोडले होतेच, त्याचीही ठसठस कुठेतरी असेलच ना. पण त्यामुळे तो जे काही बोलला ते चुकीचे कसे असेल? त्याच्या देशाचा एक सर्वोच्च बहुमान एका परकीयाला देण्यास त्याचा विरोध असेल तर त्यात त्याचे काय चुकले? काय घारुअण्णा आणि चिंतोपंत, मी नेमकं काय म्हणतोय ते ध्यानात येतंय का?”,

“त्याच्याही देशात लोकशाही आहेच की. त्या लोकशाही अंतर्गत त्या लोकशाहीने त्यालाही व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केलेले आहेच. त्यामुळे त्याने जे वक्तव्य केले ते करण्याचा त्याला हक्क आहेच. आणि तो जे म्हणाला ती त्याचा वैयक्तिक मताची पिंक होती. त्याला ना ऑस्ट्रेलियन सरकारने भीक घातली ना आपल्या सचिनने.”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्या हेडनला एवढा सारासार विचार करण्याची शक्ती असती असती तर एक चेंडू धोपटत बसण्याचा खेळ खेळण्यापेक्षा, आपल्या चावडीवरचा, तुमच्यासारखा विचारवंत नसता का झाला? काय पटतंय का? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

चिंतोपंतांनी मान हालवत चहाची ऑर्डर दिली.

चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय झाले आता?”, कोणीतरी.

“अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा.

“काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर.

“बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर.

“मग काय! आता भगवा आणि निळा युती आहे म्हटलें!”, घारुअण्णा उपरोधाने.

“हे बघा, ही सरळ गोष्ट आहे, उगाच कीस पाडू नका! मी आधीही म्हटलेच होते मंत्रालयाला आग लागली तेव्हा की ती काही साधीसुधी आग नव्हती.”, भुजबळकाका काहीसे आक्रमक होत.

“फरक आहे ना, तुम्ही चावडीवर बरळला होतात, पण आता आमचा उद्धव तेच जाहीरपणे बोलतोय, खी खी खी”, घारुअण्णा टिपीकल चिपळुणी अंदाजात, “पण जे काही बोलतोय ते खरेंच आहे हों! हे अजित’दादा’ आता उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ‘राजीनामा आपण फेकला, आता होऊन जाऊ द्या चौकशी’ असा आव आणत मिशीला तूप लावून फिरत आहेंत.”

“तेच तर, मंत्रालयाच्या आगीत घोटाळ्यांची कागदपत्रे जाळून राख केली, त्यामुळेच तर त्यांच्यात हे एवढे धाडस, हिंमत आलीय, त्याचा मंत्रालयातील आगीशी संबंध खचितच असणार”, भुजबळकाका.

“ते ठीकच आहे हो! पण पुढे दादा आणि ताईंना राज्य आणि केंद्र आंदण दिले आहे का? असला फालतू सवाल करण्याची काय गरज होती?”, शामराव बारामतीकर.

“तो फालतू सवाल कसा काय हों?”, घारुअण्णा.

“का हो! मग आम्हीही विचारू शकतो, मागे जेव्हा तुम्हाला सत्ता बहाल केली होती तेव्हा का मग सगळे राज्य आंदण मिळाल्यासारखे वागत होतात? झुणका भाकर केंद्रांच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या त्याचे पुढे काय झाले?”, शामराव बारामतीकर अजिबात विचलित न होता.

“अहो बारामतीकर, विषय सिंचन घोटाळ्याचा चालला आहे!”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, तुमच्या वर्मावर बोट ठेवले की कसे लागते ना लगेच तुम्हाला. तरी मी अजून बाकीच्या गोष्टी बोललोच नाहीयेय अजून.”, शामराव बारामतीकर.

“बारामतीकर हा राजीनामा त्यांनी दिलेला नाहीयेय. काकांनी त्यांना द्यायला लावलाय. त्यांना सुप्रियाताईंसाठी ‘गादी’ तयार करायची आहे ना! लोकशाही अंतर्गत असलेली घराणेशाहीच आहे ही कॉग्रेसची. खी…खी…खी….”, भुजबळकका.

“घराणेशाही ही काय फक्त काँग्रेसमध्येच आहे? काय हो घारुअण्णा बोलू का?”, शामराव बारामतीकर.

“हे बघा उगाच राळ उडवायचा प्रयत्न करू नका, तमाम शिवसैनिकांचीच ती इच्छा होती.”, चिंतोपंत.

“बरोबर आहे, फक्त तमाम शिवसैनिकांचीच होती ती इच्छा, एका सेनापतीची सोडून. पण काय हो ह्या असल्या इच्छा काय फक्त सैनिकांनाच असतात काय हो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय इच्छा नसतात काय हो?”, शामराव बारामतीकर.

“अरे तुम्ही सगळे कुठून कुठे वाहवत चालला आहात?”, इतका वेळ निमूट बसलेले नारुतात्या.

“बोला, बोला सोकाजीनाना तुम्हीच सांगा आता ह्यां सगळ्यांना!”, नारुतात्या.

“उद्धवचे कार्य साध्य झाले. त्याला जे साधायचे ते त्याने मेळाव्यात जाहीर प्रकटन करून साध्य केलेच. त्याला मतदार राजाला नेमके असेच जागे करायचे होते. ते झाले!”, मंद हसत सोकाजीनाना, “अरे, हे सगळे जवळ येत चाललेल्या निवडणुकांचे पडघम आहेत. विरोधकांकिषयी रान उठवण्याची रंगीत तालीम आहे ही. मतदार राजा जागा हो!”

“अहो पण मतदार राजाने जागे होऊन करायचे काय? सगळेच साले चोर लेकाचे. मतदान करायचे तरी कोणाला. त्यातल्या त्यात कमी चोराला निवडून दिले की पाच वर्षांत तो एक मोठा दरवडेखोरच बनून जातो”, चिंतोपंत त्यांची खंत व्यक्त करत.

“त्याचे काय आहे चिंतोपंत, गंगाजल सिनेमात अजय देवगण म्हणतो, ‘समाज को सरकार और पुलीस वैसीही मिलती है जैसा समाज खुद होता है’ ते अगदी खरे आहे. तुम्ही ही जी आहे ती परिस्थिती बदलवू शकता का? आमूलाग्र बदल कोणीतरी घडवून आणण्यापेक्षा तो स्वतः घडवण्याची पात्रता किंवा धाडस आहे का तुमच्यात? नुसत्या चर्चा झोडून उसासे सोडण्यापेक्षा ह्या सिस्टिमला पर्यायी सिस्टिम शोधण्याची आणि बनविण्याची तयारी आहे का तुमची? नसेल तर मग जे आहे त्यातले चांगले ते वेचून वाईट सोडून द्यायची तयारी ठेवा आणि जर असेल तर एक आंदोलन करायची तयारी करा!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“सोडा हो ह्या बातां आणि चहा मागवा”, सोकाजीनाना.

चिंतोपंतांनी मान हालवत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – रिटेल बाजार आणि FDI

“हद्द झाली ह्या शिंच्या काँग्रेसची, आता तर काय भारत विकायलाच काढला आहें.”, घारुअण्णा तणतण करीत कट्ट्यावर हजेरी लावत.

“तरी म्हटलेच! अजून असे काय कोणी सरकारी निर्णयावर न घसरता पक्षावर तोंडसुख घेतले नाही”, शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर, तो तुमच्या पक्षाचा चष्मा काढा आणि उघड्या डोळ्यांनी बघा जरा”, घारुअण्णा जरा चिडून.

“अहो घारुअण्णा तुम्ही नेमक्या कोणत्या काँग्रेसबद्दल बोलताय? त्याचं काय आहे, आपल्या शामरावांच्या काँग्रेसची ‘आय’ वेगळी आहे हो, खी खी खी”, इति भुजबळकाका.

“डोंबल तुमचं, अहो वेळ काय, विषय काय आणि तुम्ही पांचटपणा असला करताय”, घारुअण्णा घुश्शातच पुढे म्हणाले, “अहो, रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊन ह्या मनमोहन सिंगाने देश आंदणच दिला की हो परकीय कंपन्यांना, ईस्ट इंडिया कंपनीही अशीच भारतात आली होती”.

“घ्या, कळसुत्री बाहुला! कळसुत्री बाहुला! म्हणून त्यांचे हसे उडवायला तुम्हीच पुढे होतात ना घारुअण्णा? आता चक्क त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी काही ठाम निर्णय घेतला तर त्यावरही तोंडसुख घ्यायला, विरोध करायला तुम्हीच पुढे. हे डबलस्टॅंडर्ड झाले.”, शामराव बारामतीकर.

“ढोल बाजेsss, ढोल बाजेsss, ढोल बाजे ढोल, ढमढम बाजे ढोsssल”, भुजबळकाका जोरात गुणगुणत.

“भुजबळकाका शांत व्हा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात देशाच्या नाड्या देणेच झाले हे म्हणजे”, चिंतोपंतांनी चर्चेत तोंड घातले.

“चिंपोपंत, तुमचे सरकार होते तेव्हा का नाही हो हाकलवल्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या? तेव्हा तुमच्या सरकारचाही रिटेल बाजारात ह्या गुंतवणुकीचा अजेंडा होताच ना!”, शामराव बारामतीकर.

“ढोल बाजेsss, ढोल बाजेsss, ढोल बाजे ढोल, ढमढम बाजे ढोsssल”, भुजबळकाका पुन्हा गुणगुणणे सुरू करत.

“तेव्हाही आमचं म्हणणे, Computer Chips, YES! Potato Chips, NO!! असेच होते. रिटेल मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या घुसल्या तर शेतीमालावर त्यांचे वर्चस्व होईल आणि मग सर्व नाड्या त्यांच्या हातात जातील. शेतकरी अधिक पिचला जाईल आणि भांडवलशाहीला बळी पडेल तो”, चिंतोपंत.

“बरं, बरं! तुमची खरी काळजी ही त्या शेतकर्‍यांची की त्या शेतीमालाच्या नाड्या सध्या हातात असलेल्या शेठजींची हो?”, शामराव बारामतीकर.

“चिंतोपंत , तुम्ही कधीपासून भांडवलशाहीविरोधी झालात. तुमच्या पक्षाने आताही हा जो काही विरोध दर्शवला आहे तो भांडवलशाहीला नाहीच आहे मुळी. जे काही वर्चस्व आणि नाड्या ह्या व्यापारी शेठजींच्या हातात आहेत त्याला उद्भवणार्‍या धोक्याची जाणीव होऊनच हा कळवळा आला आहे.”, भुजबळकाका गुणगुणणे थांबवून.

“अहो भुजबळकाका, कशाचा संदर्भ कुठे लावताय?”, घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, जरा थांबा तुम्ही. इथे बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे येणारी निकोप स्पर्धाच नको आहे. स्पर्धा वाढली की वर्चस्व संपले, दलाली संपली. हीच खरी गोम आहे.”, शामराव बारामतीकर.

“खरं आहे! कृषिक्षेत्राच्या दृष्टीने हा निर्णय चांगलाच असणार आहे. सध्या शेतीमालाच्या उत्पादनानंतर तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत 65-100% जास्त झालेली असते, हे सर्व होते त्यानंतरच्या दलालीमुळे. त्याचे पर्यवसान होते महागाई वाढण्यात.”, भुजबळकका.

“त्यामुळे, शेतकर्‍यांचे नुकसान होणार, एतद्देशीय व्यापारी बुडणार, देश विकला जाणार असे गळे काढत ह्या निर्णयाला विरोध करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.”, शामराव बारामतीकर.

“अहो सोकाजीनाना कसला विचार करताय, लक्ष कुठे आहे तुमचे?”, चिंतोपंत.

“ह्म्म्म.., काही नाही ऐकतो आहे तुमचे सगळ्यांचे, पण एक वेगळाच विचार घोळतो आहे मनात”, सोकाजीनाना.

“आता कसला विचार घोळवताय मनात”, इतका वेळ निमूट बसलेले नारुतात्या.

“हा जो काही सावळा गोंधळ चालला आहे सध्या त्याला राजकारणाचा कुबट वास येतोय. सध्या आर्थिक विकासाला बसलेली खीळ पाहता, GDP ला आलेली मरगळ पाहता, त्या दृष्टीने आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी घेतलेला एक आर्थिक निर्णय म्हणून ह्याकडे का नाही बघू शकत आपण. तो निर्णय एका पंतप्रधानाने घेतलेला आहे, जो एक नुसताच राजकारणी नसून एक निष्णात अर्थकारणीही आहे.”, सोकाजीनाना.

“कॉम्प्युटरयुगाची सुरुवात भारतात होतानाही असाच गोंधळ झाला होता. आर्थिक उदारीकरणाचा, खुल्या आर्थिक धोरणांचा निर्णय घेताना केला गेलेला गोंधळही असाच अभूतपूर्व होता. काय झाले? आज त्याची चांगलीच फळे दिसताहेत ना?”

“अरे, आपण भारतीय स्वतःला प्रयोगशील म्हणवतो ना? मग हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त काय होईल? हा निर्णय योग्य ठरला नाही तर आर्थिक नुकसानच होईल ना? परकीय आपला पैसा लुटून नेतील एवढेच ना? सध्याचे, आपल्याच स्वदेशी बांधवांनी केलेल्या घोटाळ्यांचे आणि लुटीचे उजेडात येणारे आकडे लक्षात आहेत की विसरलात एवढ्यात? तेवढ्या आकड्यांचे नुकसान व्हायच्या आत तो निर्णय परत फिरवता येऊही शकेल ना! एनरॉन प्रकल्प तिथल्या मशीनरीला गंज चढून बंद पडलाच ना?”

“काही करायच्या आधीच नुसते वाईटच होणार हा असला निराशावाद का धरावा? कृती करूयात आणि त्यानंतर होणार्‍या परिणामांची जबाबदारी स्वीकारूयात. चांगले झाले तर मस्तच. पण वाईट होईल असेही गृहीत धरून त्याच्यासाठी ‘बॅक अप’ प्लान करूयात ना म्हणजे प्लान बी. तो प्लान बी सद्य सरकारने नसेल केला तर तो तसा करावा म्हणून सरकारवर दबाव आणूयात. पण कृती करायचीच नाही म्हणून कसले बंद पाळायचे.”

“बघा बुवा! ‘क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे’ असलं काही बाही मनात येत होतं. हे पटतंय का तुम्हाला? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच मान हालवत चहाची ऑर्डर देण्यास अनुमती दर्शवली.

चावडीवरच्या गप्पा – प्रमोशन आणि आरक्षण

“चिंतोपंत खरे नशिबवान आहात तुम्ही”, नारुतात्या चावडीवर हजेरी लावत.

“काय झाले?”, चिंतोपंत बुचकाळ्यात पडत.

“अहो काय झाले काय? रिटायर झालात तुम्ही! आमची अजुन आठ वर्षे जायची आहेत. आता काही नशिबात सिनीयर डिव्हीजनल ऑफीसरची पोस्ट नाही. प्रमोशन घेऊन रिटायर होणे हे आता स्वप्नच रहाणार असे दिसतेय”, नारुतात्या हताश स्वरात.

“कशाला जीव जाळताय एवढा, व्ही.आर.एस. घेऊन टाका”, शामराव बारामतीकर

“त्याने काय होणार आहे शामराव, नोकरीरुपी म्हातारी मरेल पण काळ सोकावतोय त्याचे काय?”, नारुतात्या.

“अरे पण झाले काय ते सांगाल का?”, घारुअण्णा काहीच न कळल्यामुळे बुचकळ्यात पडून.

“घ्या! म्हणजे तुम्हाला अजुन समजलेलं दिसत नाहीये. अहो, आता म्हणे सरकारी नोकरीतल्या बढतीमध्ये आरक्षण आणतय सरकार”, शामराव बारामतीकर.

“शिरा पडली त्या सरकारच्या…. अरे हे काय चालवलेय काय? हे म्हणजे आता ह्या सरकारी ब्राह्मणांना सरकारी यज्ञोपवित घालण्यासारखेच आहे. हे विश्वेश्वरा बघतो आहेस का रे? काय चाललेय हे”, घारुअण्णा रागाने तांबडे होत.

“घारुअण्णा, जरा जपून, चिडला आहात, ठीक आहे, पण हे असे तोल जाऊन बरळणे चांगले नाही”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनहृदयसम्राट, ज्याचे जळते ना त्यालाच कळते”, घारूअण्णा आवेगात.

“देवळात लांबच्या लांब रांग लावून कधी उभे राहिले आहात का, दहा-दहा तास्स? त्यावेळी एखादा सरकारी व्हिआयपी येऊन मध्येच आरामात दर्शन घेऊन जातो किंवा एखादा पुजार्‍याला अभिषेकासाठी पैसे देऊन विनासायास दर्शन मिळवतो त्यावेळी तुमची चिडचीड कधी झाली नाहीयेय का? त्यावेळी तुमची जी चरफड होते, तस्सेच आहे हे अगदी”, चिंतोपंत.

“फरक आहे!” भुजबळकाका प्रत्येक शब्दावर जोर देऊन.

“चिंतोपंत, तुम्ही महत्वाचा मुद्दा विसरताय ह्या दोन्ही केसमध्ये! खरा फायदा हा त्या पुजार्‍याचा झालेला असतो. आणि विषेश म्हणजे त्या फायद्यासाठी त्यांनीच ते आरक्षण घडवून आणलेले असते. त्यामुळे त्यावेळी जी चरफड होते ना ती ह्या जाणीवेमुळे होते. आता मला सांगा, ह्या मुद्याने तुमची चिडचीड कधी झालीयेय का? माझी खात्री आहे झालेली नसणारच”, अंगठा आणि तर्जनी उडवून पैशाची खूण करत, पुजारी आणि आरक्षण शब्दांवर जोर देत भुजबळकाका.

“भुजबळकाका तुमचा मुद्दा मान्य, पण ह्या असल्या प्रकाराने गुणवत्तेचे काय? ती डावलली नाही का जाणार?”, नारुतात्या.

“म्हणजे बहुजनांमध्ये गुणवत्ता नसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?”, भुजबळकाकाही जरा आवेगात.

“एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचेय, आहे ना गुणवत्ता! मग कशाला हव्यात ह्या असल्या कुबड्या?”, नारुतात्या.

“अरे, अजुनही ही उच नीचता एवढी आहे की नोकरीमध्ये योग्यता असूनही बढतीच्या संधी मिळत नाहीत जातीच्या राजकारणामुळे. चक्क एका आय.ए.एस. अधिकार्‍याला मिळणार्‍या उच्चवर्णिय कनिष्ठ श्रेणी कामगाराकडून मिळणार्‍या वागणुकीचा किस्सा सत्यमेव जयतेमुळे कळला नं तुम्हाला. हे आहे हे असे आहे! दोन्हीकडच्या बाजूंचा विचार व्हायला हवा.”, भुजबळकाका.

“म्हणजें नेमका कसां?”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, मगाशी मी जे म्हणालो त्याचे उत्तर द्या ना आधि म्हणजे मग नेमका कसां ते सांगतो. देवळातले आरक्षण चालते का तुम्हाला?”, भुजबळकाका ठामपणे.

“हे म्हंजे कै च्या कै झाले हा तुमचे बहुनजसम्राट!”, घारुअण्णा घुश्शात.

“बरं! आम्ही देवळाच्या प्रश्नात घुसलो की लगेच तुम्हाला आलेला राग तो खरा, पण तुम्ही काहीही वक्तव्य केले आणि आम्हाला राग आला तर ते कै च्या कै. हा खासा न्याय आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“अहो पण मुद्दा गुणवत्तेचा आहे भुजबळकाका”, शामराव बारामतीकर.

“मीही तेच म्हणतोय, मुद्दा गुणवत्तेचाही आहेच! पण गुणवत्ता ही एका वर्गाची मक्तेदारी कशी काय?”, भुजबळकाका.

“अहो सोकाजीनाना, नुसतेच हसताहात काय? बोला ना काहीतरी?”, चिंतोपंत, मिष्कील हसत असलेल्या सोकाजीनानांना.

“आज आपण काय ठरवायला भेटणार होतो”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आपल्या वर्षाविहाराचा प्रोग्राम ठरवायला, त्याचे इथे काय?”, बुचकाळ्यात पडत चिंतोपंत.

“अहो, तीच तर गंमत आहे ना. आपापल्या घरी जायची वेळ झाली आणि आपण आपला प्रोग्राम ठरविण्याच्या मुद्याला स्पर्शही केलेला नाही”, सोकाजीनाना.

“पण त्याचे काय?”, नारुतात्या, आता बुचकळ्यात पडायची पाळी त्यांची होती.

“सरकारही नेमके हेच करते आहे. मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांपासून जनतेला दूर करायचे असले की असले काहीतरी पिल्लू द्यायचे सोडून. मग बसते जनता असली अफूची गोळी चघळत आणि त्याच तारेत. ह्यात मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांमुळे अडचणीत येण्याच्या शक्यतेवर धुरळा बसतो. झाले! सरकारला नेमके हेच हवे असते. गेली साठ – पासष्ठ वर्षे हेच चालले आहे आणि अजुनही आपण त्यातुन शहाणे व्ह्यायला तयार नाही. कोळसा प्रकरण अंगाशी येतेय असे दिसताच हे आरक्षणाचे पिल्लू दिले सोडून. बसा आता चघळत हा विषय. तर भुजबळकाका, आहे हे अस्से आहे अगदी”, मिष्कील हसत सोकाजीनाना.

“काय पटतय का? पटलं असेल तर चहा मागवा आणि वर्षाविहाराचा प्रोग्राम ठरवायला घ्या आणि त्या प्रवासातल्या बसमधे भुजबळकाकांची सीट आधि आरक्षित करा”, मोठ्ठ्याने हसत सोकाजीनाना.

नारुतात्यांनी हसणे आवरत चहाची ऑर्डर दिली.

चावडीवरच्या गप्पा – असुरक्षित भारत

“आता भारत अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, पुण्यात बॉम्बस्फोट… चक्क पुण्यात!”, चिंतोपंत, उत्तर भारत सहलीमुळे बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय म्हणता! बॉम्बस्फोट तर डेक्कनजवळ झाला, सदाशिवपेठेत नाही, खी खी खी”, भुजबळकाका.

“कळतात हो टोमणे कळतात, पण ही वेळ टोमणे मारायची नाहीयेय, भारत खरंच सुरक्षित राहिलेला नाहीयेय”, चिंतोपंत जरा चिडून.

“तुम्हाला काय चिंता चिंतोपंत, सगळ्या जगात तुमचा गोतावळा पसरला आहे, जा की तिकडें”, इति घारुअण्णा.

“हो ना, काय हो चिंतोपंत जाणार होतात ना, काय झाले?”, शामराव बारामतीकरांनी घारुअण्णांची री ओढली.

“ह्म्म्म, अमेरिकेत जाणार होतो थोरल्याकडे पण त्यावेळी नेमका त्या ओसामाने घोळ घातला”, चिंतोपंत.

“त्याला झाली की आता बराच काळ, आता जां!”, सानुनासिक उपरोधात घारुअण्णा.

“आताही तिकडे बोंबच आहे, गोळीबार करत फिरत आहेत तिथे माथेफिरु”, चिंतोपंत.

“मग तुमच्या धाकट्याकडे का नाही जात, तिकडे इंग्लंडात?””, नारुतात्यांनी चर्चेत तोंड घातले.

“तिथेही जाणार होतो, पण तेव्हा तिकडेही बॉम्बस्फोट झाला. आता तर काय काळ्या लोकांना प्रोब्लेम आहे म्हणे तिथे, रेसिस्ट लेकाचे”, चिंतोपंत.

“बर मग मधल्याकडे जा, ऑस्ट्रेलियात”, शामराव बारामतीकर.

“अजिबात नको! तिकडे तर सरळ भोसका भोसकी चालू आहे म्हणे, त्यापेक्षा तुम्ही जपानला का नाही जात तुमच्या भावाकडे”, घारुअण्णां

“जाणार होतो, पण भाउ म्हणाला की तोच परत यायचा विचार करतोय, तिथे अणुभट्टीचा धोका अजुनही आहे म्हणे”, चिंतोपंत.

“मग त्यात काय एवढे, लेकीकडे जा ना, जावई आखातात असतात ना तुमचे”, नारुतात्या.

“नाही हो! तिथे देवाधर्माचे काही नाही करता येत, आपला धर्म कसा काय बुडवू”, चिंतोपंत.

“हां! हे मात्र खरें हों तुमचें”, घारुअण्णा हात जोडून आकाशाकडे बघत.

“अहो सोकाजीनाना कसला विचार करताय, लक्ष कुठे आहे तुमचे?”, शामराव बारामतीकर.

“ह्म्म्म.., काही नाही ऐकतो आहे तुमचे सगळ्यांचे”, सोकाजीनाना.

“मग तुमचे काय मत? काय करावे चिंतोपंतांनी?”, नारुतात्या.

“अहो त्यांचे म्हणणे नीट ऐकले का? ही असुरक्षितता सगळीकडेच आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि ह्या वेगवान युगात वेगवेगळ्या प्रकारची असुरक्षितता सगळ्याच देशांना भेडसावत आहे. त्यामुळे भारतच असुरक्षित आहे वगैरे म्हणून भारत सोडून जाण्यात काय अर्थ आहे? हा आपला देश आहे आणि त्याला सुरक्षित ठेवण्याचे आपले कर्तव्यच आहे. देश सोडून जाऊन काय हशील होणार आहे. आपल्या घराची आपण काळजी घेतो की नाही? की एरियात चोर्‍या होऊ लागल्या म्हणून आपण घर सोडून जातो? चिंतोपंत, ह्या, भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्यांच्या, भारताविषयीच्या येणार्‍या फुकाच्या कळवळ्याने काळजीग्रस्त व्हायचे सोडा, त्याला उंटावरून शेळ्या हाकणे असं म्हणतात. ‘कसे होणार’ ह्याची चिंता सोडा, ‘काय करावे’, भारत, आपला देश, कसा सुरक्षित करवा ह्याची चिंता करा!”, सोकाजीनाना.

“काय पटतयं का? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना मिष्कील हसत.

चिंतोपंतांनी मान हलवत चहाची ऑर्डर दिली.

चावडीवरच्या गप्पा – साहित्य संमेलने आणि सरकार

“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे पुन्हा विचारायची वेळ आली आहे”, घारूअण्णांनी तणतणत चावडीवर हजेरी लावली.

“ऑ?”, नारुतात्या.

“अहो, सरकार संवेदनाशून्य झाले आहे. समाजाची सांस्कृतिक जडणघडण नावाची काही चीज आहे की नाही? साहित्यिकांची कदर राहीलेली नाही”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा लालेलाल झाला होता.

“अहो काय झाले ते सांगाल का? का उगाच सकाळी सकाळी घशाच्या शिरा ताणताय!”, इति नारुतात्या.

“अहो साहित्य संमेलनाविषयी काही जिव्हाळा नाही ह्या सरकारला. साहित्य संमेलनं म्हणजे मराठी भाषेची शान. त्याला अनुदान देणे कर्तव्य आहे सरकारचे, नव्हे, तो साहित्यविश्वाचा हक्कच आहे ”, घारुअण्णा.

“कुठली मराठी म्हणायची ही? बहुजनांची की पुण्या-मुंबैतली?”, इती कट्ट्याचे बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“आवराsss ‘काका मला वाचवा’ ह्याऐवजी ‘ह्या काकांना वाचवा’, असे म्हणायची वेळ आली आहे, अहो भुजबळकाका प्रत्येकवेळी असा उपरोध बरा नव्हें ”, घारुअण्णा वैतागून.

“तुमचे हे साहित्य संमेलन सर्वसमावेशक असते काय? बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करते काय? साहित्य हा समाजमनाचा आरसा असायला हवा, तसे ते असते काय? उगा सरकारला दोष देऊ नका”, भुजबळाकाका आवेशात.

“नाहीतर काय, म्हणे सरकारने साहित्य संमेलनाचा सगळा खर्च उचलावा, अरे सरकारला दुसरे काही काम नाही का?”, शामराव बारामतीकर, सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या साहेबांच्या पक्षाशी निष्टा राखत.

“आम्ही टॅक्स काय ह्यासाठी भरतो?”, नारुतात्या.

“नाहीतर काय?”, शामराव बारामतीकर.

“अहो ह्या सरकारने, राजकारण्यांनी सगळा टॅक्सरुपी पैसा भ्रष्टाचार करून आपल्या घशात घातलेला चालतो तुम्हाला, पण जरा काही समाजोपयोगी काम करायचे म्हटले की त्रागा सुरु”, घारुअण्णांचा राग अजुनही घुमसत होता.

“हे बघा उगा आरोप करू नका. सगळे राजकारणी आणि पक्ष तसे नसतात.”, शामराव बारामतीकरांची निष्ठा.

“तर तर, उजेडच पाडला आहे ना तुमच्या साहेबांनी. जिथे जिथे चरायला कुरण आहे तिथे तिथे साहेब हजर! पण समाजासाठी, साहित्यासाठी काही करायचे म्हटले की लगेच जातीचे राजकारण करायला तयार, त्यासाठी आहेतच हे आपले बहुनजकैवारी, भुजबळकाका”, घारुअण्णा आता पेटले.

“उगाच काहीही बरळू नका, अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा कोठे गेले होते हे तुमचे समाजाभिमुख साहित्यिक? भ्रष्टाचार होतो आहे तर त्या विरोधात किती साहित्यिक आंदोलन करायला रस्त्यावर उतरले, समाजासाठी?”, भुजबळकाका.

“खरंय घारुअण्णा! साहित्यिक, साहित्य संमेलनं आणि समाज ह्यांची गल्लत करत आहात तुम्ही”, सोकाजीनाना.

“काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो हे लोकशाहीतले सरकार आहे, ते काही अकबर बादशहाचा दरबार नाही, साहित्यिक पदरी बाळगायला!”, सोकाजीनाना, मिष्कील हसत.

“हे काय आता नविनच”, सगळेच एकदम बुचकळ्यात पडून.

“ही साहित्य संमेलने कोट्यावधी मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करतात असे समजले तर त्यांचा अध्यक्ष ठरवते कोण? त्यासाठी मराठी समाज, जनता जबाबदार नको? तीन-चारशे लोकं ह्या संमेलनाचा अध्यक्ष ठरवणार. त्यातही त्यांचे रुसवे फुगवे, कंपुबाजी. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा असेल वाद तिथेही सुटलेले नाहीत. बरें, झाला अध्यक्ष आणि झाले संमेलन त्याने साध्य काय होते? ह्या साहित्यिकांना साहित्याची सेवा करताना मेवा मिळायलाच हवा, लोकशाही आहे ना शेवटी इथे. पण ह्या साहित्यिकांनी कधी वाचनालये दत्तक घेतल्याचे किंवा त्यांना अनुदान दिल्याचे, पुस्तके दिल्याचे, एकरकमी मदत केल्याचे ऐकले आहे का कोणी? उगा प्रत्येकवेळी आपला हात सरकारपुढे करून आपलीच किंमत अशी कमी करून घेण्यात काही अर्थ नाही. तशीही मराठी जिवंत रहायला ह्यांच्या संमेलनांची गरज आहे, असेही नाही. मराठी भाषेत जर मुळात दम असेल तर ती शतकानुशतके टिकून राहिलच!”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आणि काय हो घारूअण्णा, कधी उभ्या आयुष्यात तुम्ही कोणते साहित्य वाचले आहे काय? तुमचा ‘संध्यानंद’ सोडून. तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा.”

घारुअण्णांची कशी जिरली ह्या आनंदात भुजबळकाकांनी लगेच चहा मागवला.