लाल सिंग चढ्ढा

बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, “नका बघू मग आमचे सिनेमे” ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.

काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.

सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.

सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.

जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे…वगैरे…) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.

सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

झुंड

झुंड सिनेमा नागराजने त्याच्याच कामाने उंचावलेल्या अपेक्षांची उंची गाठण्यात कमी पडतो. मी फारच अपेक्षा ठेवून गेलो होतो आणि त्यामुळे निराशा पदरी पडली असे खेदाने म्हणावे लागतंय. पण ह्याचा अर्थ सिनेमा फसलाय का? तर अजिबात नाही. जे काही ‘स्टोरी टेलींग’ नागराजला करायचे आहे ते काम नागराजने व्यवस्थित केले आहे. पण सिनेमा बघताना काहीतरी कमी पडतंय असं सतत वाटत राहतं.

सिनेमाची लांबी खूप आहे, त्यात असलेल्या पात्रांच्या संख्येमुळे तसं असणं साहजिक असेल असं वाटलं होतं. पण, सिनेमात प्रत्येक पात्राची बैठक ठसवण्याचा प्रयत्न अपुरा पडला आहे. डॉक्युमेंट्री पद्धतीने पात्रांची ओळख करून देण्याचा वेगळाच प्रयत्न केला आहे. तो मनाला भिडतो पण काळजाचा ठाव घेत नाही. अंकुशची मुख्य व्यक्तिरेखा बऱ्यापैकी आकार घेत साकार होते पण त्याप्रमाणे बाकीच्या व्यक्तिरेखा आकार न घेता साकार होत राहतात. कलाकारांच्या भाऊगर्दीत पटकथा रेंगाळत राहते आणि बऱ्याच वेळा संथ होते. पात्रांची संख्या मर्यादित ठेवूनही झोपडपट्टीतल्या आयुष्याची विदारकता परिणामकारक करता येऊ शकली असती पण ह्यावेळी काहीतरी गडबड झाली आहे. पटकथा विस्कळीत झाली आहे. सगळी उपकथानकं एकसंध, घट्ट आणि ठाशीव न वाटता तुकड्या-तुकड्याने जोडल्यासारखी येत राहतात.

स्पॉयलर अलर्ट:
(विसा नसलेला, नुसता नवाकोरा पासपोर्ट घेऊन परदेश प्रवासासाठी बोर्डिंग पास कसा देता येईल? इतका महत्त्वाचा तपशील पटकथेला ठिसूळ बनवतो.)

अजय-अतुल यांचं संगीत ठीक आहे. फार काही स्कोप नाहीयेय पण आंबेडकर जयंतीचे गाणे झिंगाटच्या सावलीत असल्यासारखे झाले आहे.

सिनेमात दखल घेण्यासारखं काय असेल तर ते म्हणजे हा सिनेमा भारतीय सिमेनातले प्रस्थापित स्टीरिओटाइप्स मोडतो. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर जयंतीचं सेलीब्रेशन, त्यासाठीची वर्गणी वसुली आणि ‘जय भीम’ कथानकात ठळक आणि ठाशीव रूपात येतात. अमिताभने अतिशय लो प्रोफाइल आणि टोन्ड डाउन होऊन व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटभर अमिताभ नागपूरमधला एक सामान्य शिक्षकच वाटतो, फक्त कोर्टातल्या सीनमध्ये त्याच्यातला ‘अमिताभ’ बाहेर आला आहे. सर्व कलाकार जीव तोडून काम करतात. अर्थात तसे कलाकार शोधून त्यांच्याकडून काम करून घेणं ह्या नागराजचा हातखंडा आहे. त्याच्या टीममधले सगळे जुने कलाकार ह्या सिनेमातही आहेत आणि आपापली कामं चोख करतात.

देशभरातला निम्न स्तरावरचा समाज, त्या समाजाचं विस्थापित असणं, उच्च स्तरावर त्या समाजाच्या अस्तित्वाची दखलही नसणं आणि जर ती दखल घेणं भाग पडलं तर अवहेलना करणं, हे आजच्या काळातही कसं चालू आहे ह्यावर संवेदनशीलपणे परिणामकारक भाष्य करणं ही नागराजची खासियत आणि ताकद आहे. ह्या सिनेमातही तो ते भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. पण ते तितकं अंगावर येत नाही. उच्चभ्रूंचं कॉलेज व प्रस्थापित समाज आणि झोपडपट्टी ह्यांच्यामध्ये एक भिंत दाखवली आहे. ते ह्या दोन समाजातल्या संबंधांचं प्रतीक आहे. झोपडपट्टीमधली मुलं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे, क्षमतांमुळे ही भिंत ओलांडू बघतात आणि एक भला माणूस त्यांना भिंतीच्या ह्या पलीकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. फ़ॅन्ड्रीमधेही ही भिंत आहे, शाळेची भिंत. पण ती भिंत ज्या परखडपणे अंगावर येऊन काळजाचा जसा ठाव घेते तितकी ह्या सिनेमातली भिंत उंची गाठत नाही. कदाचित, हिंदी सिनेमाचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे नागराज त्याच्या होम ग्राउंड मराठी सिनेमात जितका परखड होतो तितका ह्या सिनेमात तो होतोय असं जाणवतं नाही.

प्रस्थापित आणि विस्थापित ह्यांच्यामधल्या प्रचंड मोठ्या भिंतीला ही ‘झुंड’ टक्कर देते पण भिंतीला ह्यावेळी भगदाड पडत नाही!

जरी सिनेमा अपेक्षीत उंची न गाठल्याने निराश करतो तरीही स्टिरीयोटाइप्स तोडणारा प्रयोग चुकवून चालणार नाही, एकदा दखल घेण्याजोगा नक्कीच आहे!

गाथा सागरतळाच्या सफरीची

(मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०२० मध्ये पूर्वप्रकाशित)

डुबकियां सिंधू में गोताखोर लगाता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

सोहनलाल द्विवेदी यांची ही एक कविता होती शाळेत असताना – कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्या कवितेतल्या या वरच्या कडव्यातून गोताखोर हा शब्द पहिल्यांदा आयुष्यात आला. त्या वेळी गोताखोर म्हणजे काय याचा मराठी अर्थ बघितला, तेव्हा गोताखोर म्हणजे पाणबुड्या असं समजलं. आमच्या गावाला विहिरीत घागरी, बादल्या बुडाल्या की त्या काढण्यासाठी खूप दम असलेला एक पट्टीचा पोहणारा पाण्याच्या तळाशी जाऊन त्या घागरी आणि बादल्या वर काढायचा. त्याला आमच्याकडे पाणबुड्या म्हणायचे. त्यामुळे गोताखोर म्हणजे समुद्राच्या तळाशी बुडी मारून मोती काढणारा पाणबुड्या असं समीकरण त्या वेळी डोक्यात फिट बसलं. पण त्या वेळी त्या समुद्राच्या अंतरंगात, सागरतळाशी असलेले समुद्री जीवांचं व प्रवाळांचं विश्व आणि त्यातलं नाट्य हे किती मती गुंग करणारं आहे, याची काहीच कल्पना नव्हती. पण पुढे सुदैवाने त्या नितांतसुंदर आणि अद्भुत विश्वाची, नुसती पुस्तकी ओळख न होता, त्या विश्वाची अद्भुत सफरही घडणार होती, ह्याची त्या वेळी काहीच कल्पना नव्हती. त्या अद्भुत सफरीची ही गाथा…

२०१३ला मॉरिशसला भेट देण्याचा योग आला होता. त्या टूरमध्ये तिथल्या एका प्रवाळ बेटावर जाण्यासाठी आयलंड हॉपिंग टूर होती. त्या प्रवाळ बेटावर समुद्राच्या उथळ भागात, ऑक्‍सिजनचा सप्लाय असलेलं एक शिरस्त्राण डोक्यावर चढवून बोटीच्याखाली पाण्यात बुडी मारून तिथले रंगीत मासे बघण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिथे फक्त रंगीत मासे बघण्यासारखे होते, आणखी दुसरं काही नव्हतं. आम्ही जिथे होतो, तिथून बरंच पलीकडे खोलवर बरंच काही होतं, पण तिकडचं नीट दिसत नव्हतं. आणि अचानक, पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर असलेले आणि काळे रबरी पोषाख घातलेले पाणबुडे दिसले आणि सोहनलाल द्विवेदींच्या कवितेला गोताखोर आयुष्यात प्रथम आणि प्रत्यक्ष बघितला. मी जिथे मासे बघत होतो, तिथलंच समुद्राखालचं विश्व इतकं भन्नाट होतं की ते गोताखोर जिथे बुड्या मारत होते, तिथलं विश्व किती भन्नाट असेल ह्याची कल्पना करूनच उत्कंठा वाढली आणि लगेच पाणबुड्या बनून तिथे जाण्याचं मनाशी ठरवलं आणि पाणबुड्या व्हायचं हे बीज तिथे डोक्यात रोवलं गेलं!

पुढे कामाच्या निमित्ताने मलेशियाला स्थलांतरित झालो आणि एका सुट्टीत लंकावि ह्या बेटावर फिरायला जाण्याचा योग आला. पांढऱ्या वाळूचे नितांत सुंदर किनारे असलेलं एक भन्नाट बेट. तीन दिवसांचा मुक्काम होता त्या बेटावर आणि लोकल टूर गाइड घेतला होता साइटसीइंगच्या मार्गदर्शनासाठी. त्या टूर गाइडने, मुख्य बेटापासून जवळच एक पुलाउ पायर नावाचं प्रवाळ बेट आहे आणि त्या बेटावरचं मरीन पार्क स्नॉर्कलिंग साइट म्हणून प्रख्यात आहे, तिथली ट्रीप बुक करू का? असं विचारलं. गूगलबाबाला साकडं घालून स्नॉर्कलिंग म्हणजे काय याचा शोध घेतला, तर तो एक मिनी-पाणबुड्या असलेला प्रकार आहे असं कळलं. स्नॉर्कलिंग मास्क लावून समुद्रात तोंड खुपसून आणि लाइफ जॅकेट घालून पाण्यावर तरंगायचं. त्या मास्कला एक पाइप असतो, त्यातून हवा आत येते आणि तोंडाने श्वास घेत तोंड पाण्यात बुडवून समुद्राखालचे रंगीबिरंगी विश्व बघायचं, हे म्हणजे स्नॉर्कलिंग. मॉरिशसच्या अनुभवानंतर समुद्राखालचे जग अधिक विस्तृतपणे बघण्याची इच्छा तर तेव्हाच झाली होती, पण ती पाणबुड्या होऊन बघण्याची होती.

टूर गाईडाला विचारलं, “डाइव्हिंग करता येईल का?”

त्यावर त्याने विचारलं, “तू सर्टिफाइड डाइव्हर आहेस का?”

मग कळलं की असं कोणीही उठून डाइव्हिंग करू शकत नाही त्यासाठी प्रॉपर प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि सर्टिफिकेट असेल तरच डाइव्हिंग करता येतं. ‘दुधाची तहान ताकावर’ या न्यायाने मग स्नॉर्कलिंग करू या असं ठरलं, कारण ते करण्यासाठी कुठल्या प्रशिक्षणाची गरज नव्हती, कोणीही लाइफ जॅकेट घालून आरामात स्नॉर्कलिंग करू शकतो!

तिथला स्नॉर्कलिंगचा अनुभव निव्वळ अवर्णनीय होता. इथे नुसते रंगीबेरंगी मासेच नाही, तर समुद्राखालच्या रंगीबेरंगी प्रवाळ वसाहतीही वैविध्यपूर्ण होत्या. भान हरपून टाकणारा आणि मन उचंबळून टाकणारा अनुभव होता एकदम. आम्ही जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, त्या भागाची खोली साधारण दहा ते पंधरा फूट इतकी होती. सूर्यप्रकाश स्वच्छ आणि भरपूर असल्यामुळे पारदर्शक पाण्यातून प्रवाळ वसाहतींनी परिपूर्ण असलेला समुद्रतळ नितांतसुंदर दिसत होता. ह्या वेळी स्नॉर्कलिंगचा आनंद सहकुटुंब घेत असल्याने तो आनंद द्विगुणित होत होता. आणखी जास्त खोलवर भागामध्ये मोठे मासे आणि प्रवाळ वसाहतींची संख्या आणि दाटी खूपच जास्त होती. जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, तिथून फक्त अंदाज येत होता, पण दूर असल्याने जास्त स्पष्ट दिसत नव्हतं. जरा रोखून बघण्याचा प्रयत्न केला, पण जास्त काही दिसू शकलं नाही. पण अचानक, पुन्हा एकदा गोताखोर दिसला, तेच पाठीवर सिलेंडर आणि आणि काळा रबरी पोशाख. त्यांना ते खोलवरच (शंभर फुटांपर्यंत खोल) समुद्रतळाचं विश्व जवळून अनुभवता येत होतं. तो अनुभव किती आणि कसा भन्नाट असेल हा विचार मनात आला आणि सर्टिफाइड डाइव्हर व्हायची बांधलेली खूणगाठ पुन्हा परत घट्ट झाली.

त्या लंकावि दौऱ्यावरून परत आल्यानंतर ऑफिसमध्ये बसलो असताना ऑफिसातील एक सह-कर्मचारी मधू माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, “काय रे इतका टॅन का झाला आहेस?” तिला सांगितलं की मी नुकताच लंकाविला समुद्रकिनाऱ्यावर मस्त हुंदडून आलोय तीन-चार दिवस. त्यामुळे जरा त्वचा टॅन झाली आहे.

त्यावर ती हसून म्हणाली, “अरे, मीसुद्धा आताच रदांग आयलंडला जाऊन आले. तीन दिवसाची डाइव्हिंग ट्रीप होती.”
ते ऐकून माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी एकदम खुशीत येऊन तिला विचारलं, “तुला डाइव्हिंग येतं?”
त्यावर ती उत्तरली, “मी असिस्टंट डाइव्हिंग टीचर आहे!”

हे म्हणजे, ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!’ असं होतं. तिच्याकडून लगेच पुढची माहिती मिळवली की मलेशियन सब अ‍ॅक्वा क्लब (Malayan Sub Aqua Club – MSAC) नावाच्या एका डाइव्हिंग क्लबाची ती मेंबर होती आणि तिथेच ती असिस्टंट टीचर सर्टिफिकेशनची तयारी करत होती. मी तिला म्हटलं, मला स्कुबा डाइव्हर व्हायचंय. त्यावर ती म्हणाली की दोन आठवड्यानंतर सर्टिफाइड डाइव्हरसाठीची एक नवीन बॅच चालू होणार आहे आणि जर मला इंटरेस्ट असेल तर ती माझी नोंदणी त्या क्लबमध्ये करेल. मला एकदम तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन गेलं. शाळेत असताना पहिल्यांदा आयुष्यात भेटलेला गोताखोर बनण्याचे जे एक अंधुक स्वप्न मॉरिशसला बघितलं होतं ते आता साकार होताना दिसत होतं.

Club – MSAC

दुसऱ्याच दिवशी, मधूने क्लबच्या मेंबरशिपसाठी लागणारी सगळी कागदपत्रं ऑफिसमध्येच आणली. सगळे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून क्लबाचा रीतसर मेंबर झालो आणि ट्रेनिंगच्या दिवसाची वाट बघू लागलो. ट्रेनिंग दोन भागात होणार होतं. पहिला भाग होता थिअरीचा आणि दुसरा प्रॅक्टिकलचा. थिअरीमध्ये दोन दिवसाचं वर्कशॉप होतं. त्यामध्ये भौतिकशास्त्राचे, पाण्याचा दाब आणि त्याचा एकंदर शरीरावर होणारा परिणाम याचं रीतसर शास्त्रीय शिक्षण होतं. जसजसं समुद्राच्या तळाशी खोल जाऊ तसतसं पाण्याचा दाब वाढत जातो आणि त्यामुळे स्कुबा इक्विपमेंट वापरून घेतलेला श्वास आणि त्यामुळे फुप्फुसात भरला जाणारा ऑक्सिजन यांचे शरीरावर काय परिणाम आणि दुष्परिणाम होऊ शकतात याची इत्थंभूत माहिती या वर्कशॉपमध्ये देण्यात आली. त्यानंतर समुद्राच्या पाण्याखाली किती काळ राहता येतं ह्याचं गणित, कागदावर आकडेमोड करून आणि Dive Computer वापरून कसं करायचं हे शिकवलं. त्याखेरीज इतरही बरीच शास्त्रीय माहिती देण्यात आली. ते वर्कशॉप एकंदरीत फारच मनोरंजक आणि ज्ञानवर्धक होतं. क्लबची प्रेसिडेंट ट्रूडी गणेंद्र हे वर्कशॉप कंडक्ट करत होती. तिने वर्कशॉप संपताना, जे काही शिकलो त्याची एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे असं सांगून आमची विकेटच घेतली. रिव्हिजनसाठी एक आठवड्याचा कालावधी देऊन, एक आठवड्यानंतरची परीक्षेची तारीख ठरवली. जोपर्यंत लेखी परीक्षा पास होणार नाही, तोपर्यंत प्रॅक्टिकल सुरू करता येणार नव्हतं. एक आठवडाभर जोरदार रिव्हिजन करून लेखी परीक्षा पास झालो.

प्रॅक्टिकल सेशन्स ही स्विमिंग पुलावर होणार होती. खुद्द समुद्रात बुडी मारण्याआधी, जी काही थियरी शिकलो त्याचा सराव ऑक्सिजन सिलेंडर लावून स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये करायचा होता. डाइव्हिंग करताना खाली बुडी मारल्यानंतर समुद्रच्या पाण्यात पोहायचे नसतं, तरंगायचं असतं. ह्या तरंगायच्या पद्धतीचा (Buoyancy) सराव करायला स्विमिंग पूलमध्ये शिकवलं जातं. पाण्याच्या दाबाची काळजी घेत हळुवारपणे कसं बुडायचं, हळुवारपणे कसं वर यायचं याचं रीतसर शिक्षण ह्या प्रॅक्टिकल स्टेशन्समध्ये असतं. सहा दिवसांचे स्विमिंग पूल प्रात्यक्षिक झाल्यानंतर प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारण्यासाठी घेऊन जातात. ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय करणारी मुख्य नळी बंद झाल्यास बॅकअप नळी कशी वापरायची, खोल पाण्यात डोळ्यावरचा मास्क काढून पुन्हा कसा लावायचा, खोल पाण्यात ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर असलेलं सगळं किट उतरवून पुन्हा पाठीवर कसे चढवायचे, आपल्या डाइव्हिंग बडीच्या ऑक्सिजन सिलिंडरमधला ऑक्सिजन संपला तर त्याला अल्टरनेट सप्लाय देत कसं वर घेऊन यायचं, अशा प्रकारचे अनेक सराव करवून घेत एकदाचं प्रशिक्षण संपलं. ट्रेनिंग संपून आता मी त्या दिवसाची वाट बघत होतो, जेव्हा प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारून पाणबुड्या होण्याचं स्वप्न अखेर साकार होणार होतं. ट्रेनिंग संपल्यानंतर दोन आठवड्यांनी क्लबकडून एक मेल आलं की रदांग आयलंडवर पहिल्या डाइव्हिंग ट्रिपवर जाण्यासाठी तयार व्हा. ते मेल बघताच मन उचंबळून आलं आणि एक अनामिक हुरहुर दाटून राहिली. आतुरतेने त्या दिवसाची वाट बघू लागलो…

डाइव्हिंग चमू

आणि अखेर तो दिवस उजाडला. कौलालंपूरपासून उत्तरेकडे असलेल्या कौलातरंगाणू राज्यातल्या रदांग बेटावर जायचं होतं. कौलालंपूरपासून रदांग बेटावर जायच्या जेट्टीपर्यंतचा प्रवास साधारण ५७५ किलोमीटरचा होता. त्यानंतर जेट्टीपासून बेटावर जायला बोटीने ४५ मिनिटं लागणार होती. कौलालंपूरपासून ५७५ किलोमीटरचा सगळा प्रवास एक्स्प्रेस हायवेचा होता. ताशी १४० ते १५० किमी. या भन्नाट स्पीडने चार-साडेचार तासात ते अंतर कव्हर केलं. एक्स्प्रेस हायवेमुळे गाडीने स्पीड पकडला होता आणि मन त्या वेगाच्या कैकपट वेगाने रदांग बेटावर पोहोचलं होतं. जेट्टीवर पोहोचल्यानंतर या डाइव्ह ट्रीपवर येणाऱ्या सर्वांशी ओळख झाली. त्या ग्रूपमध्ये सर्व प्रकारचे अनुभवी डाइव्हर होते. मी धरून आम्ही तिघे होतो, जे पहिल्यांदा सागरतळाशी बुडी मारणार होतो. सर्वांशी ओळखीपाळखी होईपर्यंत आमची बोट जेट्टीला लागली आणि सगळे उत्साहाने बोटीत जाऊन बसले. आम्ही ज्या रदांग बेटावर चाललो होतो, ते बेट मलेशियातल्या बेस्ट डायव्हिंग साइटपैकी एक आहे. ते तसं का आहे ह्याची प्रचिती किनारा जवळ येऊ लागला तशी येऊ लागली. स्फटिकासारखं निळंशार स्वच्छ पाणी आणि प्रखर सूर्यप्रकाश यांच्यामुळे सागरतळ स्पष्ट दिसत होता. अगदी किनार्‍यालगतही वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे डोळ्यांनी स्पष्ट दिसत होते. तो स्पष्ट सागरतळ डोळ्यात साठवून ठेवून आम्ही आमच्या डाइव्ह रिसॉर्टकडे निघालो. आपापल्या अलॉट झालेल्या रूमच्या चाव्या घेऊन आम्ही रूममध्ये सामान ठेवलं आणि थोडे फ्रेश झालो, तोपर्यंत ट्रूडीची हाक आली टीम मीटिंगसाठी.

रिक्रिएशनल डायव्हिंगमध्ये साधारण २५ ते ३० मीटर खोल समुद्रतळापर्यंत जाता येतं – म्हणजे शंभर ते सव्वाशे फूट खोल. आम्ही नवशिके एकदम त्या रिक्रिएशनल डाइव्हला जाण्याआधी समुद्राची आणि समुद्राच्या पाण्याची ओळख व्हावी म्हणून आमच्यासाठी एक मिनी डाइव्ह प्लॅन केली होती. ट्रूडी आणि आम्ही तीन नवशिके त्या मिनी डाइव्हसाठी जाणार होतो. त्या डाइव्हमध्ये स्विमिंग पुलामध्ये शिकलेले सगळे सराव पुन्हा एकदा किनार्‍याजवळ समुद्राच्या उथळ भगातील पाण्यात केले आणि मुख्य डाइव्हला जाण्यासाठी आम्ही तयार झालो.

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रूडी आणि रिसॉर्टचा लोकल गाइड यांनी सर्वांचं ब्रीफिंग केलं. त्या ब्रीफिंगमध्ये डाइव्ह करताना वापरायच्या सांकेतिक खुणा समजावून सांगण्यात आल्या. त्यानंतर आमच्या पहिल्या डाइव्हचा मार्ग समजावून सांगितला. त्या डाइव्हमध्ये कोणत्या प्रकारचे मासे, कोणत्या प्रकारचे समुद्री जीव, वनस्पती आणि कोणत्या प्रकारचे प्रवाळ बघायला मिळतील याची कल्पना देण्यात आली. वेळेचं काटेकोर पालन करत, टाकीमधला ऑक्सिजन पूर्ण डाइव्हसाठी कसा पुरून उरेल ह्यानुसार डाइव्ह मार्गाचं प्लॅनिंग केलं गेलं होतं. रिक्रिएशनल डायव्हिंग हा एकटा-दुकट्याने करण्याचा खेळ-प्रकार नाहीये. हा ग्रूपमध्ये करण्याचा आणि एकमेकांच्या परस्पर सहकार्याने करण्याचा खेळ-प्रकार आहे. मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, बीसीडी (Buoyancy compensator), डाइव्ह कॉम्प्युटर आणि पायात लांबलचक फीन्स हा सगळा लवाजमा सांभाळत, वेळेचे भान आणि टाकीतल्या ऑक्सिजनचं प्रमाण यांचं गणित करत समुद्रतळाचं जादुई विश्व अनुभवायचं ही एक तारेवरची कसरत असते. त्यासाठी परस्पर सहकार्याची नितांत गरज असते डाइव्ह करताना. त्यासाठी प्रत्येक डाइव्हरला चमूतील एक डाइव्हर, बडी-डाइव्हर (भिडू) म्हणून निवडायचा असतो. आमची पहिलीच वेळ असल्याने ब्रीफिंगनंतर आम्हाला आमचा बडी-डाइव्हर सांगण्यात आला, जो ट्रूडीने ठरवला होता. आमच्या चमूबरोबर असणाऱ्या अनुभवी डाइव्हर्सचा आम्हा नवशिक्यांना प्रचंड फायदा आणि मदत होणार होती

Buoyancy Control

ट्रूडीने शिट्टी वाजवली आणि आम्ही सगळे बोटीत स्थानापन्न झालो. बोटीत बसल्यानंतर माझा बडी आणि मी एकमेकांनी आमची सगळी उपकरणे व्यवस्थित आहेत आणि व्यवस्थित बांधली गेली आहेत याची चाचणी करून एकमेकांना ‘ओके सिग्नल’ दिला. पंधरा मिनिटांत बोट आमच्या डाइव्ह साइटला पोहोचली. ट्रूडीने सिग्नल देताच देवाचं नाव घेऊन मी पाण्यात उडी टाकली. निळ्याशार रंगाचं थंडगार पाणी अंगाला लागताच शरीर आणि मन दोन्हीही थरारून गेलं. सर्व डाइव्हर्स पाण्यात आल्यानंतर एक रिंगण करून ट्रूडीने सिग्नल दिल्यानंतर बीसीडीतली हवा सोडून देऊन आम्ही सगळे जण सागरतळाकडे जाऊ (बुडू) लागलो. पंधरा मीटरपर्यंत खोल आल्यानंतर बीसीडीमध्ये पुन्हा हवा भरून Buoyancy सांभाळत तरंगत राहायला सांगण्यात आलं. आजूबाजूला रंगीबिरंगी मासे घोळक्या-घोळक्याने फिरत होते. रंगीबेरंगी प्रवाळ वसाहती मन मोहून टाकत होत्या. पण आणखी खोल जायचं होतं, पुन्हा आणखीन खोल जाण्यास सुरू केलं. पंचवीस मीटर खोल पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे समुद्री जीव आवतीबोवती दिसू लागले.

खोल समुद्रातली गहन शांतता, आल्हाददायक थंडगार पाणी आणि समुद्राची हिरवट निळसर झाक या धीर-गंभीर वातावरणाचा परिणाम होऊन एक प्रकारची असीम शांतता अनुभवायला येत होती. शरीरातलं गात्र न् गात्र सैल (रिलॅक्स) झालं होतं. मनाच्या खूप खोलवर अगदी शांत-शांत वाटत होतं. सगळं एकदम संथ होऊन वेळ थांबून गेल्यासारखं वाटत होतं. इतक्यात माझं लक्ष एका माशाकडे गेलं. तो संथ लयीत त्याची शेपटी हालवत एका जागी निवांत थांबून होता. मी सगळे भान हरपून त्याच्याकडे बघत होतो. धीरगंभीर वातावरण, मनात दाटलेली असीम शांतता आणि संथपणे शेपटी हालवत निवांत असलेला तो मासा या सर्वांचा अंमल होऊन, एक भारावलेली अवस्था अनुभवली, एकदम ट्रान्समध्ये जाऊन निवांत आणि समाधिस्थ झालो होतो. हा अनुभव इतका भन्नाट आणि अलौकिक होता की तो तसा शब्दात व्यक्त करणं अशक्यच आहे. इतकी शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमात कतरीना कैफ डाइव्ह ट्रीपवरून आल्यानंतर हृतिकला म्हणते – ‘डाइव्हिंग इज लाईक मेडिटेशन!’. तो सिनेमा बघितला तेव्हा ती काय म्हणतेय त्याचा नेमका अर्थ कळला नव्हता किंवा त्यामागची भावना कळली नव्हती (आणि त्या वेळी मेडिटेशन म्हणजे काय हेही ठाऊक नव्हतं). पण त्या निवांत माशाकडे बघून जी मनाची अलौकिक अवस्था झाली होती, त्या वेळी तिच्या डायलॉगचा खरा अर्थ उमगला, अगदी खोलवर पोहोचला.

त्यानंतरच्या डाइव्ह्ज वेगवेगळ्या साइटवर झाल्या. फाईंडिंग निमो हा माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे. त्यात जे समुद्रातलं जादुई विश्व दाखवलं आहे, ते सगळं ह्या साइट्सवर बघायला मिळालं. वेगवेगळे रंगीबेरंगी मासे, शार्क, स्टिंग-रे, भलीमोठी समुद्री कासवं, माहित नसलले इतर अनेक समुद्री जीव, वनस्पती आणि वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या प्रवाळ वसाहती ह्या सर्वांचं एकत्रित एक अद्भुत विश्व आहे. हे अत्यंत सुंदर, मनमोहक आणि मंत्रमुग्ध करणारं आहे. हे सगळं अद्भुत विश्व प्रत्यक्ष अनुभवायलाच हवंच!

डाइव्हिंग सर्टीफिकेट

MSAC मेंबरशीप

सिंधू में गोताखोर – स्वप्नपूर्ती

मी आणि मधू

आशा भोसले – जीवेत शरद: शतम् 

आशा भोसले
(Image used from Internet – Wikipedia)

मिसरूड फुटण्याच्या काळात, सतरा अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर असताना बाजीगर सिनेमा बघण्याचा योग आला. नाही… नाही… शाहरुख खान बद्दल काही म्हणायचं नाहीयेय. त्या सिनेमामध्ये एक गाणं होतं, ‘किताबे बहुत सी पढी होगी तुमने, कही कोई चेहरा भी तुमने पढा है ‘. ते गाणं तेव्हा ऐकलं त्यावेळी त्या गायिकेचा धारदार आवाज काळीज चिरत खोलवर गेला. त्या आवाजाची इतकी भुरळ पडली होती की ते गाणे अक्षरशः लूपवर लावून ऐकत होतो. पण तो आवाज कोणाचा आहे हे त्यावेळी माहिती नव्हत कारण त्या वयात तोपर्यंत किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि के. एल. सैगल सोडून यांच्या पलीकडे संगीत जास्त ऐकलं नव्हत. (गाण / संगीत ऐकण्याची साधन तेव्हा परवडणारी नव्हती.) तेव्हा त्या गाण्याच्या गायिकेचा आवाज कोणाचा आहे हे माहिती नसल्याने साहजिकच कोणाचा आवाज आहे याचा शोध घेतला. तेव्हा तो आवाज आशा भोसले यांचा आहे असं कळलं! ते कळलं आणि चाटच पडलो कारण त्या वर्षी आशाबाईंचं वय साठ (६०) वर्ष होतं. सतरा – अठरा वर्षांच्या अल्लड तरुणीला तो साठ वर्षाच्या गायिकेचा आवाज चपखल बसला होता!

आशाबाईंचा आवाज आहे कळल्यावर झपाटून गेलो आणि त्यांच्या गाण्यांची शोधमोहीम हाती घेतली. आणि, त्या शोधमोहिमेत जे काही हाती लागलं त्याने आयुष्यच बदलून गेल. आशाबाईंच्या गाण्यांचा मग जो काही खजिना हाती लागला आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी अशी काही मनावर पडली त्यातून आजही बाहेर येता येत नाहीयेय. त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडून, त्यांचा फॅन होऊन, ‘लता ग्रेट की आशा’ ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, एक वेगळीच धुंदी होती त्यात त्या अल्लड वयामध्ये. आणि, त्या गाण्याच्या आवाजाच्या मोहिनी मुळे हे असले वाद कसे निरर्थक आणि पोकळ आहेत याची जाणीवही नसायची पण ते भारावलेपणच तितकं तीव्र होतं.आशाबाई – आर डी बर्मन, आशाबाई – ओ पी नय्यर, आशाबाई – कॅब्रे सॉंग्स, आशाबाई – मादक गाणी अशी अनेक समीकरण झाली होती. पण ह्या सगळ्या समीकरणांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आवाजावरची भक्ती उत्तरोत्तर वाढतच गेली.

मध्यंतरी कुठल्यातरी एका गाण्याच्या रियालिटी शोमध्ये त्या आणि सुनिधी चौहान दोघीही एकत्र होत्या. (सुनिधी चौहान ही माझी आताच्या काळातली आवडती गायिका) त्यावेळी आशाबाईंनी गायकाला (स्पर्धकाला) काहीतरी सल्ला दिला आणि खाण्यापिण्याची काळजी गेट आवाजाची निगा कशी राखायची या बद्दल काहीतरी सांगत होत्या. त्या वेळेस सुनिधीने, “मी तर चॉकलेट, आइसक्रीम मनमुराद खाते,जीवन मुक्त जगलं पाहिजे” असल्या टायपाची काहीतरी अल्लड विधान करून आशाताईंना प्रतिवाद करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खरंच हसूआलं, ज्या वयामध्ये आशाबाई तिच्या समोर बसून त्यांच्या आवाजाच्या ताकदीने स्टेजला आग लावता होत्या त्या पुढे अशी काहीतरी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचा कळस होता. असो! अशा या हरहुन्नरी गायिका, आशाबाई आज वयाच्या 88 व्या वर्षी वर्षात पदार्पण करत आहेत.

त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आर्ट ऑफ डाइंग – मृत्यूवर प्रेम करण्याची कला

मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०२० मध्ये पूर्वप्रकाशित

आहार, निद्रा, मैथुन आणि भय ह्या आदिम संवेदनांपैकी भय ही संवेदना सजीवाला त्याच्या अस्तित्व रक्षणासाठी प्राप्त झालेली प्रेरणा आहे. ह्या भयाच्या संवेदनेमुळे सजीव, जीवाला होऊ घातलेला धोका समजू शकतो आणि जीवनप्रवाह अपघाती संपण्यापासून जीवाचे रक्षण करू शकतो. हे अतिशय नैसर्गिक आहे, जीवनप्रवाह चालू राहण्यासाठी  होणारी नैसर्गिक प्रेरणा.

उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक टप्प्यात जेव्हा जीवामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचं अस्तित्व नव्हतं तेव्हा जीव आपलं नियत कर्म करून अनंतात विलीन होऊन जायचा, खऱ्या अर्थाने. (म्हणजे जन्म मृत्यूचा फेऱ्यात न अडकता, हे फक्त ह्या संकल्पनेवर विश्वास असणाऱ्यांसाठी, बाकीच्यांनी सोडून द्यावे). पण पुढे उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यात मन, बुद्धी आणि अहंकार ह्यांचा विकास होऊन ही इंद्रियं अस्तित्वात आली. अहंकारामुळे अस्तित्वाच्या मी-पणाची भावना अस्तित्वात आली तर मन, बुद्धी इंद्रियांमुळे कर्म-संस्कार अस्तित्वात आले. अहंकारामुळे ‘अहं ब्रह्मास्मी’ ह्या जाणिवेशी फारकत होऊन अस्तित्वाच्या मोहाच्या पडद्यामुळे मी म्हणजे शरीर ही भावना प्रबळ झाली. ज्या क्षणी ही भावना प्रबळ झाली त्याच क्षणी त्या शरीराच्या अस्तित्वाच्या नष्ट होण्याच्या भितीची भावना प्रबळ झाली आणि तिचा कर्म-संस्कार झाला (म्हणजेच जन्म मृत्यूचा फेरा सुरू झाला).  

सजीवांपैकी मनुष्यप्राणी जसा जसा उत्क्रांत होत गेला तसा तसा त्याच्यातील बुद्धीचा विकास वेगाने होत गेला. संकल्प-विकल्पात्मक मनाने ह्या विकसित बुद्धीच्या साहाय्याने भय ह्या नैसर्गिक संवेदनेचा (प्रेरणेचा) विस्तार करून अहंकाराच्या मदतीने आदिम भीतीला अनेक आयाम दिले. माणसाने भौतिक प्रगतीत जशी जशी घोडदौड सुरू केली तशी तशी वेगवेगळ्या भयाचे आविष्कार (PHOBIA) अस्तित्वात येत गेले. भयाचे हे अनेक प्रकार असले आणि आपल्या मनात सदैव भीती वास करीत असली तरी,  मनुष्याला सगळ्यात जास्त भय जर कुठल्या गोष्टीचे वाटत असेल तर ते मृत्यूचे.

जन्माला  येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास जीवाच्या हातात नसतो. त्या दोन श्वासावर त्याची हुकुमत किंवा सत्ता चालत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर काय? ह्या अस्तित्वाच्या अज्ञाताच्या भयाने मृत्यूचा धसका बसलेला असतो. ह्या भीतीमुळेच मृत्यू ह्या घटनेचे महत्त्व जीवाला कळलेलं नव्हतं. परंतु बुद्धीच्या प्रगल्भतेमुळे मनुष्याला “कोsहं” हा प्रश्न पडला आणि त्याने त्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. अनेक थोर साधकांनी, अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी, बुद्धावस्था प्राप्त करून घेऊन जन्म-मृत्यूचे रहस्य उलगडवले. मी म्हणजेच शरीर हा जो मोहाचा पडदा पडला होता तो दूर करून आपण म्हणजे देह नाही ह्या सत्याचा छडा लावला. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसतो पण त्या दोन श्वासांच्या दरम्यानचे सगळे श्वास मात्र आपल्या हातात असल्याने त्या सर्व श्वासांना आपल्या  नियंत्रणात ठेवून जीवन समृद्ध करत जीवन जगण्याची कला (आर्ट ऑफ लिविंग) विकसीत केली. आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व बुद्धांनी आणि अरिहंतांनी विविध साधनामार्ग शोधून त्या मार्गांनी मोक्षप्राप्तीचा (कर्म-संस्कार निर्मूलनाचा) पर्याय उपलब्ध करून दिला. फक्त वैराग्य मार्गानेच नव्हे तर प्रपंचात राहूनही मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवून दिला. पण फक्त जगण्याची कलाच महत्त्वाची नाही  तर त्याच बरोबर ‘मृत्यूची कला’ (आर्ट ऑफ डाइंग) ही तितकीच महत्त्वाची आहे हेही त्यांनी समजावून दिले आहे, फक्त दर्शनमार्गानेच नव्हे तर योगमार्गानेदेखील. पण ही मृत्यूवर प्रेम करायला लावणारी ‘मृत्यूची कला’ समजण्यापूर्वी जन्म आणि मृत्यू ह्या घटना समजणे महत्त्वाचे आहे.

जीवनप्रवाह हा ऊर्जेचा एक अखंड प्रवाह आहे. ही ऊर्जा म्हणजेच चैतन्य, परब्रह्म! ऊर्जा एका आकारातून दुसऱ्या आकारात साकार होत सतत प्रवाही असते. आकार निर्माण होणे आणि नष्ट होणे ही अटळ वारंवारता आहे कारण नित्य काही नाही, सर्व साकार सृष्टी अनित्य आहे. जन्म ही घटना, ऊर्जेचे एक जीर्ण आकार सोडून नवीन आकारात साकार होणे आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच आणि जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहेच!

जन्म  – अविरत आणि अखंड विचारप्रवाह, त्यानुसार शरीरावर निर्माण होणाऱ्या संवेदना  आणि त्या संवेदनांनुसार प्रतिक्षिप्त होणारे कर्मसंस्कार, हा घटनाक्रम पहिल्या श्वासापासून चालू होणे आणि हे सर्व प्री-प्रोग्राम्ड होऊन ‘ऑटो पायलट‘ मोड मध्ये काम सुरू होणे  हा जन्म. हेच जन्म झालेल्या सजीवाचे जीवन, ऊर्जेचे साकार रूप. अविरत आणि अखंड विचारप्रवाहामुळे निरनिराळे कर्मसंस्कार मनाच्या खोल डोहातून उफाळून वर, मनःपटलावर येत असतात आणि सजीव त्या कर्मसंस्कारांवर प्रतिक्षिप्त होत कर्मेंद्रियांद्वारे आयुष्यभर कर्म करत असतो.   

मृत्यू – ही अनेक जैविक घटनांपैकी फक्त एक जैविक घटना आहे. पण ती फार महत्त्वाची घटना आहे कारण फार महत्त्वाचे ऊर्जेचे संक्रमण ह्या घटनेतून होत असते (आणि पुढचा जन्म ह्या घटनेशी अत्यंत संलग्न असतो). वर सांगितलेल्या ऑटो-पायलट घटनाक्रमानुसार मृत्यू समोर आल्यावर ते मृत होईपर्यंत अनंत विचार मनःपटलावर उमटतात आणि त्या विचारांवर प्रतिक्षिप्त होत कर्म केल्याने कर्मसंस्कार घडतात (हेच कर्मसंस्कार पुढच्या जन्म ह्या घटनेवर प्रभाव टाकतात, संचिताच्या स्वरूपात). पण मृत्यूचे भय असल्याने त्यावेळी येणारे विचार हे त्याच भावनेने पछाडलेले असतात. सर्व काही निसटून जाणार ही भावना आणि त्यामुळे येणारी व्याकुळता ही मृत्यू ह्या अटळ घटनेला कष्टप्रद आणि वेदनादायी तर बनवतेच पण त्याच्याशी संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेलाही प्रभावित करते. त्यामुळे ऊर्जेचे संक्रमण पुढील कोणत्या आकारात आणि कसे साकार होणार हे मृत्युसमयी असलेल्या ऊर्जास्थितीवर (मन:स्थितीवर) अवलंबून असते. म्हणजेच मृत्युसमयी शांत चित्त असणे अतिशय महत्त्वाचे आहे!

जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना संलग्न असतात त्यामुळे ह्या दोन्ही घटना नैसर्गिकरीत्या होणे हे फार गरजेचे असते. कारण हे ऊर्जा संक्रमण असते. मृत्यू होतो जेव्हा जीर्ण शरीर (आकार) प्राण किंवा चैतन्य म्हणजेच ऊर्जा वाहून नेण्यास असमर्थ होते. तेव्हा अखंड प्रवाही असलेली ऊर्जा जीर्ण आकारातून नवीन सक्षम आकारात संक्रमित होते. हे नैसर्गिकपणे होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अपघाती, अनपेक्षित, अकस्मात, आत्महत्या असा अनैसर्गिक मृत्यू  योग्य नाही. अशा अनैसर्गिक मृत्यूच्यावेळी चित्त शांत नसल्याने त्यावेळी उफाळून येण्याऱ्या कर्मसंस्कारांवर नियंत्रण करता येत नाही आणि त्याचा प्रभाव ऊर्जा संक्रमणावर म्हणजेच पुढच्या संलग्न असलेल्या जन्म ह्या घटनेवर पडतो. म्हणजेच मृत्यू (ऊर्जा संक्रमण) हा नैसर्गिक असायला हवा. ह्यामुळेच धर्मग्रंथांमध्ये आत्महत्या हे पाप असं म्हटलं आहे. परंतु मोक्षप्राप्त सिद्ध योगपुरुषांनी (उदा. संत ज्ञानेश्वर) समाधी अवस्थेत जाऊन देह त्यागणं हे अनैसर्गिक नाही. कारण मोक्षप्राप्तीमुळे कर्म-संस्काराचे निर्मूलन झालेले असते आणि त्यामुळे त्या मुक्तावस्थेत ऊर्जा संक्रमणाची घटना घडताना पुढचा आकार (जन्म) नसतो, असतं ते फक्त अनंतात विलीन होणं.

‘आर्ट ऑफ डाइंग’ म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला त्यामुळेच फार महत्त्वाची आहे, मृत्युसमयी चित्त शांत ठेवण्यासाठी आणि मृत्यू नैसर्गिक होण्यासाठी. मरणावर प्रेम करायचे म्हणजे भौतिक जगात घडणाऱ्या अनेक अटळ घटनांपैकी मृत्यू हीदेखील एक अटळ घटना आहे हे समजून त्याला निर्विकार आणि निर्विचारपणे हसतमुख सामोरे जाणे आणि तो केव्हाही येऊ शकतो हे ध्यानात ठेवून त्यासाठी कोणत्याही क्षणी सज्ज असणे! पण अशी सज्जता असणे किंवा मृत्यूच्या असे प्रेमात असणे हे ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ इतके सोपे नसते. ‘आर्ट ऑफ डाइंग’ साठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ येणं फार गरजेच आहे.  कारण ह्या दोन्ही कला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकमेकीँना पूरक असलेल्या. त्यांच्यामुळेच मृत्यूच्या प्रेमात पडून त्याला सामोरे जाण्याची सज्जता करता येणं शक्य असतं. जीवन जगत असतानाच जन्म आणि मृत्यू यांची संलग्नता समजून मृत्यूवर प्रेम करण्याची कला शिकायची म्हणजे मग प्रत्यक्ष मृत्यू होताना त्याला सहजतेने सामोरे जाता येते.

पण हे साधायचे कसे? त्यासाठी काही मार्ग नाही का? इतक्या प्राचीन आणि सनातन तत्त्वज्ञानात ह्यावर काहीच उहापोह झाला नाहीयेय का? तर, आतापर्यंत होऊन गेलेल्या बुद्धांनी आणि ऋषिमुनींनी ह्यावर प्रचंड काम करून ठेवले आहे. गौतम बुद्धाची सारी शिकवण ही जीवनावर पर्यायाने मृत्यूवर प्रेम करायला  शिकवणारीच आहे. पंचशीलाचा आधार घेत ह्या त्रिसूत्रीचे अनुसरणं करणे हीच ‘आर्ट ऑफ डाइंग’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, दोन्ही. ह्यातला समाधी हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. ह्या समाधीअवस्थेतच देहातीत अवस्थेची अनुभूती येते. गौतम बुद्धाने शोधलेल्या आणि शिकवलेल्या विपश्यना ध्यानप्रक्रियेतली भंग ही अवस्था आणि  पातंजली योगसाधनेतली समाधी हाच टप्पा आहे. प्राणायामामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवून कुंभक ही अवस्था लावली जाते. अथक प्रयासाने हीच कुंभक अवस्था (श्वास आत किंवा बाहेर रोखणे) श्वासावर नियंत्रण करण्याची गरज न पडता नैसर्गिकरीत्या होते आणि तिचा कालावधी जितका जास्त तितकी देहातीत अवस्थेची अनुभूती प्रबळ होत जाते. त्या देहातीत अनुभूतीमुळे मी म्हणजेच शरीर ह्या प्रबळ भावनेतून सुटका होण्याचे ज्ञान मिळते. ह्या भावनेतून सुटका करून घ्यायची झालेली ही जाणीव आणि शेवटचा श्वास, ह्या दरम्यान विद्यार्थी आणि साधक बनून, अविरत ध्यानसाधना करत, समाधीअवस्थेचा सराव म्हणजेच ‘आर्ट ऑफ डाइंग’. हेच असते मनुष्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट, Purpose of life!

ह्या समाधी अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विचार/विकार मनःपटलावर येतात, त्या विचारांशी निगडित कर्म-संस्कार घेऊन. त्या कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची साधना करून त्यावर प्रभुत्व मिळवल्यास मृत्युसमयी शांत चित्त ठेवणे सहज शक्य होते. शरीर जीर्ण झाल्याने, शेवटचा श्वास घेऊन सोडताना, सर्व कर्म-संस्कारांच्या अंतिम आणि अफाट रेट्यामुळे शरीरातल्या ऊर्जेचे (चैतन्य किंवा प्राणाचे) संक्रमण होते, ही घटना म्हणजेच मृत्यू. त्यावेळी उफाळून येणारे  कर्म-संस्कार हा अनेकविध भावनांचा कल्लोळ असतो. त्या अनेकविध भावनांपैकी जी भावना प्रबळ असेल त्यानुसार शेवटचे कर्म घडून त्याच्या प्रभावाने ऊर्जा संक्रमणाचा पुढचा आकार (जन्म) ठरतो. पुनर्जन्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणाऱ्यांसाठी मृत्युसमयी होणाऱ्या अनेकविध भावनांचा कल्लोळ आटोक्यात ठेवणे इतकाच मुद्दा लक्षात घेतला तरीही चालेल.

समाधी अवस्थेत देहातीत शून्याची अनुभूती येते जी शेवटचा श्वास घेतला जातो तेव्हा होत असते. साधनेमुळे त्या अवस्थेची अनुभूती सरावाने मिळालेली असल्याने त्याला सामोरे जाताना  भांबावून आणि दडपून (Overwhelmed) न जाता  चित्त स्थिर राहते. तसेच साधनेमुळे कोणत्याही कर्म-संस्कारांवर प्रतिक्रिया न देण्याची, प्रतिक्षिप्त न होण्याची कला साधलेली असते. त्यामुळे मृत्युसमयी भयामुळे येणाऱ्या कर्म-संस्कारांवर तटस्थ राहता येऊन सर्व व्याकुळता टाळता येते. ही साधना आयुष्यभर करायची असते, अगदी शेवटाच्या श्वासापर्यंत. ही साधना म्हणजेच मृत्यूवर प्रेम करण्याची कला. ह्या प्रेमामुळेच मृत्यूला न घाबरता किंवा त्याच्यासाठी अधीर न होता, तो जेव्हा येईल तेव्हा त्याच्या कवेत अलगद सुपूर्द  करता येणे शक्य होऊन शांतपणे अनंतात विलीन होता येते.

ह्या मृत्यूवर प्रेम करण्याच्या कलेमुळेच (आर्ट ऑफ डाइंगमुळे) मृत्यू हा नकोशी घटना न होता त्या मृत्यूचा वैयक्तिक सोहळा साजरा करता येतो.

‘विपश्यना’ – ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग

मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या दिवाळी अंक २०१९ मध्ये पूर्वप्रकाशित

ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हे फारच ‘लोडेड’ वाक्य आहे; कारण ह्यात ध्यान, ज्ञान आणि मार्ग (विपश्यना) ह्या तीन वेगवेगळ्या संकल्पनांचा उल्लेख येतो. प्रत्येक संकल्पना हा एक मोठा अभ्यासाचा विषय असल्याने ह्या तिन्ही संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेतली की त्यांचा परस्पर संबंध, जो विपश्यनेचा गाभा आहे, त्याचे रसग्रहण करण्याचा ह्या लेखाचा मानस आहे.

सर्वात आधी ज्ञान म्हणजे नेमके काय ते बघू या…

शाळा-कॉलेजात शिकलेले, आजूबाजूच्या वातावरणात रममाण होऊन आत्मसात केलेले, स्वानुभवातून आलेले, असे अनेक प्रकारे मिळवलेले कौशल्य आणि माहिती, हे आपण ज्या भौतिक जगात वावरतो त्याबद्दलचे भौतिक ज्ञान झाले. ते ज्ञान आपल्याला रोजच्या जगात तग धरून राहण्यासाठी (Survival) गरजेच आणि तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. जडसृष्टीच्या ह्या ज्ञानाने धुंद होऊन आपण सगळे एका कैफात जगत असतो.

दृश्य भौतिक जगातल्या सर्व वस्तू ह्या जड (Solid) असतात, हा न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचा (Classical Physicsचा) पाया आहे. पदार्थ हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे ज्ञान Classical Physicsनुसार प्रमाणित झाले होते. ते पुढे क्वांटम फिजिक्सने आमूलाग्र बदलून टाकले. क्वांटम फिजिक्सच्या विविध थिअरींनुसार, सर्वात सूक्ष्म कण तरंगलहरी (Waves) असतात आणि ‘ऑब्झर्व्हर इफेक्ट’नुसार ते जड स्वरूपात प्रकट होतात, असा सिद्धान्त मांडला आहे. हे सर्व सूक्ष्मात जाणे कशासाठी? तर, हे विश्व कसे बनले आहे, आपण कसे बनलो आहोत, आपल्या अस्तित्वाच्या मागच्या कोणत्या शक्ती आहेत हे ज्ञान मिळवण्यासाठी! पण हे सगळे बाह्य, जड आणि दृश्य प्रकाराने मिळवलेले ज्ञान फक्त अस्तित्वाचा मागोवा घेणार आहे आणि अस्तित्वाच्या भौतिक सुखासाठीच आहे. अफाट वेगाने भौतिक प्रगती करूनही, भौतिक ज्ञानात भर पडूनही मनुष्यप्राण्याच्या आयुष्यातले दु:ख संपले का? तो समाधानी झाला का? त्याचे विकार संपले का? तर नाही, उलटपक्षी तो अधिक महत्त्वाकांक्षी होऊन अधिकाधिक विकारक्षम झाला आणि नेणिवेत जगू लागलाय.

मनुष्य, अज्ञानामुळे (Ignoranceमुळे) इंद्रियसुखांच्या मागे लागून, ‘इंद्रियसुख’ हेच अंतिम सत्य मानून बसला आहे. त्यासाठी भौतिकज्ञानाला म्हणजेच प्रत्यक्ष किंवा दृश्य ज्ञानालाच विज्ञान समजून तो सुखलोलुप होण्यात धन्यता मानतो आहे.

ज्ञानं तेसहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः
यज्ज्ञात्वा नेह भूयोसन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते

भगवतगीतेतल्या ह्या श्लोकात (७.२) कृष्ण सांगतो – ज्ञान दोन प्रकारचे आहे, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. आपण ज्याला विज्ञान (Science) समजून बसलो आहोत ते प्रत्यक्षात आहे प्राकृत जगताचे ज्ञान (प्रत्यक्ष ज्ञान). कृष्ण ज्याला दिव्य ज्ञान म्हणतो आहे हे आहे खरे विज्ञान, जाणिवेचे (Consciousnessचे) आकलन. हे विज्ञान म्हणजेच, जडावस्थेच्या (gross reality) पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली (subtle reality) अनुभूती घेत जाणिवेचे (consciousness) होणारे ज्ञान!

आता प्रश्न पडेल की ह्या दिव्य ज्ञानाची (विज्ञान) गरजच काय? भौतिक जगात सुखसोयीयुक्त (Luxurious) आयुष्य मजेत चालले आले की! त्या सुखाबरोबर दु:खही असतेच आणि त्यामुळे येणारे चढउतार मान्य करूनच आयुष्याचा गाडा मजेत चालू आहे. काय गरज आहे ह्या असल्या सूक्ष्मावस्थेची आणि जाणिवेची? प्रश्न रास्त आहे. जन्म झाल्यापासून ते आताच्या क्षणापर्यंत आपल्या जगण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे, तो शरीर आणि मन ह्यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असतो. आपण सतत बाह्य जगाकडून, ५ इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या संदेशांवर प्रतिक्रिया देत असतो. आणि हे इतके यंत्रवत झालेले असते की आपण आपल्या नकळत रीअ‍ॅक्ट होत असतो, निरंतर. आपल्या रोजच्या अनुभवांमधून आपण आपला जगण्याचा पॅटर्न सतत सुधारत, अधिकाधिक साचेबद्ध, ठरावीक आणि यांत्रिक करत असतो, आपल्या नकळत. हे सगळे अतिशय सूक्ष्म पातळीवर चाललेले असते, अविरत.

पण आयुष्यात एखादी वेळ अशी येते की त्या परिस्थितीला कसे हाताळायचे हे ज्ञान आपल्याकडे नसते. त्या वेळी मनुष्य उन्मळून पडतो, उद्ध्वस्त होतो. बरेच जण म्हणतील की अशी परिस्थिती फक्त कमकुवत मनाच्या लोकांबाबत होऊ शकते, कणखर मनाचे लोक कुठलीही परिस्थिती हाताळू शकतात. हा आत्मविश्वास आतापर्यंतच्या आयुष्यातल्या अनुभवांवरून आलेला असतो. पण वृद्धावस्था, मोठे आजारपण किंवा मृत्यूची चाहूल ह्या आत्मविश्वासाला तडे देते, कारण ह्या परिस्थितींचा अनुभव नसतो आणि सूक्ष्म पातळीवर मन आणि शरीर ह्यांच्या परस्पर संबंधाच्या शास्त्राचे ज्ञान नसते आणि तेव्हा दु:खाशी सामना होतो, जो आतापर्यंत झालेला नसतो.

तर, मन आणि शरीर म्हणजेच आपण की आपण ह्या मन आणि शरीरापासून वेगळे आहोत? जर वेगळे आहोत, तर मग आपण म्हणजे नेमके कोण? आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? आणि अंतिम सत्य काय? हे जाणिवेच्या सूक्ष्म (विज्ञान) पातळीवरून समजून घेणे म्हणजे ज्ञान.

आता ध्यान म्हणजे काय ते बघू या.

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः।।

भगवद्गीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.७) कृष्ण सांगतो की ज्याने मन जिंकले आहे, त्याला शांती प्राप्त झाली आहे. अशा मनुष्यासाठी सुख-दु:ख, मान-अपमान, शीत-उष्ण हे समान असतात आणि तो मनुष्य कोणत्याही स्थितीत शांतच असतो.

ते मन का जिंकायचे आणि कसे जिंकायचे, त्याआधी हे मन म्हणजे काय आणि कसे काम करते हे समजून घ्यावे लागेल.

मज्जातंतुशास्त्राच्या सिद्धान्तांनुसार मानवी मेंदूची कार्यपद्धती, बाह्य जगतातून मिळालेल्या कुठल्याही संदेशाला ‘उपलब्ध माहितीच्या आधारे प्रतिक्षिप्त होणे (react)’ अशी असते. ही उपलब्ध माहिती आपण जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत, पाच इंद्रियांच्या – कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा यांच्या साहाय्याने बाह्य जगतातून मिळवलेली असते. पंचेंद्रिये त्यांच्या कार्यपरिप्रेक्ष्यातल्या, बाह्य जगतातल्या प्रत्येक जड आणि सूक्ष्म गोष्टींच्या नोंदी घेत असतात आणि मेंदूतल्या स्मृतिकोशांमधे साठवून ठेवत असतात, चोवीस तास,अविरत. आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, घटना, घटनास्थळे, घटनांच्या वेळा, त्या त्या वेळी त्या त्या व्यक्ती आणि घटनांवर व्यक्त केलेल्या / झालेल्या भावना, क्रिया-प्रतिक्रिया ह्या सगळ्या गोष्टी ‘स्मृती’ म्हणून स्मृतिकोशांमध्ये साठवल्या जातात.. बिग डेटाच म्हणा ना! ह्या व्यक्ती, ठिकाण, भौतिक वस्तू आणि वेळ ह्या संदर्भातल्या अनुभूती ज्या आपल्या स्मृती बनल्या आहेत, त्या आपले व्यक्तिमत्त्व ठरवतात, वर्तणूक ठरवतात. रोज रोज आपण त्याच-त्याच व्यक्तींच्या संपर्कात येतो, उदा. नातेवाईक, बॉस, सहकर्मी, मित्र, शेजारी, वगैरे; त्याच त्याच वस्तू हाताळतो, उदा., टूथब्रश, टॉवेल, कार, कपडे, बूट, वगैरे; त्याच त्याच ठिकाणी जातो, उदा., ऑफिस, कॉफीशॉप, बाग, देऊळ, थिएटर, बार, रेस्तराँ, वगैरे; त्याच त्याच गोष्टी करतो, उदा., ऑफिसमध्ये पाट्या टाकणे, फेसबुकवर मतांच्या पिंका टाकत बसणे, बिचिंग करणे, कुचाळक्या करणे, जप करणे, मंत्र म्हणणे, भजन करणे, वगैरे. हे होताना, आपल्या मनात विविध भावना निर्माण होतात आणि त्याही स्मृतिकोशांमधे साठवल्या जातात. ह्या स्मृतींशी निगडित भावनांवर आरूढ होऊन अंतःपटलावर सतत उगम पावणारे विविध विचार हेच आपले मन.

आता कल्पना करा, एखादा खडूस सहकर्मी तुम्हाला अजिबात आवडत नाही, कारण तुम्हालाही स्पष्ट सांगता येत नाही, पण तो तुम्हाला आवडत नाही. तो समोर आला की तुम्ही त्याच्याशी नजरानजर टाळता. हे सगळे स्मृतिकोशांमधे साठवलेले आहे. एके दिवशी ऑफिसामध्ये तुम्ही एक आवाज ऐकता, कान तो आवाज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवतात. तिथे तो आवाज ओळखला जातो आणि स्मृतिकोशातून त्या आवाजाचा मालक तुमचा खडूस सहकर्मी आहे हे कळते. आता लगेच त्याच्याविषयी असणाऱ्या भावनांचे मज्जातंतूचे जाळे (neural network) उद्दीपित होऊन त्या भावना शरीरभर पसरतात. हे झाल्या झाल्या तुमचे मन प्रतिक्षिप्त क्रिया करते आणि तुमचा चेहऱ्यावर नाराजी झळकू लागते. त्याच्याबद्दलच्या जुन्या आठवणी विचारांच्या स्वरूपात अंतःपटलावर उमटू लागतात, ज्या कटू असतात. ह्या विचारांमुळे उद्दीपित झालेल्या भावना आणखी तीव्र होऊ लागतात. त्या आवाजाची कुजबुज अजूनही चालूच आहे. कान ती कुजबुज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवत राहतात आणि विचार येत राहणे आणि भावना उद्दीपित होत राहणे हे दुष्टचक्र चालू राहते. हे इतक्या प्रचंड वेगात होत असते की हे होतेय ही जाणीवच आपल्याला नसते. मग भावनेचा प्रचंड उद्रेक होऊन तुम्ही आवाजाच्या दिशेने जाऊन, “शांत बसा!” असे जोरात ओरडता. पण ओरडून झाल्यावर तुमच्या लक्षात येते की तो तुमचा खडूस सहकर्मी नसतोच मुळी, नवीनच रुजू झालेला एक नवीन कर्मचारी असतो. नवीन असल्यामुळे तो हळू आवाजात बोलत असतो.

ह्या उदाहरणावरून लक्षात येते की पंचेंद्रियांकडून मिळणाऱ्या बाह्य जगतातील उत्तेजना (stimuli) आपल्या मनाचा ताबा घेतात आणि मन यांत्रिकपणे जुन्या स्मृतींच्या आधारे शरीराकडून प्रतिक्षिप्त क्रिया करून घेत, आपल्या नकळत. वरच्या उदाहरणात नेमका प्रॉब्लेम कुठे सुरू झाला? स्मृतिकोशातील मज्जातंतूंच्या जाळ्यातून मिळालेल्या माहितीवरून तर्कबुद्धी जेव्हा त्या आवाजाचा मालक खडूस सहकर्मी आहे हे ठरवते तेव्हा? नाही, मनाला अजूनही प्रतिक्षिप्त व्हायला अजूनही उत्तेजना (stimuli) मिळाली नाहीये. पण ज्या क्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याच क्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरतात. ह्या संवेदनाच ओरडण्याची प्रतिक्षिप्त क्रिया होण्यास कारणीभूत असतात, कारण मन फक्त आणि फक्त संवेदनांवरच प्रतिक्षिप्त होतं.

images-2

ह्या संवेदना बारा महिने चोवीस तास शरीरभर लहरत असतात. मन अविरत ह्या संवेदना वाचत असते आणि त्यांच्यावर प्रतिक्षिप्त क्रिया करत असते. हे होत असते, कारण आपण जाणिवेत नसतो. मोहाचा (ignoranceचा) पडदा पडल्यामुळे आपण नेणिवेत गेलेलो असतो आणि बाह्य जगातील घडामोडींमुळे उद्दीपित होऊन, मनाचा तोल जाऊन, मन शरीराकडून ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ करून घेत राहते, आपल्या नकळत.

मनाचे दोन भाग असतात. पंचेंद्रियांकडून माहिती मिळवत राहून ती मेंदूतल्या ज्ञानकेंद्रांकडे प्रोसेसिंगसाठी पाठवत राहणे हे काम करणारे मन ‘चेतन मन’ असते. त्या माहितीचे ज्ञानकेंद्रात प्रोसेसिंग करून प्रतिक्षिप्त क्रिया घडवून आणण्याचे काम करणारा भाग ‘अचेतन मन’. हे अचेतन मन १२ महिने २४ X ७ कार्यरत असते, अगदी आपण झोपेत असतानाही. आपल्या वर्तणुकीला हेच अचेतन मन जबाबदार असते आणि संवेदनांवर प्रतिक्षिप्त होत असते . ह्या अचेतन मनाचा तोल ढळू न देणे आणि हे मन जे ‘आपल्या’ नकळत प्रतिक्षिप्त क्रिया करून घेतेय ते ‘आपण’ म्हणजे कोण? हेच ज्ञान मिळविण्यासाठी ध्यान करायचे.

ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाला ताब्यात ठेवून, प्रतिक्षिप्त क्रिया करू देण्याऐवजी, जाणिवेत ठेवून, ‘सुनियंत्रित क्रिया’ करायला शिकवायचे. ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाचे ‘रिप्रोग्रामिंग’ करायचे. हे ध्यान करणं अतिशय शास्त्रआधारित तंत्र आहे. ह्यात काहीही धार्मिक नाही, संप्रदायी नाही, दैवी नाही किंवा स्पिरीच्युअल नाही. ध्यान करणं आध्यात्मिक जरूर आहे कारण अध्यात्म म्हणजे स्वतःचं तटस्थ निरीक्षण, ह्यात आत्मा वगैरे काही नाही. मन आणि शरीर यांच्या परस्परसंबंधांचे शास्त्र अनुभवण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान!

आता ज्ञान आणि ध्यान म्हणजे काय हे कळल्यावर ध्यानाचा मार्ग, विपश्यनेकडे वळूयात…

आपलं मन चंचल असतं, ते शरीरावरील संवेदना पकडून, स्मृतीकोशांतील आठवणी काढून भूतकाळात रमलेलं असतं नाहीतर भविष्यातलं स्वप्नरंजन करण्यात मग्न असतं. नीट विचार करून बघा, मन वर्तमानात रमत नाही. ते वर्तमानात थांबायलाच तयार नसतं. जर मनाच रिप्रोग्रामिंग करायचं तर मन ताब्यात आणून त्याला वर्तमानात स्थिर करणं ही पहिली आणि गरजेची पायरी आहे. जर बाह्य संदेश मिळत राहिले तर मन आपला चंचल राहण्याचा धर्म पूर्ण करत राहणार म्हणजे हे बाह्य संदेश थांबावयाला हवेत. इथून थियरी संपून प्रॅक्टिकल (मार्गक्रमण) सुरू होते.

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: |
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ||

भगवतगीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.१३) सांगितलेल्या स्थितीत शरीर, मान आणि डोके उभ्या सरळ रेषेत धरून डोळे बंद करून मांडी घालून स्थिर बसायचे. डोळे बंद केल्यास आपण बाह्य जगताशी संबंध तोडू शकतो आणि अंतर्मुख होण्याची ती पहिली पायरी आहे. त्यानंतर मन एकाग्र करून त्याला वर्तमानात थांबून ठेवल्यास ते शांत होऊ लागत. जितकी मनाची एकाग्रता जास्त तितके ते अधिकाधिक शांत होत जाते. मनाला सतत काहीतरी काम लागत ते स्वस्थ बसत नाही. पण आता बाहेरचे मन उद्दीपित करणारे संदेश येणं बंद झालंय आणि मन वर्तमानात स्थिर झालंय, ही झाली समाधीवस्था. ह्या अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विकार बाहेर येतात, विचारांच्या रूपात आणि ते विचार शरीरावर संवेदना पसरवतात. बस्स, मनाला ह्या संवेदनाच हव्या असतात, त्याचं ‘प्रतिक्षिप्त होणं’ हा जन्मसिद्ध अधिकार बजावायला. पण इथेच आपल्याला रिप्रोग्रमिंग करायचेय मनाचे. शरीरावर होणाऱ्या संवेदनांचं तटस्थपणे फक्त निरीक्षण करायचं, अजिबात रीअ‍ॅक्ट न होता.

संवेदनाचं तटस्थ निरीक्षण म्हणजे काय? आपण परत वरचं उदाहरण बघूया. ज्याक्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याक्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरल्या होत्या. म्हणजे नेमकं काय झालं होतं? सर्वप्रथम श्वासाची लय बदलते, नॉर्मल लयीतला श्वास जड होतो. त्यानंतर हाताच्या तळव्यांना कंप सुटतो, चेहऱ्याचं एकंदरीत तापमान वाढतं, जशा भावना तीव्र होत जातात तसं शरीरभर कंप जाणवू लागतो. ह्या साऱ्या संवेदना आहेत. हे जर त्यावेळी कळलं असतं आणि त्यावेळी जर श्वासावर आणि शरीरभर पसरत असलेल्या संवेदनांवर जर लक्ष केंद्रित केलं असतं तर जाणिवेत राहता येऊन जी प्रतिक्षिप्त क्रिया केली गेली, ती न होता, परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.

मनाची एकाग्रता आणि संवेदनांचे तटस्थ निरीक्षण हाच विपश्यना ध्यानप्रक्रियेचा गाभा आहे. विपश्यना शब्दाची फोड वि + पश्यना अशी आहे. पश्यना म्हणजे पाहणे आणि विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने पाहणे. थोडक्यात स्वतःच्या आत डोकावणे!

विपश्यना ध्यानपद्धतीच्या पहिल्या टप्प्यात (आनपान सती) केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव केला जातो. श्वासावर मन एकाग्र करून समाधीवस्था प्राप्त करायची असते. ही तीव्र एकाग्रता किंवा समाधीवस्था पुढच्या टप्प्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!

images-3

ह्या प्रवासात संवेदनांवर प्रतिक्षिप्त न होणं हेच असतं मनाचं रिप्रोग्रमींग! जितक्या नियमितपणे विपश्यना साधना केली जाते, तितके मनाच्या खोल भागात दबून ठेवले गेलेले विकार विचारांच्या स्परूपात वर येऊन शरीरभर संवेदना पसरवतात. त्या संवेदनांवर रीअ‍ॅक्ट झाले नाही तर त्या संवेदना क्षीण होऊन विरून जातात आणि मनाची त्या विकारांपासून मुक्तता होते.

विपश्यनाध्यानाची निरंतर साधना हेच सर्व विकारांपासून मुक्त होण्याचे गुपित, म्हणजेच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग!

 

चावडीवरच्या गप्पा – AI / ML चा बागुलबुवा

chawadee

हा लेख मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या  श्रीगणेश लेखमाला २०१९ मधील ह्या लेखात पूर्वप्रकाशित!

चिंतामणी“सोशल मिडीयवर एक व्हिडीयो व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो लाखो नोकर्‍यांवर गदा येणार अस म्हटलय!” चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.

नारुतात्या“नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, ते ही एकदम सोशल मीडिया-बिडीया. हम्म, जोरात आहे गाडी!”, नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.

“नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो! “, घारुअण्णा तिरमिरीत.

“अहो चिंतोपंत, कसला व्हिडियो आणि काय आहे काय त्या व्हिडियोत एवढं व्हायरल होण्यासारखं?”, बारामतीकर.

“व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?”, नारुतात्या वेड पांघरत.

“नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे.”, चिंतोपंत.

“म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?”, बारामतीकर मोठा आ करत.

भुजबळकाका“बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी काम रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते! “, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.

“तितकं सोपं नाहीयेय ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत, खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही.”, चिंतोपंत.

“विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचे. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?”, घारुअण्णा घारुअण्णागरगरा डोळे फिरवत.

“घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं.”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनह्रदयसम्राट, असं कसं, चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडियोत काही तथ्य असेलच ना.”, घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.

चिंतोपंत“होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गुगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हे सुद्धा सांगतंय, आता बोला!”, चिंतोपंत.

“हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?”, घारुअण्णा चिंताग्रस्त होत.

“काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!”, इति बारामतीकर.

“अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसेच टेस्ट करण्यासाठी केला जातोय.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.

“काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!”, घारुअण्णा बावचळून जात.

भुजबळकाका“अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्या पादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाईक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वातक्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसऍप्स म्हणजे फोटो प्रोसेस करणारी ऍप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत.”, भुजबळकाका समजावून सांगत…

“आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खुपसारा विदा (डेटा), अक्षरशः: टेराबाईट्समध्ये, पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार. “, इति भुजबळकाका.

“अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!”, नारुतात्या ‘आजी म्या ब्रह्म पाहिले’ असा चेहरा करत.

“हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

चिंतोपंत“अहो, पण अमेरिकेततर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. ऍमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्टकरून, मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून, आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवण पण करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!”, चिंतामणी चिंताग्रस्त होत.

“साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्‍यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला.”, भुजबळकाका.

“म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल तो तरून बारामतीकर
जाईला हा अवघड काळ, काय बरोबर ना?”, बारामतीकर विचार करत.

“बारामतीकर, ते खरंच हो पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असच राहूनराहून वाटतंय!”, साशंक चिंतोपंत.

“म्हणजे त्या इंग्रजी सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रीक्ससिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका? “, घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत.

“अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!”, भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत.

“आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही अस नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?”, नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

सोकाजीनाना

“आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंग हे, काळाच्या ओघात होणार्‍या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावले आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला अजून बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचे आणि नोकर्‍यांचे नेमके काय आणि होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणे उचित ठरणार नाही. त्याची कास घरून पुढे जावेच लागेल. औद्योगिक क्रांती, इलेक्ट्रॉनिक्स आणि आलिकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगिकारावंच लागेल.

पण, ह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलीजंस मुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंग मुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या ‘जाणिवेत’ न राहता, आधिभौतिक तंत्रज्ञानच्या प्रगतीने येणार्‍या नेणीवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेच अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही ह्याची काळजी घेतली की झालं!”, सोकाजीनाना मंद हसत.

“पटतंय का? चला तर मग, आज चहा नको, बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी ते घ्या आणि तोंड गोड करा!”, सोकाजीनाना मिष्किलीने.

सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचे ताट फिरवू लागले.

सकाळचा सूर्यप्रकाश

शाळेच्या एका ग्रुपवर बर्‍याच टूम निघत असतात. एके दिवशी प्रशांत गोरे ह्या मित्राने एक फोटो शेअर करून टूम काढली की फोटोवरून काहीतरी हटके लिहा. त्याच्या कोकणातल्या आजोळच्या घराचा फोटो होता तो. कस काय कोण जाणे पण ते घर बघितल्यावर एकदम नारायण धारप आणि त्यांच्या रहस्यकथा आठवल्या. आणि, लक्षात आल की ह्या प्रकाराच काही लिहीले नाहीयेय. प्रयत्न करून बघितला, तो असा…


 

कोकणातल्या आजोळच्या घराचा फोटो

सूर्य कासराभर वर येऊन सगळा आसमंत लख्ख करून गेला. जांभ्याच्या चिरांच्या भक्कमपणावर ठाकलेल्या त्या घराचा परिसर उजळून गेला होता आणि प्रसन्न वातावरणाचा आभास निर्माण झाला होता. घराभोवतालच्या हिरवाईची आभा सकाळच्या उत्साही वातावरणाला द्विगुणीत करत होती.

रात्रीच्या अभद्र वातावरणाचा मागमूस कणभरही उरला नव्हता. रात्रीच्या काळोखात, आता प्रसन्न भासणारी, गडद हिरवाई ह्याच वातावरणाला गूढतेचं वलय देऊन भयंकर कोलाहल सामावून होती ह्यावर विश्वास बसणंच कठीण होत होतं.

सामसूम भासणाऱ्या पाउलवाटेवर रात्री कितीतरी पाशवी शक्तींचा उच्छाद चालला होता ह्यावर कोणाचाही विश्वास बसणं कठीण होतं. निवडूंगाच्या जाळीत, अतृप्त आत्म्यांची, रात्रभर चाललेली अघोरी धडपड एकंदर वातावरणाला भारून गेली होती त्याचा आता मागमूसही दिसत नव्हता.

सकाळचा सूर्यप्रकाशाचा सडा, सगळ्या अभद्रतेला तिलांजली देऊन, तेजोमय आणि मंगलमय दिवसाची सुरूवात करत होता!

मोठा फोटो

GHAR

माझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत

माझी शाळा, काशिदास घेलाभाई हायस्कूल, २०१७ मधे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने २३ एप्रिलला शाळेत एक भव्य सोहळा आयोजित केला होता. ७५ बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन हा सोहळा कसा भव्य करता येईल ह्याचे आयोजन करीत होते. सोहळा भव्य झाला. ह्या सोहळ्याचे ‘लाइव्ह टेलीकास्ट’ singetdigital.comह्या वेबसाइटवर केले होते.

ह्या सोहळ्यानिमित्ताने एक स्मरणिका काढण्याचे ठरले होते. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मनोगते मागवली होती. त्यासाठी माझे दिलेले मनोगत. 

अमृतमहोत्सवी वर्ष २०१७

काशिदास घेलाभाई हायस्कूल

“अरे ये ‘आयसोमेट्रिक व्ह्यू क्या होता है रे?”

“वो मराठे को पता होगा, उसको आता है| उसको तो ऑर्थोगोनल व्ह्यू भी आता है, टेक्निकल स्कूलसे है ना वो|”

हा भागूबाईला डिप्लोमाच्या पहिल्यावर्षी, ‘इंजिनीयरींग ड्रॉइंग’च्या तासाला नेहमी होणारा संवाद, काशीदास घेलाभाई हायस्कूलच्या अन्नपूर्णा अप्पाजी भट्टे तंत्रनिकेतनचा विद्यार्थी म्हणून छाती गर्वाने फुलवणारा असायचा. दर्जेदार, विलक्षण आणि हरहुन्नरी विद्यार्थी घडवणाऱ्या एका शाळेचा विद्यार्थी असल्याच्या अभिमान दाटून यावा असे कित्येक क्षण आयुष्यात आले आणि यापुढेही येत राहतील ह्याची खात्री काशीदास घेलाभाई हायस्कुलचा एक विद्यार्थी म्हणून मला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा काळ, ज्या वयात संस्कारांची रुजवात होऊन व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, तो असतो शालेय जीवनाचा. प्रत्येकासाठी त्यामुळेच, जिथे व्यक्तिमत्वाची मूलभूत रूपारेखा ठरली जाते, त्या शाळेच महत्व अनन्यसाधारण असतं. आपल्या सर्वांसाठी, म्हणूनच, काशीदास घेलाभाई हायस्कुल, तीच शाळा जी आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, ती आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतला एक महत्वाचा घटक आहे.

घरातल्या लाडावलेल्या आणि उबदार वातावरणात बागडत असलेल्या वयात, जेव्हा शाळा म्हणजे काय ते कळण्याची सुताराम शक्यता नव्हती त्या वयात माझी आणि आपल्या शाळेची बिगर इयत्तेत ओळख झाली. ज्युनियर केजी आणि सीनीयर केजीतल्या शिक्षीकांनी त्यावेळी घरच्या उबदार आरामाचा विसर पाडून शाळेबद्दल आत्मियता वाटावी इतका लळा लावून शाळेशी नाळ घट्ट करून टाकली. त्याच बिगरइयत्तेने आजतागायत जिवलग असणारे मित्र दिले, जे आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाले आहेत.

त्यानंतर प्राथमिक शाळेत मंदा राउतबाई, आठवलेबाई आणि दमायंती नाईकबाईनी चार वर्ष व्यापून टाकली होती. मायेचा जिव्हाळा लावून बालपण आनंददायी करण्यात यांचा मोठा हातभार होता. निबंध, वक्तृत्व ह्यांसारख्या इतर अनेक स्पर्धांमधे सहभागी व्हायला भाग पाडून आजच्या स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगात ताठ मानेने वावरण्याचा पायाच जणू काही त्यांनी घातला. चौथीत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाव नोंदवून, हुशार असल्याचा (नसलोतरीही) आव आणून आत्मविश्वासाने कसे वावरावे याची तयारीच जणूकाही करवून घेतली होती.

पहिलीत का दुसरीत असताना दोन मुलींच्यामधे एक मुलगा अशी बसण्याची व्यवस्ठा करून ‘आशेला’ लावण्यार्या ह्याच शाळेने पुढेपाचवी ते सातवी फक्त मुलांचे वर्ग ठरवून सगळ्या ‘रोमॅंटीक आशाआकांक्षांना’ सुरुंग लावण्याचे काम केले आणि ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा मंत्र देऊन, अभ्यास करून आयुष्यात ‘प्रकाश पाडण्यास’ प्रवृत्त केले. सहावीत वर्तकबाईनी हिंदी शिकवून राष्ट्रभाषेवर जे भाषिक अन्याय केले जातात ते करण्यापसून मलादूर ठेवले. सावेसरांनी नागरिकशास्त्र शिकवताना राज्यघटनेतील कलमं इतकी घोटून घेतली की तेव्हापासून राजकारणाचा धसकाच जो बसला तो आजतागायत तसाच आहे. सातवी अ मो राउतसरांनी व्यापून टाकली होती. ‘करडी शिस्त’ ह्याचा अर्थ सातवीत काय तो समजला. पण त्या करड्या शिस्तीमुळेच माझे हस्ताक्षर इतरांना वाचतायेण्या जोगे झाले. राउतसर काळाच्या पुढे होते. नदी समुद्राला जिथे मिळते त्याला नदीचे मुख म्हणतात, पण मुख का? तर नदी समुद्राला मिळते म्हणजे समुद्राचे चुंबन घेते म्हणून ते मुख हे अस समजावून देऊन त्या उमलत्या वयात प्रणयाचे भावाविश्वही मुक्त करून दिले.

आठवीत चुरीसरांनी घातलेल्या बीजगणिताच्या पायामुळेचआयुष्यातली किचकट गणितं सोडवता आली. सराफसर, चोरघेबाई, लता नाईकबाई यांनी मिळून सकलजनांना ‘शास्त्रोक्त’ करून सोडलं. कुलकर्णीसरांनी, चुरीसरांनी घातलेल्या पायावर भुमितीचा कळस चढवला. भूमितीतल्या सिद्धता सिद्ध करायाला शिकवता शिकवता आयुष्यात स्वत:ला सिद्ध करणंही तितकच महत्वाचं कसं हेही ते नकळत शिकवून गेले. मला भाषेशी खेळायला आवडण्याचे आणि भाषेची गोडी लागण्याचे कारणही कुलकर्णीसर! शाब्दिक कोट्या करण्याचं त्यांच कसब वादातीत होतं. आपल्यालाही हे जमलं पाहिजे हा ध्यास त्यांच्या मुळेच लागला आणि त्यासाठी साहित्य वाचनाचा नादही.

शाळेत नुसतं अभ्यास एके अभ्यास अस धोरण कधीच राबवलं गेलं नाही. एनसीसी, समाजसेवा, कार्यानुभव, स्काउट, गाइड असले इतर शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला होता. खेळाला असलेललं महत्व आपल्या शाळेचं वेगळेपण अधोरेखित करतं. विषेशत: खो खो आणि कबड्डी ह्या मैदानी खेळांना प्रधान्य देऊन एक चुरस निर्माण केली होती.

माझे वडील शाळेत शिक्षक असणं हे माझं सुदैव की दुर्दैव हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही. त्यांच आपल्याच शाळेत असणं एक वेगळ्याच प्रकारचं दडपण आणायचं माझ्यावर. मला खट्याळपणा(त्यावेळच्या भाषेत ‘राडे’) करायला जास्त जमायचं नाही. पण तरीही जसा जमेल तसा व्रात्यपणा मला माझ्या शाळेत करायला मिळालाच. दहावीला एक दिवस ‘मास बंक’ करणं असो की वर्गात हिंदुत्ववादी भडक सुविचार लिहीण असो. मुलींच्या दप्तरात मुलांची वह्या पुस्तकं अदलाबदल करणं असो की नावडत्या शिक्षकांच्या तासाला नेमकं काही निमित्त शोधून पळ काढणं असो, असले उपद्व्याप बरेच केले.

शालेयजीवनातली ती सोनेरी १२ वर्ष आणि आपली शाळा, आयुष्याचा एक मोठा कोपरा व्यापून आहे. आजही धकाधकीच्या आणि रूक्ष कोर्पोरेट विश्वात जेव्हा कामाचा ताण वाढून बेचैनी होते आणि विचित्र वाटून उदास व्यायला होतं; तेव्हा मी सर्व विसरून एकांतात, वाफाळता कॉफीचा कप हातात घेउन, ते सोनेरी दिवस आणि त्या रम्य आठवणी काढून भूतकाळात डोकावून येतो. ट्रस्टमी, १०-१५ मिनिटांत एकदम मूड फ्रेश होऊन, नवीन आव्हानं पेलायला मन पुन्हा एकदा सज्ज होतं.

आपली शाळा आता अमृतमहोत्सव साजरा करतेय, शतकोत्सवही साजरा करून शाळा चिरायू होईल असा सार्थ विश्वास मला आहे.

‘गो ईस्ट ऑर वेस्ट, के जी हायस्कूल इज द बेस्ट’! थ्री चीयर्स फॉर के जी हायस्कूल!!

– ब्रिजेश मराठे
१० वी ड, १८८९-९०

पुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य

Plagiarism किंवा वाड्‍ःमयचौर्य हा प्रकार ब्लॉगर जगतात ब्लॉगर्ससाठी काही नवीन नाही. त्यापासून सुरक्षा म्हणून कॉपीराईट सुविधा पुरविणाऱ्या बऱ्याच साईट्स पुढे आल्या. बहुतेककरून सर्व ब्लॉगर्स ह्या सुविधांचा वापर ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित करतात. मीही ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित केले आहेत.

पण नुकताच एक धक्का बसला. ‘पुढारी’सारख्या ख्यातनाम वर्तमानपत्राकडून माझ्या सैराटवरच्या लेखाचे वाड्‍ःमयचौर्य झाले. ‘बॅकसाईड स्टोरी’ ह्या सदरात माझा लेख जसाचा तसा प्रकाशित केला होता.  त्या लेखावर  एक प्रतिक्रिया टाकून  मी  निषेध नोंदवून ह्याबद्दल खुलासा मागवला. त्याचबरोबर संकेत पारधी ह्या मित्राने फेसाबुकवर पोस्ट टाकून हे वाड्‍ःमयचौर्य पब्लिकमध्ये उघड केले.

त्यावर पुढारी कडून त्या लिंकवर माझा नामनिर्देश करणारा खालील चित्रात दिसणारा बदल करण्यात आला. (त्यात वापरलेली मराठी भाषा अतिशय हास्यास्पद आहे)

IMG_4101[1]

तसेच पुढारीच्या वेबअडमीन कडून मेलद्वारेही खुलासा करण्यात आला.

Web Pudhari – webpudhari@pudhari.co.in via rediffmailpro.com
May 20

Dear Sir,
Got your mail regarding the article. This article was published in one of our print edition and so got carried on the website. We have informed this matter to the concern editor who is looking into the issue. Please give us some time to find out who submitted your article to us..
Pls send us your mobile number so that we can get in your touch…

असा अतिशय अश्लाध्य प्रकार पुढारीसारख्या दैनिकाकडून व्हावा हे खरोखर खेदजनक आहे. तसेच संपादकांनी कोणीही दिलेला मजकूर कसलीही शाहनिशा न करता प्रकाशित करावा  हेही निंद्य आहे!

पुढारीने माझा नामनिर्देश करून चूक कबूल केली आहे पण  त्याचा आनंद नाही कारण आता वर्तमानपत्रांचा  वाड्‍ःमयचौर्यरूपी काळ’ सोकावातोय…