चावडीवरच्या गप्पा – AI / ML चा बागुलबुवा

chawadee

हा लेख मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या  श्रीगणेश लेखमाला २०१९ मधील ह्या लेखात पूर्वप्रकाशित!

चिंतामणी“सोशल मिडीयवर एक व्हिडीयो व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो लाखो नोकर्‍यांवर गदा येणार अस म्हटलय!” चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, ते ही एकदम सोशल मीडिया-बिडीया. हम्म, जोरात आहे गाडी!”, नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.

“नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो! “, घारुअण्णा तिरमिरीत.

“अहो चिंतोपंत, कसला व्हिडियो आणि काय आहे काय त्या व्हिडियोत एवढं व्हायरल होण्यासारखं?”, बारामतीकर.

“व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?”, नारुतात्या वेड पांघरत.

“नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे.”, चिंतोपंत.

“म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?”, बारामतीकर मोठा आ करत.

भुजबळकाका“बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी काम रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते! “, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“तितकं सोपं नाहीयेय ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत, खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही.”, चिंतोपंत.

“विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचे. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?”, घारुअण्णा घारुअण्णागरगरा डोळे फिरवत.

“घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं.”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनह्रदयसम्राट, असं कसं, चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडियोत काही तथ्य असेलच ना.”, घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.

चिंतोपंत“होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गुगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हे सुद्धा सांगतंय, आता बोला!”, चिंतोपंत.

“हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?”, घारुअण्णा चिंताग्रस्त होत.

“काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!”, इति बारामतीकर.

“अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसेच टेस्ट करण्यासाठी केला जातोय.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!”, घारुअण्णा बावचळून जात.

भुजबळकाका“अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्या पादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाईक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वातक्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसऍप्स म्हणजे फोटो प्रोसेस करणारी ऍप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत.”, भुजबळकाका समजावून सांगत…

“आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खुपसारा विदा (डेटा), अक्षरशः: टेराबाईट्समध्ये, पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार. “, इति भुजबळकाका.

“अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!”, नारुतात्या ‘आजी म्या ब्रह्म पाहिले’ असा चेहरा करत.

“हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

चिंतोपंत“अहो, पण अमेरिकेततर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. ऍमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्टकरून, मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून, आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवण पण करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!”, चिंतामणी चिंताग्रस्त होत.

“साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्‍यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला.”, भुजबळकाका.

“म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल तो तरून बारामतीकर
जाईला हा अवघड काळ, काय बरोबर ना?”, बारामतीकर विचार करत.

“बारामतीकर, ते खरंच हो पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असच राहूनराहून वाटतंय!”, साशंक चिंतोपंत.

“म्हणजे त्या इंग्रजी सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रीक्ससिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका? “, घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत.

“अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!”, भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत.

“आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही अस नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?”, नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना

“आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंग हे, काळाच्या ओघात होणार्‍या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावले आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला अजून बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचे आणि नोकर्‍यांचे नेमके काय आणि होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणे उचित ठरणार नाही. त्याची कास घरून पुढे जावेच लागेल. औद्योगिक क्रांती, इलेक्ट्रॉनिक्स आणि आलिकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगिकारावंच लागेल.

पण, ह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलीजंस मुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंग मुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या ‘जाणिवेत’ न राहता, आधिभौतिक तंत्रज्ञानच्या प्रगतीने येणार्‍या नेणीवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेच अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही ह्याची काळजी घेतली की झालं!”, सोकाजीनाना मंद हसत.

“पटतंय का? चला तर मग, आज चहा नको, बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी ते घ्या आणि तोंड गोड करा!”, सोकाजीनाना मिष्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचे ताट फिरवू लागले.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’ले सरकार

chawadee

“भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखला गेला की दिल्लीत! आप ने इतिहास घडवला.”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, अशा थाटात बोलताय की अश्वमेधच रोखला जणू!”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो नारूतात्या, अवघा भारत भगवा करण्याचा 56 इंची अश्वमेधच होता तो.”, बारामतीकर खोचकपणे.

“एका उथळ माणसाला आणि पर्यायाने उथळ पार्टीला निवडून देऊन अराजकाला आमंत्रण दिले आहे दिल्लीने.”, चिंतोपंत हताशपणे.

“तो शिंचा केजरी त्या अम्रीकेच्या CIA च्या ताटाखालचं मांजर आहे म्हणे!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“हो त्याच्या NGO ला मिळणारे फंडींग, त्याच्या परदेशवार्‍या तसे असण्याला दुजोराच देताहेत.”, इति चिंतोपंत.

“अहो हो ना, म्हणे भाजपावर वचक आणि कंट्रोल ठेवायला अम्रीकेने उभे केलेले बुजगावणे आहे ते, जसे त्या पाकड्यांच्या मलाला उभे केले होते तसे.”, घारुअण्णा घुश्शात.

“अहो घारुअण्णा, उगा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करू नका, शांतपणे बोला जरा.”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“हो ना, विषय काय नं हे बोल्तात काय? भाजपाचा सुपडा साफ झालाय त्याचे काय ते बोला ना.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! अहो पण भाजपाचा मतदार दूर गेलेला नाही. तो भाजपाच्या पाठीशीच आहे.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… मियाँ गीरे तो गीरे तंगडी उनकी उप्परच!”, नारूतात्या पुन्हा एकदा पांचट विनोद मारत.

“हो ना! अहो, दिल्लीत जेमतेम 3 जागांची बेगमी झालीय आणि कसला मतदार पाठीशी हो घारुअण्णा?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, भाजपाचा टक्का कमी झालाच नाहीयेय, काँग्रेसची सगळी मते आपला मिळाली आहेत आणि काँग्रेसचाच सुपडा साफ झाला आहे खरंतर.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, काँग्रेस संपतेय ते कसे काय बघवेल त्यांना.”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! इथे विषय दिल्ली निवडणूकीच्या निकालांचा चाललाय. काँग्रेस तशीही रिंगणात कधी नव्हतीच. दुहेरी लढतच होती ही.”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, आणि अरविंदला शह द्यायला त्याच्या एकेकाळच्या साथी, किरण बेदींना, रिंगणात आणायची चाल खेळून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती भाजपाने. पण ती गाजराची पुंगी होती ते आता कळतंय, आता पराभवाचे खापर त्यांच्या बोडक्यावर मारता येईल म्हणजे मोदींच्या जोधपुरीवर शिंतोडा नाही.”, बारामतीकर शांतपणे.

“मोठे मोठे नेते, खुद्द पंतप्रधान, दिल्लीत येऊन शक्तिप्रदर्शन करून दिल्ली काबीज करण्याच्या गर्जना करत होते.”, इति भुजबळकाका.

“पंतप्रधान? प्रधानसेवक म्हणायचंय का तुम्हाला?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“अहो ते तर दिल्ली पादाक्रांत केल्याच्या थाटात, दिल्लीतूनच नितीशकुमारांना आव्हान देत होते!”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, एक अराजक माजवणारा माणूस आणि त्याचा पक्ष, काश्मीरला स्वायत्तता द्या असे म्हणणारे त्याचे साथीदार हे दिल्लीचा, देशाच्या राजधानीचा, कारभार हाकणार हे पटतच नाहीयेय.”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“फुक्कट वीज, फुक्कट पाणी सगळा फुकट्या कारभार असणार आहे. काय आहे विश्वेश्वराच्या मनात ते त्या विश्वेश्वरासच ठाऊक! ”, घारुअण्णा तणतणत.

“कळकळ दिल्लीत अराजक माजणार त्याच्यामुळे आहे.”, चिंतोपंत.

“होय होय, भाजपा हरल्याचं दुःख नाही पण हा केजरीवाल सोकावतोय ना…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. हे असले कुडमुडे ‘आप’वादी राजकारणी कसं काय राज्य चालवणार?”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“आप किंवा केजरीवाल अ‍ॅन्ड कंपनी दिल्लीत निवडून आली, ती कशी? भरघोस मतदान होऊन! आता मतदान कोणी केले? दिल्लीकरांनी! जे तिथे राहताहेत त्यांनी त्यांच्या भल्यासाठी दिलेला कौल आहे तो. त्याच दिल्लीकरांनी लोकसभेसाठी भाजपाला कौल दिला होता, तो देश चालविण्यासाठी होता. आता स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या प्रश्नांची जाण असलेल्या लोकांना निवडून आणले आहे. परिपक्व लोकशाहीची जाण असल्याचा वस्तुपाठ आहे तो! आणि अराजक माजवलेच आपने तर जशी भाजपाची आणि काँग्रेसची गत आज केलीय तशी दिल्लीकर आपची करतीलच की! दिल्लीकरांनी विश्वास दाखवलाच आहे तर आपण ही 100 दिवस बघू की वारा कुठल्या दिशेला वाहतोय ते. त्यावरून 5 वर्षांत काय होईल याचा अंदाज येईल. आणि तसंही जादूची कांडी असल्यासारखे सगळे लगेच आलबेल होत नाही, लागायचा तो वेळ लागतो, हे मोदींनी केंद्रात दाखवून दिले आहेच!”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“तर, जे काय व्हायचे असेल ते होईलच! पण आता जरा ‘आप’चे कौतुक आणि अभिनंदन करा की 67/70 ही कामगिरी कौतुकास्पद आहेच. काय पटते आहे का? जाऊ द्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – अफझलखानाचे सै(दै)न्य

chawadee

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.

“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.

“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला? ”, घारुअण्णा बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे ओले करीत.

“अहो, म्हणून काय ह्या थराला जायचे? असे बोलायचे, तेही एकेकाळच्या मित्राला? ते ही चक्क उपरा असल्याच्या थाटात?”, इति चिंतोपंत.

“मित्रं??? असा पाठीत खंजीर खुपसणारा मित्रं?? शिरा पडो असल्या मित्राच्या तोंडात!”, घारुअण्णा गरगरा डोळे फिरवत.

“अहो घारुअण्णा, भावुक होऊ नका उगीच. शांतपणे विचार करा जरा. खरोखरीच ते वक्तव्य चुकीचे नव्हते का? अशी उपमा योग्य आहे का? कितीही मतभेद असले तरीही अफझल खानाचे सैन्य असे म्हणणे हे जरा अतीच होते बरं का!”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! युती तोडायचे पातक केलेन ते केलेन वरून मिज्जासी दाखवताय कोणाला? ते सहन करून घेतलेच जाणार नाही बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात! महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असा संदेश द्यायलाच हवा. शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनीही हेच केले असते.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी… बाळासाहेब असते तर युती तुटलीच नसती! कुठे ते हिंदूहृदयसम्राट आणि कुठे हे स्वहृदयसम्राट!”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“हो ना! अहो दिल्लीत सरकार आले ते ह्यांच्याच युतीमुळे असे समजून बेडकी फुगावी तसे फुगले हे उदबत्ती ठाकरे! उदबत्ती फटाका पेटवायच्या कामी येते पण तिच्यात स्वतःमध्ये कसलाही दम नसतो हे कळले असते तर असली बाष्कळ वक्तव्य करायची वेळ आली नसती त्याच्यावर.”, बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना, आणि ते ही डायरेक्ट मोदींवर हल्ला? स्वकर्तृत्वावर आणि हिकमतीवर बहुमत मिळवून मिळालेल्या एका पंतप्रधानावर? ”, बारामतीकर हसत.

“स्वकर्तृत्वावर? संघानं डोक्यावर घेतला आणि भाजपाने पैसा ओतला म्हणून हा शिंचा पंतप्रधान! त्यात पुन्हा ब्राह्मणही नाही, कसले स्वकर्तृत्व त्या शिंच्याचे?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! पुरोगामी महाराष्ट्रात आहात, असल्या जातीयवादी पिंका टाकवतात तरी कशा तुम्हाला!”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“अच्छा, म्हणजे मोदी ब्राम्हण नाही हे कारण आहे होय घारुअण्णांच्या मोदीद्वेषाचे? बरं बरं…”, नारुतात्या संधी अजिबात न सोडत खाष्टपणे.

“अहो विषय काय, चाललात कुठे? आमच्या साहेबांकडून धोरणीपणा शिकावा जरा उद्धवाने आणि तुम्हीही घारुअण्णा! कितीही कट्टर विरोधक समोर असला तरीही जिभेवर साखरच असणार साहेबांच्या!”, इति बारामतीकर.

“साखर तर असणारच, साखर कारखान्यांच्या सहकारातून ती तर फुकटच असेल नै?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“मला तर हा पवारांचाच काहीतरी कावा वाटतोय. तिकडे मोदींची दाढी कुरवाळताहेत आणि इकडे दोन्ही ठाकरे बंधूंना पण गूळ लावताहेत. कुछ तो गडबड है!”, चिंतोपंत.

“बारामतीकर, है कोई जवाब?”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, असे अफझलखानाची उपमा देणे शोभते का? अरे, अफझल खानाने केलेला हल्ला हा लूट करून शिवरायांसकट महाराष्ट्राला बुडवण्यासाठीचा होता. त्याचीशी तुलना करायचा विचार येऊच कसा शकतो? इतिहास माहिती असला अन पक्षाचे नाव शिवरायांच्या नावावरून असले म्हणजे असे काहीही निंद्य बोलायचा परवाना मिळतो का? इतकी वर्षे सोबत मिळून सत्ता उपभोगली आणि आता तोच हिंदुत्ववादी मित्र अचानक अफझलखानाच्या पातळीवरचा होतो? अजब आहे? अकलेची दिवाळखोरी नाहीतर काय हे?”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“ऐतिहासिक दाखले देऊन जनतेला इतिहासातच रमवत ठेवण्याची ही जुनीच चाल आहे शिवसेनेची आणि एकंदरीतच राजकारण्यांची!”, बारामातीकर.

“हा मुद्दा पटण्यासारखा आहे!”, भुजबळकाका.

“मुद्दा तुम्हाला पटेलच हो! हा घारुअण्णा काहीही म्हणाला तरी त्याची फिकीर इथे आहे कुणाला? आज बाळासाहेब असते तर हे दिवस दिसले नसते! ”, घारुअण्णा उद्वेगाने.

“होय! घारुअण्णा तुम्ही म्हणताय ते खरेच आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, चिंतोपंत एकदम चमकून.

“हो, आज केलेले घूमजाव बघितले का? म्हणे मी टोपी फेकली पण त्यात तुम्ही डोके का घातले? ते ही त्या विधानावर भाजपाकडून कडाडून प्रत्युत्तर आल्यावर लगेच! अरे जनतेला टोप्या घालायचे आतातरी बंद करा!”, सोकाजीनाना कठोर बोलत, “अहो, शिवसेनाप्रमुख जेव्हा काही विधानं करीत तेव्हा ते आपल्या मतांवर ठाम असायचे मग ते मत चूक असो की बरोबर. शिवसैनिक कधीच संभ्रमात असायचा नाही. भूमिका ठाम, पक्की आणि रोखठोक असायची. त्यांना अशी सारवासारव करायची बहुदा गरजच पडत नसे! धाकली पाती उगाच आव आणून बाळासाहेबांचा तोरा आणण्याचा प्रयत्न करते आहे पण ते जमत नाहीयेय.

‘शिवसेनाप्रमुखपद’ हे शिवधनुष्य आहे आणि ते पेलविण्याची ताकद उद्धवाकडे नाही हेच युती तुटल्यावर सिद्ध झाले. मारे बाळासाहेबांचा आव आणाल, पण मुत्सद्दीपणा कुठून आणाल? बरं, ते विधान केले ते केले पण अफझल खान दिल्लीचा सरदार नव्हता, तो दक्षिणेकडून महाराजांवर आणि महाराष्ट्रावर चाल करून आला होता हा साधा इतिहास माहिती असू नये? त्याचे तारतम्य न बाळगता बेजबाबदार विधाने करणे हा भलताच मूर्खपणा आहे!

तर ते एक असो, निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात.”

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – मोदी विरुद्ध राहुल गांधी (दिवाळी धमाका)

(मिसळपाव.कॉम दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित)

chawadee

“काय हो, कर्तृत्व काय ह्या शिंच्याचे? त्या नेहरू घराण्याची सून असलेल्या इटालियन बाईच्या पोटी जन्म घेतला, एवढेच ना?” घारुअण्णा चकलीचा तुकडा काडकन तोडत, दिवाळीच्या फराळासाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“कोणाबद्दल बोलताय घारुअण्णा, आज कोणाची कंबख्ती?” नारुतात्या चिवड्याचे ताट ओढत आणि चेहऱ्यावर हसू आणत.

“तुमच्या त्या ‘राउल’ ऊर्फ पप्पूबद्दल बोलतोय मी, का उगाच वेड पांघरताय ह्या दिवाळीच्या मंगलमय सकाळी?” घारुअण्णा चकली ताटात टाकत, भयंकर उद्विग्न होत.

“घारुअण्णा, त्यात त्याचे कसले आलेय कर्तृत्व? ते कर्तृत्व राजीवचे! खी खी खी…”, नारुतात्या चिवड्याचा बकाणा भरत आणि पांचट विनोद करत.

“नारुतात्या, कसले शिंचे पुचाट विनोद करतांय सकाळी सकाळी? मी सीरियसली बोलतोय!” घारुअण्णा करारी चेहरा करून.

बारामतीकर“अहो घारुअण्णा! नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?” बारामतीकर.

“बारामतीकर, ह्याची लायकी काय हो? आपल्या ह्या ‘आर्य सनातनी आसेतुहिमाचल भारतवर्षा’चे नेतृत्व करण्यासाठी आणि करोडो जनतेची धुरा वाहण्यासाठी आयात केलेले शिलेदार, सेनापती का लागावेत तुम्हाला?”, घारुअण्णा कसल्याश्या आवेशात.

“ह्म्म्म… तुम्हालाsss”, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“नाहीतर काय? आमचे मोदी बघा, असे ह्या अस्सल हिंदुस्तानच्या मातीतून तळपत पुढे आलेले अस्सल स्वदेशी आणि करारी नेतृत्व!”, चिंतोपंत घारुअण्णांच्या खांद्याला खांदा देत.

“घारुअण्णा, तुमची देशाबद्दलची व्याख्या अतिशय जातीयवादी आणि जनमानसाचे ध्रुवीकरण करणारी आहे, असे नाही वाटत तुम्हाला?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा तुकडा मोडत.

“वाटलेच मला, अजून कसे ह्यांनी ह्यांचे सेक्युलर तोंड उघडले नाहीं ते!” घारुअण्णा तिरीमिरीत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, देशाची व्याख्या राहू द्या तात्पुरती बाजूला. पण मला सांगा, ह्या काँग्रेसकडे, नेहरू घराण्याच्या ह्या लाडावलेल्या नातवाशिवाय दुसरे कोणते कणखर नेतृत्व नाही?” चिंतोपंत.

“नाहीतर काय, शिंचा युवराज म्हणे!” घारुअण्णा रागाने धुसफुसत.

“काय हो, काय प्रॉब्लेम काय तुमचा? उमदे आणि सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व आहे की राहुल!” इति बारामतीकर.

भुजबळकाका“हो, आणि नेमके तेच कारण सांगत संघश्रेष्ठींनी अडवाणींच्या गुडघ्याचे बाशिंग काढून घेतले ना?” इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका, खमंग अनारशाचा दुसरा तुकडा मोडत.

“अहो, देशात अतिरेकी कारवाया होत असताना हे तुमचे सळसळत्या रक्ताचे तरुण नेतृत्व परदेशात काय गुण उधळत होते, ते माहीत आहे आम्हाला!” घारुअण्णा रागाने चकलीचा चुरा करत.

“अहो, त्याने CII Industrial Meet मध्ये तोडलेले अकलेचे तारे आम्ही ऐकले आणि पाहिलेसुद्धा. काय म्हणे भारत मधमाशीचे पोळे आहे, भारतीय ट्रेन्समध्ये लोक नाही तर आयडियाज प्रवास करतात. पायलट ट्रेनिंगमध्ये म्हणे आउटडेटेड सिलॅबस शिकवला जातो. नॉन्सेन्स!” चिंतोपंत करंजी मोडत.

“अहो चिंतोपंत, फक्त पायलट ट्रेनिंग नव्हे, पूर्ण शिक्षणपद्धतीचा बोर्‍या वाजलाय म्हणे. हा सुकळीचा म्हणे अमेरिकेत आणि केंब्रिजमध्ये शिकून सुशिक्षित झालाय! अरे, शिरा पडो तुझ्या तोंडात, शिंच्या, आमच्या भारतीय शिक्षण परंपरेला नावे ठेवतोय काय रे नापास गाडग्या!” घारुअण्णा रागाने अजून एका चकलीचा चुरा करत.

“अहो घारुअण्णा, कुठे भरकटत चालला आहात. मुद्द्याला धरून राहा. जनमताचे ध्रुवीकरण करणार्‍या जातीयवादी आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या नेतृत्वापेक्षा हे सर्वसमावेशक सेक्युलर नेतृत्वच भारताचे भले करेल!” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडूचा घास घेत.

चिंतोपंत“बहुजनसम्राट, शब्द मागे घ्या! फॅसिस्ट काय, जातीयवादी काय? काहीही बोलाल काय? अहो, गुजराथचा झालेला कायापालट बघितला आहात काय? मोदी फॅसिस्ट आणि जातीयवादी असते तर गुजराथच्या जनतेने त्यांना निवडून दिले असते काय? गुजराथच्या जनतेचा सार्थ विश्वास आहे मोदींच्या कणखर नेतृत्वावर. गुजरातच्या विकासाचे व्यवस्थित पॅकेजिंग आणि मार्केटिंग करून गुंतवणुकीचा ओघ त्यांनी गुजराथेत वळवला आहे. आता हाच ‘गुजराथ पॅटर्न’ भारतभर राबविण्याची गरज आहे. विकास आराखड्याची गरज आहे आज भारताला. पण त्यासाठी सार्थ पुरोगामी वैचारिक बैठक असलेल्या नेतृत्वाची आज निकड आहे आणि नरेंद्र मोदी हाच सार्थ पर्याय आहे आणि ती काळाची गरजही आहे!” चिंतोपंत ठामपणे रव्याचा लाडू तोडत.

“अहो, गुजराथबाहेर ह्या मोदींना कोणी ओळखते का? राहुलचा दिल्लीपासून पार केरळपर्यंत जनमानसावर पगडा आहे. अखंड भारत त्याला आज ओळखतो आणि त्याला पंतप्रधानाच्या रूपात पाहतो आहे. तुमच्या भाजपात तरी एकवाक्यता आहे का? तिथेही तंगडीखेच चालू आहेच. नुसता विकास आराखडा नको आहे, तो सर्वसमावेशक हवा आणि तळागाळातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हवा.” भुजबळकाका शांतपणे बेसनलाडू संपवत.

घारुअण्णा“अरे, पण ह्या नेहरू कुटुंबाच्या घराणेशाहीने राष्ट्राची वाट लागते आहे ना! मागच्या साठ-पासष्ट वर्षात देशाचा नुसता रौरवनरक करून टाकला आहे ह्यांनी. अराजक माजले आहे नुसते अराजक, त्यात आता हे युवराज, पप्पू कुठचा. काही नाही, हे थांबले पाहिजे आणि त्यासाठी मोदींना पर्याय नाही.” घारुअण्णा उद्विग्नतेने आता बेसनलाडूचा चुरा करत.

“काय हो, ७७मध्ये ही घराणेशाही मोडून काढली होती ना? काय झाले त्याचे? जनसंघाचे किती तुकडे झाले?” नारुतात्या आता चकलीवर ताव मारत.

“अहो, त्या वेळी नाही जमले, पण अटलबिहारींच्या राज्यात सर्व काही आलबेल केले होते की नाही? ‘फील गुड फॅक्टर’ कसा होता तेव्हा? होती का ही असली जीवघेणी महागाई?” चिंतोपंत शांतपणे फराळ संपवून हात झटकत.

“होsss? मग का नाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं? का तशी सुज्ञ जनता फक्त गुजराथेतच आहे?”, बारामतीकर मिश्कीलपणे शंकरपाळी चघळत.

“अहो चावडीकर, जरा माझे ऐकता शांतपणे सर्व जण? का उगा एवढे वातावरण तापवत आहात? आणि काय ह्या शाब्दिक आणि वैचारिक फटाक्यांच्या माळा? दिवाळीची एक सकाळ जरा शांत घालवा, फराळ संपवा!” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्हीच बघा बुवा काय ते आता.” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना“अहो, हा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा पोकळ बुडबुडा ह्या दोन्ही पक्षाच्या थिंक टॅन्कने, मीडियाला हाताशी धरून, हवा देऊन फुगवला आहे. अहो, गाजराची पुंगी आहे ही दोन्ही पक्षांसाठी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, काय? त्यात तुमच्यासारखे अनुयायी आहेतच त्या बुडबुड्याला अजून हवा द्यायला. निवडणुकीआधी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा किंवा तसे संकेत द्यावेत, असे पक्षावर कोणतेही बंधन नसते. ही फक्त संभाव्य मतदारांना दाखवलेली लालूच असते. अहो, निवडणुकीत जिंकेल जो जिंकायचाय तो. तुम्ही का आपापसात लढताय फुकाचे? तुमच्या मतदारसंघात कोणी लायक उमेदवार उभा केला आहे का, ते बघा. नसला तर आता सरकार तसे कळवायची सोय करतेय म्हणे, त्याचा वापर करा. त्याचा प्रभावी वापर केलात तर मोदी आणि राहुल दोघेही सोडा – कोणीच पंतप्रधान होऊ शकणार नाही. काय, पटतंय का?” सोकाजीनाना मंद हसत.

“चला, आज चहा नको. दिवाळीच्या मुहूर्तावर बायकोने बासुंदी करून दिली आहे सर्वांसाठी, ती घ्या आणि तोंड गोड करा!” सोकाजीनाना मिश्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या बासुंदीच्या वाट्या भरू लागले.

चावडीवरच्या गप्पा – ‘आप’आपली मते

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग…बरं… बरं… काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी! विशेष म्हणजे तुमच्या त्या केजरीवालांचेही पितळ उघडे केले आहे?”, बारामतीकर अभिमानाने.

“ह्म्म्म, आमचे केजरीवाल!”, (आमचे वर जोर देत) नारुतात्या.

“दिल्लीकरांनी अजून पाच सहा जागा देऊन आम आदमी  पक्षाला सरकार बनविण्याची संधी द्यायला हवी होती म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असते असे साहेब म्हणाले, परखडपणे”, बारामतीकर.

“अहो, पवार बोलणारच! त्यांच्या ‘कांद्याचे भाव’  ह्या वर्मावर केजरीवालांनी ‘कांद्यांचे भाव निम्मे करून दाखवू’ असे म्हणत बोट ठेवले होते ना!”, इति चिंतोपंत.

“अहो शेती आणि शेतीची जाण हाच तर साहेबांचा हुकुमाचा एक्का आहे! त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की  या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात  हेच वास्तव आहे.”, बारामतीकर एकदम भावुक होत.

“कसला शिंचा हुकुमाचा एक्का आणि कसली शिंची ती जाण! अहो ह्या कृषिप्रधान देशाच्या शेतीचा पार चुथडा केला आहे ह्या कृषिमंत्र्याने.”, घारुअण्णा लालबुंद होत.

“घारुअण्णा उगाच काहीही बरळू नका, तुम्हाला काय कळते हो शेतीतले?”, शामराव बारामतीकर घुश्शात.

“नसेल मला शेतीतले काही कळत, पण तुमचे सो कॉल्ड साहेब काय करताहेत ते मात्र कळते आहे बरं! भारी शेतकर्‍यांतचा पुळका त्यांना! अहो आपल्या पुण्यातलीच किती एकर लागवडीखालची जागा ‘डेव्हलपमेंट’च्या नावाखाली बरबाद केली? आणि त्यातून कोणाची ‘डेव्हलपमेंट’ झाली हे ही कळते हो! असे केल्यावर कसे वाढणार उत्पन्न आणि कशा होणार किमती कमी?”, घारुअण्णा रागाने.

“अरे पवार काय म्हणाले आणि तुम्ही कुठे चाललात! पवारांनी एकंदरीत आढावा घेतला आहे निवडणूक निकालांचा. सर्वांनाच कानपिचक्या दिल्या आहेत त्यांनी!”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“धन्यवाद बहुजनहृदयसम्राट, नेमके हेच म्हणायचे होते मला.”, बारामतीकर हसत.

“पण साहेबांनी केजरीवालांवर केलेला हल्ला जरा अतीच होता. दिल्ली निकालानंतर तर काय सगळेच केजरीवालांचे भविष्य आपल्यालाच कळल्याच्या थाटात मते सांडत सुटले आहेत? ”, इति भुजबळकाका.

“म्हणजे? स्पष्ट बोला असे मोघम नको.”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, लोकसत्तेच्या अग्रलेखात माननीय संपादकांनी काय तारे तोडलेत ते वाचले नाहीत का?”, भुजबळकाका.

“नाही ब्वॉ, काय म्हणतोय लोकसत्तेचा अग्रलेख?”, इति घारूअण्णा.

“ज्या क्षणी ‘आम आदमी पक्ष’ आपली राजकीय भूमिका स्पष्ट करेल तो क्षण आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात असेल असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“आम आदमी पक्ष वा त्या पक्षाचे रोमॅंटिक समर्थक यांनी हुरळून न जाणे बरे असा फुकटचा न मागितलेला सल्ला ही दिला आहे बरं का!”, चिंतोपंत.

“च्यामारी, त्या बिचार्‍या केरजीवालाचे यश कोणालाच बघवेनासे झालेले दिसतेय!”, नारुतात्या जोरात हसत.

“हो ना, अण्णांनी पण मौन सोडलेले दिसतेय. अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाचा प्रचार दिल्लीतल्या घरा-घरात झाला असे आता अण्णा म्हणताहेत.”, चिंतोपंत.

“पण हेच अण्णा केजरीवालांची खिल्ली उडवत होते ना पक्ष स्थापनेनंतर?”, नारुतात्या.

“अहो, केजरीवालांचे यश बघून त्यांचे संतपण ही गळून पडलेले दिसतेय, परत उपोषणाची घोषणा केली आहे त्यांनी! किती ती शिंची अॅलर्जी म्हणावी, खीsssखीsssखीsss”, घारुअण्णा खो खो हसत.

“त्या किरण बेदीही निवडणूक प्रचाराच्या वेळी कुठेही नव्हत्या, पण निकालानंतर मात्र एकदम आप आणि भाजपा यांच्यात समेट करायला रिंगणात!”, चिंतोपंत.

“अहो भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच! दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुका होतात की नाही बघा! साहेबांचेही खाजगीतले हेच मत आहे.”, बारामतीकर.

“त्याचा फायदा भाजपालाच होईल, केजरीवालांना काही फायदा होईलसे वाटत नाही.”, चिंतोपंत.

“काहीही असो, पण केजरीवालांनी मिळवलेल्या यशाने बहुतेकांना अनपेक्षिततेचा धक्का जरा जास्तच बसलेला दिसतोय!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो केजरीवालांना कोणी खिजगणतीतच धरले नव्हते! काँग्रेस राहुल गांधी आणि भाजपा नरेंद्र मोदी यांच्याच नादात होते. केजरीवाल एकदम 28 जागांवर कब्जा मिळवतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. त्यामुळे हा धक्काच आहे सर्वांसाठी!”, सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, खरे आहे तुमचे?”, नारुतात्या.

“सद्य राजकीय अनागोंदीच्या आणि भ्रष्ट सरकारी पार्श्वभूमीवर हा निकाल पॉझिटिव्ह आणि प्रॉमिसिंग ठरावा. अण्णांच्या आंदोलनाने जन-जागृती झाली होती पण त्या जन-आंदोलनात भरीव काहीही नव्हते. त्यावेळी झालेल्या जन-आंदोलनाने समजा जर क्रांती होऊन सत्ताधार्‍यांना सत्तेवरून हाकलून लावले असते, ट्युनेशिया क्रांतीसारखे, तर पर्यायी सरकारची व्यवस्था काय होती अण्णांकडे? नुसते जनलोकपाल बील पास करून घेण्यासाठीच झालेल्या जन-जागृतीचा आणि जन-आंदोलनाचा भर ताबडतोब विरून गेला कारण ठोस अजेंडाच काही नव्हता. व्यवस्थेला बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग असणे गरजेचे असते, केजरीवालांनी नेमके हेच जाणून घेतले आणि आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यावेळी अण्णांची त्यातून माघार घेतली खरी पण आता त्यांचीही गोची झालेली दिसतेय कारण केलरीवालांचे हे यश कोणालाच अपेक्षित नव्हते.

सद्य स्थितीत, कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष सत्तेवर येण्यापेक्षा एका नवीन, फ्रेश पर्यायाची भारताला गरज आहे. ‘आप’च्या रूपात केजरीवालांनी तो पर्याय दाखवला आहे आणि दिल्लीतील त्यांच्या विजयाने जनतेने त्या पर्यायाला स्वीकारलेले दिसते आहे. आता केजरीवाल आणि त्यांचे आमदार कसे आहेत ते लवकर कळेलच. त्यामुळे दिल्ली हा ‘आप’ची धोरणे समजून घेण्यासाठी उपलब्ध झालेला एक प्लॅटफॉर्म ठरावा. एवढ्यातच कुठल्याही निष्कर्षावर पोहोचणे हे जरा आततायी होईल. सो, वेट अॅन्ड वॉच!”, सोकाजीनाना मंद हसत.

“काय पटते आहे का? जाऊद्या चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

chawadee

“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात.

“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय? झाली का नोंदणी करून?”, इति भुजबळकाका.

“कसली नोंदणी आणि कसले काय? फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने? पैसे कमावायचे धंदे सगळे!”, घारुअण्णा तणतणत.

“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय? बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा? अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते!”, इति नारुतात्या.

“नारुतात्या, भोचकपणा सोडा! काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची? इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने? दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने? ऑ?”, घारुअण्णा तावातावाने.

“हो ना! माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय?”, चिंतोपंत.

“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना? मग झाले तर!”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प!”, घारुअण्णा वैतागून.

“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय?”, बारामतीकर जरा खट्टू होत.

“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले? निराधार कार्डच झाले की!”, चिंतोपंत.

“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग? हे परत कशाला आणखीनं?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.

“बरं! मग मतदान ओळखपत्र आहे ना! मग हे नवीन खूळ कशाला?”, घारूअण्णा परत तावातावाने.

“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा ‘यूनिक नंबर’ तुम्हाला देते”, भुजबळकाका.

“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्‍या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.

“हॅ, मग त्यात काय एवढे? माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.

“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.

“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.

“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग!”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.

“भले शाबास! सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल!”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.

“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का?” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी? भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्याने काय झाले असते?”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.

“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का?’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.

“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.

“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का? चला, चहा मागवा! आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.

गोंय (गोवा) – पाटणें बीच – २

गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ! …….

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर जाग आली ती रिसोर्टमधील झाडांवर गुंजारव करणार्‍या पक्षांच्या किलबिलाटाने. त्या दिवशी धाकट्याचा वाढदिवस होता. मग तो झोपलेला असतानाच त्याच्यासाठी केक आणायला मोठ्या मुलाला घेऊन बाहेर पडलो. रिसेप्शनवर केक कुठे मिळेल त्याची चौकशी केली आणि २-३ किमीवर असलेल्या एका गावात मॉंजिनीज आहे असे कळले. आनंदाने तिकडे निघालो. त्या गावात पोहोचल्यावर त्या गावाचे नाव कळले आणि आनंद द्विगुणित झाला. त्या गावाचे नाव होते चावडी. मुलाने त्या गावाचे नाव असलेला रिक्षा स्टॅंड आणि त्याच्याजवळचा झाडाचा पार बघितला आणि तोही अनपेक्षित आनंदाने ओरडला, “बाबा तुमच्या सोकाजीनानांची चावडी! बघा सोकाजीनाना कुठे दिसताहेत का ते!!”. मीही मिशीतल्या मिशीत हसत त्याच्याकडे बघितले कारण त्याच्या त्या आनंदी उद्गारांनी मलाही खूप आनंद झाला होता.

केक घेऊन घरी आलो. मुलगा झोपलेलाच होता. बायकोने त्याच्यासाठी आणलेली गिफ्ट्स त्याच्या डोक्याशी ठेवली होती. त्याला उठवल्यावर, त्याने ती गिफ्ट्स बघितली आणि त्याच्या चेहेर्‍या वरचा त्या वेळेचा आनंद अमूल्य होता. त्याची तयारी झाल्यावर केक कापून कपडे घेऊन किनार्‍याकडे कूच केले.

बीचवरच्या शॅकची कापडी छत्री असलेल्या दोन खुर्च्या पकडून सामान ठेवले. बियरची ऑर्डर सोडली, तोपर्यंत मुलांनी कपडे काढून समुद्राच्या पाण्याकडे धूम ठोकली होती. मीही मग त्यांच्या बाललीला बघत बियरचे घोट घेत घेत, कपडे काढून समुद्राला आलिंगन द्यायला निघालो. रविवार असूनही समुद्रकिनारा बराचसा निर्मनुष्य होता. अगदी मोजकीच माणसे आजूबाजूला होती. अगदी मनसोक्त, कंटाळा येईपर्यंत समुद्राच्या लाटांबरोबर दंगामस्ती केली. मध्येच थोड्या-थोड्या वेळाने खुर्च्यांकडे जाऊन बियरचे सीप घेत उन्हात पडायचे, अंग तापले (उन्हाने) की परत थंडगार आणि निळ्याशार पाण्यात जाऊन डुंबायचे हा क्रम थकवा येईपर्यंत आणि पोटात कावळे ओरडायला लागे पर्यंत चालू होता. मुलांना तर पाण्यातून बाहेरच पडायचे नव्हते. शेवटी त्यांना भुकेची जाणीव होईपर्यंत आणि माझ्या जाणिवा बधिर होईपर्यंत बियर ढोसत, छत्रीखालच्या खुर्चीत आरामात पायावर पाय टाकून, गोव्याचा सगळा सुस्तावा अंगात भरून घेत, बायकोशी गप्पा मारत बसलो. स्वर्गीय सुख म्हणतात ना ते हेच असावे किंबहुना माझी त्या स्वर्गीय सुखाची हीच व्याख्या आहे असे म्हणा ना!

मुलांचे खेळून झाल्यावर त्या शॅकच्या बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेऊन फ्रेश होऊन जेवणाची ऑर्डर द्यायचे बघायला लागलो. त्या शॅकवर ओपन किचन होते आणि समोर मासे ठेवलेले होते. मासा सिलेक्ट करायचा, रेसिपी सांगायची की समोरचा बल्लवाचार्य ती डिश आपल्या टेबलावर हजर करणार असला मामला होता. कसला राजेशाही थाट! बल्लवाचार्याला जेवणाची ऑर्डर दिली आणि वेटरला, थांब म्हणेपर्यंत नॉन-स्टॉप बियर आणत राहायची ऑर्डर दिली (इथून पुढे, परत जाईपर्यंत, बियरची मोजदाद करायचे सोडून दिले). मस्त फिश फ्राय आणि बरेच काही पदार्थ पुढ्यात आले आणि पोटाला तड लागेपर्यंत हादडणी सुरू होती. जेवण झाल्यावर मुले वाळूत खेळायला निघून गेली. शॅकमधली सर्व माणसे जेवून निघून गेली होती; काही सूर्यस्नान करत समोरच्या वाळून पडून होती. शॅकमध्ये मी आणि माझी बायकोच उरलो होतो, अर्थात बियर होतीच साथीला. मग त्या एकांताचा फायदा उठवून (चावट! कसलेही भलते विचार मनात आणू नका) बायकोचा हात हातात घेऊन गुजगोष्टी करत बसलो. बियरने चित्तवृत्ती प्रफुल्ल आणि तरल झाल्या होत्या. बर्‍याच गोष्टी ज्या जनरली आपण बोलत नाही त्या बोलायला त्याने मजा येत होती, एकदम उन्मुक्त होऊन. हीच ती सुरुवातीला म्हटलेली गोव्याची झिंग आणि कैफ.

साधारण 3-4 वाजता रिसॉर्टवर जाऊन सामान ठेवून, थोडा आराम करून परत सूर्यास्ताच्यावेळी बीच वर गेलो. अनवाणी पायांनी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने, बायकोच्या हातात हात गुंफून संपूर्ण किनार्‍याचा फेरफटका मारायला सुरुवात केली. एक दोन तास त्या फिरण्यात कसे गेले ते कळलेच नाही. मुलं समजूतदारपणे, शॅकजवळ वाळूत किल्ले आणि त्याच्या भोवताली तटबंदी करण्यात मशगुल होऊन गेली होती. मग गाडी काढली आणि पाळोळें बीच बघायला निघालो.

ह्या बीचवर बर्‍यापैकी गर्दी होती. दुकानांची गर्दीही जास्त होती. तिथल्या बाजारात फेरफटका मारला. मुलांनी काहीबाही खरेदी केली. पाळोळेंचा समुद्रकिनाराही छानच होता पण त्याला पाटणेंची सर नव्हती. कदाचित फार गर्दी असल्यामुळे असेल. अंधार दाटून यायला लागला तसा परत रिसॉर्टवर परत आलो. रात्री रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमधले कॉंटिनेंटल जेवण हादडायचे हे मुलांनी ठरवून ठेवले होते. त्यानुसार ते जेवण मी बियरच्या साथीने आणि मुलांनी व बायकोने मॉकटेल्सच्या साथीनं रिचवून एका आनंदाने आणि तृप्तीने भरलेल्या दिवसाची अखेर केली.

दुसर्‍या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत तोच कार्यक्रम रिपीट केला. त्याच कैफात आणि मस्तीत. माझा एक गोवाप्रेमी मित्र, नचिकेत गद्रेने, कोळवा बीचजवळ ‘फिशरमन्स वार्फ’ नावाचे एक भन्नाट हॉटेल आहे आणि ते ‘मस्ट गो’ आहे असे सांगितले होते. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी दुपारी थोडा आराम करून कोळवा (Colva Beach) बीचकडे प्रयाण केले. कोळवा बीचला पोहोचल्या पोहोचल्या भ्रमनिरास झाला. भयंकर गर्दी आणि अतिशय बकाल बीच. त्यात कुठल्यातरी समाजाचे लोक, कसली तरी सार्वजनिक समुद्र पूजा करण्यासाठी तिथे त्या दिवशी आले होते. त्यामुळे गर्दी आणखीनंच जास्त होती. ह्या बीचवर वॉटरस्पोर्ट्सची रेलचेल असल्याने सगळी गर्दी तिकडे एकवटली होती. माझी मुलं ती गर्दी आणि त्या बीचवरचा पसारा बघून लगेच कंटाळली आणि ‘आपल्या बीच’वर परत जाऊया असा लकडा माझ्यामागे लावला. आपला बीच? जसा काही तो बीच त्यांच्या तीर्थरूपांच्या मालकीचाच होता.

पण मीही वैतागलो होतो आणि फिशरमन्स वार्फ १७-१८ किमी लांब असल्याचे चौकशीअंती कळले होते. त्यामुळे तिथे वेळेत पोहोचण्यासाठी निघावेच लागणार होते. कोळवा बीचवर सूर्यास्त बघून, वार्का मार्गे मोबोर बीचवर असलेल्या फिशरमन्स वार्फकडे निघालो. तिथे जेवून परत पाटणेंकडे प्रयाण केले. (तिथला अनुभव(?) हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, लिहितो नंतर त्याविषयी)

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून परत चावडी गावात गेलो, खरेदीसाठी. ह्यावेळेची माझी महत्वाची खरेदी फक्त फेणीची होती. खरेदी करून, सामान आवरून परत बीचवर गेलो आणि एक शेवटची बियर समुद्राच्या साक्षीने पोटार्पण केली, पाटणेंचा समुद्रकिनारा डोळेभरून पाहून घेतला आणि भरल्या मनाने तिथून त्याचा निरोप घेतला. परतीचा प्रवास काणकोण – मडगाव – पणजी – आंबोली – गडहिंग्लज – आजरा – कोल्हापूर – पुणे असा केला, जडवलेल्या मनानेच. हा रस्ता बेळगाव – गोवा रस्त्यापेक्षा फारच चांगला होता.

पणजीतून बाहेत पडताना मन अगदी भरून आले होते. पण मागच्या ३-४ दिवसात जो आनंद गोव्याने दिला होता तो उराशी बाळगून, आता पुढच्या गोवा भेटीत अरंबोळ ह्या बीचवर सुट्टी घालवायची अशी खूणगाठ बांधून परत आलो आहे.

गोंया, हांव बेगिन परत येतलो!

गोंय (गोवा) – पाटणें बीच – १

गोवा! हा शब्द जरी नुसता ऐकला तरी माझ्या अंगात एक चैतन्याची लहर फिरून जाते; इतका गोवा मला आवडतो. स्पेसिफिक कारण असे कोणतेही नाही. आता अगदी जरी जोर लावून विचारलेच कोणी तरीही कदाचित नक्की कारण सांगता येणार नाही पण प्रयत्न करतो, गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ!

पहिल्यांदा गोव्याची सफर घडली १५ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांबरोबर आणि त्यावेळी, त्या वयानुसार, मला गोवा भेटला आणि भावला तो बांद्याच्या चेकपोस्टवर. बांद्याची चेकपोस्ट पार करून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला आणि नजरेला पडलेला नजारा म्हणजे रस्त्याच्या बाजूला ओळीने असलेले बियर बार्स आणि वाइन शॉप्स. त्यावेळी तिथूनच गोव्याचा आनंद घेणे चालू झाले होते. त्यावेळच्या भेटीत नुसते बीच बघत सुटणे झाले होते. तशीही पहिलीच ट्रीप असल्याने गोवा नेमकी काय चीज आहे ते कळायचे होते. कळंगुट, अंजुना, दोना पावला, मिरामार असे उत्तर गोव्यातले बीच एका मागोमाग एक फिरत बसलो होतो. त्यामुळे त्यावेळी गोवा बघितला पण अनुभवला नाही. त्यानंतरही बर्‍याच वेळा गोव्याला गेलो पण तेव्हाही गोवा बघितला, अनुभवला नाहीच. काही वर्षांपूर्वी काही मित्र सहकुटुंब गोव्याला गेलो होतो त्यावेळी पूर्ण वेळ कांदोळी बीचजवळ (Candolim beach) राहिलो होतो. त्यावेळी खर्‍या अर्थाने गोवा अनुभवला आणि खर्‍या अर्थाने गोवा कळला…

भन्नाट निसर्गसौंदर्य, सहज जाणवणारा आणि दिसणारा, तिथल्या वातावरणात भरून राहिलेला सुस्तावा, तिथल्या वास्तव्यात गात्रागात्रात भरून राहणारा आणि सुशेगात करणारा तोच सुस्तावा, पांढर्‍या वाळूचे शांत आणि निरतिशय सुंदर समुद्रकिनारे, कानात भरून राहणारा आणि आव्हानं देणारा लाटांचा सांद्र सूरात्मक गुंजारव, अंगाला झोंबणारा, केसांशी लडिवाळ करणारा आणि नाकात भरून राहणारा समुद्राचा खारा वारा, समुद्रकिनार्‍यावर आपल्याच कैफात आणि मस्तीत फिरणारे, रंगीबेरंगी कपडे घातलेले, देशी विदेशी माणसांचे जथ्थे, एक मादक नाद असलेली कोंकणी भाषा बोलणारे गोंयकर आणि ह्या सर्वाच्या जोडीला अफलातून आणि अवीट चवीची काजू फेणी, बियर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे, ह्या सगळ्यांचा मेंदूवर, एकत्रित आणि टीपकागदावर शाई पसरावी तसा हळुवार पसरत जाणारा अंमल म्हणजे गोंय, मला आवडणारा गोवा!

 

ह्या गाठीशी बांधलेल्या अनुभवाच्या पार्श्वमूमीवर, ह्या दिवाळीला गोव्याला जायचा प्लान करत होतो तेव्हा लक्षात आले की आतापर्यंत गोवा फक्त उत्तर गोवा आणि ओल्ड गोवा एवढाच बघितला होता. त्यामुळे आता दक्षिण गोव्यातले, माझ्या आवडत्या गोंयचे, एक वेगळे रूप अनुभवायचे ठरवले. त्यानुसार मग अनवट बीचचा शोध चालू केला. अनवट अशासाठी की बीच जेवढा लोकप्रिय तेवढा गर्दीने भरलेला हे समीकरण इतक्या वेळच्या गोवा भेटीमुळे उलगडले होते. त्या शोधा-शोधी मध्ये मिळाला पाटणें बीच (Patnem beach). हा बीच इतका की दक्षिणेला आहे तिथून कारवार फक्त ३५-४० कि.मी. वर आहे. गोव्याच्या, दक्षिण गोवा ह्या जिल्ह्यातील काणकोण (Canacona) नावाच्या तालुक्यातल्या प्रसिद्ध पाळोळें बीचजवळ (Palolem beach) असलेला हा पाटणें बीच एक नितांत सुंदर आणि अतिशय शांत बीच.

गूगलवर ह्या बीचचे फोटो बघितल्यावर, ट्रीपऍडवायझर.कॉम वर ह्या बीच जवळची हॉटेल्स शोधायला सुरुवात केली. त्यावेळी बर्‍याच हॉटेल्सच्या जोडीने ह्या बीचबद्दल ही देशी – विदेशी लोकांची मते आणि अनुभव (Reviews) वाचायला मिळून ह्या बीचची केलेली निवड किती सार्थ आहे ह्याची खात्री पटली. शेवटी शोध पूर्ण झाल्यावर समुद्र किनार्‍यापासून २०० – २५० मीटर अंतरावर असणारे ‘सी व्ह्यू रिसॉर्ट’ राहण्यासाठी नक्की केले आणि बुकिंग करून टाकले.

आता जायचे कुठल्या मार्गाने हा प्रश्न आला. कारण ह्यापूर्वी गोव्याला जेव्हा जेव्हा जाणे झाले होते ते मुंबईवरून, पनवेल मार्गे कोंकणातून झाले होते. पुण्यावरून जायची ही पहिलीच वेळ. कोल्हापूर वरून बेळगाव मार्गे किंवा गडहिंग्लज – आजरा – आंबोली मार्गे असे दोन मार्ग होते. बरीच फोना-फोनी करून चौकशी केल्यावर कळले की बेळगाव गोवा मार्गावरचा रस्ता ठीक नाहीयेय. गडहिंग्लज – आजरा – आंबोली मध्ये काही काही पॅच खराब आहेत असेही कळले. बरेच कन्फ्युजन झाले की काय करायचे? नेमका निर्णय न झाल्याने किंवा करता न आल्याने शेवटी कोल्हापुराला पोहोचल्यावर बघू काय करायचे ते असे ठरवले.

शुक्रवारी दुपारी पुण्याहून कोल्हापुराला कूच केले. प्रत्येक टोल नाक्यावर राजसाहेबांची आठवण काढत, टोलच्या दिडक्या मोजत मोजत, कोल्हापुराला पोहोचलो. पोहोचे पर्यंत रात्र झाली होती आणि थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली. रंकाळ्यापासून गगनबावड्याच्या दिशेनं साधारण ३-४ किमी वर असलेल्या राहुल डिलक्स नावाच्या एका हॉटेलात जाऊन गरमागरम तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा पोटभर ओरपून थंडीला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला.

सकाळी लवकर उठून महालक्ष्मी देवळात जाऊन दर्शन घ्यायचे असा बायकोचा फतवा निघाला. देवळात जाताना चिरंजीवांनी विकेटच घेतली, “ओ माय गॉड बघितल्यावर ‘कित्ती भारी पिक्चर’ असे किमान पन्नास वेळा तरी म्हणाला होतात; मग आता काय झाले?” त्यावर त्याला, रांगेत उभे राहायचे नाही मागच्या बाजूने मुखदर्शन घेऊन निघायचे आणि आई देव म्हणून दर्शन घेईल, आपण देवळाची शिल्पकला आणि देवीचे शिल्प यांचे दर्शन घेऊ! असे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले (आजच्या ह्या पिढीतील मुलांचे समाधान करता करता नाकी नऊ येतात हो!) आणि दर्शनाला निघालो. मुखदर्शन घेऊन झाल्यावर, आता कोणत्या मार्गाने जायचे हा प्रश्न पुन्हा उभा ठाकला.

कोल्हापूर गोवा अंतर साधारण २४० किमी आहे असे गुंगाला मॅप दाखवत होता आणि कोल्हापूर बेळगाव हे अंतर ११० किमी. एक्सप्रेस हायवेने बेळगाव पर्यंतचे अंतर सव्वा तासात कापता येणार होते. त्यापुढे १३० साध्या रस्त्याने म्हणजे साधारण ३ तास असा हिशोब करून बेळगाव मार्गे जायचे ठरवले. पण आपण जेव्हा काही ठरवत असतो तेव्हा त्याच वेळेस नियतीही काहीतरी ठरवत असते आणि आपल्याला त्याची जाणीव नसते. जेव्हा ती होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते…

बेळगावाला जायचा एक्सप्रेस हायवे, चतुष्कोण योजनेतला एक हायवे, एकदम भन्नाट आहे. भन्नाट म्हणजे एकदम आऊट ऑफ द वर्ल्ड! आजूबाजूला दुतर्फा पसरलेली शेते, हिरवागार निसर्ग आणि त्यांच्या मधोमध पसरलेला भव्य एक्सप्रेस हायवे, बोले तो एकदम झक्कास! महाराष्ट्र सोडून कर्नाटकात शिरलो आहोत ही जाणीव फक्त कन्नड भाषेतल्या पाट्या आणि मैलाचे दगड यांच्यावरूचच होत होती. प्लान केल्या प्रमाणे सव्वा तासाच्या आतच बेळगावाला पोहोचलो. बेळगावाला पोहोचलो आणि तिथून पुढे नियतीने काय ठरवले त्याची कल्पना यायला सुरुवात झाली. बेळगावातून गोव्याच्या राज्य महामार्गावर पोहोचे पर्यंत रस्ता एकदम गल्लीबोळातून जाणारा. ठीक आहे, हा गावातला रस्ता (पुणेरी माज हो, दुसरे काही नाही) आहे असे म्हणून मन शांत केले आणि मागच्या एका तासाचा भन्नाट ड्रायव्हिंगचा जोष कायम ठेवला. पुढे महामार्गावर लागल्यावर जे काही हाल झाले ते विचारु नका. कर्नाटक सरकाराने बहुतेक ठरवले असावे की कोणीही कन्नड माणसाने गोव्याला जायची हिंमत करू नये. अतिशय भंगार रस्ता. ठिकठिकाणी इथे रस्ता आहे का? असा प्रश्न पडावा अशी अवस्था.

पण गंमत म्हणजे ‘गोवा आपले स्वागत करत आहे’ अशा आशयाची पाटी गोव्याच्या सरहद्दीवर दिसली आणि तिथून रस्ता एकदम चांगला, चकाचक, माझी गोव्यातली मैत्रीण, ज्योती कामत, म्हणते तस्सा, हेमामालिनीचे गाल. पुढे फोंड्यामार्गे काणकोणला पोहोचायचे होते. फोंड्यापासून पुढे काणकोणला कसे जायचे तो रस्ता माहिती नव्हता. फोंड्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या उशीरामुळे मोबाइलच्या बॅटरीने नेमकी तेव्हाच मान टाकली आणि गूगल मॅप्स बंद झाले. मग GPS ऐवजी आपले भारतीय ‘JVS – जनता विचारपूस सिस्टिम’ उपयोगात आणून विचारत विचारत मार्गक्रमण सुरू केले. तिथे गोंयकरांचे कोंकणी उच्चार आणि माझे स्पेलिंगप्रमाणे केलेले उच्चार यांची एक जबरदस्त जुगलबंदी होऊन कोंकणी भाषेशी आणखीनं जवळीक निर्माण झाली. एका चौकात आता पुढे कसे जायचे हा प्रश्न आ वासून उभा राहिला असता एक इंग्रजी बोलणारे किरिस्ताव काका देवासारखे धावून आले आणि त्यांच्या गाडीची पाठ धरून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो. तिथून पुढे काणकोणचा रस्ता सरळ होता. संध्याकाळी, मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाटणें गावात सी व्ह्यू रिसॉर्ट मध्ये प्रवेश केला. चेक इन चे सोपस्कार पार पाडून त्या रिसॉर्टमध्ये असलेल्या हॉटेलात खादाडी केली, कोल्हापुराला चापलेल्या मिसळीनंतर जेवण केलेच नव्हते.

रूममध्ये सामान ठेवून झाल्या झाल्या लगेच बीचकडे धाव घेतली. पाटणें समुद्रकिनार्‍याचे हे विलोभनीय दृश्य नजरेला पडले आणि 6-7 तासांच्या भयाण प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला.

चपला बूट काढून थंड होत चाललेल्या पांढर्‍या शुभ्र वाळूमध्ये अनवाणी पायाने चालण्यातला आनंद घेत, समुद्राचा खारा वारा नाकात भरून घेत, समुद्राच्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत, जवळ जवळ निर्मनुष्य असलेल्या किनार्‍यावर रपेट मारत मारत काळोख पडू दिला. मग थंड वार्‍याला कवेत घेऊन, एका शॅक समोर टाकलेल्या खुर्च्यांवर बसून पोटाला एका थंडगार बियरचे अर्ध्य देऊन, “लाडक्या गोंया, मी आलो आहे! इथून पुढच्या तीन रात्री तुझ्या सोबत असणार आहे”, असे हितगुज मी गोव्याबरोबर करत अजून एका बियरचा फडशा पाडला आणि जड पोटाने रिसॉर्टवर जायला निघालो.

(क्रमशः)

सुरुवातीची काही छायाचित्रे आंतरजालाहून साभार

चावडीवरील गप्पा – सचित्र झलक

नमस्कार मंडळी! चावडीवरच्या गप्पांची मैफल आवडते ना? चावडीवरील सर्व वल्ली आहेतच एकदम नग, एकापेक्षा एक. आजपर्यंत त्यांच्या गप्पा जशा तुम्ही ऐकल्यात तशा त्या, माझी मिसळपाव.कॉम वरील मैत्रिण पूजा पवार हिनेही ऐकल्या आणि ती सोकाजीनानांची फॅन झाली. त्यांच्या चहाची चाहत तिला एकदम भावली. तिने मिसळपाव च्या दिवाळी अंकात ह्या सर्व मंडळींची एक फर्मास चर्चा ‘हौन जाउ दे’ असा आदेश दिला. (हो, ती आदेशच देते!) त्याला मिसळपाव वरील अजुन एक कलाकार मित्र, अभिजीत देशपांडे ह्याने दुजोरा देत ही फर्मास चर्चा सचित्र करुयात असा प्रस्ताव मांडला आणि ह्या वल्लींना दृश्य रुप द्यायचा विडा उचलला.

त्या दोघांच्या प्रयत्नांमुळे ह्या दिवाळीला चावडीवरील सर्वांना चित्रमय अस्तित्व मिळून तुमच्या पुढे येण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पूजा पवार आणि अभिजित देशपांडे या दोघांचे शतशः आभार.

चला तर मग आता तुम्हाला मी सर्वांची ओळख करून देतो.

घारूअण्णा
हे आमचे घारूअण्णा, ह्यांचे बालपण गेले रत्नागिरीच्या मधल्या आळीत, तरुणपण गेले चिपळूणमध्ये आणि आता सध्या उतारवयात पुण्यात स्थायिक झाले आहेत.

रत्नागिरीच्या मधल्या आळीत ह्यांची सगळी हयात न गेल्यामुळे आणि पुण्यातही सदाशिव पेठेत न राहिल्यामुळे, त्यांचे बोलणे जरी तिरकस असले तरीही त्या तिरकस बोलण्याला धार नसते.

ह्यापलीकडे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असल्याने चावडीवर हजेरी लावून उरलेल्या वेळेत वहिनींना मंडईत घेऊन जाणे, संध्यानंद वाचणे, देवळात जाणे यात त्यांचा सारा वेळ जातो. या घारूअण्णांचा देवावर भयंकर विश्वास! अत्यंत धार्मिक आणि सनातनी.

बरेचसे अंधश्रद्धाळूही, भुजबळकाका आणि यांचे खटके उडण्याचे हे ही एक कारण.

भुजबळकाका
हे आमचे भुजबळकाका, यांना त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे चावडीवर बहुजनहृदयसम्राट हे नाव मीच दिले आहे. तसेही यांची पुण्या-मुंबईकडच्या अभिजनांच्या मताशी नेहमीच असहमती असते, पण त्यांचे विचार सर्वसमावेशक असतात.

भुजबळकाका सध्या लष्करातून निवृत्त होऊन आता एका खाजगी कंपनीत चीफ सुरक्षा अधिकारी (CSO) म्हणून काम करत आहेत.

सारी हयात लष्करात गेल्याने शिस्तीचे प्रचंड भोक्ते. कुठलाही उथळपणा यांना चालत नाही अगदी विचारांमधलाही. बालपण अती दुर्गम भागातल्या खेड्यात गेल्यामुळे, परिस्थितीचे बरेच टक्के टोणपे खाल्ल्यामुळे आणि चटके सोसल्यामुळे, विचारांमध्ये एका प्रकारची सर्वसमावेशकता आणि ठामपणा असतो यांच्या.

शामराव बारामतीकर
हे आमचे शामराव बारामतीकर, मूळचे बारामतीचे पण नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य. दर महिन्याला बारामतीला जाऊन शेतीचे कमीजास्त बघणे आणि गावाकडच्या नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारणे हा नेम कधी चुकत नाही.

आता बारामतीचेच असल्याने त्यांची ‘साहेबांच्या’ प्रती असलेली निष्ठा पदोपदी जाणवते. वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या कुटुंबावर ‘साहेबांचे’ बरेच उपकार आहेत असे त्यांनी मला खाजगीत बर्‍याचदा सांगितले आहे.

त्यामुळे राजकारणात साहेबांची बाजू लावून धरणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त असते. पण त्यांचा ‘टग्या’दादांवर अतिशय राग आहे, त्या ‘टग्या’दादांमुळे  ‘साहेबांची’ प्रतिष्ठा कमी होते असे त्यांचे मत आहे. पण सुप्रियाताईंबद्दल त्यांना का कोण जाणे त्यांना खूप जिव्हाळा आहे. 

नारुतात्या
हे आमचे नारुतात्या, कोणाच्याही न अध्यात न मध्यात. यांना सर्वांचेच म्हणणे पटते. थोडक्यात काय तर यांचा नेहमी ‘बेंबट्या’ होत असतो.

साधे सरळ व्यक्तिमत्त्व. यांची सोकाजीनानांवर अपार श्रद्धा. सोकाजीनाना जे म्हणतील ते करण्यास नेहमी तत्पर.

सरकारी नोकरीची शिल्लक राहिलेली काही वर्षे, प्रमोशनचे स्वप्न बघत घालवत आहेत कशीबशी. पण स्वभावाने अगदीच भिडस्त असल्याने साहेबांचे आणि त्यांचे मतभेद होत नाहीत. 

चिंतोपंत
हे आमचे चिंतोपंत, संघाच्या, ब्राह्मणी हिंदुत्वाच्या, मुशीत सारे बालपण आणि तारुण्य नागपुरात पोसले गेलेले आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन स्थायिक झालेले.

ह्यांचे बरेचसे नातेवाईक आणि मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. पण ह्यांना परदेशात राहणे आवडत नसल्याने सध्या निवृत्त होऊन एका पेन्शनराचे आयुष्य मायदेशातच व्यतीत करत आहेत. 

ह्यांचे मूळ कोंकणातले असल्याने यांचे आणि घारूअण्णांचे सूत व्यवस्थित जमते.

सोकाजीनाना
तर मंडळी, हे सोकाजीनाना, कमावत्या वयात, कमावलेला पैसा व्यवस्थित डोके लावून गुंतवला असल्याने आता व्ही. आर. एस. घेऊन स्वच्छंद आयुष्य जगत आहेत. कामानिमित्ताने संपूर्ण जग पालथे घातले असल्याने जाणीवा प्रगल्भ होऊन अनुभवाचे विश्व व्यापक झालेले चावडीवरचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. ह्यांचा शब्द अंतिम आणि प्रमाण मानला जातो चावडीवर.

अनुभवसिद्ध असल्याने कुठल्याही विषयावर बोलण्याची हातोटी आहे यांची. एखाद्या विषयाबद्दल माहिती नसेल तर त्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्याचा ह्यांचा ध्यास विलक्षण आहे. त्यामुळे माहिती नसली तर गप्पा राहून चिंतन करणे आणि अभ्यास करून माहिती मिळाल्यावर, आपल्या विचाराची बैठक भक्कम करूनच मग हे त्यांची मते चावडीवर मांडतात. त्यामुळे त्यांना चावडीवर फार मान आहे.

“मंडळी आता ओळख तर झाली आहेच, तीही चक्क सचित्र. मग आता येत रहा चावडीवर नेहमी आठवणीने. काय आहे गप्पा मारायला आम्हाला आवडतेच पण आपल्या गप्पा कोणीतरी ऐकते, ऐकून त्यावर चर्चा होते हे खूपच सुखावह असते हो! चला आता मी आपली रजा घेतो. काय आहे, चहाची वेळ झाली आमच्या आणि आज ऑर्डर द्यायला कोणीही नाही त्यामुळे चहा प्यायला घरीच जावे लागेल. एक छानसा गजरा घेतो सौ.साठी, तेवढाच जरा मसाला चहा मिळेल हो, काय?”,” सोकाजीनाना मंद हसत.

चावडी
अस्मादिक
सर्वात शेवटी अस्मादिक 🙂

चावडीवरच्या गप्पा – स्मारक

“काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.

“ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्‍यावर आणत.

“हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला. सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना असेच म्हणावे लागेल.”, घारुअण्णा एकदम सुतकी चेहेर्‍याने.

“घारुअण्णा, तुमच्या भावना समजताहेत, अतिशय वाईट घटना, शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठीसुद्धा!”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“चला, ह्या निमित्ताने तरी घारुअण्णा आणि बहुजनह्रदयसम्राटांचे एकमत झाले! मला वाटले आता ‘सहस्त्रकातील सर्वात वाईट घटना’ वरून जुंपते की काय… खीs खीss खीsss”, नारुतात्या पांचट विनोद करत.

“नारुतात्या, तुम्हाला कसला पोचच नाही, कुठे काय बरळावे ह्याचा काही अंदाज?”, इति चिंतोपंत.

“असो, आम्ही गेलो होतो फिरायला पण तो दिवस हॉटेलातच बसून काढला, अंत्यदर्शनासाठी जमलेली गर्दी बघून आपली तर छातीच दडपून गेली ब्वॉ.”, घारुअण्णा एकदम भावुक होत.

“हो! २० लाख लोक जमले होते म्हणे शिवाजी पार्कात. साहेबांचा हिंदूहृदयसम्राट असण्याचा ह्याहून भरभक्कम पुरावा तो काय असेल दुसरा”, इति चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत, तो २० लाख म्हणे उगाच फुगवलेला आकडा आहे. एवढी माणसे जमायला तिथे जागाच नाहीयेय म्हणे”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“बरंsssबरंsss, तुमच्या सकाळ समूहानेच लावला असेल हा असला जावईशोध, नाही का?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, तुम्हाला असे बोलवतेच हो कसे? त्या २० लाखाच्या आकड्यांवर बर्‍याच जणांचा आक्षेप आहे इतकेच मला म्हणायचे होते.”, इति बारामतीकर.

“अहो, आकडा कसा काय महत्त्वाचा असेल? तो अंत्यविधीसाठी आपणहून जमलेला जमाव होता, कोणाचे शक्तिप्रदर्शन नव्हते आकड्यात मोजायला.”, घारुअण्णा रागाने लाल होत.

“जाऊ द्या हो घारुअण्णा, ह्याचा इश्यू करून काही फायदा नाहीयेय. सोडून द्या, २० लाख काय किंवा २ लाख काय, संपूर्ण अंत्ययात्रा आणि अंत्यविधी शांततेत पार पडला हे महत्त्वाचे!”, इति भुजबळकाका.

“अहो, मला कुठे इश्यू करायचाय ह्याचा, ह्या सेक्युलरवाद्यांचेच हे नेहमीचे अवलक्षण असते.”, घारुअण्णा रागात घुमसत.

“तो २० लाखांचा आकडा जाऊद्या, पण बाळासाहेबांचे स्मारक तर शिवाजी पार्कात व्हायलाच हवे! त्यावरही काही सेक्युलरवाद्यांचा आक्षेप आहे, आता बोला ”, चिंतोपंत.

“भले शाबास! हिंदूंसाठी ह्या भारतात काहीही करायचे झाले तर प्रत्येक वेळी ह्यांची परवानगी मागायची, हे म्हणजे हिंदू अस्मितेवर हल्ला आहे! हे होणे नाही! हम स्मारक वहीं बनायेंगे!”, घारूअण्णा परत रागाने लालेलाल होत.

“अहो घारुअण्णा का उगाच ‘हिंदूंवर अन्याय’ हा प्रपोगंडा करताय, शिवाजी पार्क खेळाचे मैदान आहे. तिथे कसले स्मारक उभारताय?”, भुजबळकाका शांतपणे.

“हे बघा बहुजनह्रदयसम्राट, ज्या शिवतीर्थावर या महानेत्यानं साडेचार दशकं अधिराज्य गाजवलं, ज्या ठिकाणी चिरनिद्रा घेतली, त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभे राहणे उचित आहे.”, चिंतोपंत जरा तडकून.

“मान्य, बाळासाहेब हे देशातील एक महान नेते होते त्यामुळे त्यांचं स्मारक उभारायलाच हवं. या भावनेशी मी असहमत नाही. फक्त, शिवाजी पार्क मैदानात हे स्मारक बांधणं योग्य होणार नाही.”, भुजबळकाका ठामपणे .

“बरं मग, इंदू मिलच्या जागेवर हे स्मारक बांधण्यावर आपले काय मत आहे बहुजनह्रदयसम्राट?”, घारुअण्णा घुश्शात.

“त्यापेक्षा, कोहिनूर मिलच्या जागेवर हे स्मारक बांधले तर?”, नारुतात्या काडी सारत.

“इथे तर मराठी माणसालाच काही पडले नाहीयेय तर बाकीच्यांना दोष देऊन काय उपयोग?”, घारुअण्णा हताश होत.

“अहो डोंबलाचे मराठी माणसाचे मत! भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच!”, भुजबळकाका ठामपणे.

“अहो भुजबळकाका, मनोहरपंत जोशीसरांनीसुद्धा स्मारक शिवाजी पार्कात व्हायला हवे असेच म्हटले आहे.”, चिंतोपंत.

“नाही चिंतोपंत, त्यांना तसे बोलायला काय जातेय? तसेही जोशीसरांचे राजकारण राजकारण खेळून झाले असले तरीही, पीळ काही जात नाही हेच खरे आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, घारुअण्णा आणि चिंतोपंत दोघेही चमकून.

“हो, अहो आचरटपणा आहे हा सगळा. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार करण्याची मागणी आधीच झाली आहे आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुन्हा इंदू मिलचे नाव सुचवणे हा शुद्ध आचरटपणा आहे. त्यानंतर कोहिनूर मिलच्या जागेचे नाव निघताच जोशीसर कासावीस झाले आहेत आणि त्यामुळेच शिवाजी पार्काचा त्यांनी हट्ट धरला आहे. वेळ आल्यास शिवसैनिकांनी कायदा हातात घ्यावा असेही त्यांनी सुचवले आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्‍याने.

“सोकाजीनाना, ह्यातही राजकारण?”, नारुतात्या बुचकळ्यात पडून.

“तर काय! हे सगळे गलिच्छ राजकारण आहे. जोशीसरांकडून ह्यावेळी तरी ही अपेक्षा नव्हती.”, सोकाजीनाना काहीसे हळवे होत.

“अहो, ‘शिवसेनाप्रमुख हे सच्चे क्रीडाप्रेमी होते. त्यामुळे मैदानांवर खेळणारी पावले थांबवून, खेळाचा श्वास कोंडून तिथे आपले स्मारक उभारणे, हे बाळासाहेबांनाही पटले नसते’ असे मत मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी व्यक्त केले आहे. स्मारक बांधण्याबद्दल काही हरकत नाही हो कोणाची. पण त्यातही राजकारण केले जावे ह्यात खुद्द बाळासाहेबांचा अवमान आहे हेही लक्षात घेत नाहीयेय कोणी.”, सोकाजीनाना शांतपणे, “शिवसेना भवन किंवा बाळासाहेबांचे घर, निवासस्थान, ह्या दोन्ही वास्तू बाळासाहेबांचे स्मारक म्हणून उचित स्थानं असू शकतात. ह्या दोन्ही जागांचे पावित्र्य आणि स्थानमाहात्म्य तेवढे थोर नक्कीच आहे. बाळासाहेबांच्या हस्तस्पर्शाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या वास्तू खरेतर त्यांची अस्तित्वात असलेली स्मारकेच आहेत. ही दोन्ही ठिकाणे शिवसैनिकांना आणि मराठी तरुणांना नेहमीच स्फूर्ती देत राहतील ह्यात कोणाला शंका असण्याचे काही कारणच नाही. त्यामुळे नवीनं जागा शोधून त्यावर स्मारक बांधण्याचे राजकारण करत बसण्यापेक्षा ते स्मारक नेमके कसे असावे त्याचे स्वरूप कसे असावे ह्याबद्दल चर्चा केली जाणे महत्त्वाचे आहे.”

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.