सैराट – अफाट स्टोरी टेलींग

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला…सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने ‘स्टोरी टेलींग’ साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम ‘स्टोरी टेलींग’ साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

नीयो-रियालिझम‘ ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय 😉 )

कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा – IRNSS

मागे GPS वर लिहिलेल्या लेखात संपूर्ण भारतीय बनावटीच्या ग्लोबल पोजीशानिंग सिस्टिमचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलेल्या आयआरएनएसएस (IRNSS) प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीने आज एक मैलाचा दगड पार केला. ह्या प्रणालीत अंतर्भूत असलेल्या सात उपग्रहांमधला सातवा, शेवटचा, उपग्रह भारताने आज श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात प्रक्षेपित केला. ह्या शिरपेचातल्या तुऱ्याने भारत आज अमेरिका, रशिया, युरोप आणि चीन ह्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

कारगिल युद्धाच्या वेळी स्वतंत्र आणि भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची गरज अधोरेखित झाली होती. त्यावेळी अमेरिकेच्या GPS ह्या प्रणालीचा उपयोग भारताला करावा लागला होता. इस्रोने त्यानुसार आयआरएनएसएस (IRNSS) प्रणालीचे काम हाती घेतले होते आणि आज सर्व उपग्रह प्रक्षेपित करून भारताचा उपग्रह आणि अवकाश तंत्रज्ञानातली घेतलेली झेप किती यथार्थ आहे हे सिद्ध केले.

(चित्र: आंतरजालावरून साभार)

ह्या प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये:

  • भारतीय उपखंडातील भारताच्या आजूबाजूच्या सुमारे १५००  किमी प्रदेशात ह्या प्रणालीची सेवा अचूक, रिअल-टाइम स्थिती आणि वेळ दाखवू शकणार आहे.
  • ही प्रणाली दोन प्रकारच्या सेवा प्रदान करेल:
    १. Standard Positioning Service (SPS) – हे सेवा खुली असून नागरी उपयोगाकरिता वापरण्यात येईल.
    २. Restricted Service (RS) – ही सेवा फक्त अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल आणि सुरक्षेसाठी ही सेवा एनक्रिप्टेड असेल.
  • ह्या प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित केलेले IRNSS-1A, 1B, 1C, ID,1E, 1F and IG असे हे सात उपग्रह.
  • सर्व उपग्रहांची कार्यक्षमतेचा कालावधी १२ वर्षांचा आहे आणि आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी २ राखीव उपग्रह तैनात केलेले आहेत.
  • येत्या ३-४ महिन्यांमध्ये ह्या सातही उपग्रहांमध्ये समन्वय साधला जाऊन त्यांचे प्रणालीबरहुकूम काम चालू होईल.

२४ उपग्रहांची GPS आणि GLONASS, ३४ उपग्रहांची युरोपियन गॅलिलियो, ३५ उपग्रहांची चिनी बैदु ह्या पार्श्वभूमीवर ७ उपग्रहांची सुटसुटीत IRNSS हे भारताच्या तंत्रज्ञानाताल्या अफाट प्रगतीचे द्योतक आहे!

भन्साळीचा बाजीराव मस्तानी

भन्साळीच्या बाजीराव मस्तानी ह्या सिनेमाबद्दल बराच गदारोळ, ह्या सिनेमाचे ‘पिंगा’ हे गाणे रिलीज झाल्यावर, झाला होता. आंतरजालावर आणि सोशल मीडियावर तर वादळच उठले होते.पेशवेकुलीन स्त्रियांचे आणि एकंदरच इतिहासाचे विकृतीकरण केले गेले असल्याच्या वावड्या उडल्या होत्या किंवा उडवल्या गेल्या होत्या. टीव्हीवर तथाकथित ‘मान्यवर, अभ्यासक, इतिहास संशोधक’ यांना बोलावून चर्चासत्रांचे रतीब घातले गेले होते. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणार (पुण्या-मुंबईत) हे निश्चित होते. तसे झालेही. बऱ्याच व्हॉॅटसअॅप ग्रुप्सवर सिनेमावर बहिष्कार टाका अशा आवाहनांचेही रतीब चालू होते.

ह्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून, काल ‘बाजीराव-मस्तानी’ पाहिला. प्रचंड आवडला! काय आवडले?  तर, पहिला बाजीराव, राऊ म्हणून, मनापासून आणि बेहद्द आवडला.

पहिल्या बाजीरावाबद्दल, तो एक जिगरबाज  आणि अपराजित लढवय्या जो मोहिमेवर असताना घोड्यावरच कणसे तळहातावर  मळून खायचा असे आणि मस्तानी ही यवनी पदरी बाळगून असलेला अशी प्रतिमा माझ्या मनात लहानपणापासून होती. सलग ४० लढाया जिंकणारा बाजीराव हा रांगडा आणि धडाडीने निर्णय घेणाराच असावा असे मनापासून वाटायचे. त्या प्रतिमेला नुसतेच मूर्त रूप भन्साळीने दिले नाहीयेय तर बाजीराव कसा ‘पुरोगामी’ होता हे ही त्याच्या व्यक्तीरेखाटनातून सार्थ उभे केले आहे. काही काही वेळा राऊ काहीसा बेफिकीर, आततायी आणि भडक वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपटाच्या कथानकाच्या प्रवाहात एक रांगडा योद्धा काळाच्या पुढे कसा होता याचेच ते प्रतीक वाटते.

कथानकाच्या नाट्यउभारणीसाठी लागणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कथानकात ‘सिनेमॅटीक लिबर्टी’च्या नावाखाली, सढळ हाताने वापरले आहे वापरले आहे, त्यामुळे इतिहासाचे  विकृतीकरण झाले असे वाटूही शकते. पण हा एक सिनेमा आहे व त्यात ठराविक वेळात एका  ऐतिहासिक कालखंडातली बरेच गुंतागुंतीचे पदर असलेली प्रेम-कथा बसवायची आहे हे ध्यानात घेतले की सिनेमॅटीक लिबर्टी तितकीशी जाचक न वाटता कथानकाच्या प्रवाहात बसून जाते.

बहुतेक बखरींमधून मस्तानीबद्दलचे उल्लेख जवळजवळ टाळलेले असल्याने तिच्याबद्दलची आणि तिच्या बाजीरावाशी असलेल्या नात्याबद्दल दंतकथा आणि वंदताच जास्त असल्याने ती ‘तवायफ‘ की पत्नी  ह्याबद्दल बरेच समज आणि अपसमज आजही असावेत. तिच्याबद्दल असणारे हे समाज अपसमज हे प्रामुख्याने तिचे मुसलमान असणे ह्यामुळे होते. पुण्यातला त्यावेळचा समाज आणि पेशवे घराणे यांचा तिच्याबद्दलचा दुःस्वास आणि तिला ‘गाणी बजावणी‘ करणारी ह्या दर्जाला आणून बसवणारी विचारसरणी ही ती यवनी असल्यामुळे व तिची पर्शियन आई गाणारी असल्यानेही होती. पण ह्यात ती छत्रसाल राजाचे रक्त धमन्यांमध्ये खेळवणारी, शस्त्रपारंगत राजकन्या होती ह्याकडे दुर्लक्ष केले गेले होते.

ह्या सिनेमाच्या कथानकात, तिच्यावर ‘तवायफ‘ ढंगाची राहणी लादली गेल्यावर तिने ज्या राजनैतिक मुत्सद्दीपणे ते ते प्रसंग हाताळले ते जर कोणाला इतिहासाचे विकृतीकरण वाटणार असेल तर वाटो बापडे!  ते ज्या पद्धतीने सिनेमात मांडले आहे  ते मस्तानीला योग्य ती उंची प्रदान करणारे आहे. आणि ते तसे होण्यास भाग पाडणारा राऊ म्हणूनच मग आद्य पुरोगामी वाटतो.

सर्व कलाकारांनी आपापली पात्रनिवड सार्थ ठरवत समरसून भूमिका केल्या आहेत. रणवीर अक्षरशः  भूमिका जगाला आहे. त्याने बेफिकिर, रांगडा, हळवा, प्रेमात बुडालेला भावनाप्रधान योद्धा सार्थ उभा केला आहे. मराठी शब्द्पेरणी असलेला, भाषेचा एक बेफिकीर लहेजा जो त्याने चित्रपटभर पकडला आहे  तो बहुतेक प्रसंगात भाव खाऊन जातो. विशेषतः जेव्हा निजामासमोर बसून बोलणी झाल्यावर त्याच्या पुढ्यात जातो तो प्रसंग रणवीर आणि  भन्साळीचे चित्रपटाबद्दलचे बाकीचे गुन्हे  क्षम्य करून जातो. दीपिका मस्तानी वाटते आणि तिने ती यथायोग्य वठवली आहे. प्रियांका,मिलिंद सोमण, यतीन कारेकर, तन्वी आझमी इत्यादींनी झोकून काम केले आहे.

भव्य-दिव्य न् महागडे  सेट्स, चकचकीत व भरजरी पोशाख आणि प्रचंड कॅन्व्हास ही भन्साळीची खासियत आहे (अलीकडे तेवढेच राहिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये). ह्या सिनेमात तो पुणेरी, पेशवाई थाटाचा भव्य आणि ग्लॉसी कॅन्व्हास उभा करण्यात यशस्वी ठरला आहे.

राहता राहिले ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ ह्या वादग्रस्त गाण्यांबद्दल. मल्हारी हे गाणे निजामासोबतच्या अतिशय तणावग्रस्त प्रसंगानंतर येते त्यात बाजीरावाची ‘तडफदार आणि धडाकेबाज’ भूमिका अधोरेखित झालेली असते, त्यानंतर लगेच ते गाणे येते. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. कथानकाबाहेर, संदर्भरहित गाणे बघितल्यास ते चुकीचेच वाटेल. पिंगा गाण्याचेही तसेच. कथानकाच्या प्रवाहात ते चपखल येते. मस्तानी तेव्हा शनावारवाडयावरच राहत असते आणि त्या गाण्याच्या आधीच्या दृश्यात काशीबाई तिच्याकडे हळदीकुंकवाला जाऊन तिला शालू देऊन आलेली असते जो ती नेसून पिंगा घालायला येते. दोन्ही गाण्यांचा उगाच बाऊ केला गेला आहे.

बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेला एका आदरणीय स्तरावर नेणारा आणि राऊच्या पुरोगामी रांगडेपणाला नेमके टिपणारा  भन्साळीच्या बाजीराव मस्तानी सिनेमा आवडून गेला!

चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

chawadee

आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात.

“अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे.

“बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे.

“अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“बारामातीकर, कुठे आहे तुमचा जाणता राजा ह्या दुष्काळात? आहे का काही त्या माजी कृषीमंत्र्याला शेतकऱ्याचे?”, इति चिंतोपंत.

“अमेय खोपकर ह्या बॉलीवूड सेनेच्या अध्यक्षाने मनसे तर्फे बॉलीवूडला आवाहन केले आहे शेतकर्यांना सढळ हाताने मदत करायला, चांगला काम आहे!”, इति घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, हे असे आवाहन की आव्हान? ”, बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका हसत.

“हो ना, कसलं आवाहन न आव्हान, धमकीच म्हणा ना सरळ.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, अहो जमीन कसून अन्नधान्य पिकवणाऱ्याची काळजी करायला नको का?”, घारुअण्णा तिरमिरीत.

“काळजी तर करावीच ना, पण अशी दुसऱ्यांच्या खिशावर डोळा ठेवून?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, जागृती होतेय हे काही कमी आहे का? पावसाने कंबरडे मोडले आहे.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, तथाकथित बहुजन नेत्यांकडून काही सुरुवात झाली नाही म्हणून विरोध दुसरं काय?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! स्वतः: काय केलेय मदत करण्यासाठी? दुसऱ्यांना वेठीस का म्हणून?”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, हा कळवळा कृष्णकुंजातील गारेगार एसीमध्ये बसूनच आलाय ना? की विदर्भात किंवा मराठवाड्यात बसून आलाय?”, बारामतीकर शांतपणे.

“टोल आंदोलनात मिळालेलं काही द्यायचे की आधी स्वतः:, मग आवाहनं करायची दुसऱ्यांना!”, इति भुजबळकाका.

“ओह्हो! घारुअण्णा, आत्ता माझ्या लक्षात आलं कोण आयजी आणि कोण बायजी ते.”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे जर मदत करतात तर बॉलीवूड कलाकार का करू शकत नाही असा सवाल विचारणारे हे टिकोजीराव कोण?”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“नाशिकच्या ‘नवणिर्माणा’तूनही काही ‘भले’ झालेच असेल की ते वापरायचे दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी”, बारामतीकर आवेशात.

“अहो पण हे शिंचे कलाकार कमावतात की खोऱ्याने मग सामाजिक बांधिलकी वैग्रे काही आहे की नाही?”, घारुअण्णा तणतणत.

“ते त्यांचं त्यांना ठरवू द्याना, त्यांची सामाजिक बांधिलकी ठरविणारे तुम्ही कोण? ”, भुजबळकाका हसत.

“अहो पण आपला नाना आणि मकरंद करताहेत ना? त्यांचे बघून तरी काही लाज बाळगायची…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. मराठी माणसाने मराठी माणसासाठी काही केले की लगेच बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकारांचा पोटशूळ कसा उठतो बघा! ”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“अहो राजने काहीतरी करून पक्षाची मोट बांधली आहे, पदं आणि पदाधिकारी उभे केले आहेत त्या पदाधिकाऱ्यांना काही कामं नकोत का?”, सोकाजीनाना मंद हसत

“आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी हे मनसे पहिल्यांदा करते आहे का? शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करा म्हणजे नेमके काय करा, ती मदत जर बॉलीवूडचे कलाकार करणार असतील तर त्यात मनसेचा काय रोल, ह्या दोन्ही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत. ब्लु प्रिण्ट मध्येही हेच केले होते. आता, नाना आणि मकरंद मैदानात उतरून काही करताहेत हे दिसल्यावर अचानक एक विषय मिळाला प्रकाशात यायला. शेतकऱ्यांना पैसे वाटून त्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? त्यांच्या समस्या काय आहेत आत्महत्या करण्यामागच्या त्याचा अभ्यास करून, मुळाशी जाऊन, निराकरणासाठी काही ठोस कार्यक्रम राबवायला हवा ना! तसे करण्याची सोडा, नुसते विचार करण्याची तरी कुवत आहे का? नुसते सढळ हाताने मदत करा असे आवाहन कम गर्भित धमकी देऊन समस्या नाहीशी होते का? नाही! त्याने फक्त ‘उपद्रवमूल्य’ लोकांच्या मनात ठसवता येते आणि हेतू तोच आहे. ‘आम्ही आहोत अजून, आम्हाला विसरू नका एवढ्यात‘, हाच संदेश लोकांच्या मनातफ़ ठसवायचा आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

“आणि आपण बसतो आपापली अस्मितांची गळवं कुरवाळत, तथाकथित नेत्यांनाही तेच हवे असते. सोडा तो अकलेचा दुष्काळ आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना घारूअण्णांच्या खांद्यावर हात टाकत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार

chawadee

“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.

“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.

“तो शिंचा केजरी त्या अम्रीकेच्या CIA च्या ताटाखालचं मांजर आहे म्हणे!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“हो त्याच्या NGO ला मिळणारे फंडींग, त्याच्या परदेशवार्‍या तसे असण्याला दुजोराच देताहेत.”, इति चिंतोपंत.

“अहो हो ना, म्हणे भाजपावर वचक आणि कंट्रोल ठेवायला अम्रीकेने उभे केलेले बुजगावणे आहे ते, जसे त्या पाकड्यांच्या मलाला उभे केले होते तसे.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो घारुअण्णा, उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करू नका, शांतपणे बोला जरा.”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“हो ना, विषय काय नं हे बोल्तात काय? भाजपाचा सुपडा साफ झालाय त्याचे काय ते बोला ना.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! अहो पण भाजपाचा मतदार दूर गेलेला नाही. तो भाजपाच्या पाठीशीच आहे.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… मियाँ गीरे तो गीरे तंगडी उनकी उप्परच!”, नारूतात्या पुन्हा एकदा पांचट विनोद मारत.

“हो ना! अहो, दिल्लीत जेमतेम 3 जागांची बेगमी झालीय आणि कसला मतदार पाठीशी हो घारुअण्णा?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, भाजपाचा टक्का कमी झालाच नाहीयेय, काँग्रेसची सगळी मते आपला मिळाली आहेत आणि काँग्रेसचाच सुपडा साफ झाला आहे खरंतर.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, काँग्रेस संपतेय ते कसे काय बघवेल त्यांना.”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! इथे विषय दिल्ली निवडणूकीच्या निकालांचा चाललाय. काँग्रेस तशीही रिंगणात कधी नव्हतीच. दुहेरी लढतच होती ही.”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, आणि अरविंदला शह द्यायला त्याच्या एकेकाळच्या साथी, किरण बेदींना, रिंगणात आणायची चाल खेळून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपाने. पण ती गाजराची पुंगी होती ते आता कळतंय, आता पराभवाचे खापर त्यांच्या बोडक्यावर मारता येईल म्हणजे मोदींच्या जोधपुरीवर शिंतोडा नाही.”, बारामतीकर शांतपणे.

“मोठे मोठे नेते, खुद्द पंतप्रधान, दिल्लीत येऊन शक्तिप्रदर्शन करून दिल्ली काबीज करण्याच्या गर्जना करत होते.”, इति भुजबळकाका.

“पंतप्रधान? प्रधानसेवक म्हणायचंय का तुम्हाला?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“अहो ते तर दिल्ली पादाक्रांत केल्याच्या थाटात, दिल्लीतूनच नितीशकुमारांना आव्हान देत होते!”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, एक अराजक माजवणारा माणूस आणि त्याचा पक्ष, काश्मीरला स्वायत्तता द्या असे म्हणणारे त्याचे साथीदार हे दिल्लीचा, देशाच्या राजधानीचा, कारभार हाकणार हे पटतच नाहीयेय.”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“फुक्कट वीज, फुक्कट पाणी सगळा फुकट्या कारभार असणार आहे. काय आहे विश्वेश्वराच्या मनात ते त्या विश्वेश्वरासच ठाऊक! ”, घारुअण्णा तणतणत.

“कळकळ दिल्लीत अराजक माजणार त्याच्यामुळे आहे.”, चिंतोपंत.

“होय होय, भाजपा हरल्याचं दुःख नाही पण हा केजरीवाल सोकावतोय ना…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. हे असले कुडमुडे ‘आप’वादी राजकारणी कसं काय राज्य चालवणार?”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“आप किंवा केजरीवाल अ‍ॅन्ड कंपनी दिल्लीत निवडून आली, ती कशी? भरघोस मतदान होऊन! आता मतदान कोणी केले? दिल्लीकरांनी! जे तिथे राहताहेत त्यांनी त्यांच्या भल्यासाठी दिलेला कौल आहे तो. त्याच दिल्लीकरांनी लोकसभेसाठी भाजपाला कौल दिला होता, तो देश चालविण्यासाठी होता. आता स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकांना निवडून आणले आहे. परिपक्व लोकशाहीची जाण असल्याचा वस्तुपाठ आहे तो! आणि अराजक माजवलेच आपने तर जशी भाजपाची आणि काँग्रेसची गत आज केलीय तशी दिल्लीकर आपची करतीलच की! दिल्लीकरांनी विश्वास दाखवलाच आहे तर आपण ही 100 दिवस बघू की वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते. त्यावरून 5 वर्षांत काय होईल याचा अंदाज येईल. आणि तसंही जादूची कांडी असल्यासारखे सगळे लगेच आलबेल होत नाही, लागायचा तो वेळ लागतो, हे मोदींनी केंद्रात दाखवून दिले आहेच!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“तर, जे काय व्हायचे असेल ते होईलच! पण आता जरा ‘आप’चे कौतुक आणि अभिनंदन करा की 67/70 ही कामगिरी कौतुकास्पद आहेच. काय पटते आहे का? जाऊ द्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

2014 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2014 annual report for this blog.

Here’s an excerpt:

The concert hall at the Sydney Opera House holds 2,700 people. This blog was viewed about 10,000 times in 2014. If it were a concert at Sydney Opera House, it would take about 4 sold-out performances for that many people to see it.

Click here to see the complete report.

चावडीवरच्या गप्पा – अफझलखानाचे सै(दै)न्य

chawadee

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.

“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.

“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला? ”, घारुअण्णा बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे ओले करीत.

“अहो, म्हणून काय ह्या थराला जायचे? असे बोलायचे, तेही एकेकाळच्या मित्राला? ते ही चक्क उपरा असल्याच्या थाटात?”, इति चिंतोपंत.

“मित्रं??? असा पाठीत खंजीर खुपसणारा मित्रं?? शिरा पडो असल्या मित्राच्या तोंडात!”, घारुअण्णा गरगरा डोळे फिरवत.

“अहो घारुअण्णा, भावुक होऊ नका उगीच. शांतपणे विचार करा जरा. खरोखरीच ते वक्तव्य चुकीचे नव्हते का? अशी उपमा योग्य आहे का? कितीही मतभेद असले तरीही अफझल खानाचे सैन्य असे म्हणणे हे जरा अतीच होते बरं का!”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! युती तोडायचे पातक केलेन ते केलेन वरून मिज्जासी दाखवताय कोणाला? ते सहन करून घेतलेच जाणार नाही बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात! महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असा संदेश द्यायलाच हवा. शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनीही हेच केले असते.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… बाळासाहेब असते तर युती तुटलीच नसती! कुठे ते हिंदूहृदयसम्राट आणि कुठे हे स्वहृदयसम्राट!”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“हो ना! अहो दिल्लीत सरकार आले ते ह्यांच्याच युतीमुळे असे समजून बेडकी फुगावी तसे फुगले हे उदबत्ती ठाकरे! उदबत्ती फटाका पेटवायच्या कामी येते पण तिच्यात स्वतःमध्ये कसलाही दम नसतो हे कळले असते तर असली बाष्कळ वक्तव्य करायची वेळ आली नसती त्याच्यावर.”, बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना, आणि ते ही डायरेक्ट मोदींवर हल्ला? स्वकर्तृत्वावर आणि हिकमतीवर बहुमत मिळवून मिळालेल्या एका पंतप्रधानावर? ”, बारामतीकर हसत.

“स्वकर्तृत्वावर? संघानं डोक्यावर घेतला आणि भाजपाने पैसा ओतला म्हणून हा शिंचा पंतप्रधान! त्यात पुन्हा ब्राह्मणही नाही, कसले स्वकर्तृत्व त्या शिंच्याचे?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! पुरोगामी महाराष्ट्रात आहात, असल्या जातीयवादी पिंका टाकवतात तरी कशा तुम्हाला!”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“अच्छा, म्हणजे मोदी ब्राम्हण नाही हे कारण आहे होय घारुअण्णांच्या मोदीद्वेषाचे? बरं बरं…”, नारुतात्या संधी अजिबात न सोडत खाष्टपणे.

“अहो विषय काय, चाललात कुठे? आमच्या साहेबांकडून धोरणीपणा शिकावा जरा उद्धवाने आणि तुम्हीही घारुअण्णा! कितीही कट्टर विरोधक समोर असला तरीही जिभेवर साखरच असणार साहेबांच्या!”, इति बारामतीकर.

“साखर तर असणारच, साखर कारखान्यांच्या सहकारातून ती तर फुकटच असेल नै?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“मला तर हा पवारांचाच काहीतरी कावा वाटतोय. तिकडे मोदींची दाढी कुरवाळताहेत आणि इकडे दोन्ही ठाकरे बंधूंना पण गूळ लावताहेत. कुछ तो गडबड है!”, चिंतोपंत.

“बारामतीकर, है कोई जवाब?”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, असे अफझलखानाची उपमा देणे शोभते का? अरे, अफझल खानाने केलेला हल्ला हा लूट करून शिवरायांसकट महाराष्ट्राला बुडवण्यासाठीचा होता. त्याचीशी तुलना करायचा विचार येऊच कसा शकतो? इतिहास माहिती असला अन पक्षाचे नाव शिवरायांच्या नावावरून असले म्हणजे असे काहीही निंद्य बोलायचा परवाना मिळतो का? इतकी वर्षे सोबत मिळून सत्ता उपभोगली आणि आता तोच हिंदुत्ववादी मित्र अचानक अफझलखानाच्या पातळीवरचा होतो? अजब आहे? अकलेची दिवाळखोरी नाहीतर काय हे?”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“ऐतिहासिक दाखले देऊन जनतेला इतिहासातच रमवत ठेवण्याची ही जुनीच चाल आहे शिवसेनेची आणि एकंदरीतच राजकारण्यांची!”, बारामातीकर.

“हा मुद्दा पटण्यासारखा आहे!”, भुजबळकाका.

“मुद्दा तुम्हाला पटेलच हो! हा घारुअण्णा काहीही म्हणाला तरी त्याची फिकीर इथे आहे कुणाला? आज बाळासाहेब असते तर हे दिवस दिसले नसते! ”, घारुअण्णा उद्वेगाने.

“होय! घारुअण्णा तुम्ही म्हणताय ते खरेच आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, चिंतोपंत एकदम चमकून.

“हो, आज केलेले घूमजाव बघितले का? म्हणे मी टोपी फेकली पण त्यात तुम्ही डोके का घातले? ते ही त्या विधानावर भाजपाकडून कडाडून प्रत्युत्तर आल्यावर लगेच! अरे जनतेला टोप्या घालायचे आतातरी बंद करा!”, सोकाजीनाना कठोर बोलत, “अहो, शिवसेनाप्रमुख जेव्हा काही विधानं करीत तेव्हा ते आपल्या मतांवर ठाम असायचे मग ते मत चूक असो की बरोबर. शिवसैनिक कधीच संभ्रमात असायचा नाही. भूमिका ठाम, पक्की आणि रोखठोक असायची. त्यांना अशी सारवासारव करायची बहुदा गरजच पडत नसे! धाकली पाती उगाच आव आणून बाळासाहेबांचा तोरा आणण्याचा प्रयत्न करते आहे पण ते जमत नाहीयेय.

‘शिवसेनाप्रमुखपद’ हे शिवधनुष्य आहे आणि ते पेलविण्याची ताकद उद्धवाकडे नाही हेच युती तुटल्यावर सिद्ध झाले. मारे बाळासाहेबांचा आव आणाल, पण मुत्सद्दीपणा कुठून आणाल? बरं, ते विधान केले ते केले पण अफझल खान दिल्लीचा सरदार नव्हता, तो दक्षिणेकडून महाराजांवर आणि महाराष्ट्रावर चाल करून आला होता हा साधा इतिहास माहिती असू नये? त्याचे तारतम्य न बाळगता बेजबाबदार विधाने करणे हा भलताच मूर्खपणा आहे!

तर ते एक असो, निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात.”

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

chawadee

“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.

“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात! घारुअण्णा, ऐकताय का?”, नारुतात्या शक्य तितका गोंधळलेला चेहरा करत.

“कसं चळ लागलंय बघा बारामतीकरांना!”, घारुअण्णा उद्विग्न होत.

“घारुअण्णा आणि नारुतात्या, तुम्ही समजताय त्या ‘बिपी’बद्दल बोलत नाहीयेत ते.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“बालक-पालक सिनेमा बघितल्यापासून त्यांचं हे अस्सच आहे अगदी!”, चिंतोपंत चर्चेत प्रवेश करत.

“अहो राजच्या मनसेच्या, बहुचर्चित आणि बहुआयामी ब्लु प्रिंट बद्दल बोलतोय मी! आता सांगा, बघितली का नाही ती महाराष्ट्राची ब्लु प्रिंट?”, बारामतीकर.

“नाही! वाचली नाही अजून, काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट?”, इति चिंतोपंत.

“चिंतोपंत, ही मात्र हद्द झाली! अहो, नातवाने आयपॅड दिलाय ना तुम्हाला, त्याची काय पुजा घातलीय का? ”, बारामतीकर हसत हसत.

“इथे आयपॅडचा काय संबंध?”, चिंतोपंत बुचकळ्यात पडत.

“अहो, आधुनिकतेची कास धरत मनसेने ती ब्लु प्रिंट, एक वेबसाइट काढून, ऑनलाईन करून, पब्लिक डोमेनमध्ये आणलीय.”, बारामतीकर.

“बरंsssबरंsss, म्हणजे आमच्या नमोंचाच आधुनिकतेची कास धरण्याचा कित्ता गिरवलाय म्हणा की तुमच्या राजने!”, चिंतोपंत उपहासाने.

“झालं, ह्यांचा संघीय बाणा आला लगेच बाहेर!”, इति बारामतीकर.

“बरं, राहिलं! काय म्हणतेय ती ब्लु प्रिंट ते तर सांगा…”, चिंतोपंत.

“काय सांगणार, नव्या बाटलीत जुनीच दारू, झालं!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“वाचलीय का तुम्ही ती ब्लु प्रिंटं?? की नेहमीचाच विरोधासाठी विरोध? ”, घारुअण्णा किंचित रागात.

“हो! वाचलीही आणि त्या वेबसाइटवरचा मुख्य पानावरचा व्हिडियोही पाहिलाय मी!”, भुजबळकाका शांतपणे.

“मग, काय म्हणताहेत नवनिर्माणकर्ते त्या व्हिडियोत?”, नारुतात्या.

“त्या व्हिडियोत जगाची, महाराष्ट्राची आणि मुंबईची विहंगम सफर घडवून आणलीय महाराष्ट्रीय जनतेचे प्रबोधन आणि पर्यायाने नवनिर्माण करण्यासाठी!”, बारामतीकर गालात हसत.

“म्हणजे इथेही उद्धवच्या विहंगम फोटोग्राफीशी स्पर्धा आहेच म्हणा की.”, नारुतात्या पांचट विनोद करत.

“थांबा हो नारुतात्या! बारामतीकर, नेमके आहे काय त्या व्हिडियोत असे?”, घारुअण्णा त्रस्त होत.

“वेब साइटीवर,‘महाराष्ट्राचा विकास आराखडा – होय, हे शक्य आहे’असा ओबामाचा‘येस, वी कॅन’हा कित्ता गिरवला आहे.”, बारामतीकर मिश्किल हसू चेहऱ्यावर आणत.

“अहो, त्या व्हिडियोत काय आहे ते सांगा ना पण…”, घारुअण्णा चिडून.

“विकासासाठी दूरदृष्टी हवी आणि दूरदृष्टीला सौदर्यदृष्टीची जोड हवी असं म्हणताहेत नव-प्रबोधनकार. परदेशातली उदाहरणं द्यायची गरज नाही अस म्हणत सगळी परदेशातलीच उदाहरण दिली आहेत. सुंदरता आणि रचनेवर भर द्यावा लागेल हा मुद्दा मांडताना ते जनतेने करायचे आहे असे म्हणत त्यात सरकारची जबाबदारी कमीत कमी असावी म्हणत धूर्तपणे जनतेलाच जबाबदार धरले आहे आणि जबाबदारी जनतेवरच टाकली आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!”, बारामतीकर.

“ते जाऊदे, ते नेहमीचेच आहे. पण मला एका कळत नाहीयेय, महाराष्ट्राचे जाऊ दे, मुंबईचेपण जाऊदे म्हणतो मी, जे काही सौंदर्यपूर्ण नवनिर्माण घडवायचे आहे, महाराष्ट्रभर, त्याची झलक नाशकात का नाही दिसली? आराखडा नाशकात का नाही इंप्लीमेंट करून दाखवला? जसे मोदींनी‘गुजरात मॉडेल’च्या बळावर स्वतःला सिद्ध केले तसे‘नाशिक मॉडेल’बनवून विकास आराखडा सिद्ध करायचा होता ना!”, भुजबळकाका नेहमीच्या घीरगंभीर आणि ठाम भूमिकेत जात.

“तोच तर कळीचा मुद्दा आहे ना भुजबळकाका! ते असो, मी तो व्हिडियो बघितला आणि विकास आराखडाही वाचला. एकदम राजीव गांधींची आठवण झाली!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा बुचकळ्यात पडत.

“राजीवजींच्या भाषणांमध्ये ‘हमें ये करना है’ हे पालुपद असायचे त्याची अंमळ आठवण झाली.”, सोकाजीनाना मंद हसत, “तर ते ही असो, आमच्या कॉर्पोरेट जगतात माझा साहेब मला नेहमी म्हणायचा ‘Don’t come to me with problems, I know them, come to me with 2-3 solutions or approaches. I’ll decide which is best for the situation looking at the big picture’. त्या साहेबाची आठवण ताजी झाली मला व्हिडियो बघताना. पुन्हा पुन्हा देशाची, महाराष्ट्राची कशी काँग्रेसने वाट लावली आहे आणि समस्या काय काय आहेत तेच पुन्हा पुन्हा सांगितले, पण ते कसे बदलणार ते मात्र गुलदस्त्यात राहते या व्हिडियोमध्ये. म्हणून मग आराखडा वाचला तर तिथे ‘हे करायला हवं, असं व्हायला हवं’ असं सगळं संदिग्धच. नेमके नवनिर्माण आणि विकास आराखडा म्हणजे काय हे ठाम आणि भरीव असे काहीच नाही. ज्या गोष्टी आधी केलेल्या आहेत आणि करणे शक्य आहे तिथेच फक्त ‘आम्ही हे करू किंवा केले जाईल’ असे ठामपणे म्हटले आहे, बाकीच्या ठिकाणी ‘असे असायला हवे, असे करायला हवे’ असे सगळं संदिग्ध आहे. त्यामुळे नेमके काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे हा विकास आराखडा, एकंदरीत आतापर्यंतच्या केल्या गेल्या भाषणांचे आणि मुद्द्यांचे सुसुत्रीकरण करून, एकत्रित बांधणी करून केले गेलेले डॉक्युमेंटेशन, एवढाच निष्कर्ष काढता येतोय!”

“ज्जे बात, सोकाजीनाना!”, भुजबळकाका जोषात येत.

“त्यामुळे, ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ असं भुजबळकाका म्हणाले तरी आपण मात्र चहाच मागवूयात, काय?”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

Mr. & Mrs. – एका नाटकाचा रियालीटी शो

(चित्र: आंतरजालावरून साभार)

काल बर्‍याच दिवसांनी मराठी नाटक बघण्याचा योग आला. नाटक बघण्यातली मजा, नशा काही औरच असते. पण ज्या प्रमाणात सिनेमे बघतो त्या प्रमाणात नाटके मी बघत नाही. त्याला कारण काही प्रमाणात नाटकेच कारणीभूत आहेत. विनोदाचा सरळधोपट फॉर्मुला वापरून आलेली बरीच नाटके बघून हिरमोड झाला असल्या कारणाने जेव्हा अर्धांगाचा फतवा निघाला, “बर्‍याच दिवसात नाटक बघितले नाही, ह्या आठवड्यात नाटकाला जाऊया.” आता ही विनंती नसून आज्ञा आहे हे इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर कळून चुकल्याने निमूटपणे, बघण्यासारखी काय काय नाटके चालू आहेत, ते बघायला बसलो (https://www.ticketees.com/). शक्यतो विनोदी नाटकांच्या वाट्याला जायचे नाही हे ठरवले होते. पण काही वेळ घालवावाच लागला नाही. ‘मिस्टर अॅन्ड मिसेस’ ह्या नाटकाचे पोस्टर बघितले आणि पोस्टर बघूनच नाटक फिक्स केले. मुख्य कारण म्हणजे मधुरा वेलणकर, माझा वीक पॉइंट. दुसरे कारण वेगळे आणि गूढतेचे वलय असलेले पोस्टर उत्सुकता चाळवून गेले. लगेच ऑनलाईन बुकिंग करून टाकले आणि बायकोला आश्चर्याचा धक्का देऊनच टाकला.

नाटकगृहात गेलो तर स्टेजवर दोन LCD मॉनिटर्सवर (डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक) नाटकांच्या जाहिराती चालू होत्या. मनात म्हटले, “च्यामारी, काळ बदलला! बालगंधर्वच्या प्रेक्षागृहात सर्वत्र कुबट वास पसरला आहे पण जाहिरातबाजीच्या शो साठी चक्क LCD मॉनिटर्स व्वा!” बायकोशी गप्पा मारता मारता सहज मागे बघितले तर अजून दोन दोन LCD मॉनिटर्स. जरा बुचकळ्यातच पडलो पण मनाशी म्हटले, “सोड LCD मॉनिटर्स, मधुरा वेलणकरला प्रत्यक्षात बघणार आहेस, कशी दिसेल प्रत्यक्षात ती?”

तिसरी घंटा झाली आणि पडदा वर गेला आणि एका 2 BHK फ्लॅटचा सेट समोर आला. अतिशय सुंदर नेपथ्याचे दर्शन झाले आणि मी नाटकात ओढला गेलो. दोन अंकी नाटकाच्या पहिल्या प्रवेशात पात्रांची ओळख होते. अमित जयंत (चिन्मय मांडलेकर) हा एक टेलिव्हिजनवरील एकेकाळचा स्टार आणि आता सध्या बेकार असून त्याची बायको मीरा (मधुरा वेलणकर) हीच्या बँकेतल्या नोकरीतल्या पैशावर जगतो आहे ही आणि सध्या त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे ही ओळख थोडी विनोदी, थोडी खटकेबाज संवादांनी होते. ही ओळख करून देताना, अमित आणि मीरा यांचा स्टेजवरचा वावर, 2 BHK फ्लॅट आणि त्याची रचना समजावून देण्यासाठी, अतिशय कल्पकतेने रचला आहे. दिग्दर्शकाला फुल्ल मार्क्स!

नवरा-बायकोच्या नात्यातल्या तणावावरचं नाटक आहे की काय ह्या विचाराने हैराण होत असतानाच नाटकात आश्विन (प्रियदर्शन जाधव) नावाच्या पात्राची एन्ट्री होते, एकदम हटके! आणि नाटकाला एक वेगळेच वळण लागून, एका धमाल नाट्याची सुरुवात होणार ह्याची झलक मिळते. हा आश्विन अमितच्या पहिल्या हिट दूरदर्शन मालिकेचा डायरेक्टर असतो. त्या मालिकेतून भरपूर पैसा मिळवून थायलंडला सेटल होऊन स्वतःचा व्यवसाय त्याने सुरू केलेला असतो. पण आता त्याला कंटाळून तो पुन्हा टीव्ही विश्वात दणकेबाज पुनरागमन करण्याचा विचारत असतो. अमित सध्या बेकार असल्याने, आश्विन पुन्हा लॉन्च करणार ह्या कल्पनेने त्याला अत्यानंद होतो आणि त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये तो काम करायची तयारी दर्शवतो.

आश्विन त्याचा गृहपाठ व्यवस्थित करून आलेला असतो. अमित आणि मीरा यांच्यातला तणाव त्याला पुरेपूर ठाऊक असतो. त्यांच्या भांडणातला वाद घटस्फोटाच्या निर्णयाला स्पर्शून आलेला आहे हे ही त्याला ठाऊक असते. तो अमितला एका अट घालतो की मीराला पुढचे काही महिने घटस्फोट द्यायचा नाही. ही अट मान्य असेल तर रोज दोन लाख रुपये ह्या दराने त्याला मालिकेत काम मिळणार असते. दोन महिने काम, 60 दिवसांचे रोज दोन लाख रुपये ही लालूच बेकार असलेल्या अमितला सगळ्या अटी मान्य करून घेण्यास भाग पाडतात कारण त्याच्या डोळ्यांपुढे हिरव्या नोटा नाचत असतात. आश्विन त्याची मालिकेची कल्पना मग त्याला समजावून सांगतो. तो एका रियालिटी शोचे प्लॅनिंग करत असतो. त्या शोची थीम असते ‘लाइव्ह घटस्फोट’. अमित नाहीतरी मीराला घटस्फोट देणारच असतो त्यामुळे तो लाइव्ह घेऊन, अमाप पैसा आणि हरवलेली प्रसिद्धी परत मिळवण्याची संधी ह्याची त्याला इतकी भुरळ पडली असते की तो सगळ्या अटी मान्य करतो आणि आश्विनच्या प्रोजेक्टला, अमितच्या घरात रियालीटी शोचे शुटींग करण्यास आणि मीराला रियालीटी शोमध्ये घटस्फोट देण्याला, मान्यता देतो. ‘लाइव्ह घटस्फोट’ ह्यावर विचार करायला भाग पाडून पहिला प्रवेश संपतो.

दुसरा प्रवेश चालू होतो तो बदललेल्या 2 BHK फ्लॅटच्या सेटवर. रियालिटी शोला साजेसे इंटीरियर केले गेलेले असते. सगळ्या घरात कॅमेरे बसवलेले असतात. अमितच्या कानात स्पीकर बसवलेला असतो ज्याच्यावरून त्याला शो चा डायरेक्टर आश्विन सूचना देणार असतो. कॅमेर्‍याचे टेस्टिंग सुरू होते आणि प्रेक्षागृहातल्या LCD मॉनिटर्सचे गुपित कळते. सेट वरच्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले कॅमेरे खरेखुरे असतात आणि त्यांचे प्रक्षेपण LCD मॉनिटर्सवर होत असते. नाटकात प्रेक्षकांना रियालिटी शोमधल्या कॅमेर्‍याच्या लाइव्ह फीडची अनुभूती देण्याचा अभिनव प्रकार नक्कीच कौतुकास्पद! त्या कॅमेर्‍याचा परिणामकारक वापर आणि LCD मॉनिटर्सवर वेगवेगळ्या अ‍ॅन्गल्समधली लाइव्ह फीड नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात.

दुसर्‍या प्रवेशापासून नाटक वेग आणि प्रेक्षकांची पकड घेत जाते ते थेट शेवटापर्यंत. नाटकाच्या रियालिटी शोमध्ये अमित आणि मीरा यांची कहाणी प्रेक्षकांना समजण्यासाठी, रियालिटी शोचे स्क्रिप्ट लेखक, अमित आणि मीरा यांच्यात त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच्या प्रसंग लिहून त्यांना शूट करण्याच्या आयडियाज अमलात आणत असतात. पुढे त्यांच्यात घटस्फोट होण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यासाठी रियालिटी शोचे स्क्रिप्ट अमितच्या आयुष्याचा ताबा घेते. पुढे तर त्यांच्या बेडरूममधल्या प्रायव्हसीचेही शूटिंग होतेय हे अमितच्या लक्षात येते आणि त्यातून अमितला त्याच्या चुका कळून येतात. तो पर्यंत तो पुन्हा मीराच्या प्रेमात पडलेला असतो.

पुढे नेमके काय होते? घटस्फोट होतो का आणि तो नेमका कसा होतो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी नाटक पाहणे मस्ट! हे नाटक त्यातल्या अभिनव प्रयोगामुळे ‘मस्ट वॉच’ कॅटेगरीत मोडते.

अभिनयात चिन्मय बाजी मारून जातो. 2 – 3 स्वगताचे मोठे मोठे सीन त्याला मिळाले आहेत, तो ते ताकदीने पेलवत त्यात कमाल करतो आणि अमितच्या पात्राला न्याय देतो. त्याने अमितच्या वेगवेगळ्या प्रसंगातल्या वेगवेगळ्या छटा अगदी व्यवस्थित दाखवल्या आहेत. मधुरा वेलणकर तिची भूमिका योग्य तर्‍हेने पार पाडते. तिला दिलेल्या वेषभूषा सुंदर, खास करून एक लाल ड्रेस, त्यात ती अतिशय सुंदर आणि मोहक दिसते. एकंदरीत ‘मिसेस अमित’ ह्या पात्राला चोख न्याय देते. प्रियदर्शन जाधव बहुतेकवेळा डायरेक्टरच्या बॅकग्राऊंड आवाजातून ऐकू येतो पण ज्या मोजक्या प्रसंगांत तो स्टेजवर येतो त्यात भाव खाऊनं जातो. त्याचा प्रभाव संपूर्ण नाटकभर जाणवत राहतो. बाकीच्या कलाकारांना फारच थोड्या वेळाकरिता भूमिका आहेत आणि ते त्या योग्य पार पाडतात.

नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना हा नाटकाचा हायलाइट. स्टेजचे स्पेस मॅनेजमेंट भन्नाट. किचन, डायनिंग, हॉल, बेडरूम, स्टोअर रूम आणि मुख्य एंट्रन्स हे सगळे मस्त आणि मुख्य म्हणजे एकदम ‘कंटेम्पररी’ लुक मध्ये बसवले आहे. नाटकातील पात्र घराच्या वेगवेगळ्या भागात असताना त्या त्या भागाला उठाव देणारी प्रकाश योजना नाटकाला एक ‘ग्लॉसी’ लुक देते.

प्रियदर्शन जाधव हा एक लेखक (टाईमपास सिनेमाचा संवाद लेखक) आणि मराठी कॉमेडी मालिकांमध्ये काम करणार एका विनोदी कलाकार एवढीच माझ्यासाठी होती. पण एक दिग्दर्शक आणि तोही ताकदीचा दिग्दर्शक ही ओळख ह्या नाटकातून माझ्यासाठी झाली. कमालीचे दिग्दर्शन केले आहे त्याने.

अस्लम परवेझ यांचे लेखन आणि नाटकाचा उभा केलेला प्लॉट एकदम अभिनव. पण शेवट जरा घाईत उरकल्यासारखा आणि पूर्ण नाटकाइतका परिणामकारक वाटत नाही. केलेला शेवट योग्यच पण काहीतरी कमी असल्याची जाणीव करून देत राहणारा.

एकंदरीत, नवीन अभिनव प्रयोग असलेले, एकदम चकाचक आणि ग्लॉसी, कंटेम्पररी लुक असलेले, मराठी नाटकात आधुनिक वारे आणणारे आणि रियालीटी शोजच्या समाजावर पडणार्‍या प्रभावाचे दर्शन घडवणारे हे नाटक एकदाच नव्हे तर दोनदा बघण्यासारखे आहे!

VoIP – म्हणजे काय रे भाऊ?

डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्‍याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती. त्याच सुमाराला सत्यम कंप्युटर्स ह्या कंपनीने खोज.कॉम आणि समाचार.कॉम ही संकेतस्थळं कोट्यावधी रुपयांना खरेदी केली आणि ते ऐकल्यावर माझी झोपच उडाली. डायलपॅड.कॉम सारखे मुंबईला फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे एक संकेतस्थळ चालू करायचे डोक्यात आले. लगेच ‘डायलमुंबई.कॉम’ हे डोमेन नेम सागर मेलवंकी ह्या मित्राच्या साथीने रजिस्टर केले. तुम्ही सोशल नेटवर्क हा सिनेमा पाहिला असेल तर त्यात जसे झुकरबर्ग आणि त्याचा मित्र फेसबुक स्थापन करतात अगदी सेम तसेच आम्ही डायलमुंबई.कॉम हे व्हेंचर चालू केले, मी CTO आणि तो CFO आणि COO.

त्यासाठी मग तांत्रिक संशोधन सुरू झाले. प्रोटो-टायपिंग सुरू झाले. सागर व्हेंचर कॅपिटलिस्ट शोधायच्या मोहिमेवर निघाला. पण पुढे ट्रायच्या (Telecom Regulatory Authority of India) आणि लालफितीच्या नियमांमुळे डिजीटल स्विचिंग खाजगीतत्वावर करण्याची परवानगी नाही असे कळले! हाय रे कर्मा, सगळे ओंफस झाले आणि जग आणखी एका वुड-बी झुकरबर्गसारख्या ‘यंग आंत्रेप्रेनॉर’ला मुकले. आमची ‘डायलमुंबई.कॉम’ कंपनी पुढे कोणीतरी कोट्यावधी रुपयांना विकत घेईल अशी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे मारणार्‍या आमच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

पण त्यावेळी केलेल्या तांत्रिक संशोधनामुळे VoIP ह्या तंत्रज्ञानाची ओळख झाली होती. परवा मुलाने, “बाबा, VoIP फोन म्हणजे काय?” हा प्रश्न विचारला आणि ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणांच्या जखमेवरची खपली निघाली आणि त्यातून भळभळणार्‍या दुःखाच्या भरात त्याला ते समजावून सांगितले. तर चला बघूया हे VoIP म्हणजे काय ते…

सॉकेट कनेक्शन (चित्र: आंतरजालावरून साभार)

VoIP म्हणजे Voice over Internet Protocol.

Internet Protocol म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी थोडे मागे जाऊयात. दोन संगणक एकमेकांना जोडून त्यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ‘सॉकेट’चा शोध लावला गेला. दोन्ही संगणकांवर एक एक सॉकेट ओपन करून त्या संगणकांना जोडणार्‍या केबलमधून माहिती पाठवणे शक्य झाले. पण ही माहिती कशी पाठवतात? तर ती पाठवण्यासाठी एक ‘प्रोटोकॉल’ पाळावा लागतो. तो प्रोटोकॉल म्हणजे नेमके काय? एकदम मजेशीर असते. समजा दोन ओळखीची माणसे भेटली आहेत.

माणूस एक: “नमस्कार!”
माणूस दोन: “नमस्कार!”
माणूस एक: “कसे काय ठीक?”
माणूस दोन: “ठीक, बाकी काय विशेष?”

हे संभाषण हा माणसांमधला शिष्टसंमत प्रोटोकॉल आहे. तसेच दोन संगणक माहिती पाठविताना प्रोटोकॉल पाळतात.

संगणक एक: “पिंग”
संगणक दोन: “पॉंग”
संगणक एक: “माहिती पाठवतो आहे पाठवू का?”
संगणक दोन: “ओके, पाठव”
संगणक एक: “तयार”
संगणक दोन: “ओके”
संगणक एक: “माहिती पाठवली”
संगणक दोन: “मिळाली”
संगणक एक: “माहिती ओके?”
संगणक दोन: “नाही, चेकसम एरर, परत पाठव”
संगणक एक: “ओके, पाठवली”
संगणक दोन: “ओके, मिळाली”
संगणक एक: “माहिती ओके?”
संगणक दोन: “हो!”

असा हा संवाद दोन संगणकांमध्ये सॉकेटमार्फत, ते सॉकेट जोडलेले असेपर्यंत निरंतर चालू असतो. त्या प्रोटोकॉलला ‘TCP’ – Transmission Control Protocol असे म्हणतात. ह्यामध्ये माहिती छोट्या छोट्या ‘डेटा पॅकेट्स’ मध्ये रूपांतरित करून तुकड्या तुकड्याने एका संगणकाकडून दुसर्‍या संगणकाकडे पाठवली जाते. पण संगणक इंटरनेटला कुठूनही जोडलेला असू शकतो म्हणजे जगाच्या पाठीवर कुठूनही. मग जगाच्या एका कोपर्‍यात असलेल्या संगणकापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी योग्य तो संगणक कसा शोधायचा ह्याचा प्रोटोकॉल म्हणजे Internet Protocol. वेगवेगळ्या इंटरनेट राउटर्स मधून योग्य तो IP Address असलेला संगणक शोधून डेटा पॅकेट्स त्याच्या पर्यंत पोहोचवण्याची तजवीज हा Internet Protocol करतो. अशा प्रकारे दोन संगणक TCP/IP ह्या Protocol मार्फत एकमेकांची संवाद साधत माहितीची देवाण-घेवाण करतात.

पण ह्या TCP मध्ये डेटा पॅकेट व्यवस्थित पोहोचले आहे की नाही ह्याचा पडताळा घेतला जातो आणि जर डेटा पॅकेट व्यवस्थित पोहोचले नसेल तर ते पुन्हा पाठवले जाते. जर आवाजाची डेटा पॅकेट्स पडताळली गेली तर बोलणे ‘रियल-टाइम’ राहणार नाही आणि सलग ऐकता येणार नाही. त्यामुळे हा TCP प्रोटोकॉल न वापरता ह्याच्या पेक्षा एक सोप्पा आणि लाइटवेट User Datagram Protocol वापरला जातो. हा लाइटवेट अशासाठी की ह्यात ‘error checking and correction’ होत नाही. त्यामुळे VoIP वरून केलेले संभाषण सलग ऐकता येते, पण कधी कधी नेटवर्क कंजेशन असेल तर तुटक ऐकू येते.

पारंपरिक टेलीफोन सर्विस, ‘सर्किट स्विचिंग’ ह्या तंत्रज्ञानावर आधारित असते. जेव्हा एखादा फोन केला जातो तेव्हा टेलेफोन ऑफिस मधून त्या दोन फोन्समध्ये कनेक्शन जोडून दिले जाते. हे जोडलेले कनेक्शन म्हणजे ‘सर्किट’. जो पर्यंत कॉल चालू असतो तोपर्यंत हे सर्किट जोडलेले असते. कॉल संपला की हे सर्किट ब्रेक होते. ह्या यंत्रणेला Public Switched Telephone Network (PSTN) म्हणतात. ह्या पद्धतीत सर्किट मधून वाहणारा डेटा हा ‘अ‍ॅनॅलॉग’ असतो. अ‍ॅनॅलॉग म्हणजे (ह्या लेखाच्या संदर्भात) सतत वाहणारा इलेक्ट्रिक प्रवाह. फोनमधल्या स्पीकरमध्ये बोलल्यावर कंपने तयार होतात, ती कंपने, जी इलेक्ट्रिक प्रवाहच्या माध्यमातून Public Switched Telephone Network ह्या सर्किटमधून पाठवली जातात, अ‍ॅनॅलॉग असतात.

बेसिक डेटा Internet Protocol च्या साहाय्याने कसा प्रवास करतो हे कळले. Public Switched Telephone Network मधून अ‍ॅनॅलॉग डेटा कसा पाठवला जातो हेही कळले. ह्या दोन्ही प्रकारांचा संगम म्हणजे Voice over Internet Protocol. आवाज (संभाषण), इंटरनेटच्या माध्यमातून प्रवाहित करणारे तंत्रज्ञान म्हणजे VoIP.

पण जर इंटरनेटच्या माध्यम वापरायचे असेल तर डेटा डिजीटल फॉर्म मध्ये पाहिजे, अ‍ॅनॅलॉग असून चालणार नाही. त्यासाठी अ‍ॅनॅलॉग डेटा ‘कोडेक (CODEC)’ वापरून डिजीटाइझ्ड केला जातो. हा डिजीटाइझ्ड केलेला आवाज ‘पॅकेट स्विचिंग’ च्या साहाय्याने Internet Protocol वापरून दुसर्‍या पार्टीपर्यंत पोहोचवला जातो. ही दुसरी पार्टी असू शकते.

    1. टेलिफोन

    2. संगणक

    3. VoIP फोन

अ‍ॅनॅलॉग टु डिजीटल (चित्र: आंतरजालावरून साभार)

डिजीटल टु अ‍ॅनॅलॉग (चित्र: आंतरजालावरून साभार)

VoIP साठी इंटरनेट हे माध्यम असल्यामुळे आणि डिजीटल डेटा संकीर्ण (Compress) करून पाठवता येतो. डेटा संकीर्ण असल्याने त्याच बॅन्डविड्थ मध्ये बर्‍याच कनेक्शनसाठी डेटा संक्रमित केला जाऊ शकतो. हा VoIP चा मुख्य फायदा. PSTN सर्किट मध्ये हे शक्य नसते.

VoIP तीन प्रकाराने वापरता येतो

1. Analog Telephone Adaptor (ATA): ह्यामध्ये टेलिफोन इंस्ट्रुमेंट आणि कनेक्शन पोर्ट ह्याच्यांमध्ये Analog Telephone Adaptor बसवला जातो जो अ‍ॅनॅलॉग डिजीटल कंव्हर्जन करतो. (हे भारतात शक्य नाही)

2. IP Phone: हा फोन दिसतो एकदम नॉर्मल फोन सारखा पण नॉर्मल फोनसारखे RJ-45 कनेक्शन न वापरता RJ-45 इथरनेट कनेक्शन वापरतो. त्यासाठी ह्या फोनला लागते LAN नेटवर्क किंवा WiFi नेटवर्क

3. संगणक ते संगणक: ह्यामध्ये संगणकामध्ये एक सॉफ्टवेयर स्थापित (Install) केले जाते. हे सॉफ़्टवेयर ATA आणि ‘कोडेक (CODEC)’ चे काम करून संगणकाला उपलब्ध असलेल्या नेटवर्कचा वापर करते. स्काइप, वायबर, मॅजिकजॅक अशी अनेक सॉफ्टवेयर्स उपलब्ध आहेत जी वापरून VoIP ची कमाल अनुभवू शकतो.

पण VoIP हे इंटरनेटवर अवलंबून असल्याने त्याचा प्रभावीपणा हा इंटरनेट बॅन्डविड्थवर अवलंबून असतो. ब्रॉडबँड सुविधा जर नसेल तर VoIP वापरून केलेले संभाषण 1940-50 च्या दशकातील सिनेमांच्या डायलॉग डिलिव्हरीसारखे एकदम संथ असू शकेल. तसेच इंटरनेट वापरासाठी लागणारा विद्युतपुरवठा जर व्यवस्थित नसेल तर हे तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकते. PSTN टेलिफोन सर्विसमध्ये फोनला विद्युतपुरवठा PSTN एक्सेंजकडून होतो, म्हणजे तुमच्या घरचा विद्युतपुरवठा बंद असला तरीही फोन चालू असतो. हे काही कळीचे मुद्दे सध्या VoIPच्या वापरावर मर्यादा आणतात.

थोड्याच काळात ह्यावर उपाय शोधले जाऊन ते तंत्रज्ञान क्रांती घडवून पारंपरिक PSTN टेलिफोन सर्विस मोडीत काढण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही VoIP वापरून संभाषण करत असाल आणि ते ठीक होत नसेल तर तंत्रज्ञानाला नावे ठेवण्याआधी त्यामागची यातायात समजून घ्या आणि मगच नावे ठेवा.

तर आता VoIP म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?