झुंड

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही ‘स्टोरी टेलींग’ नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

सिनेमाची लांबी खूप आहे, त्यात असलेल्या पात्रांच्या संख्येमुळे तसं असणं साहजिक असेल असं वाटलं होतं. पण, सिनेमात प्रत्येक पात्राची बैठक ठसवण्याचा प्रयत्न अपुरा पडला आहे. डॉक्युमेंट्री पद्धतीने पात्रांची ओळख करून देण्याचा वेगळाच प्रयत्न केला आहे. तो मनाला भिडतो पण काळजाचा ठाव घेत नाही. अंकुशची मुख्य व्यक्तिरेखा बऱ्यापैकी आकार घेत साकार होते पण त्याप्रमाणे बाकीच्या व्यक्तिरेखा आकार न घेता साकार होत राहतात. कलाकारांच्या भाऊगर्दीत पटकथा रेंगाळत राहते आणि बऱ्याच वेळा संथ होते. पात्रांची संख्या मर्यादित ठेवूनही झोपडपट्टीतल्या आयुष्याची विदारकता परिणामकारक करता येऊ शकली असती पण ह्यावेळी काहीतरी गडबड झाली आहे. पटकथा विस्कळीत झाली आहे. सगळी उपकथानकं एकसंध, घट्ट आणि ठाशीव न वाटता तुकड्या-तुकड्याने जोडल्यासारखी येत राहतात.

स्पॉयलर अलर्ट:
(विसा नसलेला, नुसता नवाकोरा पासपोर्ट घेऊन परदेश प्रवासासाठी बोर्डिंग पास कसा देता येईल? इतका महत्त्वाचा तपशील पटकथेला ठिसूळ बनवतो.)

अजय-अतुल यांचं संगीत ठीक आहे. फार काही स्कोप नाहीयेय पण आंबेडकर जयंतीचे गाणे झिंगाटच्या सावलीत असल्यासारखे झाले आहे.

सिनेमात दखल घेण्यासारखं काय असेल तर ते म्हणजे हा सिनेमा भारतीय सिमेनातले प्रस्थापित स्टीरिओटाइप्स मोडतो. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीचं सेलीब्रेशन, त्यासाठीची वर्गणी वसुली आणि ‘जय भीम’ कथानकात ठळक आणि ठाशीव रूपात येतात. अमिताभने अतिशय लो प्रोफाइल आणि टोन्ड डाउन होऊन व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटभर अमिताभ नागपूरमधला एक सामान्य शिक्षकच वाटतो, फक्त कोर्टातल्या सीनमध्ये त्याच्यातला ‘अमिताभ’ बाहेर आला आहे. सर्व कलाकार जीव तोडून काम करतात. अर्थात तसे कलाकार शोधून त्यांच्याकडून काम करून घेणं ह्या नागराजचा हातखंडा आहे. त्याच्या टीममधले सगळे जुने कलाकार ह्या सिनेमातही आहेत आणि आपापली कामं चोख करतात.

देशभरातला निम्न स्तरावरचा समाज, त्या समाजाचं विस्थापित असणं, उच्च स्तरावर त्या समाजाच्या अस्तित्वाची दखलही नसणं आणि जर ती दखल घेणं भाग पडलं तर अवहेलना करणं, हे आजच्या काळातही कसं चालू आहे ह्यावर संवेदनशीलपणे परिणामकारक भाष्य करणं ही नागराजची खासियत आणि ताकद आहे. ह्या सिनेमातही तो ते भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तितकं अंगावर येत नाही. उच्चभ्रूंचं कॉलेज व प्रस्थापित समाज आणि झोपडपट्टी ह्यांच्यामध्ये एक भिंत दाखवली आहे. ते ह्या दोन समाजातल्या संबंधांचं प्रतीक आहे. झोपडपट्टीमधली मुलं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे, क्षमतांमुळे ही भिंत ओलांडू बघतात आणि एक भला माणूस त्यांना भिंतीच्या ह्या पलीकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. फ़ॅन्ड्रीमधेही ही भिंत आहे, शाळेची भिंत. पण ती भिंत ज्या परखडपणे अंगावर येऊन काळजाचा जसा ठाव घेते तितकी ह्या सिनेमातली भिंत उंची गाठत नाही. कदाचित, हिंदी सिनेमाचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे नागराज त्याच्या होम ग्राउंड मराठी सिनेमात जितका परखड होतो तितका ह्या सिनेमात तो होतोय असं जाणवतं नाही.

प्रस्थापित आणि विस्थापित ह्यांच्यामधल्या प्रचंड मोठ्या भिंतीला ही ‘झुंड’ टक्कर देते पण भिंतीला ह्यावेळी भगदाड पडत नाही!

जरी सिनेमा अपेक्षीत उंची न गाठल्याने निराश करतो तरीही स्टिरीयोटाइप्स तोडणारा प्रयोग चुकवून चालणार नाही, एकदा दखल घेण्याजोगा नक्कीच आहे!

गाथा सागरतळाच्या सफरीची

(मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०२० मध्ये पूर्वप्रकाशित)

डुबकियां सिंधू में गोताखोर लगाता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

सोहनलाल द्विवेदी यांची ही एक कविता होती शाळेत असताना – कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्या कवितेतल्या या वरच्या कडव्यातून गोताखोर हा शब्द पहिल्यांदा आयुष्यात आला. त्या वेळी गोताखोर म्हणजे काय याचा मराठी अर्थ बघितला, तेव्हा गोताखोर म्हणजे पाणबुड्या असं समजलं. आमच्या गावाला विहिरीत घागरी, बादल्या बुडाल्या की त्या काढण्यासाठी खूप दम असलेला एक पट्टीचा पोहणारा पाण्याच्या तळाशी जाऊन त्या घागरी आणि बादल्या वर काढायचा. त्याला आमच्याकडे पाणबुड्या म्हणायचे. त्यामुळे गोताखोर म्हणजे समुद्राच्या तळाशी बुडी मारून मोती काढणारा पाणबुड्या असं समीकरण त्या वेळी डोक्यात फिट बसलं. पण त्या वेळी त्या समुद्राच्या अंतरंगात, सागरतळाशी असलेले समुद्री जीवांचं व प्रवाळांचं विश्व आणि त्यातलं नाट्य हे किती मती गुंग करणारं आहे, याची काहीच कल्पना नव्हती. पण पुढे सुदैवाने त्या नितांतसुंदर आणि अद्भुत विश्वाची, नुसती पुस्तकी ओळख न होता, त्या विश्वाची अद्भुत सफरही घडणार होती, ह्याची त्या वेळी काहीच कल्पना नव्हती. त्या अद्भुत सफरीची ही गाथा…

२०१३ला मॉरिशसला भेट देण्याचा योग आला होता. त्या टूरमध्ये तिथल्या एका प्रवाळ बेटावर जाण्यासाठी आयलंड हॉपिंग टूर होती. त्या प्रवाळ बेटावर समुद्राच्या उथळ भागात, ऑक्‍सिजनचा सप्लाय असलेलं एक शिरस्त्राण डोक्यावर चढवून बोटीच्याखाली पाण्यात बुडी मारून तिथले रंगीत मासे बघण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिथे फक्त रंगीत मासे बघण्यासारखे होते, आणखी दुसरं काही नव्हतं. आम्ही जिथे होतो, तिथून बरंच पलीकडे खोलवर बरंच काही होतं, पण तिकडचं नीट दिसत नव्हतं. आणि अचानक, पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर असलेले आणि काळे रबरी पोषाख घातलेले पाणबुडे दिसले आणि सोहनलाल द्विवेदींच्या कवितेला गोताखोर आयुष्यात प्रथम आणि प्रत्यक्ष बघितला. मी जिथे मासे बघत होतो, तिथलंच समुद्राखालचं विश्व इतकं भन्नाट होतं की ते गोताखोर जिथे बुड्या मारत होते, तिथलं विश्व किती भन्नाट असेल ह्याची कल्पना करूनच उत्कंठा वाढली आणि लगेच पाणबुड्या बनून तिथे जाण्याचं मनाशी ठरवलं आणि पाणबुड्या व्हायचं हे बीज तिथे डोक्यात रोवलं गेलं!

पुढे कामाच्या निमित्ताने मलेशियाला स्थलांतरित झालो आणि एका सुट्टीत लंकावि ह्या बेटावर फिरायला जाण्याचा योग आला. पांढऱ्या वाळूचे नितांत सुंदर किनारे असलेलं एक भन्नाट बेट. तीन दिवसांचा मुक्काम होता त्या बेटावर आणि लोकल टूर गाइड घेतला होता साइटसीइंगच्या मार्गदर्शनासाठी. त्या टूर गाइडने, मुख्य बेटापासून जवळच एक पुलाउ पायर नावाचं प्रवाळ बेट आहे आणि त्या बेटावरचं मरीन पार्क स्नॉर्कलिंग साइट म्हणून प्रख्यात आहे, तिथली ट्रीप बुक करू का? असं विचारलं. गूगलबाबाला साकडं घालून स्नॉर्कलिंग म्हणजे काय याचा शोध घेतला, तर तो एक मिनी-पाणबुड्या असलेला प्रकार आहे असं कळलं. स्नॉर्कलिंग मास्क लावून समुद्रात तोंड खुपसून आणि लाइफ जॅकेट घालून पाण्यावर तरंगायचं. त्या मास्कला एक पाइप असतो, त्यातून हवा आत येते आणि तोंडाने श्वास घेत तोंड पाण्यात बुडवून समुद्राखालचे रंगीबिरंगी विश्व बघायचं, हे म्हणजे स्नॉर्कलिंग. मॉरिशसच्या अनुभवानंतर समुद्राखालचे जग अधिक विस्तृतपणे बघण्याची इच्छा तर तेव्हाच झाली होती, पण ती पाणबुड्या होऊन बघण्याची होती.

टूर गाईडाला विचारलं, “डाइव्हिंग करता येईल का?”

त्यावर त्याने विचारलं, “तू सर्टिफाइड डाइव्हर आहेस का?”

मग कळलं की असं कोणीही उठून डाइव्हिंग करू शकत नाही त्यासाठी प्रॉपर प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि सर्टिफिकेट असेल तरच डाइव्हिंग करता येतं. ‘दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने मग स्नॉर्कलिंग करू या असं ठरलं, कारण ते करण्यासाठी कुठल्या प्रशिक्षणाची गरज नव्हती, कोणीही लाइफ जॅकेट घालून आरामात स्नॉर्कलिंग करू शकतो!

तिथला स्नॉर्कलिंगचा अनुभव निव्वळ अवर्णनीय होता. इथे नुसते रंगीबेरंगी मासेच नाही, तर समुद्राखालच्या रंगीबेरंगी प्रवाळ वसाहतीही वैविध्यपूर्ण होत्या. भान हरपून टाकणारा आणि मन उचंबळून टाकणारा अनुभव होता एकदम. आम्ही जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, त्या भागाची खोली साधारण दहा ते पंधरा फूट इतकी होती. सूर्यप्रकाश स्वच्छ आणि भरपूर असल्यामुळे पारदर्शक पाण्यातून प्रवाळ वसाहतींनी परिपूर्ण असलेला समुद्रतळ नितांतसुंदर दिसत होता. ह्या वेळी स्नॉर्कलिंगचा आनंद सहकुटुंब घेत असल्याने तो आनंद द्विगुणित होत होता. आणखी जास्त खोलवर भागामध्ये मोठे मासे आणि प्रवाळ वसाहतींची संख्या आणि दाटी खूपच जास्त होती. जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, तिथून फक्त अंदाज येत होता, पण दूर असल्याने जास्त स्पष्ट दिसत नव्हतं. जरा रोखून बघण्याचा प्रयत्न केला, पण जास्त काही दिसू शकलं नाही. पण अचानक, पुन्हा एकदा गोताखोर दिसला, तेच पाठीवर सिलेंडर आणि आणि काळा रबरी पोशाख. त्यांना ते खोलवरच (शंभर फुटांपर्यंत खोल) समुद्रतळाचं विश्व जवळून अनुभवता येत होतं. तो अनुभव किती आणि कसा भन्नाट असेल हा विचार मनात आला आणि सर्टिफाइड डाइव्हर व्हायची बांधलेली खूणगाठ पुन्हा परत घट्ट झाली.

त्या लंकावि दौऱ्यावरून परत आल्यानंतर ऑफिसमध्ये बसलो असताना ऑफिसातील एक सह-कर्मचारी मधू माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, “काय रे इतका टॅन का झाला आहेस?” तिला सांगितलं की मी नुकताच लंकाविला समुद्रकिनाऱ्यावर मस्त हुंदडून आलोय तीन-चार दिवस. त्यामुळे जरा त्वचा टॅन झाली आहे.

त्यावर ती हसून म्हणाली, “अरे, मीसुद्धा आताच रदांग आयलंडला जाऊन आले. तीन दिवसाची डाइव्हिंग ट्रीप होती.”
ते ऐकून माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी एकदम खुशीत येऊन तिला विचारलं, “तुला डाइव्हिंग येतं?”
त्यावर ती उत्तरली, “मी असिस्टंट डाइव्हिंग टीचर आहे!”

हे म्हणजे, ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!’ असं होतं. तिच्याकडून लगेच पुढची माहिती मिळवली की मलेशियन सब अ‍ॅक्वा क्लब (Malayan Sub Aqua Club – MSAC) नावाच्या एका डाइव्हिंग क्लबाची ती मेंबर होती आणि तिथेच ती असिस्टंट टीचर सर्टिफिकेशनची तयारी करत होती. मी तिला म्हटलं, मला स्कुबा डाइव्हर व्हायचंय. त्यावर ती म्हणाली की दोन आठवड्यानंतर सर्टिफाइड डाइव्हरसाठीची एक नवीन बॅच चालू होणार आहे आणि जर मला इंटरेस्ट असेल तर ती माझी नोंदणी त्या क्लबमध्ये करेल. मला एकदम तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन गेलं. शाळेत असताना पहिल्यांदा आयुष्यात भेटलेला गोताखोर बनण्याचे जे एक अंधुक स्वप्न मॉरिशसला बघितलं होतं ते आता साकार होताना दिसत होतं.

Club – MSAC

दुसऱ्याच दिवशी, मधूने क्लबच्या मेंबरशिपसाठी लागणारी सगळी कागदपत्रं ऑफिसमध्येच आणली. सगळे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून क्लबाचा रीतसर मेंबर झालो आणि ट्रेनिंगच्या दिवसाची वाट बघू लागलो. ट्रेनिंग दोन भागात होणार होतं. पहिला भाग होता थिअरीचा आणि दुसरा प्रॅक्टिकलचा. थिअरीमध्ये दोन दिवसाचं वर्कशॉप होतं. त्यामध्ये भौतिकशास्त्राचे, पाण्याचा दाब आणि त्याचा एकंदर शरीरावर होणारा परिणाम याचं रीतसर शास्त्रीय शिक्षण होतं. जसजसं समुद्राच्या तळाशी खोल जाऊ तसतसं पाण्याचा दाब वाढत जातो आणि त्यामुळे स्कुबा इक्विपमेंट वापरून घेतलेला श्वास आणि त्यामुळे फुप्फुसात भरला जाणारा ऑक्सिजन यांचे शरीरावर काय परिणाम आणि दुष्परिणाम होऊ शकतात याची इत्थंभूत माहिती या वर्कशॉपमध्ये देण्यात आली. त्यानंतर समुद्राच्या पाण्याखाली किती काळ राहता येतं ह्याचं गणित, कागदावर आकडेमोड करून आणि Dive Computer वापरून कसं करायचं हे शिकवलं. त्याखेरीज इतरही बरीच शास्त्रीय माहिती देण्यात आली. ते वर्कशॉप एकंदरीत फारच मनोरंजक आणि ज्ञानवर्धक होतं. क्लबची प्रेसिडेंट ट्रूडी गणेंद्र हे वर्कशॉप कंडक्ट करत होती. तिने वर्कशॉप संपताना, जे काही शिकलो त्याची एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे असं सांगून आमची विकेटच घेतली. रिव्हिजनसाठी एक आठवड्याचा कालावधी देऊन, एक आठवड्यानंतरची परीक्षेची तारीख ठरवली. जोपर्यंत लेखी परीक्षा पास होणार नाही, तोपर्यंत प्रॅक्टिकल सुरू करता येणार नव्हतं. एक आठवडाभर जोरदार रिव्हिजन करून लेखी परीक्षा पास झालो.

प्रॅक्टिकल सेशन्स ही स्विमिंग पुलावर होणार होती. खुद्द समुद्रात बुडी मारण्याआधी, जी काही थियरी शिकलो त्याचा सराव ऑक्सिजन सिलेंडर लावून स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये करायचा होता. डाइव्हिंग करताना खाली बुडी मारल्यानंतर समुद्रच्या पाण्यात पोहायचे नसतं, तरंगायचं असतं. ह्या तरंगायच्या पद्धतीचा (Buoyancy) सराव करायला स्विमिंग पूलमध्ये शिकवलं जातं. पाण्याच्या दाबाची काळजी घेत हळुवारपणे कसं बुडायचं, हळुवारपणे कसं वर यायचं याचं रीतसर शिक्षण ह्या प्रॅक्टिकल स्टेशन्समध्ये असतं. सहा दिवसांचे स्विमिंग पूल प्रात्यक्षिक झाल्यानंतर प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारण्यासाठी घेऊन जातात. ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय करणारी मुख्य नळी बंद झाल्यास बॅकअप नळी कशी वापरायची, खोल पाण्यात डोळ्यावरचा मास्क काढून पुन्हा कसा लावायचा, खोल पाण्यात ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर असलेलं सगळं किट उतरवून पुन्हा पाठीवर कसे चढवायचे, आपल्या डाइव्हिंग बडीच्या ऑक्सिजन सिलिंडरमधला ऑक्सिजन संपला तर त्याला अल्टरनेट सप्लाय देत कसं वर घेऊन यायचं, अशा प्रकारचे अनेक सराव करवून घेत एकदाचं प्रशिक्षण संपलं. ट्रेनिंग संपून आता मी त्या दिवसाची वाट बघत होतो, जेव्हा प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारून पाणबुड्या होण्याचं स्वप्न अखेर साकार होणार होतं. ट्रेनिंग संपल्यानंतर दोन आठवड्यांनी क्लबकडून एक मेल आलं की रदांग आयलंडवर पहिल्या डाइव्हिंग ट्रिपवर जाण्यासाठी तयार व्हा. ते मेल बघताच मन उचंबळून आलं आणि एक अनामिक हुरहुर दाटून राहिली. आतुरतेने त्या दिवसाची वाट बघू लागलो…

डाइव्हिंग चमू

आणि अखेर तो दिवस उजाडला. कौलालंपूरपासून उत्तरेकडे असलेल्या कौलातरंगाणू राज्यातल्या रदांग बेटावर जायचं होतं. कौलालंपूरपासून रदांग बेटावर जायच्या जेट्टीपर्यंतचा प्रवास साधारण ५७५ किलोमीटरचा होता. त्यानंतर जेट्टीपासून बेटावर जायला बोटीने ४५ मिनिटं लागणार होती. कौलालंपूरपासून ५७५ किलोमीटरचा सगळा प्रवास एक्स्प्रेस हायवेचा होता. ताशी १४० ते १५० किमी. या भन्नाट स्पीडने चार-साडेचार तासात ते अंतर कव्हर केलं. एक्स्प्रेस हायवेमुळे गाडीने स्पीड पकडला होता आणि मन त्या वेगाच्या कैकपट वेगाने रदांग बेटावर पोहोचलं होतं. जेट्टीवर पोहोचल्यानंतर या डाइव्ह ट्रीपवर येणाऱ्या सर्वांशी ओळख झाली. त्या ग्रूपमध्ये सर्व प्रकारचे अनुभवी डाइव्हर होते. मी धरून आम्ही तिघे होतो, जे पहिल्यांदा सागरतळाशी बुडी मारणार होतो. सर्वांशी ओळखीपाळखी होईपर्यंत आमची बोट जेट्टीला लागली आणि सगळे उत्साहाने बोटीत जाऊन बसले. आम्ही ज्या रदांग बेटावर चाललो होतो, ते बेट मलेशियातल्या बेस्ट डायव्हिंग साइटपैकी एक आहे. ते तसं का आहे ह्याची प्रचिती किनारा जवळ येऊ लागला तशी येऊ लागली. स्फटिकासारखं निळंशार स्वच्छ पाणी आणि प्रखर सूर्यप्रकाश यांच्यामुळे सागरतळ स्पष्ट दिसत होता. अगदी किनार्‍यालगतही वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे डोळ्यांनी स्पष्ट दिसत होते. तो स्पष्ट सागरतळ डोळ्यात साठवून ठेवून आम्ही आमच्या डाइव्ह रिसॉर्टकडे निघालो. आपापल्या अलॉट झालेल्या रूमच्या चाव्या घेऊन आम्ही रूममध्ये सामान ठेवलं आणि थोडे फ्रेश झालो, तोपर्यंत ट्रूडीची हाक आली टीम मीटिंगसाठी.

रिक्रिएशनल डायव्हिंगमध्ये साधारण २५ ते ३० मीटर खोल समुद्रतळापर्यंत जाता येतं – म्हणजे शंभर ते सव्वाशे फूट खोल. आम्ही नवशिके एकदम त्या रिक्रिएशनल डाइव्हला जाण्याआधी समुद्राची आणि समुद्राच्या पाण्याची ओळख व्हावी म्हणून आमच्यासाठी एक मिनी डाइव्ह प्लॅन केली होती. ट्रूडी आणि आम्ही तीन नवशिके त्या मिनी डाइव्हसाठी जाणार होतो. त्या डाइव्हमध्ये स्विमिंग पुलामध्ये शिकलेले सगळे सराव पुन्हा एकदा किनार्‍याजवळ समुद्राच्या उथळ भगातील पाण्यात केले आणि मुख्य डाइव्हला जाण्यासाठी आम्ही तयार झालो.

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रूडी आणि रिसॉर्टचा लोकल गाइड यांनी सर्वांचं ब्रीफिंग केलं. त्या ब्रीफिंगमध्ये डाइव्ह करताना वापरायच्या सांकेतिक खुणा समजावून सांगण्यात आल्या. त्यानंतर आमच्या पहिल्या डाइव्हचा मार्ग समजावून सांगितला. त्या डाइव्हमध्ये कोणत्या प्रकारचे मासे, कोणत्या प्रकारचे समुद्री जीव, वनस्पती आणि कोणत्या प्रकारचे प्रवाळ बघायला मिळतील याची कल्पना देण्यात आली. वेळेचं काटेकोर पालन करत, टाकीमधला ऑक्सिजन पूर्ण डाइव्हसाठी कसा पुरून उरेल ह्यानुसार डाइव्ह मार्गाचं प्लॅनिंग केलं गेलं होतं. रिक्रिएशनल डायव्हिंग हा एकटा-दुकट्याने करण्याचा खेळ-प्रकार नाहीये. हा ग्रूपमध्ये करण्याचा आणि एकमेकांच्या परस्पर सहकार्याने करण्याचा खेळ-प्रकार आहे. मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, बीसीडी (Buoyancy compensator), डाइव्ह कॉम्प्युटर आणि पायात लांबलचक फीन्स हा सगळा लवाजमा सांभाळत, वेळेचे भान आणि टाकीतल्या ऑक्सिजनचं प्रमाण यांचं गणित करत समुद्रतळाचं जादुई विश्व अनुभवायचं ही एक तारेवरची कसरत असते. त्यासाठी परस्पर सहकार्याची नितांत गरज असते डाइव्ह करताना. त्यासाठी प्रत्येक डाइव्हरला चमूतील एक डाइव्हर, बडी-डाइव्हर (भिडू) म्हणून निवडायचा असतो. आमची पहिलीच वेळ असल्याने ब्रीफिंगनंतर आम्हाला आमचा बडी-डाइव्हर सांगण्यात आला, जो ट्रूडीने ठरवला होता. आमच्या चमूबरोबर असणाऱ्या अनुभवी डाइव्हर्सचा आम्हा नवशिक्यांना प्रचंड फायदा आणि मदत होणार होती

Buoyancy Control

ट्रूडीने शिट्टी वाजवली आणि आम्ही सगळे बोटीत स्थानापन्न झालो. बोटीत बसल्यानंतर माझा बडी आणि मी एकमेकांनी आमची सगळी उपकरणे व्यवस्थित आहेत आणि व्यवस्थित बांधली गेली आहेत याची चाचणी करून एकमेकांना ‘ओके सिग्नल’ दिला. पंधरा मिनिटांत बोट आमच्या डाइव्ह साइटला पोहोचली. ट्रूडीने सिग्नल देताच देवाचं नाव घेऊन मी पाण्यात उडी टाकली. निळ्याशार रंगाचं थंडगार पाणी अंगाला लागताच शरीर आणि मन दोन्हीही थरारून गेलं. सर्व डाइव्हर्स पाण्यात आल्यानंतर एक रिंगण करून ट्रूडीने सिग्नल दिल्यानंतर बीसीडीतली हवा सोडून देऊन आम्ही सगळे जण सागरतळाकडे जाऊ (बुडू) लागलो. पंधरा मीटरपर्यंत खोल आल्यानंतर बीसीडीमध्ये पुन्हा हवा भरून Buoyancy सांभाळत तरंगत राहायला सांगण्यात आलं. आजूबाजूला रंगीबिरंगी मासे घोळक्या-घोळक्याने फिरत होते. रंगीबेरंगी प्रवाळ वसाहती मन मोहून टाकत होत्या. पण आणखी खोल जायचं होतं, पुन्हा आणखीन खोल जाण्यास सुरू केलं. पंचवीस मीटर खोल पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे समुद्री जीव आवतीबोवती दिसू लागले.

खोल समुद्रातली गहन शांतता, आल्हाददायक थंडगार पाणी आणि समुद्राची हिरवट निळसर झाक या धीर-गंभीर वातावरणाचा परिणाम होऊन एक प्रकारची असीम शांतता अनुभवायला येत होती. शरीरातलं गात्र न् गात्र सैल (रिलॅक्स) झालं होतं. मनाच्या खूप खोलवर अगदी शांत-शांत वाटत होतं. सगळं एकदम संथ होऊन वेळ थांबून गेल्यासारखं वाटत होतं. इतक्यात माझं लक्ष एका माशाकडे गेलं. तो संथ लयीत त्याची शेपटी हालवत एका जागी निवांत थांबून होता. मी सगळे भान हरपून त्याच्याकडे बघत होतो. धीरगंभीर वातावरण, मनात दाटलेली असीम शांतता आणि संथपणे शेपटी हालवत निवांत असलेला तो मासा या सर्वांचा अंमल होऊन, एक भारावलेली अवस्था अनुभवली, एकदम ट्रान्समध्ये जाऊन निवांत आणि समाधिस्थ झालो होतो. हा अनुभव इतका भन्नाट आणि अलौकिक होता की तो तसा शब्दात व्यक्त करणं अशक्यच आहे. इतकी शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमात कतरीना कैफ डाइव्ह ट्रीपवरून आल्यानंतर हृतिकला म्हणते – ‘डाइव्हिंग इज लाईक मेडिटेशन!’. तो सिनेमा बघितला तेव्हा ती काय म्हणतेय त्याचा नेमका अर्थ कळला नव्हता किंवा त्यामागची भावना कळली नव्हती (आणि त्या वेळी मेडिटेशन म्हणजे काय हेही ठाऊक नव्हतं). पण त्या निवांत माशाकडे बघून जी मनाची अलौकिक अवस्था झाली होती, त्या वेळी तिच्या डायलॉगचा खरा अर्थ उमगला, अगदी खोलवर पोहोचला.

त्यानंतरच्या डाइव्ह्ज वेगवेगळ्या साइटवर झाल्या. फाईंडिंग निमो हा माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे. त्यात जे समुद्रातलं जादुई विश्व दाखवलं आहे, ते सगळं ह्या साइट्सवर बघायला मिळालं. वेगवेगळे रंगीबेरंगी मासे, शार्क, स्टिंग-रे, भलीमोठी समुद्री कासवं, माहित नसलले इतर अनेक समुद्री जीव, वनस्पती आणि वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या प्रवाळ वसाहती ह्या सर्वांचं एकत्रित एक अद्भुत विश्व आहे. हे अत्यंत सुंदर, मनमोहक आणि मंत्रमुग्ध करणारं आहे. हे सगळं अद्भुत विश्व प्रत्यक्ष अनुभवायलाच हवंच!

डाइव्हिंग सर्टीफिकेट

MSAC मेंबरशीप

सिंधू में गोताखोर – स्वप्नपूर्ती

मी आणि मधू

आशा भोसले – जीवेत शरद: शतम् 

आशा भोसले
(Image used from Internet – Wikipedia)

मिसरूड फुटण्याच्या काळात, सतरा अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असताना बाजीगर सिनेमा बघण्याचा योग आला. नाही… नाही… शाहरुख खान बद्दल काही म्हणायचं नाहीयेय. त्या सिनेमामध्ये एक गाणं होतं, ‘किताबे बहुत सी पढी होगी तुमने, कही कोई चेहरा भी तुमने पढा है ‘. ते गाणं तेव्हा ऐकलं त्यावेळी त्या गायिकेचा धारदार आवाज काळीज चिरत खोलवर गेला. त्या आवाजाची इतकी भुरळ पडली होती की ते गाणे अक्षरशः लूपवर लावून ऐकत होतो. पण तो आवाज कोणाचा आहे हे त्यावेळी माहिती नव्हत कारण त्या वयात तोपर्यंत किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि के. एल. सैगल सोडून यांच्या पलीकडे संगीत जास्त ऐकलं नव्हत. (गाण / संगीत ऐकण्याची साधन तेव्हा परवडणारी नव्हती.) तेव्हा त्या गाण्याच्या गायिकेचा आवाज कोणाचा आहे हे माहिती नसल्याने साहजिकच कोणाचा आवाज आहे याचा शोध घेतला. तेव्हा तो आवाज आशा भोसले यांचा आहे असं कळलं! ते कळलं आणि चाटच पडलो कारण त्या वर्षी आशाबाईंचं वय साठ (६०) वर्ष होतं. सतरा – अठरा वर्षांच्या अल्लड तरुणीला तो साठ वर्षाच्या गायिकेचा आवाज चपखल बसला होता!

आशाबाईंचा आवाज आहे कळल्यावर झपाटून गेलो आणि त्यांच्या गाण्यांची शोधमोहीम हाती घेतली. आणि, त्या शोधमोहिमेत जे काही हाती लागलं त्याने आयुष्यच बदलून गेल. आशाबाईंच्या गाण्यांचा मग जो काही खजिना हाती लागला आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी अशी काही मनावर पडली त्यातून आजही बाहेर येता येत नाहीयेय. त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडून, त्यांचा फॅन होऊन, ‘लता ग्रेट की आशा’ ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, एक वेगळीच धुंदी होती त्यात त्या अल्लड वयामध्ये. आणि, त्या गाण्याच्या आवाजाच्या मोहिनी मुळे हे असले वाद कसे निरर्थक आणि पोकळ आहेत याची जाणीवही नसायची पण ते भारावलेपणच तितकं तीव्र होतं.आशाबाई – आर डी बर्मन, आशाबाई – ओ पी नय्यर, आशाबाई – कॅब्रे सॉंग्स, आशाबाई – मादक गाणी अशी अनेक समीकरण झाली होती. पण ह्या सगळ्या समीकरणांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आवाजावरची भक्ती उत्तरोत्तर वाढतच गेली.

मध्यंतरी कुठल्यातरी एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये त्या आणि सुनिधी चौहान दोघीही एकत्र होत्या. (सुनिधी चौहान ही माझी आताच्या काळातली आवडती गायिका) त्यावेळी आशाबाईंनी गायकाला (स्पर्धकाला) काहीतरी सल्ला दिला आणि खाण्यापिण्याची काळजी गेट आवाजाची निगा कशी राखायची या बद्दल काहीतरी सांगत होत्या. त्या वेळेस सुनिधीने, “मी तर चॉकलेट, आइसक्रीम मनमुराद खाते,जीवन मुक्त जगलं पाहिजे” असल्या टायपाची काहीतरी अल्लड विधान करून आशाताईंना प्रतिवाद करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खरंच हसूआलं, ज्या वयामध्ये आशाबाई तिच्या समोर बसून त्यांच्या आवाजाच्या ताकदीने स्टेजला आग लावता होत्या त्या पुढे अशी काहीतरी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचा कळस होता. असो! अशा या हरहुन्नरी गायिका, आशाबाई आज वयाच्या 88 व्या वर्षी वर्षात पदार्पण करत आहेत.

त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आर्ट ऑफ डाइंग – मृत्यूवर प्रेम करण्याची कला

मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०२० मध्ये पूर्वप्रकाशित

आहार, निद्रा, मैथुन आणि भय ह्या आदिम संवेदनांपैकी भय ही संवेदना सजीवाला त्याच्या अस्तित्व रक्षणासाठी प्राप्त झालेली प्रेरणा आहे. ह्या भयाच्या संवेदनेमुळे सजीव, जीवाला होऊ घातलेला धोका समजू शकतो आणि जीवनप्रवाह अपघाती संपण्यापासून जीवाचे रक्षण करू शकतो. हे अतिशय नैसर्गिक आहे, जीवनप्रवाह चालू राहण्यासाठी  होणारी नैसर्गिक प्रेरणा.

उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक टप्प्यात जेव्हा जीवामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचं अस्तित्व नव्हतं तेव्हा जीव आपलं नियत कर्म करून अनंतात विलीन होऊन जायचा, खऱ्या अर्थाने. (म्हणजे जन्म मृत्यूचा फेऱ्यात न अडकता, हे फक्त ह्या संकल्पनेवर विश्वास असणाऱ्यांसाठी, बाकीच्यांनी सोडून द्यावे). पण पुढे उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यात मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचा विकास होऊन ही इंद्रियं अस्तित्वात आली. अहंकारामुळे अस्तित्वाच्या मी-पणाची भावना अस्तित्वात आली तर मन, बुद्धी इंद्रियांमुळे कर्म-संस्कार अस्तित्वात आले. अहंकारामुळे ‘अहं ब्रह्मास्मी’ ह्या जाणिवेशी फारकत होऊन अस्तित्वाच्या मोहाच्या पडद्यामुळे मी म्हणजे शरीर ही भावना प्रबळ झाली. ज्या क्षणी ही भावना प्रबळ झाली त्याच क्षणी त्या शरीराच्या अस्तित्वाच्या नष्ट होण्याच्या भितीची भावना प्रबळ झाली आणि तिचा कर्म-संस्कार झाला (म्हणजेच जन्म मृत्यूचा फेरा सुरू झाला).  

सजीवांपैकी मनुष्यप्राणी जसा जसा उत्क्रांत होत गेला तसा तसा त्याच्यातील बुद्धीचा विकास वेगाने होत गेला. संकल्प-विकल्पात्मक मनाने ह्या विकसित बुद्धीच्या साहाय्याने भय ह्या नैसर्गिक संवेदनेचा (प्रेरणेचा) विस्तार करून अहंकाराच्या मदतीने आदिम भीतीला अनेक आयाम दिले. माणसाने भौतिक प्रगतीत जशी जशी घोडदौड सुरू केली तशी तशी वेगवेगळ्या भयाचे आविष्कार (PHOBIA) अस्तित्वात येत गेले. भयाचे हे अनेक प्रकार असले आणि आपल्या मनात सदैव भीती वास करीत असली तरी,  मनुष्याला सगळ्यात जास्त भय जर कुठल्या गोष्टीचे वाटत असेल तर ते मृत्यूचे.

जन्माला  येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास जीवाच्या हातात नसतो. त्या दोन श्वासावर त्याची हुकुमत किंवा सत्ता चालत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर काय? ह्या अस्तित्वाच्या अज्ञाताच्या भयाने मृत्यूचा धसका बसलेला असतो. ह्या भीतीमुळेच मृत्यू ह्या घटनेचे महत्त्व जीवाला कळलेलं नव्हतं. परंतु बुद्धीच्या प्रगल्भतेमुळे मनुष्याला “कोsहं” हा प्रश्न पडला आणि त्याने त्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. अनेक थोर साधकांनी, अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी, बुद्धावस्था प्राप्त करून घेऊन जन्म-मृत्यूचे रहस्य उलगडवले. मी म्हणजेच शरीर हा जो मोहाचा पडदा पडला होता तो दूर करून आपण म्हणजे देह नाही ह्या सत्याचा छडा लावला. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसतो पण त्या दोन श्वासांच्या दरम्यानचे सगळे श्वास मात्र आपल्या हातात असल्याने त्या सर्व श्वासांना आपल्या  नियंत्रणात ठेवून जीवन समृद्ध करत जीवन जगण्याची कला (आर्ट ऑफ लिविंग) विकसीत केली. आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व बुद्धांनी आणि अरिहंतांनी विविध साधनामार्ग शोधून त्या मार्गांनी मोक्षप्राप्तीचा (कर्म-संस्कार निर्मूलनाचा) पर्याय उपलब्ध करून दिला. फक्त वैराग्य मार्गानेच नव्हे तर प्रपंचात राहूनही मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवून दिला. पण फक्त जगण्याची कलाच महत्त्वाची नाही  तर त्याच बरोबर ‘मृत्यूची कला’ (आर्ट ऑफ डाइंग) ही तितकीच महत्त्वाची आहे हेही त्यांनी समजावून दिले आहे, फक्त दर्शनमार्गानेच नव्हे तर योगमार्गानेदेखील. पण ही मृत्यूवर प्रेम करायला लावणारी ‘मृत्यूची कला’ समजण्यापूर्वी जन्म आणि मृत्यू ह्या घटना समजणे महत्त्वाचे आहे.

जीवनप्रवाह हा ऊर्जेचा एक अखंड प्रवाह आहे. ही ऊर्जा म्हणजेच चैतन्य, परब्रह्म! ऊर्जा एका आकारातून दुसऱ्या आकारात साकार होत सतत प्रवाही असते. आकार निर्माण होणे आणि नष्ट होणे ही अटळ वारंवारता आहे कारण नित्य काही नाही, सर्व साकार सृष्टी अनित्य आहे. जन्म ही घटना, ऊर्जेचे एक जीर्ण आकार सोडून नवीन आकारात साकार होणे आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आणि जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहेच!

जन्म  – अविरत आणि अखंड विचारप्रवाह, त्यानुसार शरीरावर निर्माण होणाऱ्या संवेदना  आणि त्या संवेदनांनुसार प्रतिक्षिप्त होणारे कर्मसंस्कार, हा घटनाक्रम पहिल्या श्वासापासून चालू होणे आणि हे सर्व प्री-प्रोग्राम्ड होऊन ‘ऑटो पायलट‘ मोड मध्ये काम सुरू होणे  हा जन्म. हेच जन्म झालेल्या सजीवाचे जीवन, ऊर्जेचे साकार रूप. अविरत आणि अखंड विचारप्रवाहामुळे निरनिराळे कर्मसंस्कार मनाच्या खोल डोहातून उफाळून वर, मनःपटलावर येत असतात आणि सजीव त्या कर्मसंस्कारांवर प्रतिक्षिप्त होत कर्मेंद्रियांद्वारे आयुष्यभर कर्म करत असतो.   

मृत्यू – ही अनेक जैविक घटनांपैकी फक्त एक जैविक घटना आहे. पण ती फार महत्त्वाची घटना आहे कारण फार महत्त्वाचे ऊर्जेचे संक्रमण ह्या घटनेतून होत असते (आणि पुढचा जन्म ह्या घटनेशी अत्यंत संलग्न असतो). वर सांगितलेल्या ऑटो-पायलट घटनाक्रमानुसार मृत्यू समोर आल्यावर ते मृत होईपर्यंत अनंत विचार मनःपटलावर उमटतात आणि त्या विचारांवर प्रतिक्षिप्त होत कर्म केल्याने कर्मसंस्कार घडतात (हेच कर्मसंस्कार पुढच्या जन्म ह्या घटनेवर प्रभाव टाकतात, संचिताच्या स्वरूपात). पण मृत्यूचे भय असल्याने त्यावेळी येणारे विचार हे त्याच भावनेने पछाडलेले असतात. सर्व काही निसटून जाणार ही भावना आणि त्यामुळे येणारी व्याकुळता ही मृत्यू ह्या अटळ घटनेला कष्टप्रद आणि वेदनादायी तर बनवतेच पण त्याच्याशी संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेलाही प्रभावित करते. त्यामुळे ऊर्जेचे संक्रमण पुढील कोणत्या आकारात आणि कसे साकार होणार हे मृत्युसमयी असलेल्या ऊर्जास्थितीवर (मन:स्थितीवर) अवलंबून असते. म्हणजेच मृत्युसमयी शांत चित्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे!

जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना संलग्न असतात त्यामुळे ह्या दोन्ही घटना नैसर्गिकरीत्या होणे हे फार गरजेचे असते. कारण हे ऊर्जा संक्रमण असते. मृत्यू होतो जेव्हा जीर्ण शरीर (आकार) प्राण किंवा चैतन्य म्हणजेच ऊर्जा वाहून नेण्यास असमर्थ होते. तेव्हा अखंड प्रवाही असलेली ऊर्जा जीर्ण आकारातून नवीन सक्षम आकारात संक्रमित होते. हे नैसर्गिकपणे होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अपघाती, अनपेक्षित, अकस्मात, आत्महत्या असा अनैसर्गिक मृत्यू  योग्य नाही. अशा अनैसर्गिक मृत्यूच्यावेळी चित्त शांत नसल्याने त्यावेळी उफाळून येण्याऱ्या कर्मसंस्कारांवर नियंत्रण करता येत नाही आणि त्याचा प्रभाव ऊर्जा संक्रमणावर म्हणजेच पुढच्या संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेवर पडतो. म्हणजेच मृत्यू (ऊर्जा संक्रमण) हा नैसर्गिक असायला हवा. ह्यामुळेच धर्मग्रंथांमध्ये आत्महत्या हे पाप असं म्हटलं आहे. परंतु मोक्षप्राप्त सिद्ध योगपुरुषांनी (उदा. संत ज्ञानेश्वर) समाधी अवस्थेत जाऊन देह त्यागणं हे अनैसर्गिक नाही. कारण मोक्षप्राप्तीमुळे कर्म-संस्काराचे निर्मूलन झालेले असते आणि त्यामुळे त्या मुक्तावस्थेत ऊर्जा संक्रमणाची घटना घडताना पुढचा आकार (जन्म) नसतो, असतं ते फक्त अनंतात विलीन होणं.

‘आर्ट ऑफ डाइंग’ म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला त्यामुळेच फार महत्त्वाची आहे, मृत्युसमयी चित्त शांत ठेवण्यासाठी आणि मृत्यू नैसर्गिक होण्यासाठी. मरणावर प्रेम करायचे म्हणजे भौतिक जगात घडणाऱ्या अनेक अटळ घटनांपैकी मृत्यू हीदेखील एक अटळ घटना आहे हे समजून त्याला निर्विकार आणि निर्विचारपणे हसतमुख सामोरे जाणे आणि तो केव्हाही येऊ शकतो हे ध्यानात ठेवून त्यासाठी कोणत्याही क्षणी सज्ज असणे! पण अशी सज्जता असणे किंवा मृत्यूच्या असे प्रेमात असणे हे ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ इतके सोपे नसते. ‘आर्ट ऑफ डाइंग’ साठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ येणं फार गरजेच आहे.  कारण ह्या दोन्ही कला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकमेकीँना पूरक असलेल्या. त्यांच्यामुळेच मृत्यूच्या प्रेमात पडून त्याला सामोरे जाण्याची सज्जता करता येणं शक्य असतं. जीवन जगत असतानाच जन्म आणि मृत्यू यांची संलग्नता समजून मृत्यूवर प्रेम करण्याची कला शिकायची म्हणजे मग प्रत्यक्ष मृत्यू होताना त्याला सहजतेने सामोरे जाता येते.

पण हे साधायचे कसे? त्यासाठी काही मार्ग नाही का? इतक्या प्राचीन आणि सनातन तत्त्वज्ञानात ह्यावर काहीच उहापोह झाला नाहीयेय का? तर, आतापर्यंत होऊन गेलेल्या बुद्धांनी आणि ऋषिमुनींनी ह्यावर प्रचंड काम करून ठेवले आहे. गौतम बुद्धाची सारी शिकवण ही जीवनावर पर्यायाने मृत्यूवर प्रेम करायला  शिकवणारीच आहे. पंचशीलाचा आधार घेत ह्या त्रिसूत्रीचे अनुसरणं करणे हीच ‘आर्ट ऑफ डाइंग’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, दोन्ही. ह्यातला समाधी हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. ह्या समाधीअवस्थेतच देहातीत अवस्थेची अनुभूती येते. गौतम बुद्धाने शोधलेल्या आणि शिकवलेल्या विपश्यना ध्यानप्रक्रियेतली भंग ही अवस्था आणि  पातंजली योगसाधनेतली समाधी हाच टप्पा आहे. प्राणायामामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून कुंभक ही अवस्था लावली जाते. अथक प्रयासाने हीच कुंभक अवस्था (श्वास आत किंवा बाहेर रोखणे) श्वासावर नियंत्रण करण्याची गरज न पडता नैसर्गिकरीत्या होते आणि तिचा कालावधी जितका जास्त तितकी देहातीत अवस्थेची अनुभूती प्रबळ होत जाते. त्या देहातीत अनुभूतीमुळे मी म्हणजेच शरीर ह्या प्रबळ भावनेतून सुटका होण्याचे ज्ञान मिळते. ह्या भावनेतून सुटका करून घ्यायची झालेली ही जाणीव आणि शेवटचा श्वास, ह्या दरम्यान विद्यार्थी आणि साधक बनून, अविरत ध्यानसाधना करत, समाधीअवस्थेचा सराव म्हणजेच ‘आर्ट ऑफ डाइंग’. हेच असते मनुष्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट, Purpose of life!

ह्या समाधी अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विचार/विकार मनःपटलावर येतात, त्या विचारांशी निगडित कर्म-संस्कार घेऊन. त्या कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवल्यास मृत्युसमयी शांत चित्त ठेवणे सहज शक्य होते. शरीर जीर्ण झाल्याने, शेवटचा श्वास घेऊन सोडताना, सर्व कर्म-संस्कारांच्या अंतिम आणि अफाट रेट्यामुळे शरीरातल्या ऊर्जेचे (चैतन्य किंवा प्राणाचे) संक्रमण होते, ही घटना म्हणजेच मृत्यू. त्यावेळी उफाळून येणारे  कर्म-संस्कार हा अनेकविध भावनांचा कल्लोळ असतो. त्या अनेकविध भावनांपैकी जी भावना प्रबळ असेल त्यानुसार शेवटचे कर्म घडून त्याच्या प्रभावाने ऊर्जा संक्रमणाचा पुढचा आकार (जन्म) ठरतो. पुनर्जन्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणाऱ्यांसाठी मृत्युसमयी होणाऱ्या अनेकविध भावनांचा कल्लोळ आटोक्यात ठेवणे इतकाच मुद्दा लक्षात घेतला तरीही चालेल.

समाधी अवस्थेत देहातीत शून्याची अनुभूती येते जी शेवटचा श्वास घेतला जातो तेव्हा होत असते. साधनेमुळे त्या अवस्थेची अनुभूती सरावाने मिळालेली असल्याने त्याला सामोरे जाताना  भांबावून आणि दडपून (Overwhelmed) न जाता  चित्त स्थिर राहते. तसेच साधनेमुळे कोणत्याही कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची, प्रतिक्षिप्त न होण्याची कला साधलेली असते. त्यामुळे मृत्युसमयी भयामुळे येणाऱ्या कर्म-संस्कारांवर तटस्थ राहता येऊन सर्व व्याकुळता टाळता येते. ही साधना आयुष्यभर करायची असते, अगदी शेवटाच्या श्वासापर्यंत. ही साधना म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला. ह्या प्रेमामुळेच मृत्यूला न घाबरता किंवा त्याच्यासाठी अधीर न होता, तो जेव्हा येईल तेव्हा त्याच्या कवेत अलगद सुपूर्द  करता येणे शक्य होऊन शांतपणे अनंतात विलीन होता येते.

ह्या मृत्यूवर प्रेम करण्याच्या कलेमुळेच (आर्ट ऑफ डाइंगमुळे) मृत्यू हा नकोशी घटना न होता त्या मृत्यूचा वैयक्तिक सोहळा साजरा करता येतो.

माझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत

माझी शाळा, काशिदास घेलाभाई हायस्कूल, २०१७ मधे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने २३ एप्रिलला शाळेत एक भव्य सोहळा आयोजित केला होता. ७५ बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन हा सोहळा कसा भव्य करता येईल ह्याचे आयोजन करीत होते. सोहळा भव्य झाला. ह्या सोहळ्याचे ‘लाइव्ह टेलीकास्ट’ singetdigital.comह्या वेबसाइटवर केले होते.

ह्या सोहळ्यानिमित्ताने एक स्मरणिका काढण्याचे ठरले होते. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मनोगते मागवली होती. त्यासाठी माझे दिलेले मनोगत. 

अमृतमहोत्सवी वर्ष २०१७

काशिदास घेलाभाई हायस्कूल

“अरे ये ‘आयसोमेट्रिक व्ह्यू क्या होता है रे?”

“वो मराठे को पता होगा, उसको आता है| उसको तो ऑर्थोगोनल व्ह्यू भी आता है, टेक्निकल स्कूलसे है ना वो|”

हा भागूबाईला डिप्लोमाच्या पहिल्यावर्षी, ‘इंजिनीयरींग ड्रॉइंग’च्या तासाला नेहमी होणारा संवाद, काशीदास घेलाभाई हायस्कूलच्या अन्नपूर्णा अप्पाजी भट्टे तंत्रनिकेतनचा विद्यार्थी म्हणून छाती गर्वाने फुलवणारा असायचा. दर्जेदार, विलक्षण आणि हरहुन्नरी विद्यार्थी घडवणाऱ्या एका शाळेचा विद्यार्थी असल्याच्या अभिमान दाटून यावा असे कित्येक क्षण आयुष्यात आले आणि यापुढेही येत राहतील ह्याची खात्री काशीदास घेलाभाई हायस्कुलचा एक विद्यार्थी म्हणून मला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा काळ, ज्या वयात संस्कारांची रुजवात होऊन व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, तो असतो शालेय जीवनाचा. प्रत्येकासाठी त्यामुळेच, जिथे व्यक्तिमत्वाची मूलभूत रूपारेखा ठरली जाते, त्या शाळेच महत्व अनन्यसाधारण असतं. आपल्या सर्वांसाठी, म्हणूनच, काशीदास घेलाभाई हायस्कुल, तीच शाळा जी आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, ती आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतला एक महत्वाचा घटक आहे.

घरातल्या लाडावलेल्या आणि उबदार वातावरणात बागडत असलेल्या वयात, जेव्हा शाळा म्हणजे काय ते कळण्याची सुताराम शक्यता नव्हती त्या वयात माझी आणि आपल्या शाळेची बिगर इयत्तेत ओळख झाली. ज्युनियर केजी आणि सीनीयर केजीतल्या शिक्षीकांनी त्यावेळी घरच्या उबदार आरामाचा विसर पाडून शाळेबद्दल आत्मियता वाटावी इतका लळा लावून शाळेशी नाळ घट्ट करून टाकली. त्याच बिगरइयत्तेने आजतागायत जिवलग असणारे मित्र दिले, जे आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाले आहेत.

त्यानंतर प्राथमिक शाळेत मंदा राउतबाई, आठवलेबाई आणि दमायंती नाईकबाईनी चार वर्ष व्यापून टाकली होती. मायेचा जिव्हाळा लावून बालपण आनंददायी करण्यात यांचा मोठा हातभार होता. निबंध, वक्तृत्व ह्यांसारख्या इतर अनेक स्पर्धांमधे सहभागी व्हायला भाग पाडून आजच्या स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगात ताठ मानेने वावरण्याचा पायाच जणू काही त्यांनी घातला. चौथीत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाव नोंदवून, हुशार असल्याचा (नसलोतरीही) आव आणून आत्मविश्वासाने कसे वावरावे याची तयारीच जणूकाही करवून घेतली होती.

पहिलीत का दुसरीत असताना दोन मुलींच्यामधे एक मुलगा अशी बसण्याची व्यवस्ठा करून ‘आशेला’ लावण्यार्या ह्याच शाळेने पुढेपाचवी ते सातवी फक्त मुलांचे वर्ग ठरवून सगळ्या ‘रोमॅंटीक आशाआकांक्षांना’ सुरुंग लावण्याचे काम केले आणि ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा मंत्र देऊन, अभ्यास करून आयुष्यात ‘प्रकाश पाडण्यास’ प्रवृत्त केले. सहावीत वर्तकबाईनी हिंदी शिकवून राष्ट्रभाषेवर जे भाषिक अन्याय केले जातात ते करण्यापसून मलादूर ठेवले. सावेसरांनी नागरिकशास्त्र शिकवताना राज्यघटनेतील कलमं इतकी घोटून घेतली की तेव्हापासून राजकारणाचा धसकाच जो बसला तो आजतागायत तसाच आहे. सातवी अ मो राउतसरांनी व्यापून टाकली होती. ‘करडी शिस्त’ ह्याचा अर्थ सातवीत काय तो समजला. पण त्या करड्या शिस्तीमुळेच माझे हस्ताक्षर इतरांना वाचतायेण्या जोगे झाले. राउतसर काळाच्या पुढे होते. नदी समुद्राला जिथे मिळते त्याला नदीचे मुख म्हणतात, पण मुख का? तर नदी समुद्राला मिळते म्हणजे समुद्राचे चुंबन घेते म्हणून ते मुख हे अस समजावून देऊन त्या उमलत्या वयात प्रणयाचे भावाविश्वही मुक्त करून दिले.

आठवीत चुरीसरांनी घातलेल्या बीजगणिताच्या पायामुळेचआयुष्यातली किचकट गणितं सोडवता आली. सराफसर, चोरघेबाई, लता नाईकबाई यांनी मिळून सकलजनांना ‘शास्त्रोक्त’ करून सोडलं. कुलकर्णीसरांनी, चुरीसरांनी घातलेल्या पायावर भुमितीचा कळस चढवला. भूमितीतल्या सिद्धता सिद्ध करायाला शिकवता शिकवता आयुष्यात स्वत:ला सिद्ध करणंही तितकच महत्वाचं कसं हेही ते नकळत शिकवून गेले. मला भाषेशी खेळायला आवडण्याचे आणि भाषेची गोडी लागण्याचे कारणही कुलकर्णीसर! शाब्दिक कोट्या करण्याचं त्यांच कसब वादातीत होतं. आपल्यालाही हे जमलं पाहिजे हा ध्यास त्यांच्या मुळेच लागला आणि त्यासाठी साहित्य वाचनाचा नादही.

शाळेत नुसतं अभ्यास एके अभ्यास अस धोरण कधीच राबवलं गेलं नाही. एनसीसी, समाजसेवा, कार्यानुभव, स्काउट, गाइड असले इतर शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला होता. खेळाला असलेललं महत्व आपल्या शाळेचं वेगळेपण अधोरेखित करतं. विषेशत: खो खो आणि कबड्डी ह्या मैदानी खेळांना प्रधान्य देऊन एक चुरस निर्माण केली होती.

माझे वडील शाळेत शिक्षक असणं हे माझं सुदैव की दुर्दैव हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही. त्यांच आपल्याच शाळेत असणं एक वेगळ्याच प्रकारचं दडपण आणायचं माझ्यावर. मला खट्याळपणा(त्यावेळच्या भाषेत ‘राडे’) करायला जास्त जमायचं नाही. पण तरीही जसा जमेल तसा व्रात्यपणा मला माझ्या शाळेत करायला मिळालाच. दहावीला एक दिवस ‘मास बंक’ करणं असो की वर्गात हिंदुत्ववादी भडक सुविचार लिहीण असो. मुलींच्या दप्तरात मुलांची वह्या पुस्तकं अदलाबदल करणं असो की नावडत्या शिक्षकांच्या तासाला नेमकं काही निमित्त शोधून पळ काढणं असो, असले उपद्व्याप बरेच केले.

शालेयजीवनातली ती सोनेरी १२ वर्ष आणि आपली शाळा, आयुष्याचा एक मोठा कोपरा व्यापून आहे. आजही धकाधकीच्या आणि रूक्ष कोर्पोरेट विश्वात जेव्हा कामाचा ताण वाढून बेचैनी होते आणि विचित्र वाटून उदास व्यायला होतं; तेव्हा मी सर्व विसरून एकांतात, वाफाळता कॉफीचा कप हातात घेउन, ते सोनेरी दिवस आणि त्या रम्य आठवणी काढून भूतकाळात डोकावून येतो. ट्रस्टमी, १०-१५ मिनिटांत एकदम मूड फ्रेश होऊन, नवीन आव्हानं पेलायला मन पुन्हा एकदा सज्ज होतं.

आपली शाळा आता अमृतमहोत्सव साजरा करतेय, शतकोत्सवही साजरा करून शाळा चिरायू होईल असा सार्थ विश्वास मला आहे.

‘गो ईस्ट ऑर वेस्ट, के जी हायस्कूल इज द बेस्ट’! थ्री चीयर्स फॉर के जी हायस्कूल!!

– ब्रिजेश मराठे
१० वी ड, १८८९-९०

पुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य

Plagiarism किंवा वाड्‍ःमयचौर्य हा प्रकार ब्लॉगर जगतात ब्लॉगर्ससाठी काही नवीन नाही. त्यापासून सुरक्षा म्हणून कॉपीराईट सुविधा पुरविणाऱ्या बऱ्याच साईट्स पुढे आल्या. बहुतेककरून सर्व ब्लॉगर्स ह्या सुविधांचा वापर ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित करतात. मीही ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित केले आहेत.

पण नुकताच एक धक्का बसला. ‘पुढारी’सारख्या ख्यातनाम वर्तमानपत्राकडून माझ्या सैराटवरच्या लेखाचे वाड्‍ःमयचौर्य झाले. ‘बॅकसाईड स्टोरी’ ह्या सदरात माझा लेख जसाचा तसा प्रकाशित केला होता.  त्या लेखावर  एक प्रतिक्रिया टाकून  मी  निषेध नोंदवून ह्याबद्दल खुलासा मागवला. त्याचबरोबर संकेत पारधी ह्या मित्राने फेसाबुकवर पोस्ट टाकून हे वाड्‍ःमयचौर्य पब्लिकमध्ये उघड केले.

त्यावर पुढारी कडून त्या लिंकवर माझा नामनिर्देश करणारा खालील चित्रात दिसणारा बदल करण्यात आला. (त्यात वापरलेली मराठी भाषा अतिशय हास्यास्पद आहे)

IMG_4101[1]

तसेच पुढारीच्या वेबअडमीन कडून मेलद्वारेही खुलासा करण्यात आला.

Web Pudhari – webpudhari@pudhari.co.in via rediffmailpro.com
May 20

Dear Sir,
Got your mail regarding the article. This article was published in one of our print edition and so got carried on the website. We have informed this matter to the concern editor who is looking into the issue. Please give us some time to find out who submitted your article to us..
Pls send us your mobile number so that we can get in your touch…

असा अतिशय अश्लाध्य प्रकार पुढारीसारख्या दैनिकाकडून व्हावा हे खरोखर खेदजनक आहे. तसेच संपादकांनी कोणीही दिलेला मजकूर कसलीही शाहनिशा न करता प्रकाशित करावा  हेही निंद्य आहे!

पुढारीने माझा नामनिर्देश करून चूक कबूल केली आहे पण  त्याचा आनंद नाही कारण आता वर्तमानपत्रांचा  वाड्‍ःमयचौर्यरूपी काळ’ सोकावातोय…

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

chawadee

“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.

“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात! घारुअण्णा, ऐकताय का?”, नारुतात्या शक्य तितका गोंधळलेला चेहरा करत.

“कसं चळ लागलंय बघा बारामतीकरांना!”, घारुअण्णा उद्विग्न होत.

“घारुअण्णा आणि नारुतात्या, तुम्ही समजताय त्या ‘बिपी’बद्दल बोलत नाहीयेत ते.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“बालक-पालक सिनेमा बघितल्यापासून त्यांचं हे अस्सच आहे अगदी!”, चिंतोपंत चर्चेत प्रवेश करत.

“अहो राजच्या मनसेच्या, बहुचर्चित आणि बहुआयामी ब्लु प्रिंट बद्दल बोलतोय मी! आता सांगा, बघितली का नाही ती महाराष्ट्राची ब्लु प्रिंट?”, बारामतीकर.

“नाही! वाचली नाही अजून, काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, ही मात्र हद्द झाली! अहो, नातवाने आयपॅड दिलाय ना तुम्हाला, त्याची काय पुजा घातलीय का? ”, बारामतीकर हसत हसत.

“इथे आयपॅडचा काय संबंध?”, चिंतोपंत बुचकळ्यात पडत.

“अहो, आधुनिकतेची कास धरत मनसेने ती ब्लु प्रिंट, एक वेबसाइट काढून, ऑनलाईन करून, पब्लिक डोमेनमध्ये आणलीय.”, बारामतीकर.

“बरंsssबरंsss, म्हणजे आमच्या नमोंचाच आधुनिकतेची कास धरण्याचा कित्ता गिरवलाय म्हणा की तुमच्या राजने!”, चिंतोपंत उपहासाने.

“झालं, ह्यांचा संघीय बाणा आला लगेच बाहेर!”, इति बारामतीकर.

“बरं, राहिलं! काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट ते तर सांगा…”, चिंतोपंत.

“काय सांगणार, नव्या बाटलीत जुनीच दारू, झालं!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“वाचलीय का तुम्ही ती ब्लु प्रिंटं?? की नेहमीचाच विरोधासाठी विरोध? ”, घारुअण्णा किंचित रागात.

“हो! वाचलीही आणि त्या वेबसाइटवरचा मुख्य पानावरचा व्हिडियोही पाहिलाय मी!”, भुजबळकाका शांतपणे.

“मग, काय म्हणताहेत नवनिर्माणकर्ते त्या व्हिडियोत?”, नारुतात्या.

“त्या व्हिडियोत जगाची, महाराष्ट्राची आणि मुंबईची विहंगम सफर घडवून आणलीय महाराष्ट्रीय जनतेचे प्रबोधन आणि पर्यायाने नवनिर्माण करण्यासाठी!”, बारामतीकर गालात हसत.

“म्हणजे इथेही उद्धवच्या विहंगम फोटोग्राफीशी स्पर्धा आहेच म्हणा की.”, नारुतात्या पांचट विनोद करत.

“थांबा हो नारुतात्या! बारामतीकर, नेमके आहे काय त्या व्हिडियोत असे?”, घारुअण्णा त्रस्त होत.

“वेब साइटीवर,‘महाराष्ट्राचा विकास आराखडा – होय, हे शक्य आहे’असा ओबामाचा‘येस, वी कॅन’हा कित्ता गिरवला आहे.”, बारामतीकर मिश्किल हसू चेहऱ्यावर आणत.

“अहो, त्या व्हिडियोत काय आहे ते सांगा ना पण…”, घारुअण्णा चिडून.

“विकासासाठी दूरदृष्टी हवी आणि दूरदृष्टीला सौदर्यदृष्टीची जोड हवी असं म्हणताहेत नव-प्रबोधनकार. परदेशातली उदाहरणं द्यायची गरज नाही अस म्हणत सगळी परदेशातलीच उदाहरण दिली आहेत. सुंदरता आणि रचनेवर भर द्यावा लागेल हा मुद्दा मांडताना ते जनतेने करायचे आहे असे म्हणत त्यात सरकारची जबाबदारी कमीत कमी असावी म्हणत धूर्तपणे जनतेलाच जबाबदार धरले आहे आणि जबाबदारी जनतेवरच टाकली आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!”, बारामतीकर.

“ते जाऊदे, ते नेहमीचेच आहे. पण मला एका कळत नाहीयेय, महाराष्ट्राचे जाऊ दे, मुंबईचेपण जाऊदे म्हणतो मी, जे काही सौंदर्यपूर्ण नवनिर्माण घडवायचे आहे, महाराष्ट्रभर, त्याची झलक नाशकात का नाही दिसली? आराखडा नाशकात का नाही इंप्लीमेंट करून दाखवला? जसे मोदींनी‘गुजरात मॉडेल’च्या बळावर स्वतःला सिद्ध केले तसे‘नाशिक मॉडेल’बनवून विकास आराखडा सिद्ध करायचा होता ना!”, भुजबळकाका नेहमीच्या घीरगंभीर आणि ठाम भूमिकेत जात.

“तोच तर कळीचा मुद्दा आहे ना भुजबळकाका! ते असो, मी तो व्हिडियो बघितला आणि विकास आराखडाही वाचला. एकदम राजीव गांधींची आठवण झाली!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा बुचकळ्यात पडत.

“राजीवजींच्या भाषणांमध्ये ‘हमें ये करना है’ हे पालुपद असायचे त्याची अंमळ आठवण झाली.”, सोकाजीनाना मंद हसत, “तर ते ही असो, आमच्या कॉर्पोरेट जगतात माझा साहेब मला नेहमी म्हणायचा ‘Don’t come to me with problems, I know them, come to me with 2-3 solutions or approaches. I’ll decide which is best for the situation looking at the big picture’. त्या साहेबाची आठवण ताजी झाली मला व्हिडियो बघताना. पुन्हा पुन्हा देशाची, महाराष्ट्राची कशी काँग्रेसने वाट लावली आहे आणि समस्या काय काय आहेत तेच पुन्हा पुन्हा सांगितले, पण ते कसे बदलणार ते मात्र गुलदस्त्यात राहते या व्हिडियोमध्ये. म्हणून मग आराखडा वाचला तर तिथे ‘हे करायला हवं, असं व्हायला हवं’ असं सगळं संदिग्धच. नेमके नवनिर्माण आणि विकास आराखडा म्हणजे काय हे ठाम आणि भरीव असे काहीच नाही. ज्या गोष्टी आधी केलेल्या आहेत आणि करणे शक्य आहे तिथेच फक्त ‘आम्ही हे करू किंवा केले जाईल’ असे ठामपणे म्हटले आहे, बाकीच्या ठिकाणी ‘असे असायला हवे, असे करायला हवे’ असे सगळं संदिग्ध आहे. त्यामुळे नेमके काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे हा विकास आराखडा, एकंदरीत आतापर्यंतच्या केल्या गेल्या भाषणांचे आणि मुद्द्यांचे सुसुत्रीकरण करून, एकत्रित बांधणी करून केले गेलेले डॉक्युमेंटेशन, एवढाच निष्कर्ष काढता येतोय!”

“ज्जे बात, सोकाजीनाना!”, भुजबळकाका जोषात येत.

“त्यामुळे, ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ असं भुजबळकाका म्हणाले तरी आपण मात्र चहाच मागवूयात, काय?”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – मोदी विरुद्ध राहुल गांधी (दिवाळी धमाका)

(मिसळपाव.कॉम दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित)

chawadee

“काय हो, कर्तृत्व काय ह्या शिंच्याचे? त्या नेहरू घराण्याची सून असलेल्या इटालियन बाईच्या पोटी जन्म घेतला, एवढेच ना?” घारुअण्णा चकलीचा तुकडा काडकन तोडत, दिवाळीच्या फराळासाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“कोणाबद्दल बोलताय घारुअण्णा, आज कोणाची कंबख्ती?” नारुतात्या चिवड्याचे ताट ओढत आणि चेहऱ्यावर हसू आणत.

“तुमच्या त्या ‘राउल’ ऊर्फ पप्पूबद्दल बोलतोय मी, का उगाच वेड पांघरताय ह्या दिवाळीच्या मंगलमय सकाळी?” घारुअण्णा चकली ताटात टाकत, भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, त्यात त्याचे कसले आलेय कर्तृत्व? ते कर्तृत्व राजीवचे! खी खी खी…”, नारुतात्या चिवड्याचा बकाणा भरत आणि पांचट विनोद करत.

“नारुतात्या, कसले शिंचे पुचाट विनोद करतांय सकाळी सकाळी? मी सीरियसली बोलतोय!” घारुअण्णा करारी चेहरा करून.

बारामतीकर“अहो घारुअण्णा! नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?” बारामतीकर.

“बारामतीकर, ह्याची लायकी काय हो? आपल्या ह्या ‘आर्य सनातनी आसेतुहिमाचल भारतवर्षा’चे नेतृत्व करण्यासाठी आणि करोडो जनतेची धुरा वाहण्यासाठी आयात केलेले शिलेदार, सेनापती का लागावेत तुम्हाला?”, घारुअण्णा कसल्याश्या आवेशात.

“ह्म्म्म… तुम्हालाsss”, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“नाहीतर काय? आमचे मोदी बघा, असे ह्या अस्सल हिंदुस्तानच्या मातीतून तळपत पुढे आलेले अस्सल स्वदेशी आणि करारी नेतृत्व!”, चिंतोपंत घारुअण्णांच्या खांद्याला खांदा देत.

“घारुअण्णा, तुमची देशाबद्दलची व्याख्या अतिशय जातीयवादी आणि जनमानसाचे ध्रुवीकरण करणारी आहे, असे नाही वाटत तुम्हाला?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा तुकडा मोडत.

“वाटलेच मला, अजून कसे ह्यांनी ह्यांचे सेक्युलर तोंड उघडले नाहीं ते!” घारुअण्णा तिरीमिरीत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, देशाची व्याख्या राहू द्या तात्पुरती बाजूला. पण मला सांगा, ह्या काँग्रेसकडे, नेहरू घराण्याच्या ह्या लाडावलेल्या नातवाशिवाय दुसरे कोणते कणखर नेतृत्व नाही?” चिंतोपंत.

“नाहीतर काय, शिंचा युवराज म्हणे!” घारुअण्णा रागाने धुसफुसत.

“काय हो, काय प्रॉब्लेम काय तुमचा? उमदे आणि सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व आहे की राहुल!” इति बारामतीकर.

भुजबळकाका“हो, आणि नेमके तेच कारण सांगत संघश्रेष्ठींनी अडवाणींच्या गुडघ्याचे बाशिंग काढून घेतले ना?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा दुसरा तुकडा मोडत.

“अहो, देशात अतिरेकी कारवाया होत असताना हे तुमचे सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व परदेशात काय गुण उधळत होते, ते माहीत आहे आम्हाला!” घारुअण्णा रागाने चकलीचा चुरा करत.

“अहो, त्याने CII Industrial Meet मध्ये तोडलेले अकलेचे तारे आम्ही ऐकले आणि पाहिलेसुद्धा. काय म्हणे भारत मधमाशीचे पोळे आहे, भारतीय ट्रेन्समध्ये लोक नाही तर आयडियाज प्रवास करतात. पायलट ट्रेनिंगमध्ये म्हणे आउटडेटेड सिलॅबस शिकवला जातो. नॉन्सेन्स!” चिंतोपंत करंजी मोडत.

“अहो चिंतोपंत, फक्त पायलट ट्रेनिंग नव्हे, पूर्ण शिक्षणपद्धतीचा बोर्‍या वाजलाय म्हणे. हा सुकळीचा म्हणे अमेरिकेत आणि केंब्रिजमध्ये शिकून सुशिक्षित झालाय! अरे, शिरा पडो तुझ्या तोंडात, शिंच्या, आमच्या भारतीय शिक्षण परंपरेला नावे ठेवतोय काय रे नापास गाडग्या!” घारुअण्णा रागाने अजून एका चकलीचा चुरा करत.

“अहो घारुअण्णा, कुठे भरकटत चालला आहात. मुद्द्याला धरून राहा. जनमताचे ध्रुवीकरण करणार्‍या जातीयवादी आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या नेतृत्वापेक्षा हे सर्वसमावेशक सेक्युलर नेतृत्वच भारताचे भले करेल!” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडूचा घास घेत.

चिंतोपंत“बहुजनसम्राट, शब्द मागे घ्या! फॅसिस्ट काय, जातीयवादी काय? काहीही बोलाल काय? अहो, गुजराथचा झालेला कायापालट बघितला आहात काय? मोदी फॅसिस्ट आणि जातीयवादी असते तर गुजराथच्या जनतेने त्यांना निवडून दिले असते काय? गुजराथच्या जनतेचा सार्थ विश्वास आहे मोदींच्या कणखर नेतृत्वावर. गुजरातच्या विकासाचे व्यवस्थित पॅकेजिंग आणि मार्केटिंग करून गुंतवणुकीचा ओघ त्यांनी गुजराथेत वळवला आहे. आता हाच ‘गुजराथ पॅटर्न’ भारतभर राबविण्याची गरज आहे. विकास आराखड्याची गरज आहे आज भारताला. पण त्यासाठी सार्थ पुरोगामी वैचारिक बैठक असलेल्या नेतृत्वाची आज निकड आहे आणि नरेंद्र मोदी हाच सार्थ पर्याय आहे आणि ती काळाची गरजही आहे!” चिंतोपंत ठामपणे रव्याचा लाडू तोडत.

“अहो, गुजराथबाहेर ह्या मोदींना कोणी ओळखते का? राहुलचा दिल्लीपासून पार केरळपर्यंत जनमानसावर पगडा आहे. अखंड भारत त्याला आज ओळखतो आणि त्याला पंतप्रधानाच्या रूपात पाहतो आहे. तुमच्या भाजपात तरी एकवाक्यता आहे का? तिथेही तंगडीखेच चालू आहेच. नुसता विकास आराखडा नको आहे, तो सर्वसमावेशक हवा आणि तळागाळातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हवा.” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडू संपवत.

घारुअण्णा“अरे, पण ह्या नेहरू कुटुंबाच्या घराणेशाहीने राष्ट्राची वाट लागते आहे ना! मागच्या साठ-पासष्ट वर्षात देशाचा नुसता रौरवनरक करून टाकला आहे ह्यांनी. अराजक माजले आहे नुसते अराजक, त्यात आता हे युवराज, पप्पू कुठचा. काही नाही, हे थांबले पाहिजे आणि त्यासाठी मोदींना पर्याय नाही.” घारुअण्णा उद्विग्नतेने आता बेसनलाडूचा चुरा करत.

“काय हो, ७७मध्ये ही घराणेशाही मोडून काढली होती ना? काय झाले त्याचे? जनसंघाचे किती तुकडे झाले?” नारुतात्या आता चकलीवर ताव मारत.

“अहो, त्या वेळी नाही जमले, पण अटलबिहारींच्या राज्यात सर्व काही आलबेल केले होते की नाही? ‘फील गुड फॅक्टर’ कसा होता तेव्हा? होती का ही असली जीवघेणी महागाई?” चिंतोपंत शांतपणे फराळ संपवून हात झटकत.

“होsss? मग का नाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं? का तशी सुज्ञ जनता फक्त गुजराथेतच आहे?”, बारामतीकर मिश्कीलपणे शंकरपाळी चघळत.

“अहो चावडीकर, जरा माझे ऐकता शांतपणे सर्व जण? का उगा एवढे वातावरण तापवत आहात? आणि काय ह्या शाब्दिक आणि वैचारिक फटाक्यांच्या माळा? दिवाळीची एक सकाळ जरा शांत घालवा, फराळ संपवा!” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्हीच बघा बुवा काय ते आता.” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना“अहो, हा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा पोकळ बुडबुडा ह्या दोन्ही पक्षाच्या थिंक टॅन्कने, मीडियाला हाताशी धरून, हवा देऊन फुगवला आहे. अहो, गाजराची पुंगी आहे ही दोन्ही पक्षांसाठी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, काय? त्यात तुमच्यासारखे अनुयायी आहेतच त्या बुडबुड्याला अजून हवा द्यायला. निवडणुकीआधी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा किंवा तसे संकेत द्यावेत, असे पक्षावर कोणतेही बंधन नसते. ही फक्त संभाव्य मतदारांना दाखवलेली लालूच असते. अहो, निवडणुकीत जिंकेल जो जिंकायचाय तो. तुम्ही का आपापसात लढताय फुकाचे? तुमच्या मतदारसंघात कोणी लायक उमेदवार उभा केला आहे का, ते बघा. नसला तर आता सरकार तसे कळवायची सोय करतेय म्हणे, त्याचा वापर करा. त्याचा प्रभावी वापर केलात तर मोदी आणि राहुल दोघेही सोडा – कोणीच पंतप्रधान होऊ शकणार नाही. काय, पटतंय का?” सोकाजीनाना मंद हसत.

“चला, आज चहा नको. दिवाळीच्या मुहूर्तावर बायकोने बासुंदी करून दिली आहे सर्वांसाठी, ती घ्या आणि तोंड गोड करा!” सोकाजीनाना मिश्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या बासुंदीच्या वाट्या भरू लागले.

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास ‘अर्धा रिकामा’ असा दिसू शकतो किंवा ‘अर्धा भरलेला’ दिसू शकतो.

सुरुवातीला इंटरनेट हे फक्त वाचनीय होते म्हणजे Read-only. WEB 2.0 च्या तांत्रिक क्रांतीतून निव्वळ वाचनाचा आनंद न घेता आता इंटरनेटवर लिहिताही येऊ लागले. ‘ब्लॉग’ नावाचे माध्यम तमाम लिखाळ लोकांना उपलब्ध झाले आणि इंटरनेटवर माहितीचा पूर येऊ लागला. त्यात ‘Wikipedia’ आणि ‘Google Search’ ह्या सर्वात मोठ्या अलीबाबाच्या गुहा ठरल्या. ‘अनंत हस्ते इंटरनेट देता, किती घेशील दोन कराने’ अशी अवस्था झाली. अनेक विचारवंत आणि हौशी लेखक ‘Wikipedia’ आणि ‘Google’ च्या मदतीने माहितीचे संकलन करून लिखाण करू लागले. बर्‍याच जणांनी त्यात कौशल्य मिळवून यश प्राप्त केले. बऱ्याच जणांची पुस्तकेही प्रकाशित झाली. खास करून मराठी भाषेतल्या मराठी संस्थळांवर चांगले लेखन मराठी भाषेत उपलब्ध होऊ लागले. इंटरनेट ह्या माध्यमातही ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अशी परिस्थिती निर्माण झाली.

पण एक माशी शिंकली. ह्या यशस्वी झालेल्यांना ‘विकीपंडीत’ किंवा ‘गुगलपंडीत’ असे हिणवले जाऊ लागले. माहिती आणि त्यावर आधारित ज्ञान हे त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावे? ह्या प्रश्नाचे उत्तर न देताच हिणकस शेऱ्यांनी त्या लेखनकर्त्यांची खिल्ली उडवली जाण्यात धन्यता मानली जाऊ लागले. ‘सोशल नेटवर्किंग’ ह्या इंटरनेटच्या दुसऱ्या अपत्याच्या माध्यमातून आपले कंपू तयार करून त्या लेखनकर्त्यांविषयी चकाट्या पिटल्या जाऊ लागल्या. आजतागायत हे प्रकार चालले आहे. पण ‘माहिती आणि त्यावर आधारित मांडल्या गेलेल्या ज्ञानाचा दर्जा हा त्या माहितीच्या स्रोतावर का अवलंबून असावा?’ ह्या प्रश्नावर ह्या खिल्ली उडवणाऱ्यांनी कधीही विचार केला नाही.

ह्या प्रश्नाचे उत्तर आहे जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka). अमेरिकेतील मेरीलॅंड राज्यातील क्राउन्सविले येथील एका शाळेत शिकणारा 15 वर्षाचा शाळकरी मुलगा. ह्याने 15 व्या वर्षीच संशोधन करून स्वादुपिंड (pancreatic), अंडकोष (ovarian) आणि फुफ्फुस (lung) यांच्या कॅन्सरची शरीराला लागण झाली आहे का ह्याचे निदान करणाऱ्या तपासणीची एक कमी खर्चिक पद्धत शोधून काढली आहे. ह्या पद्धतीत डिपस्टीक पद्धतीचा एक ‘सेंसर पेपर’ (लिटमस पेपर सारखा) त्याने शोधला आहे. हा पेपर कॅन्सरचा प्रादुर्भाव दर्शविणारी, रक्तात किंवा लघवीत असणारी प्रथिने शोधतो आणि अगदी लवकरच्या स्टेजवर कॅन्सरचे निदान होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.

जॅक ऍन्ड्राका (Jack Thomas Andraka)

शाळेत असल्यापासूनच विज्ञानात रस असलेला हा धडपड्या जॅक नववीत असताना त्याचा एक अतिशय जवळचा नातेवाईक स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान लवकर न झाल्यामुळे दगावला आणि जॅकचे आयुष्य त्याने बदलून गेले. त्याने ह्यावर ‘निदान तपासणी’ शोधायचा मनाशी निर्धार केला. शाळेत जीवशात्रात त्याला ‘प्रतिजैवके’ आणि ‘कार्बन नॅनोट्यूब्जचा तपासणीच्या पद्धतींमध्ये वापर’ ह्या विषयांची तोंडओळख झाली होती. त्यांचा वापर करून स्वस्तातली निदान पद्धती शोधता येऊ शकेल असे त्याला तेव्हा वाटले. शाळेतल्या लायब्ररीत जाऊन त्याने पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. पण शाळेतल्या लायब्ररीतल्या पुस्तकांच्याही पुढची माहिती आणि ज्ञान त्याला त्यासाठी हवे होते.

ते त्याने कसे मिळवले? त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याने “a teenager’s two best friends: Google and Wikipedia” यांचा वापर करून त्याला हवी असलेली माहिती मिळवली. त्याच्या आधारे त्याचा ‘संशोधन प्रकल्प’ सुरू करून तो Intel International Science and Engineering Fair मध्ये सादर केला आणि त्याबद्दल पारितोषिक मिळवले. त्यानंतर केंब्रिज ऑक्सफर्ड हार्वर्ड ह्या सारखी विद्यापीठे त्याला अॅडमिशन द्यायला पायघड्या घालून तयार आहेत.

आतापर्यंत करोडो डॉलर्स, अत्याधुनिक लॅब्ज मध्ये संशोधनासाठी खर्च करून जे जमले नव्हते ते ह्या लहानग्या जॅकने एका छोट्या आणि साध्या प्रयोगशाळेत साध्य करून दाखवले. त्यासाठी त्याने ‘विकिपीडिया’ आणि ‘गूगल’ ह्यांचा सढळ हाताने उपयोग केला आणि त्याच्या मुलाखतींमध्ये तसे सांगायलाही तो विसरत नाही.

तर, ‘विकीपंडीत’ किंवा ‘गुगलपंडीत’ अशी हेटाळणी करणाऱ्यांनी आता ह्यातून बोध घ्यावा आणि माहिती ही माहिती असते आणि योग्य प्रकारे वापरल्यास त्यातून मानवजातीवर उपकारच होतात हे समजून घ्यावे.

दुनियादारीच्या निमित्ताने…

आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्‍याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्‍याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.

मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली. आणि म्हणूनच कदाचित वाचनातला हुरूप टिकून राहिला आणि एकंदर मराठी साहित्य वाचायची सवय आणि गोडी लागली. एकदम सुरुवातीला बाबा कदमांच्या एका दोन कादंबर्‍या वाचल्या होत्या, त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सुशिंची सालम ही कादंबरी वाचली आणि झपाटल्यासारखा सुशिंच्यासर्व कादंबर्‍या वाचनालयात जाऊन वाचायचा सपाटा लावला. त्यावेळी बहुतकरून फिरोझ इराणी आणि दारा बुलंद हे माझे आवडते हीरो बनले होते. मग एकदा अचानक कल्पांत ही कादंबरी हाती लागली आणि सुशिंचा एका आगळाच पैलू मला गवसला. सुशिंचा परम भक्त असल्याचा अभिमान तेव्हा गगनात मावत नव्हता. पुढे लवकरच कॉलेजला जायला लागलो आणि नेमकी ‘दुनियादारी’ ही कादंबरी हाती लागली. बस्स! कॉलेजजीवन अगदी झपाटून गेले होते तेव्हा.

पण आता नुकतीच ही कादंबरी आता पुन्हा एकदा वाचली (नाही, चित्रपट येणार म्हणून नाही, त्याच्या आधीच). पण ह्यावेळी ती एवढी भिडली नाही जितकी कॉलेजात असताना भिडली होती. ह्यावेळी वाचताना एम. के. श्रोत्री आणि श्रेयस यांचे नाते, सुशिंनी, कादंबरीत बरेच पोकळ दाखवले आहे असे वाटून गेले. प्रत्यक्षात एम. के. श्रोत्री आयुष्याबद्दलचे जे काही तत्त्वज्ञान कादंबरीत सांगतो ते जास्त गहन असे सुशिंनी मांडायचा प्रयत्न केला होता पण श्रेयस तळवळकराशी डायरेक्ट नाते संबंध जुळवून कादंबरीचा केलेला शेवट ह्यावेळी मला काही भावला नव्हता.

आता हा सिनेमा जेव्हा आला त्यावेळी कथानक बदलले आहे असा गदारोळ झाला होता. पात्रांची नावेदेखील बदलली आहेत असेही कळले होते. पण चित्रपट स्वतः बघितल्याशिवाय त्यावर काहीबाही वाचून मत बनविणे हे मला आवडत नाही. त्यामुळे चित्रपट बरा असो की वाईट सुशिंसाठी हा चित्रपट बघायचाच असे ठरविले होते. चेन्नैत असल्याने काही हा चित्रपट बघायला जमत नव्हते. आज पुण्यात आल्या-आल्या चित्रपट पाहून घेतला. चित्रपटगृह दुपारी बाराच्या शोलाही भरलेले होते. हे पाहून खूपच बरे वाटले आणि ही गर्दी तरुणाईची होती. त्यातल्या बहुसंख्यांना सुशि कोण हेही माहितीही नसावे.

असो, मला हा सिनेमा अतिशय आवडला. सर्वात जास्त काय आवडले असेल तर पटकथेत केलेला बदल. ह्या बदलामुळे एम. के. श्रोत्रींच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली आहे असे मला व्यक्तिशः वाटते. कादंबरीत एम. के. श्रोत्री एक शोकांतिक शेवट असलेले पात्र आहे, दुनियादारीची साक्ष देण्यासाठी उभारलेले पात्र. पण कादंबरीत एम. के. श्रोत्रींचा शेवट आणि त्याची श्रेयसशीघातलेली सांगड तितकीची पटत नाही. पण चित्रपटातल्या पटकथेत एम. के. श्रोत्रीच्या मृत्यूने श्रेयसमध्ये झालेला बदल आणि चित्रपटाच्या पटकथेतील शेवट हा अतिशय सयुक्तिक आणि वास्तविक वाटतो.

मला चित्रपट बघताना कथेत केलेले बदल कुठेही खटकले नाहीत. मुळात सिनेमा बघायला जाताना एक स्वतंत्र कलाकृती बघायला जायचे ह्या हिशोबानेच गेले होतो. त्यामुळे कुठेही तुलना केली नाही. सुशिंच्या दुनियादारी ह्या कादंबरीवर बेतलेली एक स्वतंत्र कथा/पटकथा आणि त्यावर बेतलेला एक स्वतंत्र चित्रपट असे बघितल्यास हा सिनेमा मस्तच झाला आहे. हा सिनेमा हाऊसफुल चालून 30-40 कोटींचा गल्लाही ह्या सिनेमाने जमवला आहे.

पात्रे आणि त्यांची वेषभूषा सत्तरीच्या दशकातली दाखवली आहे, पण कादंबरी त्या काळातली असल्याने तसे करणे गरजेचे आहे असे वाटत नाही. कारण कथेतला बदल हा, ही पूर्ण कथा फ्लॅश-बॅकच्या अंगाने पुढे आणतो त्यामुळे त्या वेषभूषा पटत जातात. अंकुशाचा दिग्या उर्फ डी.एस.पी. अतिशय समर्पक. तो दिग्या वाटतो, निदान मलातरी वाटला. अश्क्या, उम्या इत्यादी पात्रेही मस्तच. शिरीनसाठी सध्याच्या जमान्यात सई ताम्हनकर शिवाय दुसरी कोणी पर्याय असेल असे वाटत नाही असे वाटावे इतकी सई शिरीन म्हणून शोभते. (पण अभिनयाची वानवा असल्याने मूळ कथेतील पात्राची परिपक्वता दाखविण्यास तीच्या मर्यादा आड येतात). मिनू अतिशय समर्पक, मूळ कथेतील मिनू अस्तित्वात आलीय की काय असे वाटावे इतकी उर्मिला कानिटकर मिनू म्हणून शोभली आहे.

श्रेयस आणि साईनाथ ही पात्रे मात्र जबरी हुकली किंवा फसली आहेत. स्वप्नील जोश्याला त्याच्या त्या सुजलेल्या स्वरूपात श्रेयस म्हणून पचविणे खरंच खूप जड जाते. चेहेर्‍यावरच्या थोराडपणामुळे श्रेयसचा हळुवारपण आणि निरागसता त्याला अजिबात प्रतिबिंबित करता आलेला नाहीयेय. जितेंद्र जोशी फक्त सुरुवातीच्या, एंट्रीच्या सीनमध्ये तेवढा सुसह्य होतो बाकी चित्रपटभर त्याने ओव्हर अॅशक्टींगचा कहर केला आहे. एम. के. श्रोत्री म्हणून संदीप कुलकर्णीला काही करायला चित्रपटात वावच नाहीयेय. 2-3 सीन्समध्येच एम. के. श्रोत्रीचे दर्शन होते. पण संदीप कुलकर्णी ऐवजी मोहन जोशींना एम. के. श्रोत्री म्हणून बघायला कदाचित आवडले असते.

तर एकंदरीत ‘सुशि-भक्तांनी’ गदारोळ उडवलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट मला आवडला आणि कथेतील बदलही सार्थ वाटला, त्यामुळे एम. के. श्रोत्री ह्या पात्राला न्याय मिळाला असे मला वाटते.